ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५

रोहित

रात्रीचे ११ वाजलेत. मुंबई-गुजरात महामार्गावरून आमची गाडी सुसाट वेगाने डहाणूच्या दिशेने रस्ता कापत होती. इच्छितस्थळी पोचण्यास अजून किमान ४०-४५ मिनिटे लागणार होती आणि त्यात गाडीतल्या वायरलेसची खर-खर डोक्यात जात होती. मनात भीतीचे काहूर दाटले होते. काय होणार पुढे… काही काही कळत नव्हते. रस्त्यावर रहदारी तुरळक होती, पण प्रसन्नदा गाडी ८०-१०० च्या वेगाने दामटवत होते. आम्ही दोघेही शांत होतो. काय बोलावे सुचेनाच. मी सतत साईड मिररमधून मागे बघत होतो…कोणी पाठलाग तर करत नाही ना..कोणाला काही संशय वगैरे आला असेल का? मी सारखा त्याच विचाराने अस्वस्थ होतो. पोलिसांच्या गाडीत बसून ही भीती वाटणे म्हणजे खूपच विरोधाभासी होते….पण परिस्थिती तशीच होती. प्रसन्नदा अगदी शांतपणे गाडी चालवत होते. एक हात स्टेअरिंग व्हीलवर आणि दुसरा हात खिडकीत थोडा बाहेर निवांत विसावलेला. मागच्या सीटवर रोहित शांतपणे झोपला होता. त्याला ह्या धावपळीचा काहीच थांगपत्ता नव्हता, पण मी गेल्या १८-१९ तासात झालेले नाट्य मी कधीच विसरू शकत नव्हतो. एक-एक क्षण माझ्या डोळ्यासमोरून जात होता…

रोहित… वय वर्ष अंदाजे १४-१५. आमच्याच बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ्यावर त्याचे घर. तो आणि त्याचे आई-बाबा असे तिघे जण इथे राहायचे. म्हणजे आधी त्याचे आजी-आजोबा आणि काका हेही राहायचे इथे, पण घरातल्या अंतर्गत वादामुळे रोहितच्या आई-वडलांनी त्यांना घराबाहेर काढले. जेव्हा त्यांना घराबाहेर काढले, तेव्हा रोहित जेमतेम काही महिन्यांचा असेल. त्यामुळे आजी-आजोबा हयात असूनदेखील त्याला त्यांची माया लाभली नाही. आजूबाजूचे सगळे म्हणायचे, की ह्यांनी आपल्या आईबापाला असा त्रास दिला, म्हणून त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आता त्यात रोहितचा काय दोष म्हणा…लोकं काय दहा तोंडाने बोलत रहायची आणि त्याचे आई-बाबा ते निमूटपणे ऐकून घ्यायचे. रोहितबद्दल मोजक्या शब्दात सांगायचे तर…तो स्पेशल चाईल्ड होता. जन्मापासून तो असाच होता. खूप सारे उपचार त्याच्या आई-वडिलांनी केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याची शारीरिकदृष्ट्या वाढ होत गेली, पण तो मानसिकदृष्ट्या बालपणातच राहिला.

तो जेव्हा लहान होता… म्हणजे जेमतेम २-३ वर्षाचा तेव्हा आम्ही क्रिकेट खेळत असताना मध्येच यायचा…धावायचा बॉलच्या मागे.. सायकली ढकलून द्यायचा..लहान लहान दगड उचलून मारायचा आणि त्याचे आई-बाबा त्याच्या सतत मागे त्याला पकडायला धावायचे. त्यांची खूप दया येत असे…काय वाटतं असेल ह्यांना… कसं सांभाळत असतील ह्याला. हा तर ह्या वयात सांभाळता येत नाही…पुढे हा मोठा झाल्यावर काय होईल? असे विचार तात्पुरते यायचे आणि निघून जायचे. तसा आम्हाला तो जास्त भेटत नसे. त्याचे आई किंवा बाबा असले सोबत तरच तो आम्हाला दिसायचा. त्याचे बाबा एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीत कामाला होते आणि ते शिफ्टमध्ये काम करत. आईने ह्याची अशी अवस्था झालेली बघून घरीच राहणे पसंत केलेले होते. हळूहळू तो मोठा होत होता आणि त्याला संभाळणे अधिकाधिक कठीण होऊन बसले होते. त्याचे ते लठ्ठ शरीर..नेहमी काहीतरी शोधत फिरणारी नजर.. एका हाताचा होणारा विशिष्ट कंप आणि म्हाताऱ्या माणसासारखं हळूहळू चालणं आणि तोंडाने काहीतरी सतत पुटपुटत राहणे जे कधी समजलेच नाही. नेहमी सदरा वगैरे घालून असायचा तो. मध्येच अंगावर धावून यायचा. कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. त्याला त्यांच्या स्पेशल शाळेत सुद्धा भरती केले होते, पण तिथल्या शिक्षकांना त्याला सांभाळणे नीट जमले नसावे त्यामुळे त्याला मग काही वर्ष मी शाळेत जाताना बघितले नाही.

का कोण जाणे मला तर त्याची भयंकर भीती वाटायची… वाटते. तो कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. आता ह्यात त्याचा काय दोष… पण जे व्हायचे ते व्हायचेच त्याच्या नकळत. त्याची इच्छा असो वा नसो.. ह्या दरम्यान दोन-तीनदा असे प्रसंग घडले, की मला रोहित आसपास जरी दिसला, तरी मी थोडा अस्वस्थ होत असे. त्यातले काही प्रसंग सांगायचे, तर मी तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टमध्ये चढलो. ऑफिसला जाण्यासाठी मी एकदम फ्रेश मूडमध्ये निघालो होतो आणि लिफ्ट चौथ्या माळ्यावर गेली. तिथे रोहित आणि त्याची आई लिफ्टमध्ये चढले आणि माझी अस्वस्थता अचानक वाढली. तो माझ्याकडे बघत होता. मी त्याची नजर चुकवत होतो पण तो माझ्याकडे टक लावून बघत होता. आईने त्याचा एक हात पकडलेला होता. तो हळूच पुढे आला आणि माझ्यासमोर… अगदी समोर येऊन उभा राहिला. माझी अवस्था अजूनच वाईट.. कळत नव्हते काय होतंय… मी का घाबरतोय ह्याला… पण ह्याने काही केले तर… तशी लिफ्ट तळमजल्यावर पोचली आणि त्या १०-१२ सेकंदामध्ये मला दरदरून घाम फुटला….

एकदा असेच दिवाळीला माझ्या घरी सगळे मित्र फराळाला आले आणि फराळानंतर आम्ही सगळे बिल्डींगच्या आवारात उभे राहून गप्पा मारत उभे होतो. आम्ही ५-६ जण एका वर्तुळाकार आकारात उभे होतो. हा लिफ्टच्या दरवाज्यातून धावत आमच्याकडे आला आणि बरोबर आमच्यामध्ये येऊन उभा राहिला. सगळे हसत होते, पण माझी तंतरली होती. हा जर काही विचित्र वागला तर ह्याला आवरणार कसे. त्याचे बाबा मागून चालत येत होते आमच्याकडे. मी त्यांच्याकडे आशाभूत नजरेने बघत होतो, की त्यांनी त्याला घेऊन जावे. ते लांबूनच त्याला आवाज देत राहिले आणि मला इथे दरदरून घाम फुटला. मी एक-दोन पावले मागे गेलो आणि तो वसकन माझ्या अंगावर आला. नशीब त्याच्या बाबांनी त्याला वेळीच सावरले.

ह्या प्रकारानंतर मी रोहितची धास्तीच घेतली होती. त्याच्याबद्दल अनामिक भीती मनात कायम घर करून राहिली ती राहिलीच. तो परत शाळेत जाऊ लागला होता. दररोज संध्याकाळी त्याला एक गाडी सोडायला बिल्डींगच्या गेट खाली येत असे. मला वाटलं आता त्याची परिस्थिती नक्की सुधारेल आणि मग त्याच्याबद्दल विचार करणे थांबले…. पण हल्लीच

म्हणजे गेले काही महिने किंवा गेल्या एक-दीड वर्षापासून रोहितचा मोठ्याने रडण्याचा आवाज कानी पडणे हे नित्यनेमाचे झाले होते. आता आपण जाऊन काय बघणार का रडतोय हा.. काय झालं… ओरडले असतील आई-बाबा. तसा त्याचा आरडओरडा सुरु असायचाच, पण हल्ली तो खूपच वाढला होता. माझी आई तो असा ओरडायला लागला की घाबरायची. मला सांगायची जाऊन सांग त्यांना वगैरे वगैरे… मी त्या फंदात कधी पडलो नाही आणि दुर्लक्ष करत राहिलो. रोहितचे आई-बाबा वरवर तरी शांत वाटायचे, पण त्यांचे त्याला ओरडण्याचे, मारण्याचे आवाज कानी पडणे सुरु झाले होते. प्रकार खूपच हाताबाहेर जातंय असं वाटत होतं, पण आपण शेवटी त्रयस्थ. त्यांना समोरून काही बोलायला गेलो की, उगाच आपला पाणउतारा का करून घ्या…म्हणून काही बोललो नाही. बाबा सेक्रेटरी आहेत, त्यांना आईने सांगून बघितले… पण हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून विषय बंद केला.

धक्का तेव्हा बसला ज्या दिवशी बिल्डींगची वार्षिक सत्यनारायणाची पूजा होती.. रविवार असल्याने बिल्डींगच्या आवारात सगळेच जमले होते. रात्रीचे एक-दीड वाजला असेल. एक पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन हवालदार लगबगीने बिल्डींगमध्ये आले. आम्हाला वाटले आम्ही जास्त गोंधळ करत होतो की काय रात्रीचे, म्हणून कोणी तक्रार केली आमच्या विरुद्ध…. पण तसे काही नव्हते. त्यांनी बिल्डींगमधल्या दोन-तीन काकांना बोलावले आणि लिफ्टने वर निघून गेले. त्या दिवशी काय झालं हे कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी मला कळले की, समोरच्या बिल्डींगमधल्या एका रहिवाश्याने रात्री पोलिसांना फोन करून सांगितले, की चौथ्या माळ्यावर एक इसम एका मुलाचा गळा दाबायचा प्रयत्न करतोय. मला प्रचंड धक्का बसला हे ऐकून. रोहितचे बाबा आणि असं? काय झालं नक्की काही कळले नाही…. जेव्हा जेव्हा रोहित आणि त्याचे आई-बाबा एकत्र असत, तेव्हा तो त्याच्या बाबांना बिलगून चालायचा. त्यामुळे मला साहजिकच वाटले की, तो त्यांच्या जास्त जवळचा असेल पण काय माहित… ते जर असे वागले असतील त्याच्यासोबत तर….  😦

त्यानंतर काही दिवस रोहितला त्याची आई पार्ल्याला घेऊन गेली. काही आठवड्यांनी तो आला परत… मग तेच रडणे-ओरडणे सुरु झाले. दारावर जोरात हात आपटणे… खिडक्यांच्या काचा बडवणे. हल्ली हे प्रकार रोज आणि जास्त प्रमाणावर होऊ लागले. दुपारच्या वेळी तो रडायला लागला की तास-दीड तास तो थांबत नसे. त्याला एका बेडरूममध्ये बंद केले असायचे आणि ती बेडरूम नेमकी माझ्या बेडरूमच्या वर होती. त्यामुळे त्याच्या सगळ्या हालचाली.. त्याचे पाय आपटणे.. दारावर धक्के मारणे..ओरडणे.. खिडक्यांच्या काचांवर जोरजोरात मारणे सगळे सगळे स्पष्टपणे ऐकू यायचे आणि पुढच्या क्षणाला काच फुटल्याचा मोठा आवाज झाला. फ्रेंच पद्धतीच्या खिडक्या असल्याने त्याची एक-एक काच जवळजवळ ४-५ फुट किंवा त्याहून जास्त मोठी होती.

मी खिडकीतून खाली बघितले. समोर रस्त्यावर चालणारे सगळे थांबून वर हातवारे करून आमच्या बिल्डींगकडे बघत होते…मग त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला असावा आणि त्याला फरफटत बाथरूममध्ये नेले आणि तिथे त्याला मारत होते. मी तडक चौथ्या मजल्यावर जायला निघालो. त्यांच्या समोर राहणारे नाना आणि मी त्यांच्या घराची बेल मारत होतो, पण ती बंद होती. आम्ही दार वाजवून बघितले.. पण व्यर्थ. त्यांनी दार उघडले नाही. मी म्हटलं आत काय झालं असेल माहित नाही… पोलिसांना बोलवूया का वगैरे… नाना बोलले थांब जरा वेळ. मी नानांकडे बसलो. आम्ही दरवाजा उघडा ठेवला होता जेणेकरून रोहितच्या घरातून कोणी बाहेर येतंय का ते बघायला.

थोड्यावेळाने रोहित आणि रोहितचे बाबा बाहेर आले. रोहितच्या हाताला जखम झाली होती पण बाकी त्याच्या चेहऱ्यावर भाव तसेच होते. त्यात काही बदल झालेला नव्हता. तो शांत होता. अजिबात रडत नव्हता. आम्ही पुढे जाणार इतक्यात ते लिफ्टने खाली निघून गेले आणि मी घरी आलो.

त्यादिवशी झालेल्या प्रकारानंतर किमान दोन-तीनवेळा तरी हा प्रकार परत झालेला होता. इतक्या मोठ्या काचा त्याने हात मारून मारून तोडल्या होत्या. नानांना मी खुपदा विचारले होते की, आपण काही करू शकतो का ह्या बाबतीत. कोणी आहे का ओळखीचे जे ह्यात आपली मदत करतील. काही मार्गदर्शन करतील. दमबाजी करून हे प्रकरण संपणारे नव्हते आणि एकदा का हे प्रकरण हाताबाहेर गेलं तर खूप महाग पडू शकतं. रोहितला खूप जास्त काळजीची आणि चांगल्या शिक्षणाची गरज होती. नानांनी मला एक फोन नंबर दिला. पोलीस सब-इन्स्पेक्टर प्रसन्न नाईक. नानांच्या दूरच्या नातेवाईकांपैकी एक. त्यांची ड्युटी ओशिवरा पोलीस स्टेशनला असे नानांनी सांगितले. त्यांना मी सांगितले अहो नाना…पोलिसी दम देऊन होणारे काम नाही हो हे. त्यावर नाना शांतपणे बोलले, “ह्यांना जाऊन भेट आणि जे झालंय ते सांग. ते नक्की काही तरी करतील.” मी बरं म्हणून त्यादिवशी संध्याकाळी, त्यांना फोन करू की नको ह्या विचारतात होतो. उगाच कशाला आपण ह्या प्रकरणात पडावं. साला आपलंच सांभाळताना नाकीनऊ येत आहेत आणि त्यात हे कशाला म्हणून मी फोन न करताच निघालो. लिफ्टने खाली आलो आणि बघतो तर समोर रोहित उभा. त्याची नजर भिरभिरत होती. तो दरवाजात मध्येच उभा होता, त्यामुळे मला आडूनआडून निघावे लागत होते, पण तो ठिम्म उभा होता. मग त्याची आई आली आणि तिने त्याला सरळ आत ढकलले लिफ्टच्या. एखाद्या निर्जीव वस्तू सारखा तो आत कोलमडून पडला आणि जोरजोरात रडायला लागला. त्याची आई त्याचे तोंड दाबायचा प्रयत्न करत होती. हा प्रसंग बघून मी तडक प्रसन्न नाईकांना फोन केला.

माझ्या ऑफिसपासून त्यांचे पोलीस स्टेशन जवळच होते. मी आणि ते दोघेही नाईटला असल्याने ऑफिसनंतर मी गाडीने घरी न जाता पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितले की झालेला प्रकार निश्चितच धक्कादायक आहे, पण हे खूप सामान्य आहे. ज्या घरात अशी मुलं असतात त्यांची होणारी फरफट कधी कधी अश्या विलक्षण टोकाला जाते की त्यांचा तोल सुटतो… त्यांना त्या विशेष मुलांची चीड येऊ लागते, पण ऑफकोर्स हे सगळ्यांच्या बाबतीत होतं असे नाही…. पण अश्या खुपश्या केसेस मी बघितल्या आहेत आणि खरं सांगायचं तर माझा छोटा भाऊ… तो आज २६ वर्षाचा आहे. तोही असाच आहे. त्याला माझ्या बाबांनी कधी दूर केले नाही. भडकायचे खूप त्यावर… पण कधी त्याच्यावर हात उचलायचे नाही. माझ्या बाबांना त्याने जिन्यावरून ढकलून ही दिले होते रागात… त्यांचे डोके फुटले.. पाय दुखावला गेला..पण बाबांनी त्याला सांभाळायचा, शिकवण्याचा चंग केला होता. ह्या वयात देखील त्याला प्रार्तविधी, कपडे बदलणे, जेवणे … ह्यात कोणाची ना कोणाची मदत लागतेच. तो एकटा नाही हे करू शकत. मी ते ऐकून सुन्न झालो काय बोलावे कळेना. रोहितच्या आई-बाबांच्या बाबतीत काही घडले होते का, की ज्यामुळे त्यांना रोहित नकोसा झाला किंवा त्याला मारहाण करताना त्यांना काही वाटले नसेल का? त्यावर प्रसन्नदा इतकंच बोलले.”प्रत्येकाच्या गोष्टींना समजून घेण्याच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात अश्या गोष्टी घडल्या की टेंपर वाढणारच. पण म्हणून ते दोषी नाहीत असे मी म्हणणार नाही… पण हल्ली गोष्टी नाजूकपणे हाताळण्याऐवजी आपण तोडायच्या निर्णयावर लगेच पोचतो. बघू आपण काही करता येतं का ते…”

काही दिवस शांततेत निघून गेले. एका दिवशी पहाटे मी चार सव्वाचारच्या सुमारास मी घरी येत होतो. बिल्डींगच्या लिफ्टच्या बाजूला मुख्य दाराला एक लोखंडी जाळीचा दरवाजा आहे जो सरकवून आत जाता येत असे. रात्री तो दरवाजा कुलूप लावून बंद केलेला असे. मी पहाटे येतो म्हणून वॉचमॅन कुलूप उघडून ठेवत असे, पण दरवाजा लोटून ठेवलेला असायचा. मी त्या दरवाज्याजवळ पोचलो आणि पार शॉक लागल्यासारखा मागे झालो. समोर रोहित उभा होता आणि त्याने पिवळ्या रंगाचा सदरा घातलेला होता, ज्यावर रक्ताचे डाग दिसत होते आणि त्याच्या हाताला ही रक्त लागलेले होते. त्याला त्या अवस्थेत बघून माझी बोलतीच बंद झाली. वॉचमॅन टाकीतले पाणी बघायला गेला असणार, कारण तो आसपास दिसत नव्हता. मी तो दरवाजा उघडला आणि आत गेलो आणि दरवाजा परत लोटून बंद केला जेणेकरून रोहित बाहेर जाऊ नये. मी तडक चौथ्या माळ्यावर गेलो, तर तिथे सगळीकडे रक्ताचे डाग होते. त्यांच्या घराचा दरवाजा लोटलेला होता आणि रोहितची आई जमिनीवर पडलेली होती. मला काय करू सुचेनासे झाले. मी आधी प्रसन्नदाला फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले ज्याची भीती होती तेच झाले. आधी त्याच्या आई-बाबांच्या सहनशक्तीचा अंत झाला असेल आणि आता त्याच्या. त्यांनी मला तडक डॉक्टरांना आणि पोलीस स्टेशनला फोन करायला सांगितला. ते लगोलग इथे यायला निघाले होते. त्यांनी सांगितले की रोहित कोणाला दिसणार नाही ह्याची काळजी घे. आता ते का.. कशाला विचारायची वेळ नव्हती. मी हो बोललो आणि डॉक्टरांना बोलावले.

रोहितच्या आईला डोक्याला थोडी मोठी जखम झाली होती. कदाचित त्यांनी रोहितला आवरायचा प्रयत्न केला असेल, पण त्याने त्यांना जोरात धक्का दिलेला असावा. त्यांच्या जीवाला काही धोका नव्हता. त्या माराने आणि रक्तस्त्रावाने फक्त बेशुद्ध पडल्या होत्या. डॉक्टर आणि नाईक जवळजवळ एकाच वेळी तिथे पोचले आणि प्रसन्नदा रोहितला घेऊन निघून गेले. मी माझ्या बाबांसोबत आणि बिल्डींगमधल्या काही लोकांसोबत हॉस्पिटलला गेलो आणि एव्हाना पोलीसदेखील घटनास्थळी पोचले होते. रोहितचे बाबा रागातच घरी आले आणि मग तडक हॉस्पिटलला पोचले. रोहित कुठे.. काय कोणी काही विचारले नाही. रोहितला प्रसन्नदा कुठे घेऊन गेले काही कळत नव्हते. त्यांचा फोनही लागेनासा झाला.

संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांचा फोन आला की रोहित सुखरूप आहे आणि खार रोडला माझ्या घरी आहे. मी त्यांना काही विचारायच्या आधी ते बोलले की, “अजून प्रश्न नकोत. रोहितला सुखरूप ठिकाणी पोचवायचे आहे. तू येशील जमल्यास?” आता मला तर फारच भीती वाटू लागली होती. एक तर त्याची आई जीवानिशी वाचली. पोलीस ह्याचा शोध घेत आहेत आणि त्याला घेऊन एका पोलीसासोबत जाणे, मला खूपच धोक्याचे वाटू लागले. मी दोन मिनिटं काहीच बोललो नाही. त्यांना ते कळले असावे, ते इतकंच बोलले.काळजी नको करूस काही धोका होणार नाही. मी नानांना फोन केलाय आधीच. त्यांना पूर्ण कल्पना देऊनच हे काम करतोय आणि मला त्यांनी हायवेवर ६-६:३० पर्यंत पोचायला सांगितले.

करकच्चून मारलेल्या ब्रेकने मी थोडा पुढे फेकल्यासारखा झालो आणि एकदम भानावर आलो. इतकावेळ सुरु असणारे विचार थांबले. मी मागे बघितले रोहित शांतपणे बसून होता. पाण्याच्या बाटलीशी त्याचा काही खेळ सुरु होता. पाणी अंगावर सांडत होते, पण तो खूप खुश होता. मी आणि प्रसन्नदा गाडीतून उतरलो. समोरच्या घरातून एक साधारण साठीकडे झुकलेली व्यक्ती आमच्याकडे हळूहळू चालत आली. प्रसन्नदाचे वडील होते हे एव्हाना मला कळले होते आणि त्यांच्या मागोमाग पप्पा… पप्पा करत एक २५-२६ वर्षाचा तरुण लगबगीने आला. त्यांनी त्याला हात दिला आणि त्याचा हात घट्ट धरून आमच्याकडे आले. त्यांना जसे रोहितबद्दल सगळे माहित होतेच. त्यांनी स्वतः गाडीचा दरवाजा उघडला आणि रोहितच्या डोक्यावून हात फिरवला. रोहित एकदम शांतपणे उतरला आणि त्या तरुणाचा हात धरून घराकडे हळूहळू चालू लागला.

मी प्रसन्नदाकडे बघू लागलो. आता पुढे काय? ह्याचे आई-बाबा ह्याचा शोध घेणारच.. मग काय करायचे…? पोलिसात त्याच्या वडलांनी तक्रारदेखील केली असणार. त्यामुळे पोलीस मागावर असणारच. त्याचं काय? एखाद्या चांगल्या स्पेशल शाळेत का नाही नेले… इथे घरी का आणले वगैरे अश्या अनेक प्रश्नांची गर्दी झालेली मनात. काही सुचेनासे झालेले. त्याने मला खुणेनेच त्याच्या मागे यायला सांगितले आणि आम्ही एका खिडकीसमोर उभे होतो. आत डोकावून बघितल्यावर मला धक्काच बसला. रोहित प्रसन्नदाच्या बाबांसोबत मस्त अंगणात बसला होता. त्याच्या बाजूला प्रसन्नदाचा भाऊ सागर. ते काका दोघांशी हावभाव करत.. हातवारे करत बोलत होते आणि ते दोघे ते मन लावून ऐकत होते. ते बघून चांगले वाटले, पण प्रश्न तसाच राहिला… हे असं किती दिवस? किती महिने?

त्यावर प्रसन्नदा बोलला, “माहित नाही… मी बाबांना फोन केला, जेव्हा तू मला फोन केलास. ते म्हणाले इथे ये त्याला घेऊन बस. माझा माझ्या बापावर पूर्ण विश्वास आहे. त्याने आजवर माझ्या भावाचं सगळं काही केलंय. माझा भाऊ आज दिसतोय त्याहून अतिशय वाईट अवस्थेत होता काही वर्षांपूर्वी. बाबांनी त्याची भाषा शिकून त्याला शिकवलं मोठ्ठं केलं. रोहितला खूप सांभाळून घेण्याची गरज आहे. जे त्याच्या घरी किंवा कुठल्या शाळेपेक्षा किंवा बालसुधारगृहापेक्षा माझे बाबा चांगल्याप्रकारे करतील. इथे त्याला कसलाही धोका नाही. Compatibility…Don’t you think so?

माझे प्रश्न काही संपत नव्हते, “अरे पण दा पोलीस?”

प्रसन्नदा फक्त जोरात हसला… बस्स !!

(एव्हाना समोर अंगणात रोहित आणि सागर दोघेही फुटबॉल खेळण्यात मग्न होते)

– समाप्त

सदर कथा मिसळपाव दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित आहे. आपल्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे. मिसळपाव दिवाळी अंक इथे वाचता येईल – मिसळपाव दिवाळी अंक २०१३

सुझे   🙂   🙂

ये साली जिंदगी….

ऑफिसच्या मिटिंग रूममध्ये तो एकटाच बसून होता. एसीची सौम्य घरघर आणि हातातल्या पेनाची टेबलावरची टकटक ती भयाण शांतता भंग करत होती. त्याच्या एका बाजूला पाण्याची बाटली, एक कॉम्प्युटर, दोन-तीन फाईल्स पडून होत्या. मध्येच ते पेन तोंडात धरून फाईल्सवर आणि कीबोर्डवर हात चालवत होता. काही आकडेमोड, फॉर्म्युले तो पुन्हा पुन्हा तपासून बघत होता. शेवटी काही चूक नाही हे तपासून ऑफिसच्या लेटरहेडवर त्याने एक प्रिंट काढलं. ते तसंच काही वेळ हातात धरून निरखून बघत राहिला आणि मग एका कोपर्‍यात त्याने सही केली. त्या पानावर ठळक अक्षरात विषय होता – “Performance Development Review For Year 2012”

काही मिनिटांनी त्याचाच एक मित्र केबिनमध्ये आला. त्याच्याशी हात मिळवत समोरच्या खुर्चीमध्ये बसला. नेहमी हे दोघे मित्र भेटल्यावर गळाभेट घेत असत, पण आज वातावरण वेगळे होते. दोघांच्याही वागण्यात एक तणाव होता. मित्राने त्याला विचारले, “कसा आहेस?” तेव्हा त्याने त्याचे नेहमीचे उत्तर दिले, “कट रही हैं साली जिंदगी” आणि स्वत:च हसायला लागला. कसा आहेस असे त्याला कोणी विचारल्यावर त्याचे हे ठरलेले उत्तर असायचे. मग थोडा वेळ दोघेही शांत झाले आणि मग न राहवून त्याने मित्रासमोर तो कागद धरला आणि नंतर पाच मिनिटे त्या मिटिंग रूममध्ये शांतता पसरली. त्याचा मित्र तो कागद वाचू लागला, नंतर तो तिथे ठेवलेले काही परफॉर्मन्स रिपोर्ट्स अधाशासारखे चाळू लागला. एक एक पान उलटून आपले नाव आणि त्यापुढे असलेले आकडे पुन्हा पुन्हा तपासून घेऊ लागला. त्याला हवे ते मिळत नव्हते. त्याचा संयम आता सुटू लागला, तो आपल्या मित्राकडे बघून काहीश्या रडवेल्या स्वरात म्हणाला, “मित्रा, काही करता नाही का रे येणार? तुला तर माहीत आहे, मी संसारी माणूस आणि मला दोन मुलंही आहेत. हे असं अचानक झाल्यावर मी कुठे जाणार? मला इतक्या पगाराची नोकरी बाहेर मिळणार नाही रे. मित्रासाठी काही तरी कर रे. विनंती करतो.”

त्याला हे काहीसे अपेक्षित होतेच, तो आपल्या जागेवरून उठला. त्या रूममध्ये फेर्‍या मारू लागला आणि तो मित्र त्याच्याकडे आशेने बघत राहिला. परफॉर्मन्स रिव्ह्यू ह्या गोंडस नावाखाली कंपनीने लोकांना कमी करायचे ठरवले. कंपनीच्या खर्चाचा ताळेबंद बघता त्यांना किमान २० टक्के लोकांना कमी करायचे होते आणि दोन लोकांना ह्या कामाची जबाबदारी दिली होती. गेल्या बारा महिन्यांचा कामाचा विदा जमा करून, यादीत सगळ्यात शेवटी नावं असणार्‍या लोकांच्या नोकरीवर गदा येणार होती. जेव्हापासून ह्या दोन जणांची निवड ह्या कामासाठी केली गेली, तेव्हापासून त्यांच्या मित्रांना हे दोघे यमदूतासारखे भासायला लागले. सगळे एकमेकांचे मित्र, पण एका मित्राला दुसर्‍या मित्राच्या नोकरीची सूत्रे हातात दिल्याने वातावरण एकदम तणावपूर्ण झाले होते. रोज २० जणांना कामाच्या आधी एक तास बोलावले जायचे आणि हे प्रेमपत्र देऊन त्यांची नोकरीवरून गच्छंती केली जायची. नावाला परदेशी कंपनी, पण साला नोकरीची शाश्वती नाहीच. आधी मोठे मोठे पगार देऊन लोकांना मोठ्या प्रमाणावर भरती करायचे आणि काम संपल्यावर त्यांना नोकरीवरून काढून एकाच्या पगारात दोघा-तिघांना संधी द्यायचे. त्यामुळे कंपनीला चिक्कार फायदा व्हायचा.

ह्याच कंपनीत नवीन नवीन नोकरी मिळाल्यावर त्याच मित्रांबरोबर घालवलेले ते आनंदी क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत होते. आज त्याचाच एक मित्र त्याची नोकरी वाचवण्याची विनंती, त्याच्याच जिवाभावाच्या मित्राला करत होता. तो मनातल्या मनात विचार करू लागला, “साला काय काय करावं लागतंय मला नोकरीपायी. आज ह्या मित्राच्या डोळ्याने त्याची बायका-पोरं नोकरी न जाण्यासाठी विनवण्या करत आहेत. ह्या सणासुदीच्या काळात मित्राला नवीन नोकरी शोधत हिंडावे लागेल…. पण पण आकडेवारीनुसार परदेशातल्या मोठ्या मंडळींनी हा कार्यक्षम नसल्याचे कळवले आहे आणि त्यामुळे कंपनीला त्याची काहीही गरज नाही”

त्याला काही सुचत नव्हते. त्याला दिलेल्या टार्गेटचे हे शेवटचे दोन दिवस. त्याने जर स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध केली नाही, तर त्याला नोकरीहून पायउतार व्हावे लागले असते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. त्यात दुष्काळात तेरावं म्हणजे, त्याच्या बॉसने त्याची काल केलेली कानउघडणी. कानउघडणी म्हणण्यापेक्षा धमकी म्हणू शकतो त्याला. त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये घालवलेले ते क्षण त्याला आठवू लागले. ह्या परफॉर्मन्स ऑडीटसाठी ज्या दोघांची निवड केली, त्यांना कंपनी डायरेक्टरने आपल्या केबिनमध्ये बोलावले. दोघेही अवघडून उभेच राहिले, पण बॉसने बसायला सांगितल्यावर अवघडून बसले.

बॉस बोलू लागला, “मला काही लोकांकडून कळले आहे की, तुम्ही तुमचे काम नीट करत नाही. तुमच्या मित्रांशी चर्चा करताना तुम्ही सांगता की, कंपनी बकवास आहे, इथून सुटताय हे बरंय. (त्या दोघांवर ओरडत) How dare you to say that?? तुमचे हे मैत्रिपूर्ण संदेश तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला तुमचा पगार व्यवस्थित मिळतोय ना? कधी त्यात एक दिवस उशीर झाला? नाही नं? मग… ज्या कंपनीने तुम्हाला नोकरी दिली तिच्याबद्दल तुम्ही मस्करीतसुद्धा अपशब्द काढताय….एक लक्षात ठेवा, लोकांना नोकरीवरून काढायला तुम्हाला हौसेने सांगितलं नाही. तुमचे-माझे पगार व्यवस्थित आणि वेळेवर व्हावे, त्यात एक रुपयाचीसुद्धा कमी होऊ नये म्हणून ही कठोर पावले उचलावी लागत आहेत. ही कंपनी माझ्या बापाची नाही, की मी इथे मनाला येईल ती कामे करेन. प्रत्येक गोष्टी करताना मलासुद्धा २०-२५ ईमेल्स पाठवाव्या लागतात. मी फक्त एका प्रोसेसचा डायरेक्टर आहे. असे अनेक डायरेक्टर ह्या कंपनीत आहेत, त्यामुळे एकाला कमी करायला त्यांना काही कष्ट पडणार नाहीत. तुम्हाला हे करायला सांगताना मला आनंद होतोय असं नाही, पण मलासुद्धा कोणीतरी बॉस आहे आणि तो जे सांगेल ते मला करावंच लागेल. नाही केलं तर त्यांना दुसरा कोणी मिळेल, मग आपणच का नाही स्वत:ला पर्याय व्हायचं? मी इथे मोठा विचारवंत बसलेला नाही, पण तुमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे माझ्याकडे आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे जो जबाबदारी आहे, त्यासाठी मला तुम्हा कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मी जे सांगेन ते तुम्हाला मुकाट्याने करावेच लागेल, कारण मीसुद्धा तेच करतोय. जे मला माझ्या बॉसने सांगितलं, तेच तुम्हाला सांगतो – काम जमत असेल तर करा, नाही तर समोर दरवाजा आहे. तिथून चालते व्हा!!”

हे असे त्याला आजवर कोणी सुनावले नव्हते, पण काय करणार? परिस्थिती तशी आहे. सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. रिसेशन जे काय ते म्हणतात, ते काल्पनिकरीत्या सगळ्यांनी राबवायला सुरुवात केली होती. त्यामुळे कॉलेजमधून नुकतेच पास झालेले विद्यार्थ्यांना – जे अगदी कमी पगारात मिळेल ती नोकरी करायला तयार असतात, अश्यांना – नोकरी देऊन, अनुभवी लोकांच्या पगारात चार-पाच डोकी काम करू लागली. काम करणार्‍यांची संख्या वाढली, पण कार्यक्षमता हवी ती मिळाली नाही, कारण अनुभवाची कमतरता. मग परदेशातून एक ईमेल येणार, इतक्या लोकांची गरज ती काय? लोक कमी करा आणि खर्च आटोक्यात आणा आणि त्यासाठी सुरू होते परफॉर्मन्स ऑडीट. वास्तविक पाहता परफॉर्मन्स ऑडीट करणारा तो कोणी मोठा नव्हता. त्याचा स्वत:चा परफॉर्मन्स चांगला असल्याने कंपनीच्या डायरेक्टरने त्याची ही निवड केली होती. त्याला ते बिलकूल आवडले नव्हते आणि आपल्या मॅनेजरकडे त्याने तशी नाराजी व्यक्तही केली, पण त्याचे ऐकतेय कोण? त्याने तडकाफडकी आपला राजीनामा लिहिला आणि पाठवून दिला. त्याच्या कामाचे शेवटचे ६० दिवस तो मोजू लागला. आता मोजके १५ दिवस उरले आहेत त्याच्या कंपनीत. मग तो काहीतरी वेगळा पर्याय निवडण्यासाठी सिद्ध होत होता.

“अरे, काय झालं?” त्याच्या मित्राने त्याला हाक मारली. ती हाक ऐकून त्याची विचारांची तंद्री एकदम भंग पावली. काहीसा दचकल्यासारखा तो आपल्या मित्राकडे बघू लागला. विचारांच्या गर्तेत आपण किती काळ हरवलो होतो, ह्याचे त्याला भान नव्हतेच. तो नुसता फेर्‍या घालत होता. तो आपल्या जागेवर आला. त्याने मित्राच्या हातून तो पेपर घेतला. काही काळ तो तसाच बघू लागला त्या पेपरकडे, मग त्याने सहीखाली तारीख लिहिली आणि मित्राला म्हणाला, “माफ कर, मला जे जमेल ते नक्की करेन तुझ्यासाठी. तुला ३० दिवसांची मुदत देतोय. दरम्यानच्या काळात नोकरीचा शोध घेणे सुरू कर. मी तुला काही रेफरन्स देतो. तिथे जा, तुला अपेक्षेप्रमाणे पगार मिळेल. तुझा कंपनीतला शेवटचा दिवस २० नोव्हेंबर. कंपनी सोडताना तुला दोन महिन्यांचा पगार दिला जाईल. माझ्या परीने मी हेच करू शकतो. सॉरी यार…”

त्याचा मित्र काहीसा रागवत बाहेर पडला आणि इथे तो स्वत:ला दोष देत राहिला की आपण काय करतोय… पण मी काही चुकीचेही करत नाही. मला माझी नोकरीसुद्धा वाचवायची आहे. शेवटचे १५ दिवस असले तरी, इथे आपल्या कामावर कुठलाही काळा शिक्का बसू नये असे त्याला वाटत होते. जमेल तितक्या सहकार्‍यांना वाचवायचे त्याने प्रयत्न केले. पाणी नाकापर्यंत आलेले पाहून, माकडीणसुद्धा आपले पिल्लू आपल्या पायाखाली घेऊन भरलेल्या हौदात श्वास घेण्यासाठी मान वर काढते, तिथे तो काय चीज? विचार करत करत तो त्या केबिनबाहेर पडला. एव्हाना पहिली शिफ्ट कामावर आली होती आणि जोरदार काम सुरू होते. सगळे जण आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी त्याला पाहून जागेवरून उठून त्याचे आभार मानले, हात मिळवला, तर कोणी नुसते तोंडावर हसून मनातल्या मनात त्याला प्रचंड शिव्या घातल्या.

त्याने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्याला कामात मन रमवायचे होते. तो सगळ्यांना मदत करू लागला. मघाशी ज्या मित्राला त्याने नोकरीवरून कमी केले, त्याला घेऊन चहा प्यायला गेला आणि तोही त्याच्यासोबत न बोलता निघाला. त्याला आपली परिस्थिती कळली, ह्याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर होते. ब्रेकमध्ये त्याने स्वत: दुसर्‍या कंपनीमध्ये फोन करून त्याच्यासाठी इंटरव्ह्यू ठरवून दिले. कुठल्यातरी पापाचे क्षालन करण्याची त्याची अनामिक धडपड सुरू होती; जरी ते पाप नसले, तरी त्याच्या जिव्हारी खोलवर ते कुठेतरी लागलेले होते. त्याची ही धडपड बघून त्याचा मित्र मनोमन सुखावला आणि त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि एकमेकांना मैत्रिपूर्ण शिव्या घालत “काम कर” म्हणून सांगत आपापल्या डेस्कवर जाऊन बसले..

त्याच रात्री त्याच्या बॉसने त्याला प्रमोशन देऊन दुसर्‍या. एका अकाऊंटमध्ये टीम लीडरची बढती दिली. त्याला हे अनेपेक्षित होते. त्याला उगाच अवघडल्यासारखे वाटले. इथे लोकांना काढून, त्यांच्या नोकरीच्या बदल्यात मला बढती… नको. त्याने ती जबाबदारी स्वीकारायला नकार दिला, पण त्याचा बॉस त्याला म्हणाला, “ये साली जिंदगी बहोत कुछ सिखाती हैं. तुम जो भी सीखोगे, वो एक दिन तुम्हारे काम जरूर आयेगा. आज तक तूने अलग अलग लीड लोगो कें साथ काम किया, अब तुझे भी आगे बढना तो होगा? भले तुम्हारी कोई बुराई करे… अच्छाई करनेवाले भी बहोत मिलेंगे… All the best !!

ह्या कॉर्पोरेट लाईफमध्ये जगताना अनेकदा आपल्या भावना ऑफिसच्या बाहेर असलेल्या केराच्या टोपलीत फेकून द्याव्या लागतात. आपल्या बॉसला शिव्या देताना आपल्याला काहीच वाटत नाही, पण जेव्हा आपण कोणाचे बॉस होऊ, तेव्हा आपल्याला कोणी शिव्या देणार नाही, याची शाश्वती कोणी देऊ शकेल?

-सुझे 🙂

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१२