MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

सर्वप्रथम कथेचा हा भाग पोस्ट करण्यास झालेल्या विलंबासाठी दिलगिरी व्यक्त करतो. काही वैयक्तिक कारणांमुळे लिहिणे शक्य झालं नाही आणि उगाच घाईघाईने कथा संपवायची नव्हती. दरम्यानच्या काळात अनेक मित्र-मैत्रिणींनी, वाचकांनी कान उघडणी केल्यावर आज भाग लिहायला घेतोय 🙂

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला
भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

“ओ साहेब मारू नका साहेब, आह !! मी… मी काही नाही केलं. तुम्ही मला का इथे चौकशीला. सा sss हे ss ब …!! ” (कोणी तरी मोठ्याने ओरडले) आवाज इन्स्पेक्टर रावतसाहेबांच्या केबिनमधून येत होता.

बॉबी, जयेश भाई आणि राजू बाहेर बसून होते एका बाकावर. तीन दिवस झाले त्यांना नागपूरला येऊन. इतक्या घडामोडी घडून गेल्या होत्या ह्या तीन दिवसात. बॉबी आपल्या पांढऱ्या दाढीवर हात फिरवत, आपला मोबाईल उगाच न्याहाळत होता. त्याची बायको खूप रागावली होती आणि त्याला परत बोलावत होती, पण इथून त्याला लगेच निघता येणार नव्हते आणि तसेही प्राथमिक चौकशी झाल्याशिवाय पोलीस त्यांना सोडणार नव्हतेच. सिगारेटची तलप त्याला अस्वस्थ करत होती, पण इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना भेटायला बोलावल्याने तो गप्पा बसून होता. मुंबईत त्याचा धंदा पण बुडत होता. सुहासने एक दिवस त्याला मदत केली, पण नंतर त्याला स्वत:च्या ऑफिसला जायचे होते त्यामुळे सायबर पूर्णवेळ बंद झाला.

राहून राहून त्याला अरुणचे वाईट वाटत होते. कोणाचा शेवट असा कसा होऊ शकतो? त्याच्या अंत्यविधीसाठी घरून कोणीच आले नाही. कोणी कोणावर इतकं रागावू शकतं? आकस ठेवू शकतो? सावत्र आई होती, भाऊ होता, बायकोसुद्धा होती..पण कोणीच नाही आले. त्यांना त्याच्या जाण्याने काहीच फरक पडला नसेल? पडला असता तर ते इथे असते. किमान त्याचे शेवटचे विधी तरी… पण जाऊ देत. तो स्वतः स्वतःला प्रश्न विचारून, त्यांना बगल देत होता. दोन-तीन दिवस झोप नसल्याने त्याचे डोळे लाललाल झाले होते. हाताच्या बाह्या मळकट झालेल्या आणि ह्यावेळी स्वत:कडे लक्ष तरी कसे देणार… त्याच्या हातात पोलिसांच्या एफआयआरची एक प्रत होती.

पोलिसांच्या एफआयआरमध्ये अरुणचा तारेने गळा आवळून खून झाल्याचा रिपोर्ट तयार केला गेला. खून सकाळी ६-७ च्या आसपास झाला होता. मारताना त्याला प्रतिकाराची काही संधी दिली नव्हती, कारण जास्त झटापटीच्या खुणा नव्हत्या. त्याला गुंगी व इतर तत्सम गुंगीचे औषध दिले नव्हते, पण रक्त तपासणीमध्ये दारूचे प्रमाण आढळले. त्यामुळे दारूच्या धुंदीत सकाळी अनावधानाने त्याच्यावर मागून हल्ला करून, चोरीच्या उद्देश्याने त्याचा खून झाल्याचा रिपोर्ट तयार केला आणि तीन अनोळखी लोकांवर एक आरोप पत्र तयार केले गेले. त्याची एक प्रत कोर्टाला देण्यात आली आणि तपासाची प्राथमिक पूर्तता झाल्याशिवाय बॉबी आणि जयेशभाईंना नागपूर सोडण्याची मनाई केली गेली.

तितक्यात हवालदार साळवी रावतांच्या केबिनमधून बाहेर आले, “इथे बॉबी कोण? तुम्हाला साहेबांनी बोलावलं आहे” तो आवाज ऐकताच तिघेही उठून केबिनकडे जायला लागले. ते पाहून साळवी खेकसले, “तीन-तीन बॉबी? फक्त बॉबीने आत जायचं आहे. बाकीच्या दोघांनी इथेच बसून राहायचं” एखाद्या रोबोटप्रमाणे जयेश भाई आणि राजू मागे फिरले आणि परत त्या बाकावर बसले.

केबिनच्या दारावर टक टक करत बॉबी म्हणाला, “Sir, may I come in”

आतून फक्त “या..!!” इतकाच आवाज आला. बॉबी दरवाजा लोटून आत आला, समोर मोठ्ठं टेबल, तीन खुर्च्या, फायलींचा पसारा पडून होता. भिंतीवर भगतसिंग, सावरकर, गांधीचे फोटो त्याच्याकडे टक लावून बघत होते. बॉबीची नजर पूर्ण केबिनभर भिरभिरत होती, तेवढ्यात त्याच्या उजव्या बाजूने शर्टाची बटणे नीट लावत इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आले.

“बसा..” खुर्चीकडे हात दाखवून रावत आपल्या खुर्चीकडे वळले. सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढून, ती पेटवायला माचीस शोधू लागले. बॉबीने लगेच खिश्यातून माचीस काढून, पेटवली आणि विझू नये म्हणून दुसऱ्या हाताने माचीसची ज्योत सांभाळत रावतांच्या पुढे झुकला. रावत थोडे पुढे झाले आणी सिगारेट शिलगावून मागे झाले.

“Thanks !! बोला, तर तुम्ही बॉबी मुंबईहून इथे आपल्या मित्राच्या ड्रायव्हरच्या खुनाची तक्रार घेऊन आलात. त्यामागे काही विशेष कारण? तुमचा मित्र आणि पोलीस काय बघायचे ते बघून घेतील. तुम्ही इथे का थांबून आहात? जयेशभाई सारखे बॉबीभाई बॉबीभाई करत असतात. खूप फेमस दिसताय.

“सर, मला मराठी जमते नाही. मला समजते तुम्ही काय विचारलेत, पण इतकं क्लिअर बोलता नाही येतो. इंग्रजी किंवा हिंदीत बोलू शकतो”

(सिगारेटच्या धुराचा लोट हवेत सोडत) “कसं आहे नं. तुम्ही भाषा कुठलीही वापरा. मला माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली म्हणजे झालं. आधीच ह्या प्रकरणाला इथल्या पेपरवाल्यांनी खूप मसाला लावून छापलंय. ह्या भिकारचोटांना फक्त आपला धंदा समजतो, इथे पोलिसांची काय हालत होते कोण सांगणार”

बॉबी शांत बसून होता. रावतांचे वर्चस्व त्याला प्रत्येक क्षणाला जाणवत होते. शेवटी धीर करून तो बोलू लागला “Sir, I am running my small business of Cyber Cafe and Tours & Travels is just a side business.”

“Stop… Stop….” रावत एकदम त्याला थांबवत म्हणाले “मला कथाकथन नकोय…Story Telling… Just Keep it short, simple and to the point” सिगारेटचं पाकीट त्याच्यापुढे धरत, “Have one..”

बॉबीने सिगारेट पेटवली आणि सिगारेटचा धूर बाहेर सोडताना, तो स्वत: मोकळा होत गेला. आता तो बराच आत्मविश्वासाने बोलत गेला. झालेला सगळा प्रकार त्याने रावतांना कथन केला. रावत खुर्चीतून उभे राहिले, आणि खोलीत येरझारा घालत म्हणाले, “तुम्ही साला सगळे लोकं पोलीस म्हणजे राक्षस असेच समजता. आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत आणि आम्हीही माणसे आहोत. मला ही मुलगी झाली दोन महिन्यांपूर्वी. बायको आणि पोरगी मुंबईला आहे, खूप दिवस झाले…” विषयांतर होत असलेले बघून रावत थांबले, बॉबीला किती कळले, नाही कळले माहित नाही. त्यांनी बॉबीला बाहेर जायला सांगितले आणि जयेशभाईंना आत पाठवायला सांगितले. बाहेर पडताना त्यांनी बॉबीशी हस्तांदोलन केले. अश्या मर्डर केसेस रावतांना नवीन नाहीत, ६ वर्षाच्या नोकरीमध्ये त्यांनी अश्या अनेक किचकट केसेस सोडवल्या होत्या. ही मर्डर केस एक नवीन आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभी होती.

नंतर जयेशभाई काहीसे घाबरत आत आले. रावतांनी त्यांच्यावर एकदम प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. जयेशभाई ह्याने पुरते खचले होते. अडखळत, घाबरत त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. चौकशीशिवाय कोणाला गाडी देण्याचे दुष्परिणाम त्यांना आज भोगावे लागत होते. ह्या चुकीमुळे एक जीव आणि १५ लाखाची नवी कोरी करकरीत गाडी हातची गमावून बसले. अश्याप्रकारे गाडी भाड्याने देणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी गाडीला पिवळी नंबर प्लेट असणे म्हणजे ट्रान्सपोर्ट परवाना असणे गरजेचे असते, पण तीही इथे नव्हती. त्यामुळे जर कोणी पलटून काही बोलले, तर जयेशभाई गोत्यात येणार होते.

“साळवी… बॉबीला आत घेऊन या आणि जरा चहा पाठवा आत तीन” रावत ओरडले. बॉबी आत आला. दोन मिनिटांनी चहा घेऊन एक पोरगा हजर झाला. साळवी केबिनच्या दाराशी उभे राहिले. चहाचा एक घोट घेत रावतांनी सिगारेट पेटवली,”जयेशभाई, जेव्हा तुम्ही तक्रार नोंदवली, त्याच दिवशी आम्ही काही संशयित ताब्यात घेतले आहेत. मगाशी ज्याला प्रसाद देत होतो, तो त्यापैकीच एक. गाड्या पळवून त्याचे भाग सुटे करून विकणे किंवा गाडी चोरून पर राज्यात नेऊन विकणे असे धंदे ह्या लोकांचे. आजवर खून करण्याइतकी मजल त्यांनी मारली नव्हती. ज्यांना ताब्यात घेतले, त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्यापैकी कोणाचेही हे काम नाही..”

“ये आप इतने यकीन कें साथ कैसे बता सकते हैं?” जयेशभाई रावतांचे बोलणे तोडत मध्येच म्हणाले…

त्यांना ते फारसे आवडले नाही, ते एकदम खेकसून ओरडले “तपासातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावी, ह्याचे मला बंधन नाही. आम्ही फोनचे रेकॉर्डस्, टोल नाक्यावरचे टीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतोय. कोणी संशयित सापडला तर लगेच त्याला अटक करून चौकशी करतोय. अजून तपास सुरु राहील, कारण ह्या सगळ्याला थोडावेळ जाऊ शकतो आणि गाडी बुक करणाऱ्याला फक्त एकनाथने पाहिलं आहे. त्याच्याकडे जरा बघावे लागेल. पोलिसी हिसका दाखवला की, सगळे पोपटावानी बोलू लागतात. तूर्तास आम्ही तपास सुरु केलाय हेच तुम्हाला सांगायचे होते. तुम्ही आता जाऊ शकता मुंबईला. मी ५-६ दिवसांनी येतोय तिथे. अरुणच्या परिवाराची आणि त्या एकनाथची भेट घ्यायची आहे. तेव्हा बाकीच्या गोष्टी तिथेच बोलू… कसं?”

दोघांनी होकारार्थी मान हलवली. बॉबीने रावतांचे मनापासून आभार मानत निरोप घेतला आणि ते लगेच परतीच्या प्रवासाला लागले. त्यांना आता त्या जागेची चीड येऊ लागली होती. तीन-चार दिवस झोप नाही, नीट जेवण नाही. प्रचंड मानसिक आणि शारीरिक दगदग झाल्याने सगळे दमल्यासारखे झाले होते. पोलिसांनी आपले काम चोख सुरु केले, हीच एक समाधानाची गोष्ट. राजू गाडी दामटवत होता, बॉबीने त्याला आरामात चल म्हणून सांगितले. रस्तात एका छोटेखानी हॉटेलासमोर गाडी थांबली. बॉबी हात-पाय ताणत उतरला आणि सोड्याची बाटली घेऊन, त्याचे हबके तोंडावर मारू लागला. जयेश भाई आणि राजू एका टेबलावर बसत, चहा आणि कांदा भजी आणायची ऑर्डर सोडतात.

जयेशभाई, “बॉबी भाई, आपने बहोत मदत की हैं मेरी. मैं अकेला ये नही कर पाता” बॉबी शांत होता. एकही शब्द न बोलता, तो सिगारेट प्यायला बाहेर पडला. जयेशभाई उठून त्याच्या मागे जाणार, इतक्यात त्यांना थांबवून फोन पें बात कर रहा हुं, असे म्हणून बाहेर निघाला.. “Yes Sir..” इतकंच जयेशभाईंना ऐकू आले.

थोड्यावेळाने बॉबी परत आला आणि मग त्याने आपल्या बायकोला फोन केला आणि सकाळी घरी पोचतो म्हणून सांगितलं आणि मग त्याच्या मुलीशी सिमूशी बोलू लागला. तिच्यासाठी तो ट्रीपसाठी गेला होता, त्यामुळे तिला हव्या असलेल्या गोष्टी ती त्याला सांगू लागली. बॉबी एकदम हळवेपणाने ते ऐकून घेत होता. त्याला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती, पण ती त्याला उद्या शिवाय दिसणार नव्हती. कितीही मानसिक त्रास झाला तरी, त्याची मुलगी त्याच्यावर उतारा असायची. ती समोर आली की बॉबी एकदम हरवून जात असे. तिला कडेवर घेऊन मिरवणे त्याला खूप आवडत असे, पण आज त्याच्या खांद्यावर एक विलक्षण ओझे होते. तिचा पाकिटात असलेला फोटो बघून तो एकदम हलकेच हसला. जयेशभाई राजूशी बोलताना सारखे निव्वळ पैश्याच्या बाता करू लागले. अरुण गेला याचे त्यांना आता काही वाटत नव्हते आणि का वाटावे म्हणा. त्यांची १५ लाखांची गाडी गेली होती. अरुण त्यांचा कोणी सगेवाला नव्हता. तो फक्त होता एक बदली ड्रायव्हर… बस्स !!

रात्रीचे १० वाजले इन्स्पेक्टर रावत फायलींचा पसारा घेऊन केबिनमध्ये बसून होते. हवालदार साळवी त्यांना फोनचे रेकॉर्डस् फाईल करून देत होते. टोल नाक्यावरच्या व्हिडीओ फुटेजमध्ये अरुणशिवाय एक अंगाने शिडशिडीत असलेली व्यक्ती दिसत होती, पण तिचा चेहरा सुस्पष्ट नव्हता. नेहमी त्याचा एक हात खिडकीबाहेर सिगारेट हातात घेऊन असायचा. हातात एक दोन अंगठ्या असाव्यात, पण अजून काही कळत नव्हते. मागे बसलेल्या दोन व्यक्ती नेहमीच गूढ राहिल्या. गाडीचे फोटो, त्यावर काय काय ओळखीच्या खुणा होत्या त्या नोंदवून घेऊ लागले. सोबत त्यांनी चेसी नंबर घेऊन ती गाडी जयेशभाईंची आहे याचीदेखील खात्री करून घेतली होती. गाडीचे इन्शुरन्स पेपर, पासिंग पेपर आणि गाडीचे लोन हे सगळे पेपर ते नजरेखालून घालू लागले. असेन शंका त्यांच्या मनात येत होत्या, पण एका ठाम निष्कर्षापर्यंत ते पोचत नव्हते. शेवटी परत ते फोन रेकॉर्डस् असलेल्या फायली बघू लागले.

अरुणने रात्री उशिरा केलेले आणि पहाटे केलेले फोन त्यांच्यासाठी एक महत्वाचा दुवा होता. अचानक काहीसे आठवून त्यांनी ऑपरेटरला फोन लावला आणि तपासाला काही तरी दिशा मिळाल्याचे एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तराळले…

क्रमश:

(हा शेवटचा क्रमश: आहे… उगा चवताळून जाऊ नये. पुढचा भाग दोन दिवसात नक्की टाकतो. 🙂 🙂 )

– सुझे !! !

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला

भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

भाग अंतिम – MH-02-XA-40X2 – भाग अंतिम

MH-02-XX-4XXX – भाग पहिला

(एकनाथचं टूर आणि ट्रॅव्हल्स ऑफिस)

“ट्रिंग.. ट्रिंग… हां बोला. गाडी नं…मिळेल नं. (समोरची डायरी घाईघाईने ओढून, त्यात आजच्या तारखेच्या पानावर काहीतरी खरडू लागला) कधी जायचं आहे आणि कुठली गाडी हवीय? कुठे जायचं आहे…?”

समोरून तो माणूस एकनाथला डीटेल्स देत असतो, आणि इथे एकनाथ त्याचं म्हणणं ऐकून हम्म ह्म्म्म दाद देत राहतो. शेवटी तो म्हणतो

“अहो काळजी नको. तुम्हाला एक चांगली पॉश ईनोव्हा गाडी देतो. नागपूर म्हणजे खूप लांबचा रस्ता आहे आणि आज नक्की कधी निघायचं आहे?”

“दोन तासाने …. दुपारी ३ वाजता” (समोरून तो बोलतो)

“क्कक्काय… आता लगेच? गाडीचा रेट खूप महाग मिळेल. एक कोरी करकरीत ईनोव्हा आहे. रस्त्यावर उतरून फक्त एक महिना झालाय.”

“अरे मला अर्जंट काम आहे. पैश्याची चिंता नाही…गाडी नवीन असेल तर उत्तम”

इथे एकनाथ फायद्याचे गणित करू लागला. दिवसाला अशी तीन-चार भाडी आणि परगावी जाणाऱ्या बसेसच्या जागेसाठी बुकिंग करायची. बसल्या जागेवरून काही फोन फिरवून, आपले कमिशन काढायचे हाच त्याचा धंदा. तो समोरच्या व्यक्तीला विचार करून काय सांगायचं, ह्यावर विचार करू लागला. त्याला अनुभवाने माहित होतं की, समोरचा नक्की घासाघीस करणार पैश्यासाठी. त्यामुळे मुद्दाम जास्त किंमत सांगायचे ठरवून, तो बोलतो…

“बघ तू वेळेवर सांगतोयस आणि गाडी पण नवीन असल्याने ड्रायव्हर बदली द्यावा लागेल. गाडीचा रेट किलोमीटर मागे १३ रुपये होईल. सोबत टोल आणि ड्रायव्हरचा रोजचा खर्च वेगळा”

“ठीक आहे..गाडी पाठव” (समोरचा उत्तरतो..)

एकनाथला आश्चर्याचा धक्का बसतो. आयचा घोव… हा तयार झाला. चला आज एकदम मस्त कमाई होणार. तो त्याला ड्रायव्हरला फोन करतो म्हणून सांगतो. फोन ठेवता ठेवता, समोरचा माणूस दटावत म्हणाला, “मला गाडी वेळेवर हवीय आणि ती पण बरोब्बर ३ वाजता नॅशनल पार्कच्या गेटसमोर”

एकनाथ विचार करू लागला, आता ही काय पंचाईत.म्हणे नॅशनल पार्कहून बसणार… मग शेवटी स्वतःलाच समजावत म्हणाला, आपल्या बापाचं काय जातंय आणि त्याने जयेशभाईच्या ड्रायव्हरला फोन लावला. जयेशभाई एकनाथ बरोबर जास्त व्यवहार करत नसत, कारण तो काही झालं तरी स्वतःचा फायदा सोडत नसे. भले गाडी मालकाला कितीही नुकसान होऊ देत. त्याचं ड्रायव्हरशी बरोबर पटायचं, पण नेमका तो फोन उचलत नव्हता. शेवटी न राहवून त्याने जयेशभाईचा नंबर फिरवला. मोबाईल स्क्रीनवर एकनाथचं नाव बघून, जयेशभाईंच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्यांनी वैतागत फोन उचलला आणि ह्याने नवीन गाडीची मागणी केली. त्याने खोटं सांगितलं की हे मोठ्ठं भाडं हरेश ने दिलंय. हरेश हा नॉर्मली मोठ्या टूर्स वगैरे सांभाळायचा. त्याचं नाव आल्यावर जयेशभाई वरमले.

ते एकनाथला म्हणाले, “गाडी हैं, पर ड्रायव्हर गाव गया हैं. उसका कोई सगेवाला मर गया हैं. कोई भरोसेमंद ड्रायव्हर हैं क्या? बॉबीसें बात करू”

बॉबीचं नावमध्ये आल्यावर एकनाथ भडकला, “अरे ड्रायव्हर मेरे पास हैं. भेजता हुं आधे एक घंटे मैं. तुम चालन कोरा रखना मैं रेट और किलोमीटर लिख दुंगा.

“अरे पर बॉबी कें पास विलास रहेगा….उससें बात…” त्याला मध्येच तोडत एकनाथ म्हणाला

“अरे उसकी क्या जरुरत हैं? माना बॉबीभाई आपके खास हैं, पर गाडी दो घंटे मैं चाहिये.ज्यादा टाईम बरबाद करोगे, तो दुसरे को देता हुं भाडा…” एकनाथ ने निर्वाणीचा डाव टाकला.

शेवटी जयेशभाई तयार झाले. त्यांनी त्यांच्याच एका दुसऱ्या गाडीवरचा ड्रायव्हर पाठवायचे ठरवले. अरुण त्याचे नाव. त्याला जास्त अनुभव नव्हता, पण कोणी परका जाण्यापेक्षा आपला माणूस गेला तर उत्तम. अरुण हा मुळचा रत्नागिरीचा. एकदा बॉबीकडे नोकरी मागायला आलेला हा तरुण पोरगा, बॉबीने जयेशभाईकडे लोकल गाडी चालवायला म्हणून पाठवून दिला होता. त्याच्या खर्चासाठी जयेशभाईंनी तीन हजार रुपये दिले आणि गाडी पाठवून दिली. गाडीने बरोब्बर तीन वाजता नॅशनल पार्क येथून तीन जणांना उचलले आणि गाडी भरधाव धावू लागली.

बॉबी तसा दिलदार मनुष्य. सगळ्यांना जमेल तितकी मदत करणारा. आपल्या एकुलत्या एका पोरीच्या नावाने सुरु केलेला सायबर कॅफे आणि टूर्सचा धंदा देवखुशालीने जोमात सुरु होता. तशी त्याला हे सगळं करायची गरज नव्हती. केरळमध्ये त्याच्या वडलांनी त्याच्या नावे भरपूर शेती आणि पैसा ठेवला होता. त्याच्या सातपिढ्या आरामात बसून हे खावू शकल्या असत्या. पण स्वत: काही करायचं ही त्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. ह्या धंद्यातून मिळणारे सारे उत्पन्न, स्वतःच्या दोन गाड्यांच्या देखभालीसाठी वापरत असे. त्याच्या ओळखीच्या बळावर, त्याने ह्या धंद्यात खूप सारे मित्र आणि त्याहून जास्त शत्रू कमावले होते. शत्रूपण कसे, रोज त्याला भेटायचे, त्याची खालीखुशाली विचारून, मागच्यामागे त्याचा धंदा तोडायचा. बॉबीला ह्याने काडीचाही फरक पडत नव्हता. जी लोकं आपल्या सोबत आहेत, त्यांना काहीही मदत लागली तर आपण मागे हटता कामा नये हीच त्याची जिद्द.

संध्याकाळी ४:३० वाजता जयेशभाई बॉबीच्या कॅफेवर पोचला. बॉबी बाहेर बसून मस्त सिगारेट पीत बसला होता. जयेशभाई आल्याचे बघताच त्याने छोटूला चहा आणायला सांगितले. जयेशभाईंनी दुपारी झालेला प्रकार बॉबीला सांगितला.

बॉबी एकदम भडकला, “अबे वो च्युतीये को अक्कल नही हैं. उसको सिर्फ पैसा दिखता हैं, पर तुझे तो समझदारी दिखानी चाहिये थी. नई गाडी देदी, वो भी अरुण को? चलो उसें दे दी, वांदा नही. पर पार्टी सें बिना बात किये? पार्टी का पता वगैरा कुछ नही. आजकल कितना पुलिस का लफडा हो रहा हैं. इतना लंबा नही भेजना चाहिये था. चल जल्दी अरुण को फोन लगा.”

अरुण फोन उचलतो. बॉबी त्याला दर एक-दीड तासाने फोन करेन म्हणून सांगतो आणि फोन ठेवायच्या आधी त्याला सांगतो की, अपना खयाल रख. कोई लफडा हो, तो तुरंत दुकान पें फोन कर.

इथे गाडीत बसलेले ते तीन लोकं आणि अरुण, ह्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी सुरु होतात सगळे एकदम मोकळेपणाने गप्पा मारू लागतात. मोठ्याने गाणी वाजवत, एकमेकांना किस्से सांगत त्यांचा प्रवास सुरु असतो. मग त्यातल्या एकाने अरुणला डिझेल भरायला तात्पुरते पैसे मागतो आणि सांगतो की पैसे एटीममधून काढून देतो. अरुण दीड हजाराचे डिझेल भरतो.

मग पुढे साधारण ९ ला एका छोट्या गाडी हॉटेलसमोर थांबवतात आणि रात्रीचे जेवण घेण्यासाठी सगळे उतरतात. मस्त दाबून जेवतात. सगळ्यांना सुस्ती आली असते. एका डेपोजवळ रात्री अरुणला जरा झोप मिळावी, म्हणून गाडी थांबवतात. दोघेजण सिगारेट ओढायला खाली उतरतात आणि अरुण आणि दुसरा गाडीत सिट मागे करून ताणून द्यायची तयारी करतात. झोपायच्या आधी अरुणने एक फोन जयेशभाईंना फिरवला. त्यांनी तो उचलला नाही, झोपले असतील म्हणून त्याने परत फोन केला नाही.

पहाटे ४:३०ला ते उठले. नागपूर अजून १००-९० किलोमीटर होतं. फक्कड चहा घेऊन, ते निघाले. निघताना अरुणने न चुकता जयेशभाईंना फोन केला आणि सगळं ठीक आहे सांगितल्यावर, जयेशभाईंचा जीव भांड्यात पडला. चला पोचला एकदाचा. हा बॉबी उगाच डोक्याला शॉट देतो, असं बोलून परत ताणून दिली. गाडीने ८:३०च्या सुमारास नागपूरचा टोलनाका पार केला. इथे जयेश भाई बॉबीच्या कॅफेवर आला. १० वाजले असतील. बॉबीने नुकतेच दुकान उघडल्याने, तो येशूच्या क्रॉससमोर प्रार्थना करत होता. प्रार्थना झाल्यावर, सिगारेटचं पाकीट हातात घेऊन तो बाहेर आला. माचीसने सिगारेट पेटवली आणि हलकेच नाका-तोंडातून धूर सोडू लागला. खुर्चीवर बसता बसता, दो स्पेशल लेके आ रे…असं ओरडलो.

“तो जयेशभाई, कहां हैं अरुण? फोन किया था?”

“हा बॉबीभाई, सब ठीक हैं. आठ-साडे आठ बजे पहोच गया. आप भी नं मुझे डरा देते हो.”

“ह्म्म्म… बहोत सालों सें यें धंदा कर रहा हुं. रिस्क लेते लेते, कब अपना गला कट जाये पता नही चलेगा. कब निकल रहा हैं वहां सें?”

“कल शाम को ५ बजे कें करीब. सोमवार सवेरे गाडी मुंबई मैं होगा”

“ठीक…लो चाय पिलो.”

(रात्रीचे ९ वाजतात)

बॉबी स्वतः अरुणला फोन करतो, पण फोन बंद. पुन्हा एक तासाने करतो, तरी बंद. बॉबी जयेशभाईला फोन करतो. तो म्हणतो नेटवर्क नही होगा भाई. सो जाओ. बॉबी दुसऱ्या दिवशी सकाळी फोन करतो, पण फोन लागत नाही. अस्वस्थ मनाने तो कॅफेवर पोचतो. रविवार पूर्णवेळ कॅफे एका खाजगी बँकेच्या परीक्षेसाठी आरक्षित केलेला असतो. तो त्या अधिकारी लोकांशी फोनवर गप्पा मारण्यात गर्क होतो. शनिवारची दुपार ह्या धावपळीत गेली. अचानक संध्याकाळी त्याच्या फोनवर एक निनावी नंबर वाजू लागतो. तो फोन उचलत नाही. तरी फोन वाजायचा बंद होत नाही, शेवटी वैतागून तो फोन उचलतो. समोरून एक व्यक्ती त्याच्या नावाची चौकशी करत असते आणि बॉबी स्वतः फोनवर आहे समजताच धडाधडा बोलू लागते. बॉबीला दरदरून घाम फुटतो. तो फोन ठेवतो आणि तडक जयेशभाईंना फोन करतो. कॅफेमध्ये बँकेची लोकं, त्यांची सॉफ्टवेअर इंस्टॉल करत असतात, बॉबीला काय करावे सुचत नव्हते. बँकेशी आगाऊ व्यवहार झाल्याने, तो आता आयत्यावेळी मागे हटू शकणार नव्हता आणि तो फोन आल्यावर तो एक क्षण बसू शकत नव्हता.

तो आपल्या बायकोला फोन लावतो, “बिंदू, विलास को भेज रहा हुं. गाडी का चाबी देना उसको. साथ मैं कुछ कॅश भी देना मेरे लिये. अर्जंट हैं. मैं दोन-तीन दिन बाहर जा रहा हुं. फिकर मत करना”

त्याच्या बायकोला ह्या अश्या विचित्र वागण्याची एव्हाना सवय झाली होती. ती निमुटपणे हो म्हणते आणि फोन ठेवते.

जयेशभाई दुकानावर येतात,”क्या हुवा बॉबीभाई?”

बॉबी निराशपणे म्हणतो, “हमें नागपूर जाना पडेगा. वों भी अभी निकलना होगा.”

काहीतरी गडबड झालीय, हे लक्षात यायला जयेशभाईंना वेळ लागला नाही. बॉबीला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. इतका मोठ्ठा सेटअप, कोणाच्या भरोश्यावर सोडून जायचा? उद्या बँकेच्या लोकांना काही तांत्रिक मदत लागली तर कोण करणार? मग अचानक काही आठवून त्याने एक फोन केला…

“हॅलो सुहास, बेटा एक काम था रे. बिजी हैं क्या?”

(क्रमशः)

– सुझे !!

भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

भाग तिसरा – MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

भाग अंतिम – MH-02-XA-40X2 – भाग अंतिम

(पुन्हा) शाळेला जातो मी…

आठवतो काय आजचा दिवस? काय म्हणता नाही? काय हे कसं विसरू शकता तुम्ही?

एक-दीड महिना मामाच्या गावी मस्त धम्माल, मज्जा करून शाळेच्या पुढल्या वर्गात जाणारे आपणचं.. गावाला जाऊन आलो, की सर्वात आधी धावपळ शाळेच्या खरेदीची – पुस्तके, वह्या, दप्तर, रेनकोट, पावसाळी बूट, गणवेश, नवीन डबा. मज्जा ना एकदम… 🙂 🙂

पहिला दिवस शाळेचा - साभार गुगल

जून महिन्याची १३-१४ तारीख म्हटली, की सगळी छोटी मंडळी शाळेच्या गेटवर आपापली दप्तरं सांभाळत, हातात रंगीबेरंगी वॉटरबॅग घेऊन आणि चेहऱ्यावर काहीश्या त्रासिक आणि काहीश्या आनंदी मुद्रा घेऊन उभे ठाकलेले दिसतात. पावसाला हलकेच सुरुवात झाली असते, आकाशातले ढग कुतूहलाने शाळेच्या भोवती जमा होऊन ह्या चिमुरड्यांना बघत बसतात. पिल्लू एका वर्षाने मोठ्ठं झालं, म्हणून आई-बाबांच्या डोळ्याच्या कडा हळूच पाणावत असतात. दूर लांभ उभे राहून, शाळेतल्या रांगेत उभ्या आपल्या चिमण्या-चिमणीकडे एकटक बघत उभे असतात. त्याने/तिने आपल्याकडे बघितले की, हात उंचावून त्याला प्रतिसाद देतात. सगळं नीट ठेव, मस्ती करू नकोस असे खुणेनेच बजावून सांगतात. 🙂 🙂

इकडे प्रत्येक लहानग्याच्या मनात एक उत्सुकता असते. नवीन वर्गात जायला मिळणार, नवीन जागा मिळणार. माझ्या बाकाला कप्पा मोठा असेल नं, त्यात दप्तर राहील नं, मला खिडकीतून बाहेर बघता येईल नं, पाण्याची बाटली नीट राहील नं, आज डब्यात आईने काय खाऊ दिला असेल, मधल्या सुट्टीत काय खेळायचं, तासानुसार पुस्तकं-वह्या काढून ठेवायची आणि सगळ्यात शेवटी पेन/पेन्सिल ठेवायला बाकाला असलेल्या जागेत, एखादी भडक पेन्सिल काढून Trespassers will be prosecuted अश्या थाटात बसायचं 😀

खरंच तो दिवस आजही आठवतो, आदल्या दिवसापर्यंत चालेलेली तयारी. शाळेच्या गणवेशापासून, जेवणाच्या डब्याची तयारी. आदल्या रात्री बाबांनी नवीन पुस्तकाना घालून दिलेली चापचोप कव्हर्स आणि आपण फक्त स्टिकर लावण्याची घेतलेली मेहनत (भारताच्या पंतप्रधानांसारखं). मग ती कव्हर्स फिट्टं बसावीत म्हणून, गादीखाली ठेवून स्वत: त्यावर चिरनिद्रा घ्यायची 😉

पाण्याची वॉटरबॅग ( 😀 ) आणि कंपासपेटी, हे शालेय जीवनात बघितलेले आणि अनुभवलेले एक प्रकारचे सायफाय फिक्शन. कुठून बटण दाबून, कुठून काय बाहेर येईल, याचा काही नेम नाही. शाळेचे दप्तर म्हणजे Treasure hunt चा एक नकाशा. दप्तराला जमेल तितके जास्त खण हवेत आणि आपण ते कशासाठी वापरायचे ते आणल्याबरोबर ठरवून मोकळं व्हायचं. मग निदान पहिले १०-१५ दिवस नित्यनेमाने ते ठरवून करायचं देखील. मग आहेचं ये रे माझ्या मागल्या. नंतर स्वतःलाचं शिव्या देतो, झक मारायला एवढे खणाचे दप्तर घेतले. एक गोष्ट सापडेल तर शप्पथ 😀

नवीन पुस्तकांचा वास तो काय वर्णावा…एका हातात पुस्तक घट्ट धरून, डोळे बंद करून, नाकाजवळून त्याची पानं सळसळत फिरवायची… स्वर्गसुख !!! मग एक एक तास सुरु होतात. प्रत्येक विषयाला नवीन कोरी वही आणि वहीच्या पहिल्या पानावर सुबक हस्ताक्षरात आपले नाव आणि नंतर पुढली सगळी पानं डॉक्टरी लिपीत :p

मग एक-एक तास संपल्याची घंटा वाजते, एक-एक दिवस पुढे जातो आणि सगळी बच्चेकंपनी एक-एक दिवसाने मोठी होऊ लागतात. एक मंद पण सुखावणारा प्रवास. निदान अश्या गोष्टींसाठी तरी कधीच मोठ होऊ नये.. काय म्हणता? 🙂

–सुझे 🙂

(जुनी पोस्ट पुन्हा नव्याने :D)