एका लग्नाची गोष्ट…

पिल्लू, दागिने, शालू सावरत बेडवर काहीशी अवघडून बसली होती. बाकी सगळीकडे निरव शांतता होती. तिच्या हालचालीमुळे वाजणाऱ्या बांगड्या, त्या शांततेचा भंग करत होती. ती खुप दमली होती दिवसभराच्या समारंभामुळे, पण तिला झोप येत नव्हती. ती स्वतःच्या विचारात गुंग झाली होती. गेल्या काही वर्षात घडलेल्या घडामोडी, आणि अचानक १५ दिवसात आलेल्या एका वेगवान वळणाने, तिचे आयुष्य पूर्णतः बदलून टाकले होते. तशी ती या बदलला खुप आधीपासून तयार होती, पण आज प्रत्यक्ष त्याला सामोरे जाताना तिला प्रचंड भीती वाटत होती. इतक्या वर्षांपासून असलेले तिच्या आई-बाबांचे स्वप्न आज साकार झाले होते. त्यांनी खुप थाटामाटाने आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न लावून दिले. आपल्या मुलीची जड अंत:करणाने, तिच्या सासरी पाठवणी केली होती. सगळं खुप खुप छान पार पाडलं होत. तिला किती तरी प्रसंगांना धीराने तोंड द्यावे लागले होत गेल्या काही दिवसात, ते सगळं-सगळं आठवत होत तिला.

आई-बाबांनी जेव्हा दिल्लीस्थित मंदार चे स्थळ पिल्लूला सुचवलं, तेव्हा त्यांना तिच्याकडून होकाराचीच अपेक्षा होती. कारण पिल्लूने खुप वेळ घेतला होता आधीच आणि आता त्यांना अजुन जास्त थांबता आलं नसतं. तिने ही जास्त आढेवेढे न घेता, दोन भेटीत होकार कळवला होता. दोघेही खुप खुप आनंदी झाले होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न होणार, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता आणि त्यांना आनंदी बघून पिल्लूला खुप समाधान वाटत होत. तिला काळजी होती ती फक्त त्याची. त्याला हे कसं सांगायचे, या विचारात तिने अख्खी रात्र जागून काढली आणि सकाळी त्याला मोठ्या धीराने फोन करून सांगितलं, की मला तुला भेटायचं आहे. त्यांनी बोलणे खुप कमी केल्यामुळे, अचानक पिल्लूला भेटता येणार या खुशीने तो धावतच त्यांच्या नेहमी भेटायच्या ठिकाणी निघाला. तो पोचायच्या आधीच, ती तिथे हजर होती. एका कोपऱ्यातील टेबलावर बसलेली होती. थोडीशी अस्वस्थ, नाराज, हरवलेली वाटत होती ती. हा तिच्यासमोर जाऊन बसला, आणि म्हणाला “काय झालं बाळा, तब्येत ठीक नाही आहे का? चेहरा का असा पडलाय? आज तुला तब्बल दीड महिन्यांनी बघतोय पिल्लू, किती बारीक झालीयेस…बोल ना गप्प का?” तिने मानेनेच नकार देत वेटरला ऑर्डर दिली, त्याच्यासाठी कॉफ्फी आणि तिच्यासाठी ज्यूस. त्याने तिला घरून आणलेला चिवड्याचा डब्बा दिला, तिला चिवडा खुप आवडायचा म्हणून, त्याने घरी न सांगता लपवून तो तिच्यासाठी आणला होता.

ती शांतच होती. एक मोठा सुस्कारा सोडून, तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली. “शोना, एक चांगली बातमी आहे.” तो काहीसा सावध झाला, त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मान खाली करून कॉफीकडे एकटक बघू लागला आणि चढत्या सुरात म्हणाला, “कधी ठरलं, कोण आहे मुलगा? इतकी घाई गरजेची होती का?” ती काहीशी बावरली, आणि त्याला सगळं सांगू लागली, पण तो प्रचंड चिडला होता. त्याला माहित होत हे होणार आहे, तरी त्याला राग आला होता आणि तो तडक उठायला निघाला तिथून. तिने हलकेच त्याचा हात धरला आणि म्हणाली, “सॉरी, पण हे होणारंच होत आणि तुला हे माहित होत नं शोन्या? मला तुझी साथ हवी आहे आयुष्यभरासाठी, पण एक मित्र म्हणून….” तिला पुढे काही बोलता येत नव्हते, त्याने तिचा हात धरून रिक्षात बसवलं आणि तिच्या ऑफिसपर्यंत सोडायला निघाला. वाटेत तो तिच्याशी काहीच नाही बोलला, काहीसा घुश्यातच होता. तिने त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण तो काही बोलला नाही. तिला ऑफिसच्या गेटवर सोडून, तिच्या पाठीवर एक धीराची थाप मारली आणि डोळ्यांच्या कडा पुसत तो मागे फिरला.

तिने त्याला भेटायचा, बोलायचा खुप प्रयत्न केला. पण तो खुप रागावला होता, खुप चीड चीड करत होता, सारखा तिच्याशी भांडत होता. तिला हे काहीसे अपेक्षित होते म्हणा, पण ती भांडणे इतकी वाढली की दोघांनी एकमेकांशी बोलणे कायमचे बंद केले. ती लग्नाच्या तयारीत गुंतून गेली आणि हा नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला. दोघांनाही राहवत नव्हते एकमेकांशी बोलल्याशिवाय, पण भांडणे टाळण्यासाठी मन मारत होते दोघेही. त्याने तिला साफ सांगितलं होत, की तिच्या लग्नाच्या एकाही कार्यक्रमाला तो जाणार नव्हता. ती पार कोलमडून गेली होती, त्याचे ते शब्द ऐकून. ती स्वतःला विचारायची की, हा असं का वागतोय. त्याला त्रास होतोय हे माहितेय, पण मला ही हे सगळं करणे कठीण आहे. तो मला का नाही समजून घेत आहे. तिला त्याचा खुप राग आला होता, पण मनोमन तिला वाटतं होत, राग उतरला की शांत होईल. तिचा थोडा भ्रमनिरास झाला जेव्हा तो साखरपुड्याला आला नाही, तिने त्याला फोनकरून जाब विचारला तर तो रागात म्हणाला मी तुला परत कधीच भेटणार नाही आणि फोन ठेवून दिला. ती तिकडे रडायला लागली आणि हा इथे. त्याला माहित होतं, की आपण चुकीचं वागतोय, पण तिच्यासमोर गेल्यावर स्वतःला सावरणे खुप कठीण आहे, हे ही त्याला माहित होते. म्हणूनच तो असा उद्धटपणे वागत होता. ती सुद्धा वर-वर राग दाखवून, सारखं त्याला लग्नाला यायची गळ घालत होती. पण तो काही ऐकेना, आणि शेवटी तिनेपण त्याला रागात सांगितलं नको येउस लग्नाला, आणि त्याला लग्नाची पत्रिका ही पाठवणार नाही असे सांगितले.

काही दिवस लग्नाच्या तयारीत सगळे मश्गुल झाले होते. होता होता लग्नाचा दिवस उजाडला. तिने आदल्यादिवशी रात्री २ वाजता, हळद झाल्यावर न राहवून त्याला लग्नाची पत्रिका पाठवली, आणि लिहिले नाही आलास तरी चालेल, पण तुला बोलावणे माझ कर्तव्य आहे. त्यामुळे तू न वाचताच, डिलीट करू शकतोस हा इमेल. ती लॅपटॉप तसाच सुरु ठेवून झोपली. लग्न दुपारचं असल्याने, सकाळी आरामात उठले तरी तिला चालणार होते. थकव्यामुळे तिला प्रचंड सुस्ती आली होती. ती सकाळी उठली तेव्हा इनबॉक्समध्ये एक अनरीड मेसेज होता, आणि तो त्याचाच होता.

त्याने लिहलं होत, “पिल्लू, सर्वप्रथम तुझे खुप खुप अभिनंदन. आज आयुष्याच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाला तू सामोरी जात आहेस. माझ्या तुला खुप खुप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद. मी तुला का भेटलो नाही किंवा तुझ्या लग्नाला का आलो नाही, याचं स्पष्टीकरण मागू नकोस प्लीज. मी नाही देऊ शकणार. तुला फक्त एक सांगायचं आहे, मंदारमध्ये कधी मला शोधू नकोस, नाही तर त्याला तू कधीच आपलंस करू शकणार नाहीस. काळजी घे. आणि पुनश्च अभिनंदन. सुखी रहा!!”

तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, का कोण जाणे आपण चूक करतो का असं वाटायला लागलं. तितक्यात आई आली आणि तिला लवकर लवकर तयारी करायला सांगून निघून गेली. तिने डोळे पुसले, हातावर काढलेल्या मेंदीच्या नक्षीकडे बघत स्वतःला समजवायला लागली, हेच होत नशिबात आणि आता मागे हटणे नाही आणि क्षणात तयारीत गुंग झाली. तिला हे सगळं लवकर संपवायचं होत.

लग्नघटिका समीप आली. ऊंची लग्नाचा शालू, दागिन्यांनी सजून ती लग्न मंडपात आली. एखाद्या राजकान्येसारखी दिसत होती ती. तिने सगळीकडे नजर फिरवली, तो आला नव्हता. तिला वाईट वाटलं, राग आला, पण शेवटी तो नाही आला हे बरंच झालं. कारण त्याला इथे तुटताना, कोसळताना बघून, तिला त्याला सावरायला जमलं नसतं. ती अग्निकुंडा समोर शांत बसली आणि हलकेच मंदारकडे बघितले. तो हसला, आणि मुंडावळ्या सावरू लागला. मंत्रघोषाने वातावरण भरून गेलं होत. एक एक विधि पार पडत होते. एकदम प्रसन्न वातावरण होत. त्याचं शुभमंगल सुंदररीत्या पार पडलं. आई-बाबांनी एकदम साश्रुनयनांनी पोरीचे कन्यादान केलं आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तिचे सगळे मित्र-नातेवाईक दूर दुरून आले होते, पण तो…तोच फक्त काय तो आला नव्हता…. 😦

इतक्यात थोडी कुजबुज होऊन दार बंद केल्याचा आवाज झाला, ती थोडी बावरली. अजुन जास्त अवघडून बसली. खुप सुंदर दिसत होती ती, मंदार तिच्या सौंदर्याकडे एकटक बघत राहिला होता. तो हलकेच तिच्या जवळ आला. तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, “काळजी नको करूस, तुला काय वाटत असेल, ते मी समजू शकतो. आपण एकमेकांना अजुन खुप वेळ देऊ. आपल्या दोघांना मिळून हा संसार सुखाचा करू. तुला मी सगळी सगळी सुख देण्याचा प्रयत्न करेन, मला फक्त तुझी साथ हवी आहे. खुप जपायचं आहे तुला, आनंदी बघायचं आहे तुला. माझी साथ देशील नं?”

तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली. का माहित पण, त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत होत नव्हती, पण एका क्षणात, आपल्या शरीरातील बळ एकवटून आणि मनातील घालमेल दूर सारून त्याला घट्ट मिठी मारत ती म्हणाली, “हो मंदार नक्की, नक्की साथ देईन तुझी, अगदी काही झालं तरी. मी वचन देते..”

– या आधीची स्वैरलिखाणे इथे वाचायला मिळतील.
– ही पोस्ट एका अनामिक ब्लॉग वाचकाला समर्पित, फक्त या वाचकाच्या आग्रहाखातर ही पोस्ट लिहायचं धाडस केलंय. धन्स !!

– सुझे 🙂