ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५

अविस्मरणीय नाणेघाट…!!

गेल्यावर्षी मराठी ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने सेनापतींची (रोहन चौधरी) प्रत्यक्ष भेट झाली होती. त्या भेटी आधीही रोहनचा ब्लॉग वाचत होतोच, त्याने केलेली सह्यभ्रमंती बघून/वाचून, मला सह्याद्रीची जास्त ओढ लागली. मेळाव्यात असंच गप्पा मारताना, त्याने मराठी ब्लॉगर्स ट्रेकची कल्पना मांडली होती. आपल्या मराठी ब्लॉगर्समध्ये बहुसंख्य ब्लॉगर्संना भटकंती आणि विशेषतः शिवाजीमहारांच्या गड-किल्ल्यांची भटकंती आवडत असल्याने ही कल्पना सगळ्यांनी उचलून धरली होती. त्याप्रमाणे रोहनने १७ जुलै रोजी,विसापूर येथे पहिला मराठी ब्लॉगर्स ट्रेक आयोजित केला होता. त्यावेळी सगळ्यांनी उत्साहात नावनोंदणीदेखील केली होती, पण एक-एक करत सगळे गळू लागले आणि शेवटी आम्ही फक्त ६ जण, विसापूर ट्रेकला गेलो आणि भरपूर धम्माल केली. सांगायचा मुद्दा हा, की तो दिवस माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस होता. एक तर खुद्द सेनापतींच्यासोबत किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य मिळालं आणि दुसरं कारण म्हणजे, खुप खुप चांगले मित्र मिळाले. 🙂

त्या दिवसानंतर आम्ही सर्वांनी एकत्र किती गड-किल्ले सर केले, त्याची गणतीचं नाही. ह्या वर्षीदेखील १७ तारखेला तसाच ट्रेक जमवता येतंय का, ते बघत होतो. अनायासे रविवार आला. दिपकला आधीच सांगितलं होत, ज्या दिवशी आपण सगळे पहिल्यांदा भेटलो होतो, तो दिवस तसाचं साजरा करायचा, जसा एका वर्षापूर्वी केला होता. खुप पर्याय आमच्यासमोर होते, एकमेकांना ईमेल्स सुरु झाले. इथे जाऊया का, तिथे जाऊया का?, असं करत करत शेवटी नाणेघाट नक्की केला. 🙂

मी, दिपक, सागर, भारत, देवेंद्र, आका आणि प्रतिभा वहिनी, असे सात जण नक्की झालो. सेनापती दुसऱ्या दिवशी दुबईला जाणार होते, त्यामुळे त्यांना यायला जमले नाही. त्यात मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु होता. पावसाच्या गोंधळामुळे मला पोचायला तब्बल ४५ मिनिटे उशीर झाला :(, पण गाडी असल्याने काही काळजी नव्हती. मी येईपर्यंत ठाण्याच्या प्रसिद्ध अशोक हॉटेलमध्ये, सगळ्यांनी नाश्ता उरकून घेतला आणि मला पोहे आणि उपमा पार्सल करून घेतले. बरोब्बर ७ वाजता आम्ही ठाण्याहून निघालो. कल्याणच्या रस्त्याने पार कंबरडेच मोडले, गाडीचे आणि आमचेही. मुरबाडहून पुढे, वैशाखिरे गावातून थोडीपुढेचं नाणेघाटाची वाट सुरु होते. रस्त्यावरचं तुम्हाला नाणेघाट –>असा दिशादर्शक दिसेलचं. तिथे आम्ही गाडी पार्क केली. आधीच ३-४ गाड्या तिथे उभ्या होत्या. त्यामुळे खूप सारी मंडळी, ह्या वाटेवर आहेत हे ताडले. साधारण ९:१५ च्या सुमारास आम्ही तिथून निघालो. वातावरण एकदम प्रसन्न होतं. आकाशात ढगांची दाटीवाटी सुरु होती. हिरवागार निसर्ग त्या मंद हवेत, डौलाने डुलत होता. जोरदार पाऊस पडणार, म्हणून आम्ही खुश होतो.

वैशाखिरे गावातून नानाच्या अंगठ्याचे पहिले दर्शन...

आमच्या ह्या छोटेखानी ग्रुपला लीड करत होती, प्रतिभा आनंद काळे. ओजसच्या बाळंतपणानंतर वहिनींचा हा पहिलाचं ट्रेक. त्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यांनी आम्हाला चालता चालता थोडीफार माहिती दिली. जीवधन करून नाणेघाट करता येतो असे सांगितले. तेवढ्यात उजव्या बाजूला, नानाचा अंगठा धुक्यातूनवर डोके वर काढू लागला. सगळ्यांचे कॅमेरे ते नयनरम्य दृश्य टिपण्यात मग्न झाले. आम्हाला आमचे ध्येय दिसतं होते. वाट सोप्पी होती, पण लांबलचक होती.

सेनापतींच्या ब्लॉगवर याबद्दल वाचले होतेचं. नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारास सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. ह्या घाटाचा वापर करण्यासाठी व्यापारांकडून जकात वसूल केली जायची. त्यासाठी घाटाच्या सुरुवातीला एक मोठ्ठे दगडाचे रांजण ठेवले आहे. त्यात नाणी/पैसे गोळा केले जायचे, म्हणून ह्याला नाणेघाट असं म्हणतात. ह्या जकातीच्या बदल्यात व्यापारांच्या सामानाला, सैन्याद्वारे सुरक्षा पुरवली जायची. त्या सैन्यासाठी घाट मार्गात अनेक लहान-मोठ्या गुहा आणि पाण्याची टाकी खोदलेली आहेत. घाटाच्या वरच्या बाजूला गावातून पक्का रस्ता आहे, जिथून तुम्ही गाडीने नाणेघाटात येऊ शकता.

आम्ही सारे..
फोटो खूप झाले, आता पटापटा चालते व्हा….
नाणेघाट - मुख्य वाट

आम्हाला नाणेघाटात पोचायला पावणे तीन तास लागले. रमत गमत, फोटोसेशन करत आम्ही वर पोचलो. तिथून खाली नजर टाकली आणि दूर कुठे तरी लांब, गावाचं एक छोटं अस्तित्व आणि हिरवीगार निसर्गाची दुलई इतकंच दिसतं होत. आम्हाला जग जिंकल्यासारखा आनंद झाला होता. आम्हाला वाटलं वर चढताना पाऊस पडेल, पण वरुणराजा नाराज दिसतं होता. आम्ही घामाने पुरते भिजलो होतो, पाऊस पडला नाहीचं. नाणेघाटाच्या मुख्य व्यापारी मार्गाने आम्ही वर निघालो, तेव्हा हळू हळू पाऊस सुरु झाला. तिथे ट्रेकर्सची (??) भरपूर गर्दी होती, जत्रा भरली होती असे म्हणा हवंतर. काही उत्साही वयस्कर मंडळीदेखील तिथे होती. आम्ही गणेशाचे दर्शन घेऊन, खादाडी करायला बसलो. ब्रेड-श्रीखंड-जाम आणि मक्याचा चिवडा-लेमन भेळ एकत्र करून, मस्त पोटभर जेवलो. एव्हाना पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली होती. सगळीकडे दाट धुके दाटले होते. थोडी भटकंती केली, मस्त गरमागरम चहा घेतला. २ वाजले आम्हाला परतीच्या वाटेवर निघायचं होतं, तिथून निघावं असं वाटत नव्हतं…..पण 😦

कातळात खोदलेले पाण्याचे टाके….
नाणेघाट – मुख्य वाट..
गुहेतील गणेशमूर्ती..
जकातीचा रांजण
नाणेघाटातली मुख्य गुहा..
देवेंद्रराजे..
दीपक..
खा रे खा…
धुक्यात हरवलेली नाणेघाटामधली मुख्य वाट …
परत येताना जबरदस्त पाऊस सुरु झाला.. पाण्याचे लोट डोंगरावरून खाली बदाबदा कोसळत होते…. 🙂
पाण्याचे लोट 🙂 🙂

घाटाचे ते दृश्य डोळ्यात सामावून घेत, गप्पागोष्टी करत आम्ही लगबगीने खाली उतरू लागलो. पावसाचा जोर प्रचंड होता. शुभ्र पाण्याचे लोटच्या लोट डोंगरावरून खाली कोसळत होते. आम्ही २ वाजता खाली उतरायला सुरुवात केली आणि अडीच तासात खाली पायथ्याशी पोचलो. नानाचा अंगठा धुक्यात हरवून गेला होता. तिथे खूप पाऊस पडत होता. बाजूला जीवधन पठारावर असलेला खडा पारसी सुळका आम्हाला खुणवत होता. त्याला लवकरचं येतो भेटीला, असं सांगून मुंबईच्या दिशेने सुसाट निघालो.

संपूर्ण दिवस सार्थकी लागला होता. अजिबात थकवा जाणवत नव्हता. याचवेळी आम्ही ठरवले, की जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी असाचं एक ट्रेक आयोजित करायचा आणि त्यात जमेल तितक्या ब्लॉगर मित्रांना घेऊन जायचं. सेनापतींनी सुरु केलेली ही प्रथा, आम्ही सुरु ठेवायचा नक्की प्रयत्न करू. !!

– सुझे 🙂

ट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली

३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल 😦 मग विचार केला निदान पहिला वीकेंड तरी एखाद्या किल्ल्यावर जाव. शांत थोडावेळ निवांत कुठल्यातरी गडाच्या तटबंदीवर, उंच टेकडीवर बसाव आणि डोळे बंद कराव आणि मोठा श्वास घ्यावा. मग ठरवल की ३१ च्या रात्री करायचा ट्रेक रविवारी २ जानेवारीला करायचा. गड ठरलाच होता माहुली (आसनगाव)

किल्ले माहुली, मुंबई-नाशिक हाय वे जवळ आहे. मुंबईहून इथे लोकल ट्रेनने येता येतं किवा हाय वे वरुन. ट्रेनने सेंट्रल रेलवेच्या आसनगाव स्टेशनला उतरून एसटीने किवा रिक्षाने माहुली गावापर्यंत पोहचता येत. ते अंतर अंदाजे ६ किमी आहे. गावात असलेल्या गीताभारती मंदिराच्या मागून किल्ल्याकडे जाण्याची पायवाट आहे. सगळीकडे मार्किंग्स असल्यामुळे रस्ता शोधायला कष्ट घ्यावे लागत नाहीत. मंदिराच्या इथूनच किवा ट्रेनमधूनच तुम्हाला प्रसिद्ध नवरा, नवरी आणि भटोबा सुळके दिसतील.

नवरा, नवरी आणि भटोबा सुळके (भंडारगड)
हाच तो प्रसिद्ध धबधबा..मी इथे २००८ मध्ये गेलो होतो

ह्याच किल्ल्यावरुन येणारा एक प्रसिद्ध धबधबा आहे. जिथे वॉटर रॅपल्लिंग केल जात. मी १० ऑगस्ट २००८ ला तिथे गेलो होतो, पण किल्ल्यावर गेलो नव्हतो. त्यामुळे आज किल्ल्यावर जाण्याचा योग आला, हि अपार समाधानाची गोष्ट होती.. रोहन आणि अनिशने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित गर्दी होती. खूप जण आम्हाला वाटेत भेटलेसुद्धा. त्यात दुकल्यांची म्हणजेच मराठीत आपण कपल, जोड्या वगैरे म्हणतो ती होती. (मायला कसली हौस ती प्रेमाची, रस्ताभर चाळे करत जातात नालायक) x-(

भंडारगड, माहुली आणि पळसगड…

शेवटचा टप्पा…

असो, बघायला गेलं तर हा गड फार नशीबवान आहे. साक्षात महाराजांनी लहानपणी इथे काही दिवसांसाठी वास्तव्य केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला. इतिहासात ह्या किल्ल्याची अजून एक नोंद सापडते ती पुरंदरच्या तहात. ह्या तहामध्ये महाराजांना २३ किल्ले मोघलांना द्यावे लागले होते. तहानंतर अवघ्या अडीच वर्षात महाराजांनी हे २३ किल्ले जिंकलेच, त्यात भर म्हणून अजून २०० हून जास्त किल्ले स्वराज्यात सामावून घेतले.

गड चढायला सोप्पा आहे पण ते चढून जाण्याचा अंतर खूप जास्त होत. गेले ३ महिने ट्रेक बंद असल्यामुळे खूप दमछाक होत होती. लाल माती आणि त्यावर असलेले ते गुळगुळीत गोटे आम्हाला खूप वेळा पाडण्याचे प्रयत्‍न करीत होते. शेवटी वाटेत थांबत थांबत वर पोचलो. शेवटची शीडी चढून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचणार याचा खूप आनंद झाला. तिथेच बाजूला असलेल्या एका मोठ्या दगडावर मांडी घालून बसलो, डोळे मिटले आणि उघडून त्या दरीत डोकावलो आणि आपण केलेल्या परिश्रामाचे चीज झाले असा म्हणून मनोमन सुखावलो 🙂 सगळा थकवा नाहीसा झाला. एक वेगळाच उत्साह अंगी संचारला. तिथे दोन तीन ग्रूप्स आधीच आले होते. त्यांनी आम्हाला महादरवाज्याकडे कसे जायचं वगैरे सांगितले.

कमान महादरवाज्याची.. इथे अजुन फोटो काढू शकलो नाही 😦

पाण्याच टाक..एकदम स्वच्छ आणि थंड पाणी 🙂

थोड अंतर चालताच डाव्या बाजूला पाण्याच एक टाकं आहे, पण ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही. आम्ही त्या गार गार पाण्यात हात पाय धुवून मस्त फ्रेश झालो. गडावर झाडी खूपच वाढली आहे आणि त्यात पायवाट चुकण्याची खूपच शक्यता होती. मग आम्ही महादरवाज्याकडे निघलो. तिथे उर्दू शिलालेख आणि शिवलिंग बघितले. इथे जे पाण्याचे टाके आहे, त्यात एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी असत. “पण तिथुनच बाजूला असलेल्या महादरवाजा आणि देवड्या यात प्रचंड घाणीच साम्राज्य होत. पिशव्या, उरलेल जेवण, हाड्, थर्मकोलच्या प्लेट्स… रोहन बोलला त्याप्रमाणे हा पिकनिक स्पॉट आहे याची खात्री पटली.” 😦

पाटलाचं केळवण
खा रे खा 🙂
थ्री ट्रेकर्स 🙂

मग आम्ही थोड खाउन घ्यायचं ठरवलं. सगळ्यांत स्पेशल डब्बा होता “ज्यो”चा, मस्त गाजराचा हलवा. मग आम्ही तो डबा एक एक घास करत खाउ लागलो. नो डाउट मी आणि दीपक ने जास्त ताव मारला त्यावर, कारण तो खरच खूप छान झाला होता. मग तिथून आम्ही निघालो भंडारगडाकडे. मध्ये एक जुनाट मंदिर/वाडा बघितला, त्यात मध्यभागी एखादी मूर्ती असावी पण सगळी पडझड झाली होती. समोरच एक छोट तळ आहे तिथून पुढे दहा मिनिटे पुढे चालत गेलो की भंडारगड सुरू होतो एक दरी ओलांडून पुढे गेलो की पुढे नवरा, नवरी आणि कल्याण दरवाजा, पण तिथे आम्ही जाउ शकलो नाही कारण आमच्याकडे रोप नव्हता. 😦 नवरा, नवरीला दुरुनच शुभेच्छा देत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

गड चढायला तीन साडे तीन तास लागले, पण आम्ही एक तास ४५ मिनिटात उतरून खाली आलो. मस्त हॅण्डपंपवर हात पाय धुवून गरमागरम पोहे आणि चहा मारला 🙂 आणि मग घरी पोचलो रात्री १० ला.

२०११ मधला हा पहिला ट्रेक. आशा करतो की असे नवनवीन किल्ले ह्या वर्षात फिरता येतील. 🙂

एक विनंती:

महाराजांच्या कारकिर्दीची साक्ष देणारे हे किल्ले, आपला इतिहास त्या अभेद्य तटबंदीतून ताठ मानेने सांगतात, भरभरून बोलतात. फक्त तो इतिहास ऐकायची इच्छाशक्ति हवी. पिकनिक करायला रेसॉर्टस, हॉटेल्स पडली आहेत. तिथे हवा तो धुमाकूळ घाला, पण किल्ल्यावर नको. अश्या किल्ल्याचं पावित्र्य जपणं आपलं कर्तव्य आहे. कसं वाटत असेल महाराजांना, आपल्या किल्ल्याची अशी दुरवस्था पाहताना? ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे लढले, आपल्या जिवाच रान केललं. तिथे आपण साधी स्वच्छता सुद्धा राखु शकत नाही. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. असं नका करू, विनंती करतो. नाही तर पुढल्यावेळी असे चाळे करणाऱ्यांना, आमचे चाळे सहन करावे लागतील.

— सुझे 🙂