ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५

किल्ले सुधागड

सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक  अप्रतिम किल्ला. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याला पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरापासून पुढे १२ किलोमीटर जावं लागत.  पाछापूर इथे ठाकरवाडीपासून किल्याकडे जायला रस्ता आहे. तसाच धोणशे गावातूनदेखील आहे. धोणशेमधून किल्ला चढायला सुरूवात केली, की आपण महादरवाजाने किल्ल्यावर जातो. ह्या किल्ल्याचे खरे नाव होतं भोरापगड, पण शिवाजी महाराजांनी त्याचं नामकरण सुधागड केलं. ह्या किल्ल्याचा इतिहासातील अजुन एक संदर्भ म्हणजे, अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस,  आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद, ह्याना संभाजी महाराजांनी सुनावलेली शिक्षा. त्यांना हत्तीच्या पायाखाली इथेच देण्यात आल होतं.

विसापूर ट्रेकला ओळख झाल्यावर दिपक ने सुधागडबद्दल विचारले होते. किल्ला म्हटलं की कामाच्या वेळा सांभाळून धुम ठोकायची एवढच मला जमत 🙂 ह्या वेळी देखील तसच, कारण नेमका ट्रेक नेमका रविवारी होता आणि मला रविवारी रात्री (सोमवार पहाटे) ऑफीसला जायच होतं. शनिवारी रात्री निघून रविवार संध्याकाळी परत यायच असा ठरवल. दीपक, अनुजा आणि आशुतोषच ऑफीस होत. भेटायाची वेळ संध्याकाळी ६ मग ८ ठरली अंधेरीला. तिघे ही ऑफीसमधून परस्पर आले होते. आता वाट बघायची होती ती महेशची दिपकचा वर्ग मित्र, ज्याची गाडी होती. तो काही कारणामुळे बाहेर गेल्याने थोडा उशिरा येणार होता. ह्याच वेळेचा आम्ही फायदा घेऊन हॉटेल आरफाला (जोगेश्वरी) जायच ठरवला. रिक्षा करून पोचलो यथेच्छ खादाडी केली पोट भर. मग स्टेशनला येऊन परत महेशची वाट बघत राहिलो. खूपच उशीर होत होता, ११ वाजले होते, म्हटला हा येतो की नाही 😉 दिपक त्याला फोन करतोय तर फोन पण बंद, म्हटला झाला दिपकचा मारुती (अनुजा, वाचला ग हा ;)) पण शेवटी महेशने फोन केला आणि आम्हाला उचलला अंधेरीहून.

मग मस्त गप्पा सुरू होत्या, बाहेर वातावरण मस्त होत, आम्ही मस्त एसीलावून, गाणी ऐकत, गप्पा मारत प्रवास सुरू केला. मग काही ट्रेकच्या आठवणी, तू इथे गेलास का? हा गड मस्त आहे वगेरे वगेरे. पनवेलहून पालीला जायच रस्ता धरला आणि मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढग फुटले होते अक्षरश:, म्हटल असा पाउस पडला तर काय किल्ला धड बघता यायचा नाही, पण पाउस काही थांबायला तयार नव्हता. मध्ये चहा घेऊन पालीकडे निघालो, झोप होती डोळ्यावर, आणि एसीचे वारे मला डुलक्या काढायला छान निमित्त होत. पाउस पण येऊन जाउन होता, पण जेव्हापण यायचा घाबरवून सोडायचा.

किल्ले सुधागड

सरतेशेवटी आम्ही पालीला पोचलो पहाटे ३:३० ला, म्हटला आता थांबायच कुठे, म्हणून मंदिराच्या ट्रस्ट विश्रांती गृहामध्ये विचारणा केली, पण कुठेही जागा नव्हती. मग थोडे पुढे जाउन सुधागडला परस्पर जाउया का असा विचार केला आणि निघालो. पण परत पावसाने आपला प्रताप सुरू केला होता, मग आम्ही मंदिराकाडे परत येऊन, पार्किंगच्या इथे गाडी लावून, गाडीतच झोपायच ठरवला. झोप होतीच डोळ्यावर, पण गाडीत झोपायला जमत नव्हत मला नीट, डास पण खूप होते, पण डुलकी काढत काढत झोपलो, आणि ६ ला उठलो, आणि एका गावकरी बाजूने जाताना म्हणाला टायर पंचर आहे गाडीचा, माहीत आहे का? हे ऐकल्यावर सगळ्यांच्या झोपा उडाल्या 🙂 रात्री अनुजाने असा काही अंदाज, भीती व्यक्त केली होती खड्डे पडलेले रस्ते बघून आणि झाला पण तसच. झाला मग सकाळी ब्रश फिरवणारे हात आता जॅक फिरवत गाडीचा टायर बदलत होते आणि पंचर काढायला गावातील एका गॅरेजवर गेलो. दीपक आणि महेश पंचर उतरून काम बघत होते आणि गाडीत मी, अनुजा आणि आशु मस्त झोपा काढत होतो, कारण पाउस काही थांबला नव्हता आणि एक हवाहवासा गारवा सुटला होता. एव्हाना ९:३० वाजले होते, म्हटला आता कसा जमणार संध्याकाळी निघायला, पहाटे ऑफीस, अनुजा आणि आशुला तर पालघर, बोईसरला जायच होत..काय होणार होता काय माहीत?

असाच एक क्लिक 🙂

असे विचार करत करत गडाकडे जायला निघालो, ठाकरवाडीच्या वेशीपासून किल्ल्याचा काही भाग दिसायला सुरूवात झाली, मोठमोठे धबधबे किल्ल्यावरुन कोसळत होते, आणि धुक पण खूपच होता. मग शाळेजवळ गाडी लावून, किल्ल्याकडे जायला निघालो. गावातून छोटी पायवाट वर डोंगराकडे जात होती. ढग अंधारुन आले होते, पाउस काय थांबायच नाव घेत नव्हता, हळूहळू वाढतच होता. गावाच्या बाजूने वाहवरी नदी तुडुंब भरून वाहत होती. त्या प्रवाहात गडाचे धबधबे कोसळत होते आणि प्रवाहाला गती द्यायच काम करत होते. आम्ही गडाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन, एका धबधब्यात मस्त पाणी पिऊन, तोंडावर पाणी मारुन पुढे निघालो. गडाची तटबंदी आता स्पष्ट दिसत होती, तिथे जरा वेळ थांबून मस्त चॉकलेट खाल्ले, गप्पा मारल्या. तिथे पोचेपर्यंत ११:३० वाजले होते, किल्ला एका तासात चढून आलो होतो आम्ही. मग रोहणाने सांगितला तशी ठिकाण शोधू लागलो, प्रसिद्ध चोर दरवाजा अनुजाला दिसला आणि आम्ही त्या अरुंद वाटेत उतरलो आणि खाली सरकत सरकत त्या दरवाजाच्या बाहेर आलो, बाजूला खोबणीचा आधार घेऊन मी खाली उतरलो होतो, टॉर्च घेऊन. तिथून बाहेर पडल्यावर आशुने मला फोटो दाखवला की त्याच खोबणीत एक मोठी पाल होती, तस मला काही तरी नरम जाणवला होत, पण म्हटला झाड असेल 😉 तो फोटो बघून पार दचकलो मी. मग परत किल्ल्याच्या प्लाटूवर चढून धबधबे बघू लागलो, धुक्यामुळे आम्हाला फक्त पाण्याची एक पांढरी आकृती दिसत होती बस.

पाल ..

मग किल्ल्यावर फिरू लागलो, सगळीकडे दिशादर्शक असल्याने फिरण सोप्प होत, पण पावसाने हैराण केला होता. पंतांच्या प्रसिद्ध वाड्यात पोचलो तेव्हा तिथे खूप बॅगा ठेवलेल्या दिसल्या आणि मस्त जेवण पण केला होत. ठाण्याहून दुर्ग सखा ह्या ट्रेकिंग ग्रूपचे ते सदस्य होते, गड फिरून ते जेवून निघणार होते, थोड्या गप्पा मारल्यावर आम्ही जायला निघालो, तर त्यांनी जेवणार का असा विचारला, भूक लागली होतीच, पण आम्ही अनुजाने आणलेले थालीपीठ आधीच खाल्ल्याने जड अंत:करणाने त्याना नाही सांगून निघलो. मग वाघजाईचे मंदिर बघितल, किल्ल्याचे तुटलेले दगडी बांधकाम पडले होते सगळीकडे. मंदिराच्या बरोबर समोरून गडाच्या खाली उतरायला रस्ता आहे, तुटलेल्या दगडी पायर्‍या महादरवाज्याकडे जातात. त्यावरून पाणी नूसत धो धो वाहत होत, नीट चालता पण येत नव्हत, मग कसरत करत करत आम्ही दरवाज्यापर्यंत पोचलो, पावसाने ते दगडी बांधकाम हिरवळून गेला होत. मग त्याच दरवाज्यातून पाण्यातून वाट काढत काढत लवकर उतरू लागलो, सोबत एक मोठा ग्रूपपण होता. आम्ही एक-दीड तास चाललो तरी काही खाली उतरत नव्हतो. म्हटला झाला चुकलो आता. सगळे रस्ते शोधू लागले. आमच्या सोबत असलेल्या ग्रूपचे काही लोक आधीच उतरल्याने त्याना हाका मारायला सुरूवात झाली. सगळे हेsssओ  हेsss ओ असा ओरडून प्रतिसादाची वाट बघत होते. काहीच उत्तर येत नव्हत, अंधारपण पडायला लागला होता आणि काळजी वाढायला लागली होती. माझा तर ऑफीस होत त्यामुळे मला जास्तच काळजी वाटत होती. थोडावेळ चालून गेल्यावर हेsssओ ला प्रतिसाद मिळाला आणि आमचा जीव भांड्यात पडला.

River Crossing..

आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो आणि नदीच्या पात्राला समांतर चालू लागलो. पायाचे वांदे झाले होते बुटात पाणी भरून भरून. आम्हाला काहीच ओळखीच दिसत नव्हत. मग आम्हाला सांगण्यात आल की नदीच पात्र ओलांडून गेला की धोणशे गाव लागत. तो वाहता प्रवाह, हात धरून, धडपडत, ओरडत पार केला (). पण आमची मोठी गोची झाली होती जेव्हा आम्हाला कळला की धोणशे आणि पाछापूरमध्ये तब्बल २० किलोमीटरच अंतर आहे आणि तिथे जायला एसटी किवा परत जंगल चढून २ तास चालायच हेच पर्याय. मग अंतर कमी करायला आम्ही एसटीने २१ गणपती फाट्याला उतरलो, जो पालीच्या आधी ५ किलोमीटरवर आहे आणि डाव्या बाजूला असलेला फाटा ठाकरवाडीच्या दिशेने जातो ९-१० किलोमीटर.

गडाच हृदय 🙂

आमची इथे चुक झाली की दुसर्‍या एसटीची वाट न बघता, महेशला एका बाइकवर बसवून पुढे धाडला, तो बिचारा रस्ता चुकला (त्या बाइकवाल्याने चुकवला) तो बिचारा तंगडतोड करत अंधारात गावात पोचला आणि आम्ही इथे त्या फाट्याला काळजी करत, तर्कवितर्क काढत बसलो होतो. शेवटी तो १० वाजता आला गाडी घेऊन आणि आम्ही निघालो. खूप चालल्याने त्याचे पाय दुखत होते आणि त्याला गाडी चालवायला त्रास होत होता, मग आशुने गाडी चालवतो म्हणून सांगितला आणि अनुजा, महेश, आशु दीपककडेच थांबणार असा ठरला दीपकचा पण हात दुखावला होता कारण तो दोनदा पडला होता. मला ऑफीस जाण भागच होत म्हणून, पनवेलला जेवून मी ट्रेनने निघालो घरी. हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न ट्रेन पकडत पोचलो घरी. पहाटे २:३०ला आंघोळ केली आणि १५ मिनिटे पडणार तर ट्रान्सपोर्टचा फोन, गाडी येईल १० मिनिटात म्हणून, जिवावर आल होता जायच्या पण…असो

एक मस्त थरारक अनुभव होता, कधीही न विसरण्यासारखा..आता पुढचा ट्रेक प्लान करायला हवा, तोवर रजा घेतो..

— सुझे

फोटो इथे पाहता येतील

🙂