Where is the HOPE?

सरतेशेवटी सत्यसाईबाबा अनंतात विलीन झाले.. (असंच लिहितात ना?) आज सकाळपासून त्यांच्या अत्याविधीचे थेट, आपलं लाईव्ह प्रक्षेपण सुरु होतो. गेले ३ दिवस हा प्रकार सुरु होता म्हणा. कोण रडले, कोण काय बोलले, त्यांची संपत्ती किती, त्यांचे शिष्य किती, तो बाबा खरा होता की खोटा, यावर प्रचंड काथ्याकुट झाला. माझा देवबाप्पा त्या बाबांच्यासमोर देहासमोर बसून शोकाकुल रडला, हे ही किती तरी वेळा बघितलं, नव्हे तेच तेच दाखवलं. सगळ सगळ बघत आलो हे गेले तीन दिवस. त्यांनी आयुष्यभर जमा केलेल्या मायेचा, माफ करा ट्रस्टचा पुढला धनी कोण यावर चिंतन सुरु आहे सध्या. ट्रस्टपण काही छोटी नाही, तब्बल १ लाख ४० हजार कोटीं रुपयाची मालमत्ता आहे. तुम्ही म्हणाल, हे सगळ का सांगतोय?

मी त्यांच्या विषयी बोलणारा कोण? त्यांनी पैसा कमावला, लोकांची सेवा केली आणि आता ते गेले. लोकांनी श्रध्दांजली वाहिली, त्यांना शांती मिळाली. एक बाबा इतकी संपती जगभरातून गोळा करतो, आणि त्याचा काही भाग लोकांसाठी वापरतो आणि त्याचा उदो उदो होतो. आता ती ट्रस्टच्या नावे असल्याने कोणी चौकशी करायचा प्रश्न नाहीच. आता तो सगळा पांढरा पैसा आहे.

असो, माझा बोलायचा मुद्दा हा नाही. आपण भारतात राहतो आणि बडे बडे देशो मैं, ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं. आपल्या देशात पैश्याला काही म्हणजे काहीही कमी नाही हे दाखवायला एक उदाहरण सांगितलं. गेल्या एका वर्षात जितके घोटाळे बाहेर आले आहेत, त्याने आपण काही देशांच्या बजेटचा डोलारा उचलू शकलो असतो. १२ हजार कोटी काय, ७० हजार कोटी काय… किती किती पैसा आहे आपल्या देशात, पण साला आपलंच नशीब पांडू म्हणून रोज ऑफिसला जा, मरमर काम करा. महिन्याच्या शेवटी पोटाला चिमटे काढत जगा, हौसमौज टाळा. आपला जन्म हा केवळ असाच जाणार. ह्याउलट अशी लोक आहेत ज्यांना पैसे ठेवायला जागा नाही. स्विस बँकमध्ये १०-१२ खाती काय, ७०-८० मजल्याची घर ती काय, फिरायला ऊंची गाड्यांचा ताफा तो काय, जीव जपायला केलेली सुरक्षायंत्रणा काय.सगळ कसं स्वप्नवत.

पैसा कमावत असताना ह्यांनी केलेले कष्ट (???) जगजाहीर आहेतच. मोठमोठ्या लोकांकडून चुटकीसरशी कामे करून देणारा पैसा ह्यांच्या हातचा मळ. ह्या लोकांना भीती कशाचीही नाही, कालसुद्धा जेव्हा कलमाडीला कोर्टातून बाहेर आणलं, तेव्हा साहेब असे बाहेर आले की, त्यांनी भारतरत्न मिळवलं आहे. त्यांच्यावर सॉरी त्याच्यावर जेव्हा चप्पल फेकून मारली आणि त्याचा नेम चुकला, तर हे ध्यान दात काढून हसत होत. लाज, शरम, भीती, कायदा ह्या सगळ्या तुच्छ गोष्टी आहेत.

गेल्या दोन तीन दिवसात कानावर आलेल्या बातम्यांमध्ये अजून एक बातमी होती, ती ज्युलिअन असांजेची. टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याने स्वतः स्विस बँकची माहिती बघितली आहे आणि त्यात अनेक भारतीय नावे आहेत. त्यांच्या नावावर भला मोठा पैसा जमा आहे. जगातला सगळ्यांत जास्त काळा पैसा हा भारतातूनच येतो (बातमी) आणि त्याचे पुरावेदेखील तो लवकरच देणार आहे. त्याने भारतीयांना सांगितलं आहे “Don’t Loose Hopes Completely, We will soon put those names in front of you”

हे तर आपल्या देशातील लोकसुद्धा, कित्येक वर्ष ओरडून सांगत आहेत. विरोधक थोडे दिवस हल्लाबोल करतात पण हे सगळ नावापुरतं. कारण त्यांचीही खाती जोपर्यंत तिथे भरली जात नाही, तोपर्यंत हे इथे गोंधळ घालणार. एकदा का पैसे पोचल्याची पोचपावती आली, की मुग गिळून गप्प राहायचं आणि दुसऱ्या मुद्द्यावर सरकारला धाऱ्यावर धरायचं.

खरंच सांगतो, आता पेशन्स नाही आणि खात्री तर नाहीच नाही. जे आजवर बघितलं आहे त्यानंतर जरी ती नावे बाहेर आली त्या बँकेमधून, तरी काही फरक पडणार नाही असंच दिसतंय. विकीलिक्सला सुरुवातीला अमेरिकेतून जास्त विरोध होता, पण आता तो भारतातून आहे. एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जशी कमीतकमी पैश्यात लोकांना काम करायला लावून जगवते आणि आपण वारेमाप नफा ओढत राहते. 😦

खरंच सांगा कुठे आहे होप? नक्की कुठे जातोय आपण? काय होणार पुढे?

– सुझे

घराला घरघर…

महावीर नगर (कांदिवली) येथे एक फ्लॅट १ कोटी रुपयाला विकला गेला, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सला एका कोपर्‍यात आलेली ही बातमी. म्हणाल तर खास नाही तर एकदम बकवास. जेव्हा आम्ही डहाणूकरवाडीत राहायचो, तेव्हा महावीर नगर इथे गर्द झाडीच जंगल होत. तिथे छोट्या मोकळ्या जागेवर आम्ही क्रिकेटसुद्धा खेळायचो. आता तिथली परिस्थिती पूर्णपणे बदललीय. उंच उंच टॉवर, प्रशस्त लिंक रोड, शॉपिंग कॉंप्लेक्स…आपल्या मुंबईच्या प्रगतीच हे स्वरूप नक्कीच छान आहे, पण मी स्वत: नक्कीच म्हणेन की परिस्थिती खूप वाईट होत जातेय दिवसेंदिवस 😦

सुरुवातीला, म्हणजे १०-१२ वर्षापुर्वी मरीन लाइन्स, चर्चगेट, दादर ही महागडी आणि सगळ्या सुविधा असलेली उपनगर् होती. पण..पण आता लोवर परेल, बांद्रा, सांताकृज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरीवली आणि विरारसुद्धा. हो, विरारसुद्धा त्यात समाविष्ट झालय. कांदिवली पश्चिम एक बीएचके फ्लॅट ४०-५० लाख, विरारला २०-५२ लाख. आजच्या तारखेला विरारला ६ ते ८ तास लोडशेडिंग असत. तुम्हाला बिल्डर घरा सोबत दोन जेनरेटर्स पण देतात..ते पण मोफत…मोफत.. मोफत… तरी तिथे जागेचा हा असा चढता भाव सुरू आहे.

साडेतीन वर्ष नोकरी केली, थोडा फार पैसा जमवून आता घर शोधायला बाहेर पडतो, तर माझ्या बजेट मध्ये विरारपर्यंत पण घर घेण शक्य नाही अस दिसतय.. पार हतबल झालोय जागेचे वाढते भाव बघून…लोकांचे ऑफीसला एकाच बाजूने जाणारे लोंढे बघून….खरच त्रास होतो. थोड लांब घर घ्यायच म्हटल तर प्रवासातच दोन-तीन तास जायचे… 😦 लांब घर घेण्यासाठी दिलेली काही आश्वासन् भारी असतात म्हणा उदाहरणार्थ… भविष्यात सरकारकडून इथे नवीन रेलवे स्टेशन बांधणार आहेत, लोड शेडिंग फक्त ४ च तास होईल, मेट्रो येणार, विमानतळ येणार, मॉल येणार, कमी ट्रॅफिक, मुबलक पाणी, हिरवागार निसर्ग, मोठ्ठे एक्सप्रेस रस्ते… हे सगळ माझ्या कांदिवलीत पण होत, १५ वर्षापूर्वी. तेव्हा वडिलांनी ७ लाखात आमच राहत घर घेतल होत. ज्याचा आता भाव आहे तब्बल ५०-५५ लाख.. त्यामुळे आता इथे घर घेण हे मला तरी अजिबात शक्य नाही… खरच 😦

सगळीकडे चाळी, जुन्या बिल्डिंग्स पाडून मोठ्ठे मोठ्ठे टॉवर बांधत सुटले आहेत सगळे. ह्यात मोठ्ठे बिल्डर तर सरकारकडून कुठले ही प्रॉजेक्ट मंजूर करून घेऊ शकते ह्याची अनेक उदाहरणे आहेत आपल्यापुढे. जेव्हा सिफीमध्ये होतो तेव्हा चारकोप (कांदिवली) जिथे मी राहतो, तिथे दोन नवीन सेक्टर्स (८-९) बांधणार अशी बातमी उडाली. त्यावेळी तिथे वन प्लस वन अश्या घरांची फाईल निव्वळ ७ लाखात मिळत होती. तेव्हा सुद्धा ही रक्कम खूप जास्त होती म्हणा माझ्यासाठी, तरी घरी बोलून बघितल होत. पण मग त्या प्रॉजेक्टवर न्यायालयाने आक्षेप घेतला आणि ते थांबल. सगळ्यांनी आपल्याजवळ असलेल्या जागेच्या फाइल्स भीतीपोटी परत विकल्या स्वस्तात (कशाला पैसे अडकवून ठेवा उगाच म्हणून). मग जादू झाली, ते प्रॉजेक्ट दिमाखात आणि एकदम युद्ध पातळीवर सुरू झाल. ज्यांनी जागा विकल्या नाहीत आणि ज्यांनी स्वस्तात मिळतेय जागा म्हणून दोन-तीन जागा घेऊन ठेवल्या. ती लोक आज करोडपती आहेत. ह्या विकासाला राज्यसरकारने मंजुरी दिली होती. कधी चारकोपला आलात तर सेक्टर ८ ला एक चक्कर मारा. ह्या सेक्टरमध्ये शेवटच्या बिल्डिंगच्या बाजूला गोराई खाडीच पात्र आहे. भले गाळ का असेना, पण भरती आली की काही प्रमाणात पाणी येत तिथे.

हे चारकोप, इमेजवर क्लिक केल्यावर तुम्हाला जी एकसंध लहान लहान घर दिसतील ती आता तोडून टॉवर्स बांधणार आहेत...एकदम डाव्याबाजूला कोपर्‍यात आहे ती गोराई खाडी...

आता अजुन एक मोठी गोष्ट इथे होतेय..कदाचित ह्याला अजुन तरी पुरावा नाही आहे, पण एका मोठ्या बिल्डरने इथल्या म्हाडा सोसायटी पाडून इथे टॉवर बांधून देतो अस वचन दिल. खूप आकर्षक स्कीम दिल्या. चारकोप परिसरात असलेल्या प्रत्येक उत्सवाला जोरदार मदत केली पैश्याने. आता त्याने परस्पर ती जागा तिसर्‍या बिल्डरला विकली आहे. खरच काय होईल ते माहीत नाही पुढे पण.. मेट्रोच एक मुख्य स्थानक म्हणून चारकोपचे वाढलेले भाव, बिल्डर लोकांची हाव आणि सामान्य माणसाच अस्तित्व इथून लवकरच संपणार अस दिसतय.

हे झाल एक उदाहरण, संपूर्ण मुंबईत हेच सुरू आहे. ग्रँट रोडचा रेड लाइट भाग, मुंबईतला भविष्यातला महाग असा भुखंड आहे. उत्तन जे गोराई गावाच्याच्या पलीकडे असलेला निर्जन डोंगरांचा भाग आयटी हब होणार म्हणून तयारी सुरू झाली आहे. (इथे गूगलच एक ऑफीस सुद्धा होणार आहे, माहीत नाही अफवा खरी आहे की नाही). पालघर, बोईसर इथे आजपर्यंत मुंबईच्या इतिहासात कधी बांधले गेले नाहीत एवढे मोठे गृहनिर्माण प्रॉजेक्ट्स सुरू आहेत. बोईसरला टाटाच्या प्रॉजेक्टमध्ये असलेले ९५० फ्लॅट्स १६-२२-२८ लाखाला विकले गेलेत आणि प्रॉजेक्ट पूर्णपणे सोल्ड आउट झालसुद्धा एका वर्षापूर्वी. पनवेलला विमानतळ नक्की येणार, हे जेव्हा लोकांना कळल तेव्हा, इथे जागेचा भाव अडीच हजारावरून पार ६ ते ७ हजारावर पोचलाय. म्हणजे आता सगळ्या सामान्य लोकांनी मुंबईच्या बाहेरच रहाव अस गृहीतच धरलय.

मला वाटायच, ह्या राहत्या घरच्या आजूबाजूला फारफार तर दोन-तीन स्टेशन मागे-पुढे घर घेईन. पण मुंबईत घर घेण, हे कर्मकठीण होऊन बसलय निदान माझ्यासारख्या सामान्य मुलाला तरी…

इथे मिळते तशी संधी दुसर्‍या शहरात मिळत नाही, पण आता ती शोधावी म्हणतो…
खरच इथे घर घेण्याची आशा सोडावीच म्हणतो 😦

— सुझे

एक साफ चुकलेला संदेश…

२५ डिसेंबर, नाताळबाबाची सुट्टी कशी घालवावी हा मोठा प्रश्न होता. आधी १० दिवस हा विचार अजिबात आला नाही. लग्नसराई सुरू आहे ना, अहो माझी नाही, मित्र मंडळी, नातलगांची 🙂 ७ दिवसात किमान ४ लग्नाला हजेरी लावली होती. ट्रेक्सपण बंद आहेत मग काय करावा म्हणून शिनेमा बघायच असा ठरल. आता सुट्टीचा हंगाम म्हणून चिक्कार सिनेमे प्रदर्शित झाले होते. आदल्यादिवशीच सगळ्यांनी ठरवला होत की टीएमके (तीस मार खाँ) बघू, पण सकाळी सगळ्यांनी टांग दिली.

करणार काय, काही तरी वेळ घालवायचा होता म्हणून मी आणि प्रसन्नने तरी जायच ठरवल. टीएमके बघायचा मूड नव्हता, म्हणून पावल वळली आपल्या केदार शिंदेच्या ऑन ड्यूटी २४ तास कडे. याचा ट्रेलर मला अतिशय आवडल्याने मनात ह्या सिनेमाबद्दल खूपच चांगल मत झाला होत. पोलिसांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट, त्यांच ते खडतर जीवन यशस्वीपणे पडद्यावर दर्शवेल याची मला खात्री होती. केदारसारखा दिग्दर्शक आणि तगडी टीम म्हटला बघुयाच.

चित्रपट सुरू होतो ते २६/११ दहशदवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. मंत्रीमंडळाच्या एका सभेत एक स्पेशल पोलीस दस्ता तयार करायला परवानगी मिळते. ह्या टीमला सैनिकासारख प्रगत प्रशिक्षण देऊन, दहशतवाद मोडून काढणे ही जबाबदारी त्या टीमकडे येते. त्यासाठी राज्यभरातील १४ पोलीस अधिकारी निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करण बेदी (अमोल कोल्हे) ह्या अधिकार्‍यावर येते. ही निवड काहीशी अपेक्षित नसलेल्या त्याच्या एका वरिष्ठ मद्रासी सहकार्‍याने राजकारण करून एक कमकुवत (अपयशी) लोकांची फौज निवडून ती करणला देण्यात येते. महाराष्टाच्या विविध भागातून आलेली ही अधिकारी मंडळी ही काही कामाची नाहीत आणि राजकारण करून आपल्याला अशी फौज दिली गेली आहे हे कळत, पण सीनियर्सच्या ऑर्डर्स पाळणे हे आपल कर्तव्य मानून ट्रेनिंग सुरू करतो. त्यातच मुंबई शहरात घुसलेले ४ दहशतवादी आणि त्यांची मुंबईत स्फोट करायची योजना सुरू असते.

ह्या टीममध्ये वडिलांच्या जागी लागलेले, पैसा कमावण्यासाठीच पोलीस खात्यात भरती झालेले, दुसरा काही काम न जमत असल्याने अंगवळणी पडून पोलीस म्हणून काम करणारी मंडळी असतात. त्यात एक पती-पत्नीसुद्धा असतात. सगळ्यांना हे प्रशिक्षण एक सरकारी आदेश वाटत असतो आणि कोणी ते इतक्या आत्मीयतेने करत नाही. थोड नाटक करून देतील सोडून असा त्यांना वाटत होत, पण असा होत नाही.

 

ऑन ड्यूटी २४ तास

त्यातच एक खोटा बॉम्ब निकामी करण्याची आणि एका पुतळ्याची विटंबना झाल्यावर झालेली दंगल आटोक्यात आणण्याची जबाबदारी यांना मिळते. ही मंडळी धडपडत का होईना आपली जबाबदारी चोख बजावतात, पण हे सगळा करताना केलेली विनोदाची केविलवाणी निर्मिती प्रसंगाच गांभीर्य नष्ट करते. दंगलीच्या दृष्याला दिलेली वेळ खूपच जास्त वाटली.

शेवटी ते दहशतवादी एक कुठल्याश्या गल्लीत एक पोलीस स्टेशन ओलिस धरून गोळीबार करतात आणि लोकांना बंदी बनवून आत अडकवतात. पण मग ही जाबाज टीम येते आणि ते पोलीस स्टेशन ५ मिनिटात आपल्या ताब्यात घेतात. ह्या क्षणी सुद्धा विनोदी वाक्य ऐकायला मिळाल्याने तो दहशदवादी हल्ला हा नाटकच आहे असा जाणवला. असो, ह्या हल्ल्यात त्यांचे दोन अधिकारी गोळी लागून शहीद होतात. शेवट एवढा पटापट केलाय की त्यातल्या विनोदनिर्मितीमध्ये दोन पात्रांचा मृत्यू होतो ते बघून काहीच वाटत नाही.

मग त्या दहशदवादी हल्ल्याचा सूत्रधाराला विचारतात का केलस असा आणि कुठल्या संघटनेसाठी तू काम करतोस. यावर तो शुद्ध मराठीत सांगतो की आम्ही भारतीय आहोत आणि देशाच्या भ्रष्टाचार, बेकारी, राजकारणाविरूध्द आम्हाला लढायच होत, म्हणून आम्ही हे असा केला. (हे वाक्य मी ऐकून एवढा हसायला लागलो म्हणून सांगू..या आधी प्रत्येक सीनमध्ये तो हिंदी आणि शुद्ध हिंदीच बोलायचा :))

खूपच गोंधळ झालाय, दोन दोन दगडांवर एकदम पाय ठेवून उभे राहिल्याने. विजय चव्हाण ह्यांना घेऊन केलेली विनोद निर्मिती छान होती. अमोल कोल्हेला सरदारजी बनवल्याने त्याला काहीस हिंदी-मराठी बोलाव लागत होत आणि त्यात त्याला खूप कष्ट पडले असावेत (तो बोलताना बघितल्यावर जाणवेलच तुम्हाला). गाणी म्हणाल तर फक्त शीर्षक गीत खूप छान झालय, बाकी तीन गाणी चित्रपटामध्ये घुसडल्यासारखीच वाटतात. बाकी सगळ्यांचा अभिनय ठीक झालाय.

विषय खूपच छान निवडला होता, पोलिसांच्या जीवनावर आधारित असे फार कमी चित्रपट आले असतील. पण ऑन ड्यूटी मध्ये तो तितक्या सफाईदारपणे हाताळता नाही आला दिग्दर्शकाला. केदारने निराश केल असच म्हणेन… 😦

असो, मी माझा अनुभव सांगितला. तुमचा कदाचित वेगळा असेल..बघून ठरवा हव तर  🙂

– सुझे