पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !!
सलाम तुम्हा सर्वांना सलाम… सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!!
सलाम तुम्हा सर्वांना सलाम… सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!!
टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये “सी- सॅट” आणि “डी- सॅट” हे नेहमीच्या वापरातले शब्द. मागे आपण डी- सॅट बद्दल वाचले असेलंच. थोडक्यात सांगायचं झालं तर, “डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )” आणि “सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)” प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते.
जर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला फक्त ते संवादाच्या माध्यमातून परदेशात पोचवायचे असते आणि आपली तांत्रिक हुशारी बरोब्बर ठिकाणी वापरायची असते. पण एका झटक्यात ऐकणारे ते च्यामारिकन कुठले, त्यांच्यासमोर किती डोकं फोडा, जोपर्यंत ती लोकं त्यांचा मेंदू वापरणे बंद करत नाही, तो पर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला बांधता येतो तो फक्त अंदाज, तिथे ते काय करतायत याचा..त्यांना प्रत्येक गोष्ट लहान मुलांसारखी हळूहळू आणि पटवून द्यावी लागते. आता ह्यात त्यांची काही चुकी नाही म्हणा, तिथल्या प्राथमिक शिक्षणाचा घसरलेला दर्जा ह्यासाठी कारणीभूत आहे… एकदा एकीला सांगितलं की, कम्प्युटरच्या सगळ्या विंडो बंद कर, तर ती बया घरातल्या सगळ्या खिडक्या बंद करून आली आणि म्हणाली Don’t you think its odd? काय बोलावं आता? 😀 😀
आता माझं जे नवीन प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशन सांभाळतो. खास करून दुर्गम, खेड्यापाड्यातील लोकांसाठी ही सुविधा एक वरदान आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शहरात जितकी कंपनीची ग्राहकसंख्या आहे, त्याहून अधिक ग्राहकसंख्या दुर्गम भागात आढळते. कारण त्यांना त्याची जास्त गरज असते. तिथेही आयुष्याची ३५-४० वर्ष शहरात पैसे कमावतात ऐशो आराम करतात आणि मग उरलेला पैसा घेऊन कुठेतरी गावात, जंगलात, वाळवंटात राहायला जातात मन:शांतीसाठी. तिथे ना त्यांना फोन नेटवर्क मिळत, ना इंटरनेट. मग त्यांच्याकडे सॅटेलाईट कम्युनिकेशन, हे एकच उपलब्ध माध्यम असतं जगाशी जोडण्याचे. म्हणूनचं सॅटेलाईट कम्युनिकेशनला लगेच आणि जास्त प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेचे लष्कर आणि जगभरातील सगळ्या ATM मशीन्सचं नेटवर्क, हे आमच्या सॅटेलाईट कम्युनिकेशनचा वापर करूनचं जोडलेले आहेत. हे नेटवर्क त्यातल्यात्यात कमी खर्चात सेटअप होतं, पण त्याचा मेंटेनन्स खुपंच जास्त आहे. पण हे नेटवर्क खुपच नाजूक आहे. तसेच अमेरिकेत वाढत असलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे ह्या नेटवर्कला खूप वेळा (नेहमीच) धक्का लागतो आणि तो धक्का आम्हाला सहन करावा लागतो. मग आम्हाला फोनाफोनी, शिव्याशाप सुरु…त्यातल्या अश्याच एका धक्क्याची कहाणी इथे देतोय 🙂
(संभाषणाचे जमेल तितकं मराठीत भाषांतर करतोय…)
(ट्रिंग ट्रिंग !!) जवळपास पंचेचाळीशीच्या आसपास असलेल्या स्टिफनचा आवाज ऐकू आला… मी काही बोलायच्या आधीचं त्याने कंपनीच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली होती..
स्टिफन:- युवर कंपनी सक्स… मी माझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही मला त्याचा परतावा देत नाही.. मी तुमच्यावर केस करेन.
मी:- (ऑफकोर्स आधी माफी मागितली आणि एका नवीन डी- सॅटची मनापासून तयारी करत विचारलं) नक्की प्रॉब्लेम काय आहे स्टिफन?
स्टिफन:- (काही बोलायच्या मुडमध्ये नव्हता) मला तुझ्या बॉसशी बोलायचं आहे, कंपनी सीईओशी.. माझा फोन ट्रान्सफर कर अमेरिकेत…
मी:- स्टिफन, मला असे करता येणार नाही. पण तू जर मला नक्की काय झालंय सांगितलंस, तर मी तुला नक्की मदत करायचा प्रयत्न करेन…
स्टिफन:- मदत…नको मला तुझी मदत… मला तू तुझ्या बॉसचा नंबर दे..!!
मी:- सॉरी, पण मला तसे करता येणार नाही.. (मी खुणेनेच माझ्या मॅनेजरला कॉल ऐकायला सांगितला त्याच्या डेस्कवरून)
स्टिफन:- (सूर वाढवत) #$#$@$, ^%&%^$# तू मला नाही म्हणालास…मला??
मी:- (माफी मागत) मला तू नक्की सांग काय झालंय ते, मला माझ्या मॅनेजरपेक्षा तरी जास्त माहित आहे ह्या सर्विसबद्दल. (मॅनेजर डोळे वटारून बघू लागला आणि हसायला लागला)
स्टिफन:- अच्छा, तू स्वतःला शहाणा समजतोस काय? माहितेय तुम्ही भारतीय लोकं हुशार असता..पण शेवटी अमेरिकन्स ते अमेरिकन्स…!!
मी:- ह्म्म्म.. (काही बोललो नाही)
स्टिफन:- आम्ही हे केलं, आम्ही ते केलं.. जगाला जगायची दिशा वगैरे दिली आणि आता जगावर सत्ता गाजवतोय. आमची संस्कृती सगळं जग मानतेय….
मी:- (माईक बंद करून, मस्त पाणी पिऊन आलो..तो बोलतच होता)
स्टिफन:- फक्त, तुमच्या भारतात एक गोष्ट चांगली आहे, नाती सांभाळायची जिद्द आणि अक्कल.. तुम्ही त्या बाबतीत पुढे गेलात..
मी:- (हे ऐकून मी एकदम बावरलो..म्हटलं ह्याला काय झालं आता… मग मीच म्हणालो) काही प्रॉब्लेम झालाय का?
स्टिफन:- सुहास, तुझं लग्न झालंय काय रे?
मी:- नाही.. (हा विषय टाळत) मला कळेल का नक्की काय प्रॉब्लेम झालाय नेटवर्कचा?
स्टिफन:- काही नाही.. सगळं एकदम सुरळीत सुरु आहे !!
मी:- क्काय…(आवशीचा घोव तुझ्या) मग तू शिव्या का देत होतास?
स्टिफन:- माफ कर दोस्ता, पण त्या तुझ्यासाठी किंवा तुझ्या कंपनीसाठी नव्हत्या…
मी:- मग… नक्की झालंय काय? मी तुला काही मदत करू शकतो काय?
स्टिफन:- मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होतं… स्वतःला मोकळं करायचं होतं… माझी बायको मला सोडून गेली दुसऱ्याकडे. मी साधा सॉफ्टवेअर इंजिनिअर. आयुष्यात २० वर्ष प्रचंड कष्ट केले, पैसा कमवला आणि उडवलासुद्धा. प्रेम केलं एका मुलीवर आणि तिच्याशीच लग्न केलं, मग आम्हाला मुलगी झाली. तिच नाव जेन…मग वयाच्या ४३ व्या वर्षी कंटाळून नोकरी सोडली. मी नोकरी सोडल्याने मला पैश्याचा एकुलता एक स्त्रोत म्हणजे, गावी घरासमोर असलेली थोडीफार शेती. पोटापाण्यापुरते पैसे आरामात मिळतात त्यातून, पण बायकोला ते कमीपणाचं वाटायचं आणि शेवटी १५ वर्षाच्या पोरीला माझ्याकडे सोपवून निघून गेली… आता ती मुलगी सुद्धा घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतेय आणि गेला एक आठवडा ती घरी आली नाही. मित्राच्या ऑफिसमध्ये काम करतेय म्हणाली.. वेळ मिळाल्यास घरी चक्कर मारेन लवकरचं असं म्हणतेय… माझी मुलगी मलाच म्हणतेय जमल्यास घरी चक्कर टाकेन.. काय बोलावं? तिचा खूप राग आला होता, पण तिला ओरडू शकत नाही. काही म्हणालो तर, घर सुद्धा सोडून जाईल जेन. कोणाशी बोलावं, मन मोकळं करावं, तर शेजारी कोणी नाही. माझा सख्खा शेजारी माझ्या घरापासून जवळजवळ ३०-३५ किलोमीटर अंतरावर राहतो. मोबाईल नाही, टीव्ही नाही.. आहे ते फक्त इंटरनेट
मी:- स्टिफन, वाईट वाटलं हे ऐकून !!
स्टिफन:- आमच्या इथे नात्यांना फार कमी वेळ किंमत असते… काही वेळा वाटतं की, ही नाती अशीच टिकतील…पण कुठल्याही क्षणी, तो माणूस आपल्याला लाथाडून दूर निघून जातो, कधीच परत नं येण्यासाठी.. माझं दोघींवर खूप प्रेम आहे रे.. पण त्यांना त्याची किंमत नाही… आज मनसोक्त दारू प्यायलो आहे, मस्त बार्बेक्यू बनवायचा प्लान आहे आणि तुझ्याशी बोलतोय.
मी:- (विषय बदलावा म्हणून) अरे व्वा.. बार्बेक्यू..सही हैं… ख्रिसमसची तयारी सुरु झाली का? (मी स्वतःच जीभ चावली, त्याला तर अजुन दोन महिने अवकाश आहे)
स्टिफन:- हा हा हा हा… विषय बदलतोयस…ख्रिसमसला अजुन खूप वेळ आहे रे. जाऊ दे. तू कर तुझं काम…!!
मी:- सॉरी, बोलण्याच्या ओघात निघून गेलं. मुद्दामून नाही बोललो..
स्टिफन:- ह्म्म्म्म..ठीक आहे रे. मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होत… तुमच्या नेटवर्कमध्ये, ह्या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन फिरवता येतो, म्हणून मी फोन केला आणि सगळा राग रिता केला तुझ्यावर. माफ कर मला, खरंच माफ कर !!
मी:- (मी काय बोलावं मला सुचत नव्हतं…मॅनेजरला खुणावलं, त्याने हाताने खुन करून सांगितलं कट कर फोन..एएचटी वाढतेय (AHT = Average Handle Time)) स्टिफन, मी समजू शकतो तुझी परिस्थिती….पण आम्हाला वैयक्तिक गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत. जर तुला सर्विसचा काही प्रॉब्लेम नसेल, तर मला हा कॉल कट करावा लागेल….सॉरी !!
स्टिफन:- हो हो.. नक्की कर आणि होsss (तोडक्यामोडक्या शब्दात का होईना तो आनंदाने हिंदीत ओरडला) फिर मिलेंगे !!!
मी:- नक्की… काळजी घे.. Bye !!
=======================================================
अमेरिकेच्या लॅविश संस्कृतीबद्दल सगळ्यांना माहित आहेच, पण तिथे असाही एक वर्ग आहे जो त्या लॅविशपणाला कंटाळून शहराबाहेर पळ काढतोय (आपल्यासारखंच). काय बोलावे सुचत नव्हते. एक वेगळेच वास्तव समोर आले होते..आपल्याकडे सुद्धा आपल्या मनात कधी कधी विचार येतो, जाऊया आता गावाकडे, शहरात राहून कंटाळा आलाय. ह्या धकाधकीच्या जीवनात आता जगायचा खरंच कंटाळा आलाय. 😦
मी मॅनेजरला ओरडून सांगतो, चल मी आता ब्रेक घेतो. तो जा म्हणाला आणि मी दारातून बाहेर पडणार इतक्यात तो ओरडला… “सुहास, स्टिफनने सी-सॅट भरा हैं तेरे कॉल कें लिये, और बार्बेक्यू पार्टी का इन्व्हिटेशन भी भेजा हैं…!! 🙂 ”
मी नुसताच हसलो… आणि बाहेर पडलो !!
पूर्वप्रकाशित – मीमराठी दिवाळी अंक २०११
— सुझे !!
माय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
अपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी (?) असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला. ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.
प्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची असते, पण ते गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मदत करत असतात.
प्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा प्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.
असेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.
दीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.
त्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण होत. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.
म sssध्यां ssss त ssss र sss
मूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांतर दिलेला होता याची नोंद घ्यावी 🙂 🙂
इथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिलेल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.
हळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग तोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग !!!! 😀 😀
पहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने 😀
असो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉
– सुझे !!