इमर्जन्सी वॉर्ड

नागपुरामधलं सगळ्यांत मोठ्ठं आणि सर्व सोयींनी उपयुक्त अश्या, इंदिरा गांधी सरकारी हॉस्पिटलामधला नेहमीचाच दिवस. नेहमीप्रमाणेचं खून, अपघात, जाळपोळ, मारामारी, अश्या ढीगभर कॅज्युल्टी केसेस पडून होत्या. लोकांची प्रचंड गर्दी होती. डॉक्टर्स आपापली कामे करत होते. त्यांतच आज पहिल्या पावसाचा तुफान तडाखा बसला होता संपूर्ण शहराला, त्यामुळे गर्दी, गोंधळ आणि हाहाकार असं एकूण चित्र होतं सगळ्या परिसरात. ह्यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या मुलांची एक बँच, इंटर्न म्हणून कॅज्युल्टीमध्ये प्राथमिक तपासण्या करत होती. त्यांना फक्त एका फॉर्मवर रुग्णाची त्यावेळची परिस्थिती कशी आहे याची नोंद घेणे आणि प्राथमिक उपचार करणे, ही जबाबदारी हॉस्पिटलाने दिली होती. त्यात त्यांनी रुग्णाला इंजेक्शन देणे, रक्तदाब तपासणे, टाके घालणे अशी कामे करायची. बाकी काहीही उपचार करण्यासाठी त्यांना सीएमओची (CMO – कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर) परवानगी घेणे गरजेचे असते.

नितिका, अतिशय हुशार डॉक्टर. ह्याच वर्षी ज्युपिटर मेडिकल कॉलेजमधून, पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. सगळे सीनिअर्स तिच्या कामावर खूश होते. आयुष्यात कधी बघितली नसतील इतकी प्रेतं, रक्त ती रोज ९ तासाच्या शिफ्टमध्ये, दर ५ मिनिटाला बघायची. तसंही डॉक्टर लोकांसाठी हे काही नवीन नाही, त्यांना ह्या गोष्टींचे प्रशिक्षण दिलेलं असतंच, पण कधी कधी तिला ते सगळं नकोसं वाटायचं. विचार करायची की जनरल वार्डमध्ये बदली करून घ्यावी, पण पुढे निष्णात सर्जन होण्यासाठी हा अनुभव गरजेचा होता. आज तिने डबल शिफ्ट केली होती, काम खूप होतं. लोकांची गर्दी कमी व्हायची, नावंच घेत नव्हती. संध्याकाळचे ६:३० वाजले होते. ती थोडा आराम करावा म्हणून, कोपर्‍यात एका खुर्चीवर डोळे मिटून शांत बसून होती. तितक्यात एक म्हातारे गृहस्थ इमर्जन्सी वॉर्डमध्ये धावत धावत आले, “डॉक्टर…डॉक्टर माझ्या पोरांना खूप मार लागलाय हो, त्यांना बघा नं!” नितिका तातडीने उठली आणि, त्यांनी सांगितलेल्या बेडपाशी पोचली. त्यांच्या तीन मुलांना जबरदस्त मार लागला होता, आणि खूप रक्तस्त्राव सुरु होता. त्यांच्या गाडीला एका भरधाव ट्रकने टक्कर दिली होती आणि ही तीन भावंड त्यात जबर जखमी झाली होती.

तिने लगेच CMO राघवेंद्र ह्यांना फोन केला. ह्या केसची माहिती दिली आणि काय काय करू हे विचारून घेतलं. नितिकाने त्या काकांना एक कॅज्युल्टी फॉर्म दिला, आणि लगेच उपचार करायला सुरुवात केली. ते बाजूला उभे राहून, डोळे पुसत पुसत फॉर्म भरत होते. राघवेंद्र सर एका दुसर्‍या पेशंटला बघत होते, ते धावत इमर्जन्सी वॉर्डमध्ये आले, आणि परिस्थितीचे गांभीर्य बघता, आरएस आणि आरऑर्थोला (RS – Resident Surgeon, R Ortho – Resident Orthopedics) त्वरित बोलवायला सांगून, सगळ्यांची तपासणी केली. मोठ्या मुलाला हाताला आणि तोंडाला मोठी जखम झाली होती, त्यांनी त्याला इंजेक्शन देऊन टाके घालायला सांगितले. मधल्या मुलाला खांद्याला, छातीला आणि पायाला मार बसला होता आणि त्याला पाय देखील हालवता येत नव्हता. छोट्या मुलाला गुडघ्याला आणि कपाळाला मार बसला होता.

राघवेंद्रसरांनी सगळ्यांना एनएस (NS – Normal Saline) लावायला सांगून, सगळ्यांवर लक्ष ठेवायला सांगितले. आरएस पोचणार होतेच, इमर्जन्सी वॉर्डमध्ये. तोपर्यंत नितिका, त्यांच्या जखमा साफ करून त्यांना ड्रेसिंग करत होती. ७:२० पर्यंत हे सगळं सुरू होतं. ते काका सारखे हिला येऊन सांगायचे, माझ्या मुलांना बरं करा, पाया पडतो. ही त्यांना जमेल तितका धीर देण्याचा प्रयत्न करत होती. तरी ते हात जोडून मुलांना वाचवायची आर्जवा करत होते. मोठा आणि छोटा मुलगा काही प्रमाणात स्टेबल होते, पण त्यांचा भाऊ खूप सिरीअस होता. नितिकाने तिला सांगितलेलं काम केलं होतं आणि ती इतर पेशंटना बघत होती. ती मग काकांकडे आली, तिने विचारलं मुलाच्या ड्रेसिंगसाठी काही गोष्टी लागतील, त्या आणून देता का बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून. त्यांनी त्या निमुटपणे आणून दिल्या. दुसरे डॉक्टर मोठ्या मुलाला टाके घालणार होते, तरी ते काका रडत होते, वाचवा, माझ्या मुलाला वाचवा म्हणून, तिने त्यांना धीर दिला. मोठे डॉक्टर आहेत तिथे, काळजी करू नका. पण ते ऐकायला तयार नव्हते, शेवटी ही वैतागून म्हणाली, “काका काळजी नका हो करू, मी माझं काम केलंय, अजून मी काही करू शकत नाही. देवावर विश्वास ठेवा!! ”

दोन डॉक्टर त्यांच्या भावाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्याची प्रकृती खालावत होती. खांद्याला आणि छातीला मार बसल्यामुळे, त्याला श्वास घेतांना थोडा त्रास होत होता. ऑक्सिजन मास्क लावून, त्याला कृत्रिम श्वास देण्यात येत होता, तरी काही फरक पडत नव्हता. त्याचा रक्तदाब उतरत चालला होता. शेवटी त्याला ईओटीमध्ये (EOT – Emergency Operation Theater) हलवायचा निर्णय घेतला गेला आणि त्याला ईओटीमध्ये आत घेऊन गेले.

इकडे नितिका आपली शिफ्ट संपवून, कँटिनमध्ये चहा घ्यायला गेली. तिला सीएमओची सही घेतल्याशिवाय शिफ्टवरून घरी जाता येणार नव्हतं. तिने तोंडावर थंडगार पाणी मारलं आणि गरमागरम चहा घेतला. पाऊस अजून सुरूच होता, ढग गडगडत होते. बाहेर वातावरण प्रसन्न होतं, पण खूप काम झाल्यामुळे ती थकलेली होती. झोप येत होती तिला. थोडावेळ तिथे बसून, ती इमर्जन्सी वॉर्डकडे निघाली.

दरवाज्यात ते काका मान खाली पाडून उभे होते. तिने त्यांना काही विचारायच्या आत ते म्हणाले, “मॅडम, पोरगा गेला माझा. ऑपरेशन थिएटरामध्ये नेला तेव्हाच तो गेला 😦 त्याच्या आईला ह्या धक्क्याने चक्कर आली, तिला बाहेर बसवून आलो आहे. ” नितिका एकदम स्तब्ध उभी, काय बोलावे सुचेनासे झाले तिला. ते काका बोलत राहिले, “पोरी तुझे खूप आभार, तुम्ही माझ्या दोन मुलांना वाचवलंत. ह्या तिघांना मी सांगितलं होतं, पाऊस पडतोय कुठे जाऊ नका, पण ह्यांना पावसात गाडी फिरवायची हौस… आता फिटली ह्यांची हौस 😦 ” ते क्षणभर शांत झाले, मग त्यांनी हात जोडले, “माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर माफ करा.. पण… असो” त्यांना बोलताच येईना. अश्रू सावरत ते म्हणाले, “डॉक्टरसाहेब, शिफ्ट संपली का तुमची? आराम करा, खूप काम झालं नं आज? पुन्हा तुमचे खूप खूप आभार, निघतो मी”

नितिका शांत उभी होती, स्वतःला दोष देत होती, की आपण मघाशी ह्यांच्यावर उगाच रागावलो, एक अपराधीपणाची भावना मनाला छेदून गेली. काय वाटत असेल त्या बापाला ह्या क्षणी, याची कल्पना करणे अशक्य होते तिला. इतकं सगळं झालं, तरी हा माणूस आपल्याला धन्यवाद काय म्हणतो, असा नॉर्मल काय वागतो, याचे तिला आश्चर्य वाटत होते. एका मुलाच्या जाण्याचे दु:ख आणि दोन मुले वाचल्याचा आनंद असा संमिश्र भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता. डोळे तुडुंब भरून वाहत होते. हिला काही बोलणेच सुचत नव्हते, त्यांच्या पाठीवर हलकेच थोपटून, “काळजी घ्या” म्हणून ती निघाली.

पाऊस अजिबात थांबायचे नावं घेत नव्हता. तिने त्या भरलेल्या आभाळाकडे एकदा बघितलं आणि डोळे पुसले. ती देवाला दोष देत होती. देवा, का मला आज एक जीव वाचवायची संधी दिली नाहीस तू? एका बापाला त्याचा मुलगा सुखरूप आहे हे सांगितल्यावर, त्याच्या चेहर्‍यावर येणारा आनंद का नाही बघू दिलास तू मला? देवानंतर लोकं डॉक्टरला पूज्य मानतात, कारण तो एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवून आणू शकतो.. मग आज हा विश्वास का खोटा ठरवलास तू? मान्य आहे, मी डॉक्टर आहे, पण शेवटी मी पण एक माणूस आहे, मला ही भावना आहेत… मग माझ्या भावना अश्या का दुखावतोयस देवा.. का… सांग ना, का? 😦 😦

तितक्यात प्रचंड ढगांच्या गडगडाटासह, विजा चमकून पाऊस जास्त जोरात बरसू लागला… जणू देवालाही आपले अश्रू थोपवता आले नाही..अश्रू थोपवता आले नाहीत!!


– ही एक सत्यकथा आहे. नितिका माझी बहीण आहे. प्रसंग मांडण्यात थोडाफार बदल केला आहे, पण घटना १००% सत्य आहे.

– ही कथा ह्यावर्षीच्या जालरंग प्रकाशनाच्या ऋतू हिरवा २०११, ह्या अंकात प्रकाशीत झाली होती. आपल्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे.

– सुझे !! 🙂

वो तो है अलबेला हजारों में अकेला…

आज बारावीचा निकाल, आयुष्याचा एका महत्वपूर्ण टप्पा ओलांडून एका नवीन प्रवाहात उड्या मारायला सज्ज असतील सगळे, कोणाला झोपच नसेल लागली, माझा हा पेपर खराब गेला, आता माझी वाट लागणार, मला ते गणित सुटलंच नाही, मराठीचा पेपर पूर्ण झालाच नाही 😦 ह्या ना त्या काळजीने. सारखं घड्याळ बघ, किती टक्के मिळतील मला? सीईटीमध्ये स्कोर येईल, पण बारावीत कमी स्कोर आला तर, गेलं माझं इंजिनियरिंग मुंबई बाहेर आणि मेडिकल महाराष्ट्राबाहेर…काय होणार माझ आज? मार्क कितीही पडू देत आई-बाबा आणि घरचे इतर लोक काय म्हणतील? त्यांची तर खूप अपेक्षा आहे माझ्याकडून, बाबांनी तर आधीच सांगून ठेवलं की, पोरीला मेडिकलमध्ये घालणार, आईला पोरला इंजिनियर बनवून फॉरेनला धाडायचंय..

किती किती ते प्रश्‍न, किती किती त्या अपेक्षा? मान्य आहे हे युग स्पर्धेच आहे..पण स्पर्धा करताना असं गाढव करायंच का आपल्या मुलांचे? त्याना थोडं समजून घ्यायला हवं, पण हे “काही पालक” समजून घेत नाही आणि मग फ्रस्ट्रेशन, भीती, स्वतःसाठी एक कमीपणाची भावना निर्माण होते आणि मग कदाचित त्यातूनच आत्महत्या करायला प्रवृत्त होतात..आपण कधी अशी बातमी पाहिली आहे का? “आज न्यू यॉर्कमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून मुलाची आत्महत्या” “ऑस्ट्रेलियात नापास झाल्यामुळे एका मुलीने गळफास लावून आयुष्य संपवले”..का आपल्याला अश्या बातम्या ऐकायला मिळत नाही तिथे? आणि प्लीज़ असा गैरसमज करू नका, की मी कोणी मोठा तत्ववादी आपल्याच शिक्षणसंस्थेवर आरोप करणारा.. ह्याच शिक्षणपद्धतीत मी माझे शिक्षण पूर्ण केलंय…झाली त्याला आता ६-७ वर्ष. म्हटले तर तसा जास्त काळ नाही लोटला, पण ह्या काळात वाढलेल्या स्पर्धेने मला तोंडात बोट घालायला भाग पाडलंय.

आमच्या इथे सुशांत म्हणून एक मुलगा राहतो यंदा बारावीच वर्ष, ह्या वर्षात त्याला मी फक्त दोन-तीनदा बघितला असेन..एकदा सोसायटीच्या पुजेला आणि एकदा मी त्याच्या घरी गेलेलो दसर्‍याला सोनं द्यायला…..पुजेला जेमतेम ३० मिनिटे थांबला असेल तो, त्याला अजुन थांबायच होतं, पण तोच नाही म्हणाला, कारण जितका वेळ तो खाली राहणार तितका वेळ त्याला जागरण करायला लागणार….म्हटलं जा बाबा तू घरी…हे एकच उदाहरण नाही. माझ्या मित्राचा भाऊ रोज रात्री १२ ला झोपून पहाटे ३-३:३० ला उठायचा, माझा मित्र त्याला ऑफीसमधून फोन करून अलार्म द्यायचा…म्हटलं झोपू दे रे त्याला एक दिवस नीट, तर बरोबर ४ ला त्याच्या बाबांचा फोन तुला भावाची काळजी नाही का? त्याने अभ्यास करून पुढे गेलेला नकोय का तुला? आता तो मित्र मलाच (मैत्रिपूर्ण)  🙂 शिव्या देऊ लागला फोननंतर…मित्राच्या भावाच बॅडलक,  तो परीक्षेच्या वेळात नेमका आजारी पडला आणि त्यानंतर त्याला खूप पडली सुद्धा 😦

आता तुम्ही पालक म्हणाल किती कष्ट घेतो मुलांसाठी आम्ही, मर मर झटतो, त्याना काही कमी पडू देऊ नये म्हणून पोटाला चिमटा काढत दिवस जगतो..मग त्यानी आमची ही अपेक्षा पूर्ण करू नये? मला मान्य आहे स्पर्धा युगात कोणालाच आपला मुलगा/मुलगी मागे नकोय, फक्त थोड त्यांच्या कलाने घ्या, ही एकच विनंती करतोय, आधीच विचारून ठेवा त्यांना कशात रस आहे..सगळे डॉक्टर, इंजिनियर होऊ शकत नाहीत आणि व्हायला पण नकोय. त्यांना त्याच्या भविष्याची वाटचाल करण्यात मदत करा, त्यांचा मार्गच बदलू नका प्लीज….ते चालतील त्या मार्गाने तुमच्या इच्छेखातर, पण दूरावतील तुमच्यापासून…

मी एवढा मोठा नाही की कोणाला सल्ले देईन..पण ही जीवघेणी स्पर्धा खूप कोवळ्या कळ्या कोमेजायला कारणीभूत ठरतेय उमलण्याआधीच त्यांना वाचवा…

दीए की बाती देखी, देखी ना उसकी ज्योती..सदा तुमने ऐब देखा, हूनर तो ना देखा… असं नको व्हायला  !!

सगळ्या माझ्या दोस्तांना ऑल द बेस्ट आजच्या निकालासाठी, तुम्हाला भरपूर यश मिळो आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळो….  🙂  🙂

– सुझे