ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५

पार्टनर…

वरळी सीफेसच्या कठड्यावर तो कितीतरी वेळ शांत बसून होता. हातातल्या मोबाईलशी खेळत. दोन बोटांमध्ये मोबाईल गोल गोल फिरवत रहायची त्याला सवय. समुद्राच्या लाटांकडे बघत.. हवेची मंद झुळूक अंगावर घेत, कुठेतरी खोलवर विचारांच्या गर्तेत हरवून गेलेला तो… असा कितीवेळ तिथे बसून होता त्याचे त्यालाच माहित नव्हते. आजूबाजूला कोण येतंय-जातंय कोणाचंच भान नाही. लोकांची गर्दी, त्यांचे आवाज त्याला ऐकू येत नव्हते. ऐकू येत होतं, तो फक्त लाटांचा खळखळणारा आवाज आणि त्यांचा दगडांवर होणारा आघात. लाटा न कंटाळता सतत त्या दगडांवर येऊन आदळत होत्या आणि त्यांचा एकसंधपणा तो दगड नेमाने तोडत होता. लाटा कंटाळल्या नव्हत्या. त्या पुन्हा पुन्हा जोरात…अजून जोरात, येऊन त्यावर आदळत होत्या.

हे सगळं त्याला बघत राहायला आवडत असे. कितीतरी वेळ तो लाटांचा आणि दगडांचा खेळ बघत होता. तो खेळ बघता बघता मनातल्या विचारांशी त्याची तुलना सुरु होती. कुठे तरी एकदम अपराधीपणाची भावना दाटून आलेली. एकटं राहावं इथेच बसून जितका वेळ बसता येईल तितका वेळ… मोठ्या आशा-आकांक्षा. मोठी स्वप्ने… ती पूर्ण करायची घाई आणि अशक्यप्राय दडपण. फक्त आयुष्यात सुख असावे बाकी काही नको. हेच ध्येय…हेच एक टार्गेट. मग त्यासाठी यांत्रिक जगणे…मरमर काम करणे. पर्सनल लाईफला नारळ देणे.. आपल्या लोकांतील संवाद खुंटणे आणि नुसती त्या ध्येयाकडे धावत रहायची ही सक्ती किंवा इच्छा. काय झालंय साला आयुष्य… कुठून कुठे. कुठे कमी पडलो, काय करावे सुचत नाही…एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेलेला तो अचानक भानावर आला, जेव्हा त्याच्या पाठीवर कोणी तरी हलकेच थाप मारली.

तो आश्चर्याने म्हणाला, “तू… आणि इथे? तुला कोणी सांगितलं मी इथे आहे ते?”

“नाही मला कोणीच काही बोललं नाही, पण तुला इतकं तरी ओळखून आहे. मला कोण काय बोलणार तुझ्याबद्दल.. बोल काय झालं?”

तो शांत बसून होता. काही उत्तर किंवा प्रतिक्रिया नव्हती त्याच्याकडे. त्याने नजर परत समुद्राकडे वळवली आणि मोबाईलशी खेळत राहिला. त्याच्याशेजारी पार्टनर बसला आणि तोही समुद्राकडे बघत बसला. थोडावेळ कोणीच काही बोललं नाही आणि मग शेवटी पार्टनर बोलू लागला.

“समुद्र…खूप आवडतो ना असंच बघत राहायला..कितीही वेळ… कुठल्याही वेळी…पहाट असो वा दुपार.. अगदी क्षितिजापर्यंत पसरलेले नुसते पाणीच पाणी. कधी शांत तर कधी खवळलेला. ह्याच्या पोटात त्याने काय काय दडवून ठेवलं, तो कधीच कोणाला सांगत नाही. कधी थोडंफार बाहेर पडतं, पण ते अगदीच थोडंफार असतं. बाकी कोणालाही थांगपत्ता लागू देत नाही. आपण करू ती सगळी घाण पोटात घ्यायला तो मागे हटत नाही. एकदम आनंदाने सगळी घाण आपल्यात सामावून घेत राहतो. काय वाटतंय आज तुला त्याच्याकडे बघून…इतकावेळ मी तुला बघतोय दुरून. तुझी नजर स्तब्ध. काय प्रेमभंग वगैरे झाला की काय.. की ऑफिसचं टेन्शन? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? कसला इतका विचार?”

“काही नाही… खरंच”

“विचारांचे वादळ मनात घोंगावत असले की असाच शांत होतोस. अगदी थंड. कशाचंच काही वाटत नाही तुला… बेफिकीर होतोस काही क्षणापुरता..आज ओळखत नाही तुला मी. विचारांची जंत्री सुरु आहे तुझ्या डोक्यात. काय करावे, कुठे जावे..सगळेच मार्ग कुठेतरी खुंटल्यासारखे वाटतात का तुला? मला ते नेहमीच वाटतात… त्यात काय? चालायचंच रे… आयुष्य जर असं सरळसोट असतं, तर त्यात कसली मज्जा. ही तर मोठी अडथळा शर्यत. ज्यात प्रत्येकजण जिंकतोच, पण ते कधी हे ज्याचे त्याने ठरवायचे. जर ती वेळ… तो एक क्षण निभावून नाही गेलो, तर आपण त्या विचारात, काळजीत इतके हरवून जातो आणि तिथेच राहतो. मागे पडतो ह्या शर्यतीत आणि ते फार धोक्याचे आहे. अश्याक्षणी आपल्याला गरज असते आपल्या लोकांची आणि स्वतःची. स्वतःशी संवाद करणे.. काय चुकले. स्वतःला दोष देत बसून आपण आपल्या लोकांपासून स्वतःला तोडून घेतो जेणेकरून त्यांना आपली अवस्था कळू नये, पण असं होत नाही रे? ज्यांना कळायचं त्यांना कळतं रे बरोबर… ह्याने प्रश्न सुटत नाहीत… वाढतात. साला पंचविशीच्या पोरांना हार्टअटॅक येत असतात आजकाल… तुझ्या ऑफिसचीच गोष्ट बोलालेलास ना मागे.. कशाला इतका गप्प राहतोस. बोल की भडाभडा सगळे हिशोब जिथल्या तिथे चुकते करावेत. त्याची उधारी वाढली की मनस्तापाचे व्याज चढत राहते. मुद्दल बाजूलाच राहते, ते व्याज फेडण्याच्या फेऱ्यात आपण कायमचे अडकतो.”

“प्लिज…असं काही…”

“तू मला खोटं ठरवतोयस रे… मला? मी बघतोय की तुझं वागणं. मला कोणी काही सांगायला नको त्यासाठी. तुझी अवस्था बघून काळजी वाटतेच, पण त्याहून जास्त कीव करावीशी वाटते. इतक्यात हरलास? सहनशक्ती संपली तुझी? माणसाने प्रचंड स्वार्थी असावे आणि तो असतोच, पण त्या स्वार्थापायी सगळं असं उधळून द्यायचं नसतं. विचार करून निर्णय घेणे हाच उत्तम पर्याय. हवा तेवढा वेळ घे, विचार करून निर्णय घे…. घाईघाईने निर्णय घेऊन आपण आपलेच रस्ते चुकतो… भरकटतो आणि भरकटलो ते ठीक पण पुन्हा बरोबर रस्त्याला लागायची जिद्द हवी रे. नुसते हताश बसून काही होत नाही. चुका झाल्या त्या सुधाराव्यात… स्वतःसाठी सुधार. दुनियेसाठी नाही. दुनिया गेली #$%@@#$. आपल्याला लागलेली बोच आपल्यालाच बोचत असते…त्याचा त्रास बाकी कोणालाही कळणार नाही. गतकाळाच्या हरवलेल्या गोष्टी, घडलेल्या चुका आपण वर्तमानात आणि भविष्यात घडू पाहणाऱ्या परिस्थितीशी जुळवू पाहतो. तुझ्या, माझ्या आणि जगातील कुठल्याही माणसाच्या स्वभावात एक साम्य आहे. आपल्याला नक्की काय हवंय… कशाची गरज आहे हे आपल्याला माहित असतं.. एस्पेशली नाते संबंधात, पण आपण ते कधी कबूल करत नाही. प्रेम, दु:ख, काळजी, गुन्हा, राग वगैरे वगैरे असं सहज व्यक्त करता आलं असतं, तर खूप गोष्टी सहज झाल्या असत्या. एक लक्षात ठेव “The time to repair the roof is when the sun is shining”

“प्लिज.. अरे काय बोलतोयस तू? थांब… तुझा काही गैरसमज होतोय यार…”

“हा हा हा हा… गैरसमज… बघ आताच बोललो तुला ते मान्य करायचे नाही… नको करूस. तुला ह्याक्षणी काय वाटतंय नको सांगूस. मी असंच बोलतोय समज…निरर्थक”

“बरं…बोल”

“हां… तर मी कुठे होतो.. व्यक्त होणे… आपल्याला मोठमोठ्या फिलोसॉफीकल गोष्टी लगेच कळतात, किंवा आपण तसा आव आणतो आणि त्याबद्दल अजून अजून चर्चा करत राहतो, कारण ह्या गोष्टी माहित नसणे म्हणजे कमीपणाचे अशी भावना असते हल्ली सगळ्यांमध्ये…पण आपल्याला हव्या असलेल्या, आपल्या गरजेच्या लहानसहान गोष्टी..त्याचं काय? जसे आईला घट्ट मिठी मारून तिला सांगणे की माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे… बाबांना सांगणे मला तुमची खूप गरज आहे. नाही सांगत आपण, आपल्याला ना स्वतःचं स्वतःसाठी मिरवायची सवय झालेली असते. मी खूप कणखर…सगळं निभावून नेईन असा (फाजील) आत्मविश्वास…पण बऱ्याचदा असं नसतं रे. सगळं सगळं आपल्याला नाही निभावता येत. आपल्याला आपल्या माणसांची गरज पडते त्यावेळी. अश्यावेळी साद घालावी त्यांना हक्काने… कोणाशी भांडावे वाटले भांडावे.. रडावेसे वाटले रडावे… काही चुकलं असेल तर माफी मागायची असेल तर मागावी. सगळ्या अगदी साध्यासाध्या गोष्टी दिसायला, ऐकायला अगदी शुल्लक वाटतील, पण करताना त्यासाठी किती हिम्मत लागते ते कळतं. संवाद साधणे हेच मला सांगायचे आहे. मित्रांची फौज काय कामाची, जर मन मोकळं करता येत नसेल तर आणि मित्राहून जास्त महत्त्वाचे घरचे असतात. त्यांना कधी तू हे आपुलकीने सांगणार. तुझ्या मित्रांहून जास्त त्यांनी तुझ्यासोबत वेळ घालवलाय..हो की नाही? आपण लाख बोलू की माझ्या मित्राने माझ्यासाठी हे केलं, मला समजावून घेतलं….हेच घरच्यांनी नसतं घेतलं वगैरे… हे आपण सहज बोलून जातो… पण घरी स्वत: कधी हे आजमावून बघितलेस का? नाही…कधीच नाही”

“हम्म्म्म… हो. कधीच नाही !!”

“थोडा बदल गरजेचा आहे ह्याक्षणी आणि तुझं ते तुलाच कळायला हवं स्वत:ला वेळ दे.. नीट गोष्टी प्लान कर. घाई घाई नको. लगेच सगळं संपलं म्हणून विचार करून स्वतःला दोष देत बसू नकोस, जे घडलं ते तुझ्यामुळे असेल, तर ते बदलेल पण तुझ्यामुळेच आणि फक्त तुझ्यामुळे. त्यासाठी कोणा त्रयस्थ माणसाच्या वकिलीची गरज नाही. बाकीच्यांकडे बघ… सगळं करून भागून निवांत असतात, मग आपण तसं वागलं तर कुठे झालं? कोणासाठी आपली गरज संपली, म्हणून आपल्यासाठी ती व्यक्ती बदलत नाही. त्रास..त्रागा…चिडचिड सगळं सगळं मान्य, पण ह्यातून तुलाच बाहेर यावं लागेल. दुसरे आधाराचे शब्द बोलतील ती वाट नकोच बघायला. स्वतःसाठी काही कर… घरच्यांसाठी काही कर. दुनियादारी सोड आता…आपल्याला कोणाची गरज आहे, हे कोणाला सांगावे लागणे हीच त्या नात्याची हार असते. कोणी आपल्याला समजावून घ्यावं हा अट्टहास आपलेच हसू करतो हे लक्षात असू देत. इतका विचार करत राहशील तर वेड लागेल. पळत्या मागे धावायची सवय सोड, खूप कमीपणा घेतलास आजवर स्वतःकडे, पण आता हे बदलायला हवंय मित्रा. तुझ्या ह्याच स्वभावाचा सगळे फायदा घेत आलेत रे… कसं कळत नाही तुला ते? This is the time to set your priorities..”

“ह्म्म्मम्म…”

“फक्त ह्म्मम्म्म? अरे आता शांत नको राहूस… शेवटी आयुष्याला पण आयुष्य असतं… वेळ निघून जाते.. .गोष्टी बदलतात….माणसं निघून जातात… आपल्याला त्रास होतो सगळ्याचा. होतो ना? आणि त्या गोष्टी घडण्याला… तुटण्याला आपण कारणीभूत असू तर जास्तच. तुटलेल्या गोष्टी सुधारायची हिम्मत हवी किंवा ती बोच सतत मनात तेवत ठेवायची सहनशक्ती. Its part of life. आयुष्याच्या गणितात प्रमेय.. साध्य-सिद्धता वगैरे सुरूच राहणार. जास्त विचार करू नकोस.. असो ठाम राहायला शिक आणि घरी चल. स्वतःच्या स्वप्नांचा विचार कर. हा समुद्र इथेच राहणार आहे आणि त्या लाटा कधीही थांबणार नाहीत तुझ्या विचारांसारख्या….तुही आहेसच म्हणा सगळ्यांसाठी इथेच कायमचा अगदी तसाच” 🙂

– सुझे !!