रोहित

रात्रीचे ११ वाजलेत. मुंबई-गुजरात महामार्गावरून आमची गाडी सुसाट वेगाने डहाणूच्या दिशेने रस्ता कापत होती. इच्छितस्थळी पोचण्यास अजून किमान ४०-४५ मिनिटे लागणार होती आणि त्यात गाडीतल्या वायरलेसची खर-खर डोक्यात जात होती. मनात भीतीचे काहूर दाटले होते. काय होणार पुढे… काही काही कळत नव्हते. रस्त्यावर रहदारी तुरळक होती, पण प्रसन्नदा गाडी ८०-१०० च्या वेगाने दामटवत होते. आम्ही दोघेही शांत होतो. काय बोलावे सुचेनाच. मी सतत साईड मिररमधून मागे बघत होतो…कोणी पाठलाग तर करत नाही ना..कोणाला काही संशय वगैरे आला असेल का? मी सारखा त्याच विचाराने अस्वस्थ होतो. पोलिसांच्या गाडीत बसून ही भीती वाटणे म्हणजे खूपच विरोधाभासी होते….पण परिस्थिती तशीच होती. प्रसन्नदा अगदी शांतपणे गाडी चालवत होते. एक हात स्टेअरिंग व्हीलवर आणि दुसरा हात खिडकीत थोडा बाहेर निवांत विसावलेला. मागच्या सीटवर रोहित शांतपणे झोपला होता. त्याला ह्या धावपळीचा काहीच थांगपत्ता नव्हता, पण मी गेल्या १८-१९ तासात झालेले नाट्य मी कधीच विसरू शकत नव्हतो. एक-एक क्षण माझ्या डोळ्यासमोरून जात होता…

रोहित… वय वर्ष अंदाजे १४-१५. आमच्याच बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ्यावर त्याचे घर. तो आणि त्याचे आई-बाबा असे तिघे जण इथे राहायचे. म्हणजे आधी त्याचे आजी-आजोबा आणि काका हेही राहायचे इथे, पण घरातल्या अंतर्गत वादामुळे रोहितच्या आई-वडलांनी त्यांना घराबाहेर काढले. जेव्हा त्यांना घराबाहेर काढले, तेव्हा रोहित जेमतेम काही महिन्यांचा असेल. त्यामुळे आजी-आजोबा हयात असूनदेखील त्याला त्यांची माया लाभली नाही. आजूबाजूचे सगळे म्हणायचे, की ह्यांनी आपल्या आईबापाला असा त्रास दिला, म्हणून त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आता त्यात रोहितचा काय दोष म्हणा…लोकं काय दहा तोंडाने बोलत रहायची आणि त्याचे आई-बाबा ते निमूटपणे ऐकून घ्यायचे. रोहितबद्दल मोजक्या शब्दात सांगायचे तर…तो स्पेशल चाईल्ड होता. जन्मापासून तो असाच होता. खूप सारे उपचार त्याच्या आई-वडिलांनी केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याची शारीरिकदृष्ट्या वाढ होत गेली, पण तो मानसिकदृष्ट्या बालपणातच राहिला.

तो जेव्हा लहान होता… म्हणजे जेमतेम २-३ वर्षाचा तेव्हा आम्ही क्रिकेट खेळत असताना मध्येच यायचा…धावायचा बॉलच्या मागे.. सायकली ढकलून द्यायचा..लहान लहान दगड उचलून मारायचा आणि त्याचे आई-बाबा त्याच्या सतत मागे त्याला पकडायला धावायचे. त्यांची खूप दया येत असे…काय वाटतं असेल ह्यांना… कसं सांभाळत असतील ह्याला. हा तर ह्या वयात सांभाळता येत नाही…पुढे हा मोठा झाल्यावर काय होईल? असे विचार तात्पुरते यायचे आणि निघून जायचे. तसा आम्हाला तो जास्त भेटत नसे. त्याचे आई किंवा बाबा असले सोबत तरच तो आम्हाला दिसायचा. त्याचे बाबा एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीत कामाला होते आणि ते शिफ्टमध्ये काम करत. आईने ह्याची अशी अवस्था झालेली बघून घरीच राहणे पसंत केलेले होते. हळूहळू तो मोठा होत होता आणि त्याला संभाळणे अधिकाधिक कठीण होऊन बसले होते. त्याचे ते लठ्ठ शरीर..नेहमी काहीतरी शोधत फिरणारी नजर.. एका हाताचा होणारा विशिष्ट कंप आणि म्हाताऱ्या माणसासारखं हळूहळू चालणं आणि तोंडाने काहीतरी सतत पुटपुटत राहणे जे कधी समजलेच नाही. नेहमी सदरा वगैरे घालून असायचा तो. मध्येच अंगावर धावून यायचा. कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. त्याला त्यांच्या स्पेशल शाळेत सुद्धा भरती केले होते, पण तिथल्या शिक्षकांना त्याला सांभाळणे नीट जमले नसावे त्यामुळे त्याला मग काही वर्ष मी शाळेत जाताना बघितले नाही.

का कोण जाणे मला तर त्याची भयंकर भीती वाटायची… वाटते. तो कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. आता ह्यात त्याचा काय दोष… पण जे व्हायचे ते व्हायचेच त्याच्या नकळत. त्याची इच्छा असो वा नसो.. ह्या दरम्यान दोन-तीनदा असे प्रसंग घडले, की मला रोहित आसपास जरी दिसला, तरी मी थोडा अस्वस्थ होत असे. त्यातले काही प्रसंग सांगायचे, तर मी तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टमध्ये चढलो. ऑफिसला जाण्यासाठी मी एकदम फ्रेश मूडमध्ये निघालो होतो आणि लिफ्ट चौथ्या माळ्यावर गेली. तिथे रोहित आणि त्याची आई लिफ्टमध्ये चढले आणि माझी अस्वस्थता अचानक वाढली. तो माझ्याकडे बघत होता. मी त्याची नजर चुकवत होतो पण तो माझ्याकडे टक लावून बघत होता. आईने त्याचा एक हात पकडलेला होता. तो हळूच पुढे आला आणि माझ्यासमोर… अगदी समोर येऊन उभा राहिला. माझी अवस्था अजूनच वाईट.. कळत नव्हते काय होतंय… मी का घाबरतोय ह्याला… पण ह्याने काही केले तर… तशी लिफ्ट तळमजल्यावर पोचली आणि त्या १०-१२ सेकंदामध्ये मला दरदरून घाम फुटला….

एकदा असेच दिवाळीला माझ्या घरी सगळे मित्र फराळाला आले आणि फराळानंतर आम्ही सगळे बिल्डींगच्या आवारात उभे राहून गप्पा मारत उभे होतो. आम्ही ५-६ जण एका वर्तुळाकार आकारात उभे होतो. हा लिफ्टच्या दरवाज्यातून धावत आमच्याकडे आला आणि बरोबर आमच्यामध्ये येऊन उभा राहिला. सगळे हसत होते, पण माझी तंतरली होती. हा जर काही विचित्र वागला तर ह्याला आवरणार कसे. त्याचे बाबा मागून चालत येत होते आमच्याकडे. मी त्यांच्याकडे आशाभूत नजरेने बघत होतो, की त्यांनी त्याला घेऊन जावे. ते लांबूनच त्याला आवाज देत राहिले आणि मला इथे दरदरून घाम फुटला. मी एक-दोन पावले मागे गेलो आणि तो वसकन माझ्या अंगावर आला. नशीब त्याच्या बाबांनी त्याला वेळीच सावरले.

ह्या प्रकारानंतर मी रोहितची धास्तीच घेतली होती. त्याच्याबद्दल अनामिक भीती मनात कायम घर करून राहिली ती राहिलीच. तो परत शाळेत जाऊ लागला होता. दररोज संध्याकाळी त्याला एक गाडी सोडायला बिल्डींगच्या गेट खाली येत असे. मला वाटलं आता त्याची परिस्थिती नक्की सुधारेल आणि मग त्याच्याबद्दल विचार करणे थांबले…. पण हल्लीच

म्हणजे गेले काही महिने किंवा गेल्या एक-दीड वर्षापासून रोहितचा मोठ्याने रडण्याचा आवाज कानी पडणे हे नित्यनेमाचे झाले होते. आता आपण जाऊन काय बघणार का रडतोय हा.. काय झालं… ओरडले असतील आई-बाबा. तसा त्याचा आरडओरडा सुरु असायचाच, पण हल्ली तो खूपच वाढला होता. माझी आई तो असा ओरडायला लागला की घाबरायची. मला सांगायची जाऊन सांग त्यांना वगैरे वगैरे… मी त्या फंदात कधी पडलो नाही आणि दुर्लक्ष करत राहिलो. रोहितचे आई-बाबा वरवर तरी शांत वाटायचे, पण त्यांचे त्याला ओरडण्याचे, मारण्याचे आवाज कानी पडणे सुरु झाले होते. प्रकार खूपच हाताबाहेर जातंय असं वाटत होतं, पण आपण शेवटी त्रयस्थ. त्यांना समोरून काही बोलायला गेलो की, उगाच आपला पाणउतारा का करून घ्या…म्हणून काही बोललो नाही. बाबा सेक्रेटरी आहेत, त्यांना आईने सांगून बघितले… पण हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून विषय बंद केला.

धक्का तेव्हा बसला ज्या दिवशी बिल्डींगची वार्षिक सत्यनारायणाची पूजा होती.. रविवार असल्याने बिल्डींगच्या आवारात सगळेच जमले होते. रात्रीचे एक-दीड वाजला असेल. एक पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन हवालदार लगबगीने बिल्डींगमध्ये आले. आम्हाला वाटले आम्ही जास्त गोंधळ करत होतो की काय रात्रीचे, म्हणून कोणी तक्रार केली आमच्या विरुद्ध…. पण तसे काही नव्हते. त्यांनी बिल्डींगमधल्या दोन-तीन काकांना बोलावले आणि लिफ्टने वर निघून गेले. त्या दिवशी काय झालं हे कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी मला कळले की, समोरच्या बिल्डींगमधल्या एका रहिवाश्याने रात्री पोलिसांना फोन करून सांगितले, की चौथ्या माळ्यावर एक इसम एका मुलाचा गळा दाबायचा प्रयत्न करतोय. मला प्रचंड धक्का बसला हे ऐकून. रोहितचे बाबा आणि असं? काय झालं नक्की काही कळले नाही…. जेव्हा जेव्हा रोहित आणि त्याचे आई-बाबा एकत्र असत, तेव्हा तो त्याच्या बाबांना बिलगून चालायचा. त्यामुळे मला साहजिकच वाटले की, तो त्यांच्या जास्त जवळचा असेल पण काय माहित… ते जर असे वागले असतील त्याच्यासोबत तर….  😦

त्यानंतर काही दिवस रोहितला त्याची आई पार्ल्याला घेऊन गेली. काही आठवड्यांनी तो आला परत… मग तेच रडणे-ओरडणे सुरु झाले. दारावर जोरात हात आपटणे… खिडक्यांच्या काचा बडवणे. हल्ली हे प्रकार रोज आणि जास्त प्रमाणावर होऊ लागले. दुपारच्या वेळी तो रडायला लागला की तास-दीड तास तो थांबत नसे. त्याला एका बेडरूममध्ये बंद केले असायचे आणि ती बेडरूम नेमकी माझ्या बेडरूमच्या वर होती. त्यामुळे त्याच्या सगळ्या हालचाली.. त्याचे पाय आपटणे.. दारावर धक्के मारणे..ओरडणे.. खिडक्यांच्या काचांवर जोरजोरात मारणे सगळे सगळे स्पष्टपणे ऐकू यायचे आणि पुढच्या क्षणाला काच फुटल्याचा मोठा आवाज झाला. फ्रेंच पद्धतीच्या खिडक्या असल्याने त्याची एक-एक काच जवळजवळ ४-५ फुट किंवा त्याहून जास्त मोठी होती.

मी खिडकीतून खाली बघितले. समोर रस्त्यावर चालणारे सगळे थांबून वर हातवारे करून आमच्या बिल्डींगकडे बघत होते…मग त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला असावा आणि त्याला फरफटत बाथरूममध्ये नेले आणि तिथे त्याला मारत होते. मी तडक चौथ्या मजल्यावर जायला निघालो. त्यांच्या समोर राहणारे नाना आणि मी त्यांच्या घराची बेल मारत होतो, पण ती बंद होती. आम्ही दार वाजवून बघितले.. पण व्यर्थ. त्यांनी दार उघडले नाही. मी म्हटलं आत काय झालं असेल माहित नाही… पोलिसांना बोलवूया का वगैरे… नाना बोलले थांब जरा वेळ. मी नानांकडे बसलो. आम्ही दरवाजा उघडा ठेवला होता जेणेकरून रोहितच्या घरातून कोणी बाहेर येतंय का ते बघायला.

थोड्यावेळाने रोहित आणि रोहितचे बाबा बाहेर आले. रोहितच्या हाताला जखम झाली होती पण बाकी त्याच्या चेहऱ्यावर भाव तसेच होते. त्यात काही बदल झालेला नव्हता. तो शांत होता. अजिबात रडत नव्हता. आम्ही पुढे जाणार इतक्यात ते लिफ्टने खाली निघून गेले आणि मी घरी आलो.

त्यादिवशी झालेल्या प्रकारानंतर किमान दोन-तीनवेळा तरी हा प्रकार परत झालेला होता. इतक्या मोठ्या काचा त्याने हात मारून मारून तोडल्या होत्या. नानांना मी खुपदा विचारले होते की, आपण काही करू शकतो का ह्या बाबतीत. कोणी आहे का ओळखीचे जे ह्यात आपली मदत करतील. काही मार्गदर्शन करतील. दमबाजी करून हे प्रकरण संपणारे नव्हते आणि एकदा का हे प्रकरण हाताबाहेर गेलं तर खूप महाग पडू शकतं. रोहितला खूप जास्त काळजीची आणि चांगल्या शिक्षणाची गरज होती. नानांनी मला एक फोन नंबर दिला. पोलीस सब-इन्स्पेक्टर प्रसन्न नाईक. नानांच्या दूरच्या नातेवाईकांपैकी एक. त्यांची ड्युटी ओशिवरा पोलीस स्टेशनला असे नानांनी सांगितले. त्यांना मी सांगितले अहो नाना…पोलिसी दम देऊन होणारे काम नाही हो हे. त्यावर नाना शांतपणे बोलले, “ह्यांना जाऊन भेट आणि जे झालंय ते सांग. ते नक्की काही तरी करतील.” मी बरं म्हणून त्यादिवशी संध्याकाळी, त्यांना फोन करू की नको ह्या विचारतात होतो. उगाच कशाला आपण ह्या प्रकरणात पडावं. साला आपलंच सांभाळताना नाकीनऊ येत आहेत आणि त्यात हे कशाला म्हणून मी फोन न करताच निघालो. लिफ्टने खाली आलो आणि बघतो तर समोर रोहित उभा. त्याची नजर भिरभिरत होती. तो दरवाजात मध्येच उभा होता, त्यामुळे मला आडूनआडून निघावे लागत होते, पण तो ठिम्म उभा होता. मग त्याची आई आली आणि तिने त्याला सरळ आत ढकलले लिफ्टच्या. एखाद्या निर्जीव वस्तू सारखा तो आत कोलमडून पडला आणि जोरजोरात रडायला लागला. त्याची आई त्याचे तोंड दाबायचा प्रयत्न करत होती. हा प्रसंग बघून मी तडक प्रसन्न नाईकांना फोन केला.

माझ्या ऑफिसपासून त्यांचे पोलीस स्टेशन जवळच होते. मी आणि ते दोघेही नाईटला असल्याने ऑफिसनंतर मी गाडीने घरी न जाता पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितले की झालेला प्रकार निश्चितच धक्कादायक आहे, पण हे खूप सामान्य आहे. ज्या घरात अशी मुलं असतात त्यांची होणारी फरफट कधी कधी अश्या विलक्षण टोकाला जाते की त्यांचा तोल सुटतो… त्यांना त्या विशेष मुलांची चीड येऊ लागते, पण ऑफकोर्स हे सगळ्यांच्या बाबतीत होतं असे नाही…. पण अश्या खुपश्या केसेस मी बघितल्या आहेत आणि खरं सांगायचं तर माझा छोटा भाऊ… तो आज २६ वर्षाचा आहे. तोही असाच आहे. त्याला माझ्या बाबांनी कधी दूर केले नाही. भडकायचे खूप त्यावर… पण कधी त्याच्यावर हात उचलायचे नाही. माझ्या बाबांना त्याने जिन्यावरून ढकलून ही दिले होते रागात… त्यांचे डोके फुटले.. पाय दुखावला गेला..पण बाबांनी त्याला सांभाळायचा, शिकवण्याचा चंग केला होता. ह्या वयात देखील त्याला प्रार्तविधी, कपडे बदलणे, जेवणे … ह्यात कोणाची ना कोणाची मदत लागतेच. तो एकटा नाही हे करू शकत. मी ते ऐकून सुन्न झालो काय बोलावे कळेना. रोहितच्या आई-बाबांच्या बाबतीत काही घडले होते का, की ज्यामुळे त्यांना रोहित नकोसा झाला किंवा त्याला मारहाण करताना त्यांना काही वाटले नसेल का? त्यावर प्रसन्नदा इतकंच बोलले.”प्रत्येकाच्या गोष्टींना समजून घेण्याच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात अश्या गोष्टी घडल्या की टेंपर वाढणारच. पण म्हणून ते दोषी नाहीत असे मी म्हणणार नाही… पण हल्ली गोष्टी नाजूकपणे हाताळण्याऐवजी आपण तोडायच्या निर्णयावर लगेच पोचतो. बघू आपण काही करता येतं का ते…”

काही दिवस शांततेत निघून गेले. एका दिवशी पहाटे मी चार सव्वाचारच्या सुमारास मी घरी येत होतो. बिल्डींगच्या लिफ्टच्या बाजूला मुख्य दाराला एक लोखंडी जाळीचा दरवाजा आहे जो सरकवून आत जाता येत असे. रात्री तो दरवाजा कुलूप लावून बंद केलेला असे. मी पहाटे येतो म्हणून वॉचमॅन कुलूप उघडून ठेवत असे, पण दरवाजा लोटून ठेवलेला असायचा. मी त्या दरवाज्याजवळ पोचलो आणि पार शॉक लागल्यासारखा मागे झालो. समोर रोहित उभा होता आणि त्याने पिवळ्या रंगाचा सदरा घातलेला होता, ज्यावर रक्ताचे डाग दिसत होते आणि त्याच्या हाताला ही रक्त लागलेले होते. त्याला त्या अवस्थेत बघून माझी बोलतीच बंद झाली. वॉचमॅन टाकीतले पाणी बघायला गेला असणार, कारण तो आसपास दिसत नव्हता. मी तो दरवाजा उघडला आणि आत गेलो आणि दरवाजा परत लोटून बंद केला जेणेकरून रोहित बाहेर जाऊ नये. मी तडक चौथ्या माळ्यावर गेलो, तर तिथे सगळीकडे रक्ताचे डाग होते. त्यांच्या घराचा दरवाजा लोटलेला होता आणि रोहितची आई जमिनीवर पडलेली होती. मला काय करू सुचेनासे झाले. मी आधी प्रसन्नदाला फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले ज्याची भीती होती तेच झाले. आधी त्याच्या आई-बाबांच्या सहनशक्तीचा अंत झाला असेल आणि आता त्याच्या. त्यांनी मला तडक डॉक्टरांना आणि पोलीस स्टेशनला फोन करायला सांगितला. ते लगोलग इथे यायला निघाले होते. त्यांनी सांगितले की रोहित कोणाला दिसणार नाही ह्याची काळजी घे. आता ते का.. कशाला विचारायची वेळ नव्हती. मी हो बोललो आणि डॉक्टरांना बोलावले.

रोहितच्या आईला डोक्याला थोडी मोठी जखम झाली होती. कदाचित त्यांनी रोहितला आवरायचा प्रयत्न केला असेल, पण त्याने त्यांना जोरात धक्का दिलेला असावा. त्यांच्या जीवाला काही धोका नव्हता. त्या माराने आणि रक्तस्त्रावाने फक्त बेशुद्ध पडल्या होत्या. डॉक्टर आणि नाईक जवळजवळ एकाच वेळी तिथे पोचले आणि प्रसन्नदा रोहितला घेऊन निघून गेले. मी माझ्या बाबांसोबत आणि बिल्डींगमधल्या काही लोकांसोबत हॉस्पिटलला गेलो आणि एव्हाना पोलीसदेखील घटनास्थळी पोचले होते. रोहितचे बाबा रागातच घरी आले आणि मग तडक हॉस्पिटलला पोचले. रोहित कुठे.. काय कोणी काही विचारले नाही. रोहितला प्रसन्नदा कुठे घेऊन गेले काही कळत नव्हते. त्यांचा फोनही लागेनासा झाला.

संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांचा फोन आला की रोहित सुखरूप आहे आणि खार रोडला माझ्या घरी आहे. मी त्यांना काही विचारायच्या आधी ते बोलले की, “अजून प्रश्न नकोत. रोहितला सुखरूप ठिकाणी पोचवायचे आहे. तू येशील जमल्यास?” आता मला तर फारच भीती वाटू लागली होती. एक तर त्याची आई जीवानिशी वाचली. पोलीस ह्याचा शोध घेत आहेत आणि त्याला घेऊन एका पोलीसासोबत जाणे, मला खूपच धोक्याचे वाटू लागले. मी दोन मिनिटं काहीच बोललो नाही. त्यांना ते कळले असावे, ते इतकंच बोलले.काळजी नको करूस काही धोका होणार नाही. मी नानांना फोन केलाय आधीच. त्यांना पूर्ण कल्पना देऊनच हे काम करतोय आणि मला त्यांनी हायवेवर ६-६:३० पर्यंत पोचायला सांगितले.

करकच्चून मारलेल्या ब्रेकने मी थोडा पुढे फेकल्यासारखा झालो आणि एकदम भानावर आलो. इतकावेळ सुरु असणारे विचार थांबले. मी मागे बघितले रोहित शांतपणे बसून होता. पाण्याच्या बाटलीशी त्याचा काही खेळ सुरु होता. पाणी अंगावर सांडत होते, पण तो खूप खुश होता. मी आणि प्रसन्नदा गाडीतून उतरलो. समोरच्या घरातून एक साधारण साठीकडे झुकलेली व्यक्ती आमच्याकडे हळूहळू चालत आली. प्रसन्नदाचे वडील होते हे एव्हाना मला कळले होते आणि त्यांच्या मागोमाग पप्पा… पप्पा करत एक २५-२६ वर्षाचा तरुण लगबगीने आला. त्यांनी त्याला हात दिला आणि त्याचा हात घट्ट धरून आमच्याकडे आले. त्यांना जसे रोहितबद्दल सगळे माहित होतेच. त्यांनी स्वतः गाडीचा दरवाजा उघडला आणि रोहितच्या डोक्यावून हात फिरवला. रोहित एकदम शांतपणे उतरला आणि त्या तरुणाचा हात धरून घराकडे हळूहळू चालू लागला.

मी प्रसन्नदाकडे बघू लागलो. आता पुढे काय? ह्याचे आई-बाबा ह्याचा शोध घेणारच.. मग काय करायचे…? पोलिसात त्याच्या वडलांनी तक्रारदेखील केली असणार. त्यामुळे पोलीस मागावर असणारच. त्याचं काय? एखाद्या चांगल्या स्पेशल शाळेत का नाही नेले… इथे घरी का आणले वगैरे अश्या अनेक प्रश्नांची गर्दी झालेली मनात. काही सुचेनासे झालेले. त्याने मला खुणेनेच त्याच्या मागे यायला सांगितले आणि आम्ही एका खिडकीसमोर उभे होतो. आत डोकावून बघितल्यावर मला धक्काच बसला. रोहित प्रसन्नदाच्या बाबांसोबत मस्त अंगणात बसला होता. त्याच्या बाजूला प्रसन्नदाचा भाऊ सागर. ते काका दोघांशी हावभाव करत.. हातवारे करत बोलत होते आणि ते दोघे ते मन लावून ऐकत होते. ते बघून चांगले वाटले, पण प्रश्न तसाच राहिला… हे असं किती दिवस? किती महिने?

त्यावर प्रसन्नदा बोलला, “माहित नाही… मी बाबांना फोन केला, जेव्हा तू मला फोन केलास. ते म्हणाले इथे ये त्याला घेऊन बस. माझा माझ्या बापावर पूर्ण विश्वास आहे. त्याने आजवर माझ्या भावाचं सगळं काही केलंय. माझा भाऊ आज दिसतोय त्याहून अतिशय वाईट अवस्थेत होता काही वर्षांपूर्वी. बाबांनी त्याची भाषा शिकून त्याला शिकवलं मोठ्ठं केलं. रोहितला खूप सांभाळून घेण्याची गरज आहे. जे त्याच्या घरी किंवा कुठल्या शाळेपेक्षा किंवा बालसुधारगृहापेक्षा माझे बाबा चांगल्याप्रकारे करतील. इथे त्याला कसलाही धोका नाही. Compatibility…Don’t you think so?

माझे प्रश्न काही संपत नव्हते, “अरे पण दा पोलीस?”

प्रसन्नदा फक्त जोरात हसला… बस्स !!

(एव्हाना समोर अंगणात रोहित आणि सागर दोघेही फुटबॉल खेळण्यात मग्न होते)

– समाप्त

सदर कथा मिसळपाव दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित आहे. आपल्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे. मिसळपाव दिवाळी अंक इथे वाचता येईल – मिसळपाव दिवाळी अंक २०१३

सुझे   🙂   🙂

MH-02-XA-40X2 – भाग अंतिम

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला

भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

भाग तिसरा – MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

अरुणने रात्री उशिरा केलेले आणि पहाटे केलेले फोन त्यांच्यासाठी एक महत्वाचा दुवा होता. अचानक काहीसे आठवून त्यांनी ऑपरेटरला फोन लावला आणि तपासाला काही तरी दिशा मिळाल्याचे एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तराळले…

इन्स्पेक्टर भालचंद्र रावत जातीने ह्या प्रकरणात लक्ष घालत होते. त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्यादेखील होत्या, पण ही केस त्यांनी अगदी प्रतिष्ठेची करून घेतली होती. जमेल तितके पुरावे आणि माणसांची जबानी ह्यात घेतली गेली. दोन दिवसांनी मुंबईला जाऊन एकनाथची साक्ष घेण्याचे मनसुबे उद्ध्वस्त झाले. कारण चार दिवसांनी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एका खाजगी कार्यक्रमासाठी नागपुरात येणार होत्या. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी आणि त्या जिथे जिथे कार्यक्रमाला जातील, त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. अचानक आलेल्या या जबाबदारीमुळे त्यांच्या तपासातली एकसूत्रता भंग पावली. रस्त्याची गस्ती, संशयित लोकांची धरपकड आणि हॉटेल्सची झडती हीच कामे त्यांच्या मागे लागली.

इकडे मुंबईत बॉबी आणि जयेशभाई आपल्या धंद्यात गुंतले. रोजची गाडीभाडी, बस तिकीट बुकिंग आणि सोबतीला सायबर हे वेळापत्रक सुरु झाले. मध्यंतरी दोन-तीनदा बॉबीने रावतांना फोन केला, पण तो त्यांनी कामात असल्यामुळे कट केला. गाडी जाऊन आता १४-१५ दिवस झाले होते. इतक्या दिवसात गाडी पूर्ण सुटी करून किंवा जशीच्यातशी कोणाला तरी विकली असेल. त्यामुळे पोलिसांचा तपास पुढे जाणार नाही याची त्यांना खात्री पटली. रोज सकाळ-संध्याकाळ जयेशभाई बॉबीच्या ऑफिसात मेरा नुकसान हो गया, कर्जे मैं डूब गया म्हणून रडगाणं गात असे. बॉबीला ते निमुटपणे ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. असे दिवस जात राहिले.

होता होता महिना झाला. सकाळी सकाळी रावतांनी जयेशभाईंना फोन केला. “रावत बोलतोय… दाढी खूप वाढलीय. चारकोपला येतोय दाढी करायला. ” जयेशभाई काही म्हणेपर्यंत समोरून फोन कट झाला होता. जयेशभाईंना काय कळावे सुचले नाही. ते तडक बॉबीकडे निघाले. त्याचं ऑफिस त्याच्या घरापासून अगदी दोन इमारती सोडून होतं. बॉबी ऑफिसमध्ये सिगारेट पीत बसला होता. जयेशभाईंचा असा प्रश्नार्थक चेहरा बघून तो तडक बाहेर आला आणि हातातली सिगारेट फेकून दिली. “क्या हुआ जयेशभाई??”

त्यांनी झालेला प्रकार बॉबीला सांगितला. आता बॉबीदेखील विचारात पडला. बॉबीचा सायबर जिथे होता, त्या इमारतीत एक दुधवाला, एक ब्युटीपार्लर, एक दातांचा दवाखाना, एक किराणामाल दुकान, एक दागिन्यांचे दुकान आणि एक हेअर कटींग सलून होते. सगळे तसे बॉबीला चांगले ओळखायचे आणि त्याला मानायचेसुद्धा. बॉबीने तातडीने रावतांना फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन बिजी आला. त्याने वैतागून फोन कट केला आणि सिगारेट पेटवली.

पाच मिनिटांनी जे दृश्य बॉबी आणि जयेशभाईंना दिसले, त्यावर त्यांचा स्वत: विश्वास बसत नव्हता. डोळे फाडून ते एकटक तिथे बघत राहिले. इन्स्पेक्टर भालचंद्र रावतसमोर एका गाडीत बसलेले आणि ही तीच गाडी जी चोरीला गेली होती. जयेशभाईंच्या उत्साहाला पारावर उरला नाही. ते धावत गाडीपाशी गेले आणि गाडी न्याहाळू लागले. रावत त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, “हो हो तुझीच गाडी आहे.” आणि ते बॉबीच्या दिशेने निघाले. बॉबीशी हात मिळवत, बाजूला असलेल्या खुर्चीवर बसले. मागून एक पोलिसांची जीप आली आणि ती थोडं अंतर ठेवून उभी राहिली. पोलिसांच्या गाडीतून कोणी उतरले नाही, सगळे होते तसेच बसून राहिले. नंतर दोन मिनिटांनी रिक्षातून एकनाथ उतरताना दिसला. तो पूर्णपणे घामाने थिजलेला होता. त्याचा एक गाल लालसर सुजला होता. हाताने गाल दाबत तो बॉबीच्या ऑफिससमोर आला. बॉबीला त्याच्या सुजलेल्या गालाची कहाणी न सांगता कळली होती.

रावत एकदम गडबडीत उठले आणि बाजूला असलेल्या हेअर कटींग सलूनमध्ये घुसले. जीपमधून एक हवालदार उतरून त्या सलूनच्या बाहेर उभा राहिला. रावतांनी बॉबी, जयेशभाई आणि एकनाथला आवाज दिला आणि सलूनमध्ये यायला सांगितले. एअर कंडीशन वातावरणामध्ये ते एका खुर्चीवर जाऊन बसले. सलूनवाल्याने न सांगता स्पेशल दाढीची तयारी सुरु केली. रावतांनी हातातले घड्याळ आणि अंगठी समोर काढून ठेवली. युनिफॉर्मच्या शर्टाची दोन बटणे काढून, त्या खुर्चीत निवांत बसले. सलूनमध्ये अजून दोन कारागीर होते, जे टीव्ही बघण्यात मग्न होते. रावतांना समोरच्या आरश्यात मागे उभ्या असलेल्या तिघांचे चेहरे साफ दिसत होते. दाढीचा एक हात मारून झाला.रावत काहीच बोलले नाही. एव्हाना मागे उभ्या असलेल्या ह्या तिघांची चुळबूळ सुरु झाली. एकनाथने धीर एकवटून विचारले, “साहेब, मी बाहेर थांबू का? मला एसी चालत नाही. लगेच सर्दी होते” रावतांनी समोरच्या आरश्यात काहीसे नाराजीने बघितले, आणि त्यांची आणि एकनाथची नजरानजर झाली. एकनाथ काय समजायचं ते समजला.

दाढी करणाऱ्या पोरालामध्येच थांबवून, रावत मागे वळले, “मग जयेशभाई, तुमची गाडी मिळाली. एकदम सुखरूप. गाडीवर एक साधा ओरखडादेखील नाही. खुश नं?” जयेशभाई तडक पुढे झाले आणि रावतांशी हात मिळवत म्हणाले, ” खूप उपकार झाले, बहोत बहोत शुक्रिया. पर गाडी मिली कहां पें. खुनी पकडे गयें?” रावत नुसते हसले, “मानेने होकार देत, परत दाढी करायला बसले” त्या पोराने तोंडाला फेस लावला आणि वस्तरा घेऊन दाढी सुरु केली. दाढीनंतर आपल्या तुळतुळीत चेहऱ्यावर हात फिरवत त्यांनी पोराला दाढीचे पैसे दिले. आता ते जयेशभाईकडे वळले आणि बोलू लागले..

“मी मुंबईला कालच आलो. जेव्हा आलो तेव्हा तडक एकनाथचं ऑफिस गाठलं. निव्वळ पैश्यासाठी धंदा करणारा हा मनुष्य, त्यामुळे त्याला जिथून फोन आला, त्या नंबर व्यतिरिक्त मला काही सापडले नाही. पण एकनाथने गुन्हा केला होता आणि त्याची त्याला काहीतरी शिक्षा मिळायला हवी म्हणून त्याला पोलिसी हिसका दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, दोन दिवसांपूर्वी अशीच एक गाडी गोराईइथून मिसिंग आहे. हंपीला जातो म्हणून ती गाडी भाड्याने घेतली गेली, पण ती निर्वाचित स्थळी कधी पोचलीच नाही. गाडीची अजून काही माहिती नाही, आणि ड्रायव्हरशी काही संपर्क होत नाही. परवा रात्री त्याने शेवटचा फोन केला… बस्स्स !!! शेवटच्या फोनवरून आठवलं की अरुणने रात्री झोपताना आणि सकाळी निघताना जयेशभाईंना फोन केला होता. त्या फोन रेकोर्डच्या आधारे, जवळ असलेल्या मोबाईल टॉवरमधून कनेक्ट झालेले सगळे फोन आम्ही तपासले. जवळजवळ ७४० फोन नंबर्स आम्हाला मिळाले. सर्वांचा अभ्यास सुरु झाला. प्रत्येक नंबरचा मालक कोण, मालकाची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही ते तपासले. ७४० फोन्स मधून आम्ही ५ संशयित नंबर बाजूला काढले. ४ फोन्स मध्यप्रदेशातले आणि एक मुंबई इथला. फोन रेकॉर्डिंग मिळणे अशक्य असल्याने, आम्ही परस्पर त्या मोबाईलच्या पुढच्या हालचालींवर काही दिवस नजर ठेवून राहिलो.”

“बाकी जरावेळाने सांगतो, पण आधी गाडी कशी मिळाली ते सांगतो. मध्यप्रदेश कोर्टात जेव्हा तपासाची एक कॉपी द्यायला गेलो. तेव्हा कोर्टाच्या आवारात गाडीतच बसून मी आणि माझे सहकारी चहा पीत बसलो. इतक्यात माझ्या गाडीसमोर एक कोरी करकरीत ईनोव्हा येऊन थांबली. नेहमीप्रमाणे माझी संशयी नजर गाडीवरून फिरली. गाडीला MP ची पिवळी नंबर प्लेट होती, त्यामुळे ही ती गाडी नाही म्हणून मी चहा पिऊ लागलो. अचानक काही तरी ओळखीचं बघितल्यासारखं मी गाडीकडे बघितलं. गाडीच्या मागच्या काचेवर एका कोपऱ्यात हनुमानाचा फोटो होता आणि फोटोखाली गुजरातीत लिहिलं होतं जय बजरंग बली !!”

“गाडीच्या ड्रायव्हरकडे चौकशी केल्यावर कळले, की मध्यप्रदेशातले नावाजलेले वकील रामप्रकाश गुप्ता यांची ती गाडी आहे आणि दहा दिवसांपूर्वीच विकत घेतली आहे. रावतांनी गाडीचे पेपर बघितले आणि ते बरोबर होते. हे पेपर बनवणे किती सोप्पं आहे, हेही ते ओळखून होते. गाडीचा मालक वकील असल्याने मी तिथे जास्त चौकशी केली नाही” कोर्टाचे काम संपल्यावर वकील आपल्या गाडीत बसून निघाले आणि मागोमाग आम्ही निघालो. एका निर्जन रस्त्यात त्यांना गाठून वकिलांची पोलिसीतऱ्हेने चौकशी केली आणि त्यात तो वकील भडाभडा ओकला. त्याला स्वतःची बदनामी करायची नव्हती, त्यामुळे त्याने ती गाडी कुठून घेतली वगैरे सांगितले आणि एका तासात आम्ही त्या तिघांपैकी एकाला पकडला आणि बाकी दोघे पळून जाण्यात यशस्वी ठवले. त्या तिघांनी ही गाडी ७ लाखांना विकली होती. गाडी चोरल्यावर पाच दिवसात गाडीचे पेपर बनवून तिचे MP पासिंग करून, ट्रान्सपोर्ट परमिट घेतले होते. वकील साहेबांचे जितके चांगले संबध चांगल्या लोकांशी तितकेच चांगले संबंध गुन्हेगार लोकांशी होते. त्या वकिलाकडून कोऱ्या कागदावर सही आणि शिक्का घेऊन त्याला गाडी हवाली करायला सांगितली. वकिलाच्या माहितीनुसार ज्याला पकडला तो याक्षणी बाहेर गाडीत बसून आहे.”

एकनाथ मध्येच त्यांना तोडत म्हणाला, “मग तो फोन त्यानेच केलेला का?”

रावते गालात हसले, “ज्याने फोन केला, त्या माणसाला गाडीची आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांची माहिती होती. कुठल्या गाफीलक्षणी आपण ती गाडी पळवून नेऊ शकू याचे त्यांनी विशेष प्लान्निंग केले होते. तुला ज्या नंबरवरून फोन आला गाडीसाठी, त्याचं नंबरवर रात्री आणि पहाटे असे एक एक फोन गाडीतून आले. ते फोन चारकोपमध्येच उचलले गेले अशी माहिती आम्हाला मोबाईल कंपनीने दिली. नंतर काही काळाने तो फोन बंद झाला आणि त्याच लोकेशनवर दुसरा फोन डिटेक्ट झाला तोच तो संशयित नंबर मुंबईचा. त्या टॉवरवर तो नंबर लोकेट झाला आणि गाडीतून त्या नंबरवर एक फोन केला गेला. सकाळी ८:३०ल देखील मध्यप्रदेशमधून त्या नंबरवर फोन केला गेला”

“मग तो नंबर कोणाचा??” एकनाथ उत्सुकतेने विचारू लागला..

“तो नंबर इथलाच, ह्या सलूनमधला. हाच तो पोरगा जो त्या टोळीला गाड्यांची माहिती देत होता. धंद्यात नवीन आहेत साले, कळत नाही कोणाशी पंगा घेतलाय त्यांनी.. थोड्याश्या पैश्याच्या मोबदल्यात नवीन गाड्यांची माहिती काढायची आणि मग ती त्या टोळीला कळवायची” हे ऐकताच बॉबीला धक्का मारून तो मुलगा पळून जाऊ लागला, पण बाहेर हवालदाराच्या काठीचा एक फटका बसल्यावर जागच्याजागी विव्हळत बसला.त्याने सगळा गुन्हा कबूल केला आणि २० हजाराच्या मोबदल्यात हे काम केल्याचे सांगितले. लवकर श्रीमंत व्हायची इच्छा हेच गुन्हा करण्यामागे मुख्य कारण होते.

इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आणि तिघेजण बाहेर आले. बाहेर बेड्या घातलेला तो तरुण हमसून रडत होता, आणि हात जोडून माफी मागत होता. रावतांनी त्याच्याकडे तुच्छतेने बघितले आणि शिवी हासडून म्हणाले, “भेट भडव्या पोलीस कोठडीत, नागवा करून ह्या बेल्ट ने फोडतो तुला” एव्हाना रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्याने, रावतांनी हवालदाराला इशारा केला आणि हवालदार पोराला जीपमध्ये कोंबून चारकोप पोलीस स्टेशनकडे भरधाव निघाले. रावतांनी बॉबी, जयेशभाईंचे आभार मानले. एकनाथच्या सुजलेल्या गालावर हलकेच चापटी मारत म्हणाले, “मी कधीतरी गाडी हवी म्हणून खोटा फोन करेन आणि जर तू आता केलेला प्रकार पुन्हा केलास, तर माझा हात आहे आणि तुझे गाल आहेत… समजल??” एकनाथने शरमेने होकारार्थी मान हलवली.

रावत पोलीस स्टेशनकडे निघता निघता मागे फिरले, “Bobee, Can I have one smoke?” बॉबीने संपूर्ण पाकीट त्यांना देऊ केले, “नको नको, एक पुरेशी आहे. नवीन बाबा झालोय. बायकोला कळलं तर माझ्या बाळाला मला जवळ घेऊ द्यायची नाही. सिगारेट सोडायची आहे. तू पण सोड…. चल Byeee”

!! समाप्त !!

तळटीप – ह्या सर्व प्रकारानंतर जयेशभाईंनी पनवती गाडी विकायची ठरवली आणि ती गाडी बॉबीने विकत घेतली. गाडी पळवणाऱ्या टोळ्यांना ही गाडी म्हणजे एक चपराक होती आणि त्याचा बदला म्हणून ह्या गाडीवर आजही विशेष पाळत असते. पण गाडी बॉबीच्या ताब्यात आहे आणि तो ती कुठल्याही अनोळखी लोकांना देत नाही. हल्लीच नाशिकला जाताना बॉबीकडे गाडी मागितल्यावर त्याने विश्वासाने ही गाडी मला दिली. तेव्हा मला भाग तीन आणि चारचा सविस्तर वृत्तांत राजूकडून कळला. तरी भाग तीन आणि चार हे बऱ्यापैकी काल्पनिक आहेत. आजही राजू दिमाखात आणि निर्धास्तपणे ती गाडी चालवतोय आणि चालवत राहील ह्यात शंका नाही….!!

— सुझे !! 🙂 🙂

रिझवान चाचा – भाग अंतिम

रिझवान चाचा – भाग पहिला

इम्रानचं ऑफिस सुरु झालं, चाचा आपलं पोरगा मार्गी लागला म्हणून खूप खुश असतात. जग्याकडे इम्रानचं कौतुक करताना, त्यांना शब्द सापडत नव्हते आणि जग्या डोळे भरून ते बघत होता. कितीतरी वर्षांनी स्वतःच्या पोरामुळे, ह्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला होता त्याने…

=================================================

होता होता ५ महिने झाले इम्रानचं ऑफिस सुरु होऊन, पण चाचा उदास होते. त्यांचा धंदा खूप कमी झाला होता, गिऱ्हाईक मिळेनासे झाले होते. त्यांना पैश्याची कमी नव्हती, पण पिढीजात धंदा बुडताना त्यांना बघवत नव्हता. काही झालं तरी ते वखार बंद करायच्या विरुद्ध होते. इम्रान गेली दोन वर्ष त्यांच्या मागे लागला होता, विकून टाका ही जागा बिल्डरला आणि इथे मोठा टॉवर बांधूया, पण नाही चाचांना ते मान्य नव्हते. त्यांना इम्रानचे ते शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते. रात्रीची झोप उडाली होती, दिवाळी एका दिवसांवर येऊन ठेपली होती. चाचा रात्रभर जागेच होते. शेवटी वैतागून ३-३:३०च्या सुमारास ते उठले आणि खोलीत फेऱ्या मारू लागले. सहज त्यांनी बाहेर डोकावलं. इम्रानच्या ऑफिसबाहेर खूप गर्दी दिसली. दोन मोठे टेंपो, चार-पाच गाड्या, २०-२५ माणसं असा लवाजमा होता. त्यांना वाटले आपण जाऊन बघुया काय झालं, पण पोरगा रागावेल म्हणून तिथेच खोलीत बघत उभे राहिले. इम्रान आणि प्रथमेश खूप घाईघाईने बोलत होते आणि त्या लोकांना काही तरी देऊन निघायला सांगत होते. चाचा विचार करत होते, इतक्या सकाळी सकाळी ही लोकं काय करतायत? पण कुठल्यातरी जागेवर काम करणारी मंडळी असतील म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, आणि आरामखुर्चीत शरीराला झोकून दिलं.

कळलंच नाही त्यांना की गाढ झोप कधी लागली ते, सकाळी जग्या त्यांना उठवायला आला.

“चाचा आज धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस. आज आणि उद्या धंदा बंद असेल. आईने पणत्या विकायला आणल्या आहेत. तिच्यासोबत जाईन मी मार्केटला. तेव्हढीच तिला मदत होईल माझी. तुमच्यासाठी हे चार दिवे आणले आहेत. संध्याकाळ झाली, की अंगणात लावा. लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी घरात येईल.”

चाचा – “तुझा खरंच विश्वास आहे यावर? मी विचार करतोय ही वखार कोणाला तरी चालवायला देऊ भाड्याने… ”

“विश्वास आहे आणि तुमचा पण बसेल. तुम्ही कोणाचं वाईट नाही नं केलं, तर देव पण तुमचं काही वाईट करणार नाही. वखारीला मागणी कमी आहे मान्य आहे, पण तुम्ही ती दुसऱ्याच्या हवाली करावी हे मला पटत नाही”

“ह्म्म्म्म, तुझा बाप पण हेच बोलायचा मला.. बिचारा लवकर सुटला. असो, जा तू…”

=================================================

संध्याकाळी सहाच्या सुमारास रिझवान चाचांचा एक कारागीर धावत पळत आला…

“मालिक ओ मालिsssक…. किधर हैं आप… मालिक..”

“क्या हुवा? मैं दिये जला रहा था… जग्या आयेगा तो मुझे दाटेगा… आज दीपावली हैं नं. तू बोल, क्या मुसिबत आयी तुझ पें?”

“मालिक, अल्ला का केहर हो गया.. पुरे शहर मैं धमाके हुये हैं..”

“या अल्लाह.. ये कैसे घडी हैं, आज तो त्योहार का दिन और ऐसी आपदा?”

“मालिक, हजारो जाने गयी और उसमें.. उसमें…”

“उसमें उसमें मैं क्या? ठीक सें बोल…. इम्रान ठीक हैं नं?”

“मालिक, इम्रान की तो कोई खबर नही, पर जगदीश अल्लाह को प्यारा हो गया.. उसने उसकी अम्मी को घर भेज दिया, आपको प्रशाद देने कें लिये.. और मार्केट मैं…:(”

(चाचा एकदम थंडगार पडतात) ” या अल्लाह… उस नन्ही जान का क्या कसूर था, मुझे उठा लिया होता” (रडत रडत छाती बडवायला लागतात..)

“मालिक.. मालिक संभालो अपने आप को… आपको खुदा का वास्ता”

“किस खुदा का वास्ता दे रहे हो, जो मेरे बेटे जैसे जग्या को मुझसे दूर ले गया…नफरत हैं उसासे मुझे, नफरत हैं..”

=================================================

त्यादिवशी रात्री रिझवान चाचांचा डोळ्याला डोळा लागला नाही, इम्रान मित्राकडे थांबतोय म्हणून फोन आला होता बस्स. चाचा एकटेच आपल्या खोलीत आरामखुर्चीत बसून, छताकडे टक लावून बघत होते. त्यांची नजर शून्यात हरवली होती. त्यांना वाटलं एक मस्त ग्लास दारू पिऊन नशेत हरवून जाऊ, पण जग्याला ते आवडतं नसे म्हणून त्यांनी बाटली तशीच ठेवून दिली. काय करावे त्यांना सुचत नव्हते. रोज तो पोरगा सकाळ-संध्याकाळ त्यांच्या घरात हक्काने फिरत असे, काय हवं काय नको ते बघत असे. आज तो आपल्यात नाही, कसं पचवणार हे. त्याच्या आईने कोणाकडे बघावं. तिचं तर कोणीच नाही या जगात. विचार करून करून त्याचं डोकं भणभणायला लागलं. त्यांनी झोपेची गोळी घेतली आणि खुर्चीत पडून राहिले. सकाळी ९ च्या आसपास त्यांना जाग आली. इम्रान कोणाशी तरी फोनवर बोलत होता. चाचांनी इम्रानला आपल्याकडे बोलावले…

“बेटा, तुला माहित आहे का, आपलं जग्या आता ह्या जगात नाही. कालपरवापर्यंत घरभर फिरणारी ती पावलं परत दिसणार नाहीत”

“पता हैं अब्बा, मोहसीन ने बताया. बहोत बुरा हुआ..”

“त्याच्या मर्जीसमोर कोणाचं काही चालत नाही… अच्छा हुआ तुने फोन कर दिया. मुझे बहोत फिक्र हो रही थी, पर तू कहां था इतने देर?”

“अब्बा, मित्राकडे होतो माहीमला, नवीन जागेच काम बघायला गेलो होतो आणि मग हे असं झालं, मित्राकडेच थांबलो रात्री”

“अच्छा…”

“खूप लोकं गेली, अल्लाह उन्हे जन्नत बक्शे, चलो अब्बा बहोत काम पडा हैं”

“अरे आज तो जग्या के घर चल…”

“अब्बा, तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार. एक तर आता कुठे धंद्यात जोम बसतोय आणि तुम्ही…”

“ठीक आहे…ठीक आहे… जा तू”

=================================================

रिझवान चाचा जग्याच्या आईचे सांत्वन करून घरी येत असताना, ५-६ लोकं आपल्या घरात शिरताना दिसतात. ते लगबगीने घरात जातात. इम्रानच्या ऑफिसमधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत असतो. दोन जाडसर लोकं साहेब लोकं, इम्रानची पाठ थोपटत असतात. रिझवान चाचांना आपल्या मुलाचा गर्व वाटतो, लेकाने नक्कीच मोठं काम केलंय. म्हणून तर ही साहेब मंडळी घरी आली आहेत त्याचं कौतुक करायला. ते त्याचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करतात.

तो साहेब म्हणत असतो,”इम्रान तुने बहोत बेखुबी सें अपना काम किया हैं. अल्लाह ताला तुम्हे बहोत तरक्की दे.”

“क्यों शरमिंदा कर रहे हो साब, सब आपकी वजह से तो हुआ हैं.”

“खुश रहो… मैने सुना तुम्हारा कोई नजदिकी रिश्तेदार गुजर गया इस ब्लास्ट मैं..”

“नही नही..कोई नही.. अब्बा का एक नौकर मर गया इसमें”

“अच्छा… ठीक हैं. जनरल तुम्हारे काम सें बहोत खुश हैं. तुम्हे इनाम मैं ये दस करोड रुपये भेजे हैं.” (एक मोठी बॅग इम्रानकडे सरकवतो, इम्रान हात मिळवतो)

इकडे रिझवान चाचांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, आपल्या पोराने इतक्या लोकांचे जीव घेतले आणि त्याला त्याचे काहीही वाटत नाही. तो बेशरमपणे फिरतोय जगभर. स्वतःची कीव वाटली त्यांना. काय करावं सुचत नव्हते. कोणा एका माणसाचे आयुष्य संपवण्याचा अधिकार देवाने आपल्याला कधी दिला? धर्माच्या नावाखाली लोकं राजकारण करून मोकळे होतात, पण त्याचे परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागतात. काय करायचं अश्या धर्माचं? आपल्या खोलीत डोक्याला हात लावून बसले होते. डोकं बधीर झालं होत, आपल्या संस्कारात काय कमी पडलं आणि अशी औलाद निपजली आपल्या पोटी असा अल्लाहला वास्ता देत होते. राहून राहून त्यांना जग्याच्या प्रेताजवळ धायमोकलून रडणारी ती आई दिसतं होती. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा थांबायचं नावं घेत नव्हत्या. मध्यरात्री उशिरा गपचूप ते जग्याच्या घराजवळ गेले आणि तिथे एका बॅगेत आपली आजवरची मिळकत ठेवली. माहित होत त्यांना ह्याने जग्या परत येणार नाही, पण… पण त्या मातेला कोणासमोर हात पसरायला लागू नये म्हणून त्यांनी …. तिथे ओसरीवर शांत बसले थोडावेळ, तिथून जग्याची चहाची टपरी दिसत होती. एकदम गिऱ्हाइकांची गर्दी सांभाळणारा जग्या डोळ्यासमोर आला. त्यांनी डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि घराकडे चालू लागले. इम्रानच्या ऑफिसमध्ये जोरजोरात गाणी सुरु असल्याचा आवाज आला.

चाचा आत डोकावून बघतात, इम्रान नशेत एकदम टून् झालेला असतो. बोलता येत नव्हती, पण गाणी बोलायचा प्रयत्न करत होता. त्याचं असं हे रूप बघून चाचांना राहावलं नाही, त्यांच्या डोळ्यात रागाने रक्त साकळलं होतं. क्षणात त्यांनी बाजूला पडलेली लोखंडाची शीग उचलली आणि त्याच्या डोक्यात मारली.

“मर साल्या मर… तुला ह्या दिवसासाठी नव्हता मोठ्ठा केला… तुझी अम्मी वर रडत असेल. का केलंस तू असं? काय मिळालं तुला हकनाक लोकांना मारून?”

(इम्रान वेदनेने कळवळत होता) “अब्बा, मुझे अस्पताल ले चलो. आप की कुछ गलतफैमी हुयी है. हमें बहोत पैसा मिलेगा. हम अमीर होंगे.. मैं आप को सब बताता हुं.. मुझे ले चलो.. अ ssss ब्बा”

“या अल्लाह, क्या करुं इस पापी का. अब भी इसे अपने गलती का एहसास नही हो रहा”

असं बोलून त्यांनी जोरदार घाव घातला आणि इम्रानचा देह शांत झाला. ते लहान मुलासारखे रडत बाहेर आले. आपल्या वखारीवर नजर फिरवली, आजवर बापदाद्यांनी केलेली मेहनत त्यांच्या समोर होती.. त्यांनी किचनमधून एक कॅनभरून रॉकेल आणलं आणि वखारीच्या लाकडाच्या ढिगांवर रितं केलं. काडीपेटी पेटवून, त्या ढिगावर फेकली. संपूर्ण वखार सुं सुं सुं करत पेटली, त्या आगीच्या प्रकाशात चाचांचा चेहरा शांत भासत होता. ते शांतपणे आपल्या खोलीत गेले, आणि स्वतःला गळफास लावून आपले जीवन संपवले…

एका आईच्या मुलाच्या हत्तेचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं…एका आईच्या मुलाच्या हत्तेचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं !! 😦 😦

=================================================

– समाप्त –

पूर्वप्रकाशित मोगरा फुलला दिवाळी अंक २०११

– सुझे !!!