प्रोजेक्ट शेड बॉल्स…

गेल्या दहा वर्षात पर्जन्यमानाची वाढती अनियमितता हा सर्वच प्रगतिशील देशांसाठी मोठा प्रश्न ठरलेला आहे. अगदी आपल्याकडचेच उदाहरण घ्यायचे तर, गेल्या वर्षी महाराष्ट्रात जवळपास ३५-४०% कमी पर्जन्यमान झाल्याने भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, ह्याउलट चेन्नई तामिळनाडू भागात पर्जन्याचे प्रमाणे २०-२५% ने वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण शहर १०-१२ दिवस पाण्याखाली गेले. जगभरातील विविध देशांमध्ये अशीच अवस्था बघायला मिळतेय आणि ह्या बदलत्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.

सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला आजवरच्या सर्वात वाईट दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत येथील पावसाचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याने, पाणीसाठे, जलस्रोत आणि जमिनीतील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत जात आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या कॅलिफोर्नियाच्या एकूण पाण्याच्या वापरानुसार ६० टक्के पाणी हे विहिरी, बोअर्स वगैरे तत्सम जमिनीतील स्रोतांवर आणि ४० टक्के पाऊस/बर्फवृष्टी यावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण असेच घटत गेल्यास परिस्थिती अधिकच भयंकर होईल ह्यात शंका नाही. जिथे आधी ३००-३५० फुटावर पाणी उपलब्ध व्हायचे, तिथे १५०० फूट खोल विहिरी खणून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारतर्फे विहिरी खोदण्यासाठी सक्त बंदी केली गेली आहे आणि समजा तुम्हाला परवानगी मिळाली असल्यास त्याचा सध्याचा खर्च जवळपास $३००,००० इतका प्रचंड आहे. नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सने दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण अमेरिकेतील जमिनीतील पाण्याची पातळी २००४ ते २०१३मध्ये अक्षरशः निम्म्यावर आली आहे आणि नैसर्गिक पावसाचे प्रमाण असेच कमी होत गेल्यास २०२०पर्यंत ही पातळी ३५ टक्के आणि २०४० पर्यंत ७-५ टक्के इतकी कमी होऊ शकते. परिस्थिती इतकी गंभीर झाल्यानेच, आहे ते पाणी वाचवणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करता येणे हा एकच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. गेली काही वर्षे त्यावर बरेच संशोधन सुरू होते.

त्यामधल्या एका संशोधनाचा प्रत्यक्ष प्रयोग ११ ऑगस्ट २०१५ रोजी स्थानिक पालिकेकडून राबवला गेला. त्यांनी लॉस एंजलीस ह्या कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठ्या आणि अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या शहरात असलेल्या मुख्य जलस्रोतावर अक्षरशः एक भलीमोठी चादर अंथरली. त्यानंतर सगळीकडे त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. अनेकांनी ह्या प्रयोगावर टीकेची प्रचंड झोड उडवली, तर अनेकांनी त्याचे भरभरून समर्थन केले. त्या प्रयोगाचे नेमके उद्दिष्ट, त्यामुळे होणारे फायदे-नुकसान, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि महत्त्वाच्या इतर घडामोडींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ह्या वादात (?) सापडलेल्या प्रयोगाचे नाव ‘प्रोजेक्ट शेड बॉल्स’.

.
वर दिलेला फोटो हा लॉस एंजलीस शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलाशयचा आहे. ह्या जलाशयातूनच शहराची पाण्याची तहान भागवली जाते. त्यावर आपण जो काळा छोट्या छोट्या चेंडूंचा थर बघतोय, तीच ती भलीमोठी चादर. त्या काळ्या चेंडूना शेड बॉल्स (Shade Balls) म्हटले जाते. ह्याक्षणी १७५ एकरावर पसरलेल्या जलाशयाचा पृष्ठभाग ९,८०,००,००० शेड बॉल्सने आच्छादलेला आहे. दुरून बघताना संपूर्ण जलाशयावर एक भलीमोठी चादर अंथरल्याचा भास निर्माण होतो.

शेड बॉल्सची पार्श्वभूमी :-

शेड बॉल्सचे जनक म्हणजे लॉस एंजलीस डिपार्टमेंट ऑफ वॉटर अँड पॉवरमधून हल्लीच निवृत्त झालेले जीवशास्त्रज्ञ डॉ. ब्रायन व्हाईट. डॉ. व्हाईट ह्यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या हवाई दलाच्या ठिकाणी असलेल्या छोट्या पाण्याच्या स्रोतांवर बॉल्सचे आवरण पसरवून, २००३ साली ह्याची यशस्वी चाचणी केली होती. त्या वेळी हवाई तळाजवळ असलेल्या जलाशयांवर पक्षी बसू नये यासाठी ह्या बॉल्सचा उपयोग केला जायचा. त्यामुळेच त्यांना ‘बर्ड बॉल्स’ असे संबोधले जायचे. हवाई तळावर सतत विमानांची ये-जा सुरू असते आणि फायटर विमानांचा कर्णकर्कश आवाज ऐकून पक्ष्यांचे थवे सैरावैरा उडून ते विमानांना आपटून दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असायची. यासाठी सर्वप्रथम फेअरचाईल्ड ह्या हवाई तळावर ह्या बर्ड बॉल्सचा यशस्वी वापर केला गेला आणि मग अमेरिकेत सैनिकी क्षेत्रांसाठी सगळीकडे हेच तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले.

शहरी भागात शेड बॉल्सचा उपयोग :-

विविध हवाई तळांच्या यशस्वी चाचणीनंतर शहरी भागातील जलाशयांवर ह्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल यावर संशोधन सुरू होतेच. २००४ पासून कॅलिफोर्नियामधील पावसाचे प्रमाण लक्षणीय घटल्याने, जलाशयांमध्ये साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यावर बुरशीची किंवा तत्सम एकपेशीय वनस्पतींची वाढ होऊ नये, पाण्यातील क्लोरीन आणि सूर्यप्रकाश यांची एकत्रितपणे ब्रोमेटसारखी रासायनिक प्रक्रिया होऊ नये यासाठी ह्या शेड बॉल्सचा वापर करता येईल, असा निष्कर्ष निघाला. शेड बॉल्सच्या आवरणाखाली पाणी सुरक्षित राहील आणि सूर्यकिरणांचा थेट पाण्याशी संपर्क न होता पाण्याचे तापमान कमी राहील, ह्या अनुषंगाने त्याची चाचणी करण्याचे ठरवले गेले. सन २००८ ते २०१२मध्ये हेच तंत्रज्ञान, थोडे बदल करून शहरी भागातील पाण्याच्या स्रोतांवर प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात झाली. त्यात लॉस एंजलीसमधील आयव्हनहो, एलिसिअन, अप्पर स्टोन कॅनियन ह्या जलाशयांवर शेड बॉल्स वापरण्यात आले. २००८ मध्ये सर्वप्रथम आयव्हनहोमध्ये ३,०००,००० शेड बॉल्स वापरल्यावर एका वर्षाने तेथील परिस्थिती खाली दिलेल्या प्र.चि. २मध्ये बघता येईल आणि पाण्याचे तापमानदेखील खूप कमी झाल्याचेसुद्धा डॉ. ब्रायन ह्यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर लगेच २००९ मध्ये एलिसिअन आणि २०१२ मध्ये अप्पर स्टोन कॅनियन जलाशय शेड बॉल्सने भरून गेले. ह्या तिन्ही जलाशयांमध्ये वापरलेले शेड बॉल्स नजीकच्या काळात बदलून, नव्या पद्धतीचे शेड बॉल्स वापरले जाण्याची शक्यता आहे.

.
शेड बॉल्स – तांत्रिक माहिती आणि त्याचे फायदे :-

– शेड बॉल्सचा व्यास ४ इंच इतका आहे. हे बॉल्स वेगवेगळ्या आकारात, मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर उपलब्ध आहेत.
– ते पूर्णपणे प्लास्टिकचे बनलेले आहेत. यासाठी खास पॉलिइथिलीन प्लास्टिक वापरले गेले आहे, जे किमान १० वर्ष तरी आरामात टिकेल असा अंदाज आहे. ह्या प्लास्टिकला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही किंवा त्यातून पाण्यात कुठली रासायनिक प्रक्रिया घडत नाही. खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठीसुद्धा पॉलिइथिलीन वापरले जाते. प्रत्येक प्लास्टिक बॉल शास्त्रीय पद्धतीने बंद केला आहे. दहा वर्षांनी किंवा बॉल्स फुटल्यावर त्या बॉल्सवर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्याजोगे करता येईल. बॉल्स बनवणार्‍या कंपन्यांनी ह्या बॉल्सचे आयुष्य साधारण २५ वर्ष असेल असा दावा केला आहे.
– एका बॉलचे वजन साधारण २४५ ग्राम इतके आहे. बॉलच्या आतील पोकळ भागात पाणी आणि हवा समप्रमाणात भरलेले आहेत, जेणेकरून ते पाण्यात बुडू नयेत किंवा हवेसोबत उडून जाऊ नयेत.
– काळा रंग शास्त्रीयदृष्ट्या अधिक परिणामकारक असल्याने निवडला गेला आहे. ह्या रंगामुळे प्लास्टिक कंपाउंडचे जीवनमान सगळ्यात जास्त बनते. तसेच काळ्या रंगामुळे पाण्याचे तापमान वाढणार नाही आणि रेडिएशन पाण्यापर्यंत पोहोचून रासायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता शून्य होते.
– प्लास्टिक उष्णता दुर्वाहक असल्याने, सूर्यप्रकाशाची उष्णता पाण्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन ९०% कमी होऊन, सध्या वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत लॉस एंजलीसमध्ये होणार आहे. हे पाणी साधारण ८,१०० लोकवस्तीला चार आठवडे पुरेल इतके आहे.
– ह्या बॉल्सचा वितळण बिंदू साधारण १२०°-१८०° सेल्सिअस असल्याने, वाढत्या तापमानाचा त्यावर परिणाम होणार नाही, याची शाश्वती डॉ. व्हाईट ह्यांनी दिली आहे.
– शेड बॉल्स तुलनेने स्वस्त (०.३६¢ प्रती बॉल) असल्याने, त्याच्या वापरावर आणि प्रयोगांवर मर्यादा सध्यातरी नाहीत.
– या घडीला XavierC, Artisan Screen Process, Orange Products ह्या तीन मुख्य कंपन्या आहेत, ज्यांनी आजवर हे प्रोजेक्ट शेड बॉल्स हाताळलेले आहे. अमेरिकेत झालेल्या प्रयोगानंतर जगभरातून ग्राहक मिळवण्यात ते यशस्वी होतीलच किंवा एव्हाना झाले असतीलच. नजीकच्या काळात स्पर्धा वाढल्याने जगभरातले मोठ्ठे बिझनेस टायकून्स, ह्या शेड बॉल्स निर्मितीमध्ये उतरणार हे वेगळे सांगणे न लगे.

शेड बॉल्सवर होणारी टीका :-

ह्या प्रयोगावर होणारी मुख्य टीका म्हणजे बाष्पीभवन थांबवण्यासाठी शेड बॉल्सचा केलेला खर्च आणि जे पाणी बाष्पीभवन होते त्याचे बाजारमूल्य. म्हणजे समजा एलएमध्ये शेड बॉल्ससाठी जवळपास ३४.५ मिलियन डॉलर इतका खर्च झाला. हे शेड बॉल्स बाष्पीभवन रोखून वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत करणार आहेत. ह्या ३०० मिलियन गॅलन्स पाण्याचे बाजारमूल्य जवळपास २ मिलियन डॉलर आहे. कंपन्यांनी जरी हा दावा केला, की ते २५ वर्ष सहज टिकतील, तरी शेड बॉल्स दर दहा वर्षांनी बदलावे लागले, तर १० वर्षात फक्त २० मिलियन डॉलर्स किमतीच्या पाण्याची बचत होणार, मग पुन्हा ३४.५ मिलियन डॉलर्सचा खर्च. सरकारने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी पिण्याच्या पाण्यात तरंगते प्लास्टिक आणि त्याचा पाण्याशी कुठलाच रासायनिक परिणाम होत नाही यावर काही लोकांचा विश्वास बसत नाही आहे आणि ते सोशल मीडियावर रोज त्याबद्दल लिहीत आहेत. यावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे काही कंपन्यांना आणि त्या कंपन्यांद्वारे सरकारी यंत्रणेला मुद्दाम फायदा पोहोचवण्यासाठी ही योजना अमलात आणली गेल्याचा. याआधी ३ जलाशयांवर हा प्रयोग केला गेला, पण त्याची इतकी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी कधीच केली गेली नाही.

ह्या प्रयोगाचे भविष्यकाळच ठरवेल, परंतु अशी काटकसर करण्याची वेळ आपणच आपल्यावर आणली आहे, ह्यावर कोणाचेही दुमत नसेल. सिमेंटच्या जंगलात राहून कामातून मुद्दाम वेळ काढून, कुठे जंगलात एक-दोन दिवस काढण्यात कसली आली आहे धन्यता? आपणच निसर्ग इतका दूर नेऊन ठेवला आहे की, तो अनुभवावा लागतो मुद्दाम वेळ काढून. प्रगतिशील होण्यासाठी अवलंबलेल्या मार्गांमध्ये आपण निसर्गाचा अक्षरशः बळी दिला आहे. त्यामुळे निसर्ग कोपतो, पाऊस पडत नाही, जास्तच पडतो अशा तक्रारी करण्यास आपण पात्र नाही. आता शक्य तितका प्रयत्न करून निसर्गाची हानी थोड्या प्रमाणात का होईना भरून काढणे हेच आपल्या हातात उरले आहे.

डॉ. व्हाईट आणि त्यांनी केलेले हे संशोधन निश्चितच एक मैलाचा दगड ठरलेला आहे, पण अजून भलामोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आशा आहे की ह्या आणि अशा अनेक प्रयोगांद्वारे कमीतकमी किमतींमध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे पाणी वाचवण्याची यंत्रणा जगभर उपलब्ध व्हावी. सगळीकडे पर्जन्यमान व्यवस्थित व्हावे. त्यापरीस सजीव सृष्टींच्या अस्तित्वाबद्दल एकूणच निसर्गाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन, त्याची अधिक हानी न होऊ देण्याची बुद्धी सगळ्यांना मिळो ही माफक अपेक्षा.

धन्यवाद !!

~ सुझे 🙂

———————————
-: लेखाचे संदर्भ :-
१. LADWP Newsroom – Shade Balls FAQ
२. National Geographic
३. Wikipedia
४. Time.com
५. Grist.org
६. Bloomberg.com

———————————

पूर्वप्रकाशितमिपा विज्ञान लेखमाला

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५

बोर्डरूम ड्रामा…

हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात. त्याही एक ते दोन दिवसात. हे क्षेत्र दिवसेंदिवस आपल्या कक्षा विलक्षण रुंदावत आहे आणि त्यातून होणारी रोजगार निर्मितीही अनेक तरुणांना आकर्षित करत आहे.

ह्याच तंत्रज्ञानाचा वापर पुढे घरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्याप्रमाणांवर केला जाऊ लागला. भारतातील रिअल इस्टेटचा भाव जसा चढत्या दिशेने वधारू लागला, तसा मोठमोठ्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या आणि आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ह्या क्षेत्रात  www.99acres.comwww.magicbricks.com, www.indiaproperty.com,  www.makaan.comwww.commonfloor.com  अश्या कंपन्या नावाजलेल्या होत्या. त्यांनी आपला एक ठसा विशिष्ट ग्राहकांवर उमटवला होता. त्यासाठी निव्वळ हटके मार्केटिंग कँम्पेन्स वापरात येत गेल्या आणि त्यासाठी देशी-विदेशातल्या मार्केटिंग कंपन्यांना टेंडर्स देण्यात आले. साधारण ह्या वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्यात अचानक एका कंपनीच्या जाहिराती झळकू लागल्या. जिकडे पाहावे तिकडे भडक रंगसंगतीचे बॅनर्स, त्यावर एक वरच्या दिशेला निदर्शित करणारा बाण आणि सोबत फक्त एक हॅशटॅग #lookup

Housing.com

 

त्यानंतर काही दिवसांनी Housing.com अशी कंपनीची ओळख करून देण्यात आली आणि रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये अजून एका ब्रँडची भर पडली.  राहुल यादव आणि त्याच्या मित्रांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरु केली होती. एकदम गाजावाजा करत ह्या ऑनलाईन रिअल इस्टेट कंपनीने पहिली मोठी उडी घेतली आणि सर्वांना अवाक केले. त्यानंतर काही महिन्यातच त्यांचे अंतर्गत कलह, विरोधकांशी झालेले वादविवाद सोशल मिडियावर उघडे पडले. त्याची चर्चा वृत्तपत्रांमधून, बातम्यांमधून, शेअर बाजारात चर्चिल्या जाऊ लागल्या. ह्या सर्वाचा हाऊसिंग.कॉमवर, रिअल इस्टेट मार्केटवर आणि प्रतिस्पर्ध्यांवर झालेला परिणाम म्हणजेच हा बोर्डरूम ड्रामा.

 

  • राहुल यादव – नाम तो सुना ही होगा. काही महिने हे नाव रोज पेपरात यायचे. मुख्यत्वे टाईम्स ग्रुप्सच्या पेपरांमध्ये. आता टाईम्स ग्रुपच का? ते बघूच पुढे…. सुरुवातीला राहुलची ओळख करून घेऊ. राहुल यादव हाऊसिंग डॉट कॉमचा पहिला सीईओ. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ही संकल्पना तयार केली. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत राजस्थानतून पहिला आल्यावर, सरकारतर्फे पुढील शिक्षणासाठी ७५ टक्के खर्च स्कॉलरशिप म्हणून त्याला मिळाला. तो हुशार आणि चुणचुणीत होताच. शैक्षणिक दरमजल करत तो २००७ मध्ये आयआयटी मुंबईत (IITB) मध्ये दाखल झाला. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम त्याने http://exambaba.com/ नावाची वेबसाईट सुरु केली. ज्यावर आयआयटीचे सर्व जुने पेपर्स आणि त्यांचे सोल्युशन्स, तिथे शिकणाऱ्या मुलांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्याचे प्रचंड कौतुक झाले. २०११ मध्ये त्याने आयआयटीमधले आपले शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडला स्वतःचे असे काही सुरु करण्यासाठी.

 

Rahul Yadav

 

 

  • त्या काळात आयआयटीच्या परिसरात घर घेणे, जेणेकरून तिथे येणे जाणे सोप्पे होईल म्हणून त्याने तो शोध सुरु केला. प्रचंड कष्ट केल्यावर त्याला हवेतसे घर मिळाले, पण आपल्याला एक शोधायला किती त्रास झाला, ह्या संकल्पनेतूनच Housing.com चा जन्म झाला. जो त्याने ऑगस्ट २०१२ मध्ये आपल्या ११ मित्रांच्या सहाय्याने पूर्णत्वास नेला. त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते पोर्टल तयार केले आणि मग शोध सुरु झाला इन्व्हेस्टर्सचा. कारण पैश्याशिवाय त्या पोर्टलला सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचण्यात प्रचंड अडचणी येणार होत्या.
  • राहुलसह सर्व मित्रांनी मार्केट पालथे घालण्यास सुरुवात केली. आपाल्या प्रोडक्टचे प्रेझेन्टेशन निरनिराळ्या कंपन्यांना ते देऊ लागले आणि त्यांना यश मिळाले फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये एंजल इन्व्हेस्टर्स, फ्युचर बाजारचे झिशान हयात आणि नेटवर्क १८ चे हरेश चावला, ह्यांनी मोठी रक्कम हाऊसिंगमध्ये गुंतवली. ह्या पैश्यातूनच हाऊसिंगचे पुणे, हैद्राबाद आणि गुरगावमध्ये यशस्वीपणे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यातच नेक्सस वेंचर पार्टनर्स ह्यांनी १५.९ करोड आणि हेलीओन वेंचर्स-क्वाल्कोम वेंचर्स पार्टनर्स, ह्यांनी तब्बल ११५ करोड हाऊसिंगमध्ये गुंतवले.

 

  • १५ डिसेंबर २०१४ ला जपानच्या सॉफ्टबँक कॅपिटलने $90 मिलियन (५७२ करोड) इतकी प्रचंड मोठी रक्कम Housing मध्ये गुंतवून, कंपनीला पैश्यांचा भक्कम असा पाठींबा जाहीर केला. भारतासोबत संपूर्ण आशियातील ग्राहकांना हाऊसिंगकडे आकर्षित करण्याचा त्यांचा मानस होता. ह्याच पैश्याच्या जोरावर देशभरातील आयआयटीयन्सला हाऊसिंगमध्ये नोकरी देऊन त्यांनी आपली टीम वाढवली आणि मार्चमध्ये देशातल्या ७ शहरात जाहिरातींचा अक्षरशः पाऊस पाडला.
  • इतक्या झपाट्याने वाढ होत असताना, प्रतिस्पर्धी कंपन्या शांत बसणे शक्यच नव्हते. त्यांनी हाऊसिंगचे इंजिनियर्स फोडण्याचा प्रयत्न केला, त्याला राहुल ने सोशल मिडियावर जाहीरपणे उत्तर देऊन शिवीगाळ केली. त्याचवेळी टाईम्स ग्रुपच्या एकॉनॉमिक्स टाईम्सनेcom चे इन्व्हेस्टर्स राहुलला काढून टाकण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी दिली. राहुलने आणि हाऊसिंगने त्वरित त्या वृत्ताचा इन्कार केला आणि राहुल यादवने कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांना एक ईमेल पाठवला आणि तो ईमेल सोशल मिडियावर लिक केला गेला.

 

rahul Vs times

 

  • आता टाईम्सचा हाऊसिंगमध्ये इतका इंटरेस्ट का याचे करणार कळले असेलच. ह्या ईमेल प्रकारानंतर हाऊसिंगवर टाईम्सने १०० करोडची कायदेशीर नोटीस बजावली. कंपनीची बदनामी केल्याबद्दल.
  • ही नोटीस आल्यावर राहुल यादव भडकला आणि त्यांनी अनेक सोशल वेबसाईट्सवर आक्रमकपणे टाईम्स ग्रुपवर उघडपणे हल्ला करायला सुरुवात केली. काही झाले तरी टाईम्स ग्रुप काही छोटी कंपनी नव्हती, हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही. अखेरीस ४ मे २०१५ ला राहुल ने तडकाफडकी हाऊसिंगमधल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि त्याचा तो ईमेल सोशल नेटवर्क साईट्सवर फिरू लागला. अतिशय बोचरी टिका त्याने आपल्या मित्रांवर आणि इन्व्हेस्टर कंपन्यांवर केली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या बोर्डमिटिंगनंतर त्याने आपला राजीनामा परत घेतला असे जाहीर केले आणि सर्व सहकाऱ्यांची माफी मागितली.

 

  • ह्या राजीनामा सत्रानंतर राहुल यादवचे पर्यायी हाऊसिंगचे सोशल नेटवर्कवर प्रचंड हसे झाले. एक यशस्वी ब्रँड स्टार्टअप म्हणून उदयाला आलेल्या हाऊसिंगसाठी हा प्रकार लाजीरवाणा ठरला होता. त्याच महिन्यात राहुल यादवने स्वतःकडचे हाऊसिंग डॉट कॉमचे एकूण एक शेअर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या आपल्या २२५१ सहकाऱ्यांना वाटून टाकले. ज्याची किंमत साधारण १५०-२०० करोड होती.
  • राहुलच्या ह्या लहरी वागण्याचा आता सगळ्यांना कंटाळा आला नसता तर नवलच. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना सोशल मिडीयावर शिवीगाळ करणे, ई-कॉमर्स क्षेत्रात असलेल्या दिग्गजांना उगाचच ज्ञान पाजाळने, त्यांच्याशी सतत राहुलचे खटके उडणे, मिडियाशी राहुलचे असलेले वर्तन, अश्या अस्नेक गोष्टी विचारात घेऊन १ जुलैच्या बोर्ड मिटिंगमध्ये राहुलला हाऊसिंगमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

 

ह्या सर्व नाट्यमय घडामोडींवर त्याच्या काही मित्रांनी राहुल विरुद्ध उघड पवित्रा घेतला. राहुलविरुद्ध ब्लॉग्गिंग सुरु झाले. तो कसा वाईट होता, बनेल वृत्तीचा होता आणि हाऊसिंगला तो कसा धोकादायक ठरला असता याचे विश्लेषण केले जाऊ लागले. त्याचवेळी राहुलच्या समर्थनासाठीसुद्धा खूप जण पुढे आले, त्यात हरेश चावला यांचे नाव अग्रगण्य आहे. त्यांनी राहुलचे केलेले विस्तृत विश्लेषण इथे वाचता येईल. हाऊसिंगमध्ये इन्व्हेस्टर मंडळींच्या हातचे बाहुली न बनण्यापेक्षा बाहेर पडून, अजून एक नवीन सुरुवात राहुल करेल असा त्यांनी विश्वास दर्शवला.

म्हणायला गेलं तर ह्या सर्व बोर्डरूम घडामोडींचा आपल्या आयुष्यावर सरळसरळ परिणाम होत नाही. रोज बाजारात हजारो नव्या कंपन्या येतात आणि बंद देखील होतात. राहुल यादव स्वतः नवीन प्रोजेक्टवर काम करतोय, त्याला मुकेश अंबानी ह्यांनी देखील भेटायला बोलावले होते. त्याचे अपडेट्स त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर बघता येतीलच. हाऊसिंगचे नक्कीच नुकसान झाले मोठ्या प्रमाणावर, पण आशा करू ते त्यातून बाहेर येतील आणि पुन्हा आपला दबदबा निर्माण करतील. कारण त्यांच्याकडे अजूनही चांगली टीम आहे.

ह्या बोर्डरूम ड्रामावरून एक लक्षात येते की, ही एक भली मोठी शर्यत आहे, शर्यत जिंकायची असेल, तर तुम्हाला धावत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यात तुम्ही थांबलात तर १००१ टक्के संपलात… !

——————–

(लेखाचे सर्व संदर्भ : गुगलकडून साभार)

~ सुझे

पुर्व्रप्रकाशित – कलाविष्कार ई दिवाळी अंक २०१५