लढाई टेनिस कोर्टची..

दुसऱ्या महायुद्धात दिनांक १५ मार्च १९४४ रोजी ब्रम्हदेशातील चिंडविन नदीपासून “ऑपरेशन यू गो” ची सुरुवात झाली. जपानच्या 15 व्या आर्मीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याने ब्रिटीश भारतीय भूभागावर हल्ला करण्याची योजना बनवली होती. इंफाळ, कोहिमा, दिमापुरमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करून पुढे सैन्य कुमक वाढवत दिल्लीपर्यंत मजल मारण्याचे स्वप्न मुटागुची ह्यांनी बघितले होते. ह्या हल्ल्याला काही कोअर कमांडर्स ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता, कारण त्यात भारतातील भौगोलिक परिस्थितीचा फारच कमी अभ्यास केल्याचे निदर्शनात आले होते. त्यामुळे योजना सदोष होती आणि त्याचा फटका जपानी सैन्याला बसू नये याची त्यांना काळजी होती. इकडे मुटागुचीचा महत्त्वाकांक्षी स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. ज्यांनी ज्यांनी ह्या योजनेला विरोध केला, त्यांची जबरदस्ती बदली किंवा तात्पुरती मनधरणी करण्यात आली. तरीही म्हणावा तसा अभ्यास झाला नाही ही कुरकुर सुरूच राहिली, परंतु सरतेशेवटी तत्कालीन प्रधानमंत्री हिडेकी तोजो, ह्यांच्या संमतीने ह्या हल्ल्याला हिरवा कंदील दिला गेला. जनरल मुटागुची ह्यांनी ह्या सैनिकी हल्ल्याला “ऑपरेशन यू गो” असे नाव दिले.

कोहिमा ही भारतातील नागालँडची राजधानी.दिमापुर ओलांडल्यावर नागालँडचा निसर्गसंपन्न डोंगराळ प्रदेश सुरु होतो. दिमापूरच्या पुढे ४० किलोमीटर अंतरावर एका विस्तृत कडेपठारावर कोहिमा आणि त्याच्या दक्षिणेला ७० किलोमीटर अंतरावर मणिपूरची राजधानी इंफाळ. दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ लागलेली ही भारतातली दोनच शहरे. जपानचे हे आक्रमण मोडून काढण्यासाठी ब्रिटीश इंडियन १४ व्या आर्मीला ब्रम्हदेशातच जपानवर आक्रमण करून त्यांची पुढची वाटचाल रोखण्याचे आदेश देण्यात आले. ह्या १४ व्या आर्मीचे नेतृत्व होते लेफ्टनंट जनरल विलियम स्लिम ह्यांच्याकडे. १४ व्या आर्मीमध्ये ४ आणि ३३ अश्या दोन कोअर्स होत्या. सुरुवातीच्या काळात ४ कोअर इंफाळमध्ये आणि ३३ कोअर दिमापुर भागात होत्या. सतत दोन वर्ष युद्धभूमीवर असल्याने सर्वच तुकड्यांची शक्ती कमी झाली होती. ह्याउलट जपानने १५, ३३ आणि ३१ ह्या तीन इन्फंट्री डिव्हिजनचा वापर ह्या हल्ल्यात केला. संपूर्ण ब्रम्ह्देशावर कब्जा मिळवत त्या आगेकूच करू लागल्या. ३३ आणि १५ डिव्हिजन इंफाळमधल्या ४ कोअरला घेरण्यासाठी आणि ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमावर कब्जा करून, ब्रिटीश इंडियन आर्मीची रसदमार्ग तोडण्याच्या उद्देशाने निघाल्या.

 

 

लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची  यांच्या योजनेनुसार कोहिमावर लगेच ताबा मिळवून इंफाळमधील ब्रिटीश इंडिअन आर्मीची रसद आरामात तोडता येईल असे वाटले, पण मित्र सैन्याच्या एयर बेसवरून इंफाळला रसद आणि कुमक दोन्ही पुरवठा होऊ शकतो ही शक्यता त्यांनी गृहीत धरली नाही. इकडे जनरल विल्यम स्लिम ह्यांनी असा अंदाज बांधला की, जपानी फौजा प्रथम इंफाळवर हमला करतील आणि त्यासाठी पुरेसा सैन्यसाठा आणि रसद उपलब्ध आहे याची खात्री होती, परंतु जपानी फौजा कोहिमा आधी ताब्यात घेतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पुढे ह्याच चुका त्यांना महागात पडल्या. ठरलेल्या योजनेनुसार जपानी सैन्य (३१ इन्फंट्री डिव्हिजन) कोहिमा परिसरात घुसले. ह्या डिव्हिजनचा कमांडर कोटोकू साटो ह्या हल्ल्याबद्दल साशंक होता. त्याला काळजी वाटत होती की, जर कोहिमा वेळेत पडले नाही तर संपूर्ण डिव्हिजनचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, पण मुटागुची आता काही समजावण्याच्या पलीकडे गेल्याने ते हतबल होते.

 

हल्ल्याची योजना

                                                           हल्ल्याची योजना

 

कोहीमावर हल्ला होणार नाही ह्या आपल्या अंदाजानुसार स्लिम ह्यांनी तिथे जास्त कुमक ठेवली नव्हती. जेमतेम २५०० सैन्य तिथे होते, ज्यामधील १००० तर निव्वळ मदतनीस होते. सैन्यसंख्या कमी असून देखील त्यांनी संरक्षण फळीची मोर्चेबांधणी भक्कमपणे उभारण्यावर प्राधान्य दिले होते. कोहिमा परिसरात असलेल्या उंच टेकड्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणी सैन्य ठाणी उभारून संरक्षण फळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. जेव्हा ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमाच्या जसामापाशी धडकली, तेव्हा जनरल स्लिम ह्यांनी ५ इंडियन इन्फंट्री डिव्हिजनला विमानाने दिमापुरला हलण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या डिव्हिजनच्या १६१ इन्फंट्री ब्रिगेडला कोहीमाला हलवण्याआधीच जपानी सैन्य कोहिमामध्ये घुसले होते आणि त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली.

कोहिमा रिजवर आय जी एच स्पर, गॅरिसन हिल, कुकी पिकेट, फिल्ड सप्लाय डेपो, जेल हिल, पिंपल, जी.पी.टी. रिज, डेप्युटी कमिश्नर (डीसी) बंगला इत्यादी ठिकाणी ब्रिटीश इंडियन आर्मीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. एकामागून एक अश्या ठाण्यांवर हल्ला करत जपानी सैन्य युद्धात आघाडी घेऊ लागले. त्यांनी आय जी एच स्पर, कुकी पिकेट, जेल हिल, जी.पी.टी. रिज आणि पिंपल ही ठाणी जिंकली. ही ठाणी जिंकता जिंकता जपानी सैन्याचे  प्रचंड नुकसान झाले होते. गॅरिसन हिल हे कोहिमाचे बालेकिल्ला ठाणे होते. इथेच ब्रिटीशांचे नागालँड प्रांताचे सैनिकी मुख्यालय होते आणि त्यावेळी चार्ल्स पॉसे हे त्या मुख्यालयाचे डेप्युटी कमिश्नर होते. जपान्यांनी चौफेर हल्ला चढवून देखील गॅरिसन हिल त्यांना काबीज करता आली नाही. तेथील एका टेनिस कोर्टवर एका बाजूला जपानी आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटीश इंडिअन आर्मी असे तुंबळ युद्ध सुरु झाले. शत्रू अगदी समोर असूनदेखील ब्रिटिशांनी तिथे जोरदार प्रतिकार केला आणि जपान्यांना टेनिसकोर्टच्या एका बाजूला रोखून धरले. हे युद्ध काही दिवस अविरत सुरु होते. कधी जपानी थोडे पुढे सरकायचे आणि एखादे ठाणे ताब्यात घ्यायचे, तर कधी अधिक निकराने लढा देत ब्रिटीश इंडियन आर्मी हातचे गेलेले ठाणे जिंकून परत तिथे आपली मोर्चेबांधणी करायचे. काही केल्या गॅरिसन हिल जपान्यांचा तीव्र प्रतिकाराला जुमानत नव्हती.

 

कोहिमा परिसर आणि तटबंदी

                                                      कोहिमा परिसर आणि तटबंदी

जपानी सैन्याने ४ एप्रिलला कोहिमावर हल्ला केल्यावर तब्बल १४ दिवसांनी, म्हणजे १८ एप्रिलला १६१ इंडियन इन्फंट्री ब्रिगेड कोहीमाच्या सीमेवर येऊन पोचले. जपानी सैन्याचे इंफाळ-कोहिमा मार्ग मोकळा करण्याचे स्वप्न दुभंगले त्यामुळे सैन्याकडे रसद उपलब्ध नाही आणि ती उपलब्ध करण्याचा कुठलाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता ही नव्हती. जनरल साटोंना ह्याच गोष्टीची आधीपासून भीती होती. हीच मोक्याची संधी साधून जनरल स्लिम ह्यांनी २ ब्रिटीश इंडियन इन्फंट्रीचा तोफखाना कोहीमाजवळ हलवून जपानच्या मोर्चांवर तुफान हल्ला सुरु केला. हळूहळू जपान्यांनी ताब्यात घेतलेली ठाणी जिंकत जिंकत ते गॅरिसन हिलकडे पोचले आणि जपान्यांनी नांगी टाकायला सुरुवात केली. जनरल साटो ह्यांनी मुटागुची ह्यांना ही परिस्थिती कळवली आणि आता माघार घेण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही असे सांगितले. कोहिमा-इंफाळमधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि २२ जून पर्यंत जपानी सैन्य चिंडविन नदीच्या पार निघून गेले. ह्या लढाईत ब्रिटीश इंडियन सैन्याचे सुमारे १६,९८७ आणि जपानी सैन्याचे सुमारे ६०,६४३ सैनिक जखमी झाले किंवा मरण पावले.४ एप्रिल ते २२ जून १९४४ म्हणजेच तब्बल अडीच महिने ही लढाई सुरु होती.
टेनिस कोर्टवर झालेल्या तुंबळ युद्धामुळे, कोहीमाची लढाई “टेनिस कोर्टची लढाई” म्हणूनदेखील ओळखली जाते. जनरल स्लिम, ह्यांच्या निग्रह युद्धनीतीमुळे सैन्याला पुरेशी रसद आणि वाढीव कुमक वेळोवेळी मिळत गेली आणि ती मिळेपर्यंत निकराने जमेल तितकी ठाणी त्यांनी लढवत ठेवली आणि शत्रूला थोपवून ठेवले. इतक्या बिकट अंतरावर शत्रूला दीर्घकाळासाठी थोपवून धरल्याची फार थोडी उदाहरणे इतिहासात सापडतील. लष्करी संरक्षण ठाणी लढवणाऱ्या, कुठल्याही देशाला कोहीमाची लढाई आजही प्रमुख मार्गदर्शक मानली जाते. जपानी सैन्याचा निर्णायक पराभव करणारा बालेकिल्ला म्हणजेच गॅरिसन हिल इथे १४२० सैनिकांच्या बलिदानाचे स्मृतीस्थळ बांधलेले आहे, जे तिथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. आजही जगभरातून लाखो लोक ह्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी येतात.

Kohima War Cemetery

                                                      Kohima War Cemetery

 

१९६२ च्या भारत-चीन युद्धात जर सेलासारखा बालेकिल्ला कोहीमाचा आदर्श समोर ठेवून निग्रहाने लढवली गेली असता, तर चीनी फौजा भारतात इतक्या आत घुसू शकल्या नसत्या. त्या युद्धात भारताकडून फॉरवर्ड पॉलिसीचा वापर केला गेला आणि तोच आपल्या अंगाशी आला. वेळ पडल्यावर बचावात्मक माघार घेऊन शत्रूला आपल्याच हद्दीत, पण त्यातल्यात्यात थोडे बाहेरच्या बाजूला लढत ठेवले असते, तर चीनचा डाव भारताला खूप आधीच उधळता आला असता.  २०१३ मध्ये ब्रिटनच्या नॅशनल आर्मी म्युझियमने कोहिमा लढाईला आजवर लढलेली सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून घोषित देखील केले गेले. ह्या लढाईचे विविध पैलू जगभरातील सैन्य आपल्या अभ्याक्रमात वापरतात. आजही जपान कोहिमा-इंफाळ लढाईला आपला सर्वोच्च पराभव मानतात ह्यातच सर्व काही आले.

कोहिमा आणि इंफाळ ही शहरे त्यावेळी जपानी सैन्याच्या ताब्यात गेली असती, तर आज भारताचा इतिहास नक्कीच पूर्णपणे वेगळा असता.    🙂   🙂

——————————-

लेखन संदर्भ :
१. मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे लिखित – न सांगण्याजोगी गोष्ट (१९६२च्या पराभवाची शोकांतिका) :  नकाशे आणि माहिती  (पान क्र. २५३ -२५९)
२: विकिपीडिया
३. प्रचि Renya Mutaguchi, William Slim, Kohima War Cemetery   – गुगलकडून साभार
पूर्वप्रकाशित: (दिवाळी अंक) ईसृजन.कॉम
~ सुझे !!

प्रोजेक्ट शेड बॉल्स…

गेल्या दहा वर्षात पर्जन्यमानाची वाढती अनियमितता हा सर्वच प्रगतिशील देशांसाठी मोठा प्रश्न ठरलेला आहे. अगदी आपल्याकडचेच उदाहरण घ्यायचे तर, गेल्या वर्षी महाराष्ट्रात जवळपास ३५-४०% कमी पर्जन्यमान झाल्याने भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, ह्याउलट चेन्नई तामिळनाडू भागात पर्जन्याचे प्रमाणे २०-२५% ने वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण शहर १०-१२ दिवस पाण्याखाली गेले. जगभरातील विविध देशांमध्ये अशीच अवस्था बघायला मिळतेय आणि ह्या बदलत्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.

सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला आजवरच्या सर्वात वाईट दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत येथील पावसाचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याने, पाणीसाठे, जलस्रोत आणि जमिनीतील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत जात आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या कॅलिफोर्नियाच्या एकूण पाण्याच्या वापरानुसार ६० टक्के पाणी हे विहिरी, बोअर्स वगैरे तत्सम जमिनीतील स्रोतांवर आणि ४० टक्के पाऊस/बर्फवृष्टी यावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण असेच घटत गेल्यास परिस्थिती अधिकच भयंकर होईल ह्यात शंका नाही. जिथे आधी ३००-३५० फुटावर पाणी उपलब्ध व्हायचे, तिथे १५०० फूट खोल विहिरी खणून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारतर्फे विहिरी खोदण्यासाठी सक्त बंदी केली गेली आहे आणि समजा तुम्हाला परवानगी मिळाली असल्यास त्याचा सध्याचा खर्च जवळपास $३००,००० इतका प्रचंड आहे. नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सने दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण अमेरिकेतील जमिनीतील पाण्याची पातळी २००४ ते २०१३मध्ये अक्षरशः निम्म्यावर आली आहे आणि नैसर्गिक पावसाचे प्रमाण असेच कमी होत गेल्यास २०२०पर्यंत ही पातळी ३५ टक्के आणि २०४० पर्यंत ७-५ टक्के इतकी कमी होऊ शकते. परिस्थिती इतकी गंभीर झाल्यानेच, आहे ते पाणी वाचवणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करता येणे हा एकच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. गेली काही वर्षे त्यावर बरेच संशोधन सुरू होते.

त्यामधल्या एका संशोधनाचा प्रत्यक्ष प्रयोग ११ ऑगस्ट २०१५ रोजी स्थानिक पालिकेकडून राबवला गेला. त्यांनी लॉस एंजलीस ह्या कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठ्या आणि अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या शहरात असलेल्या मुख्य जलस्रोतावर अक्षरशः एक भलीमोठी चादर अंथरली. त्यानंतर सगळीकडे त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. अनेकांनी ह्या प्रयोगावर टीकेची प्रचंड झोड उडवली, तर अनेकांनी त्याचे भरभरून समर्थन केले. त्या प्रयोगाचे नेमके उद्दिष्ट, त्यामुळे होणारे फायदे-नुकसान, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि महत्त्वाच्या इतर घडामोडींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ह्या वादात (?) सापडलेल्या प्रयोगाचे नाव ‘प्रोजेक्ट शेड बॉल्स’.

.
वर दिलेला फोटो हा लॉस एंजलीस शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलाशयचा आहे. ह्या जलाशयातूनच शहराची पाण्याची तहान भागवली जाते. त्यावर आपण जो काळा छोट्या छोट्या चेंडूंचा थर बघतोय, तीच ती भलीमोठी चादर. त्या काळ्या चेंडूना शेड बॉल्स (Shade Balls) म्हटले जाते. ह्याक्षणी १७५ एकरावर पसरलेल्या जलाशयाचा पृष्ठभाग ९,८०,००,००० शेड बॉल्सने आच्छादलेला आहे. दुरून बघताना संपूर्ण जलाशयावर एक भलीमोठी चादर अंथरल्याचा भास निर्माण होतो.

शेड बॉल्सची पार्श्वभूमी :-

शेड बॉल्सचे जनक म्हणजे लॉस एंजलीस डिपार्टमेंट ऑफ वॉटर अँड पॉवरमधून हल्लीच निवृत्त झालेले जीवशास्त्रज्ञ डॉ. ब्रायन व्हाईट. डॉ. व्हाईट ह्यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या हवाई दलाच्या ठिकाणी असलेल्या छोट्या पाण्याच्या स्रोतांवर बॉल्सचे आवरण पसरवून, २००३ साली ह्याची यशस्वी चाचणी केली होती. त्या वेळी हवाई तळाजवळ असलेल्या जलाशयांवर पक्षी बसू नये यासाठी ह्या बॉल्सचा उपयोग केला जायचा. त्यामुळेच त्यांना ‘बर्ड बॉल्स’ असे संबोधले जायचे. हवाई तळावर सतत विमानांची ये-जा सुरू असते आणि फायटर विमानांचा कर्णकर्कश आवाज ऐकून पक्ष्यांचे थवे सैरावैरा उडून ते विमानांना आपटून दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असायची. यासाठी सर्वप्रथम फेअरचाईल्ड ह्या हवाई तळावर ह्या बर्ड बॉल्सचा यशस्वी वापर केला गेला आणि मग अमेरिकेत सैनिकी क्षेत्रांसाठी सगळीकडे हेच तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले.

शहरी भागात शेड बॉल्सचा उपयोग :-

विविध हवाई तळांच्या यशस्वी चाचणीनंतर शहरी भागातील जलाशयांवर ह्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल यावर संशोधन सुरू होतेच. २००४ पासून कॅलिफोर्नियामधील पावसाचे प्रमाण लक्षणीय घटल्याने, जलाशयांमध्ये साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यावर बुरशीची किंवा तत्सम एकपेशीय वनस्पतींची वाढ होऊ नये, पाण्यातील क्लोरीन आणि सूर्यप्रकाश यांची एकत्रितपणे ब्रोमेटसारखी रासायनिक प्रक्रिया होऊ नये यासाठी ह्या शेड बॉल्सचा वापर करता येईल, असा निष्कर्ष निघाला. शेड बॉल्सच्या आवरणाखाली पाणी सुरक्षित राहील आणि सूर्यकिरणांचा थेट पाण्याशी संपर्क न होता पाण्याचे तापमान कमी राहील, ह्या अनुषंगाने त्याची चाचणी करण्याचे ठरवले गेले. सन २००८ ते २०१२मध्ये हेच तंत्रज्ञान, थोडे बदल करून शहरी भागातील पाण्याच्या स्रोतांवर प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात झाली. त्यात लॉस एंजलीसमधील आयव्हनहो, एलिसिअन, अप्पर स्टोन कॅनियन ह्या जलाशयांवर शेड बॉल्स वापरण्यात आले. २००८ मध्ये सर्वप्रथम आयव्हनहोमध्ये ३,०००,००० शेड बॉल्स वापरल्यावर एका वर्षाने तेथील परिस्थिती खाली दिलेल्या प्र.चि. २मध्ये बघता येईल आणि पाण्याचे तापमानदेखील खूप कमी झाल्याचेसुद्धा डॉ. ब्रायन ह्यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर लगेच २००९ मध्ये एलिसिअन आणि २०१२ मध्ये अप्पर स्टोन कॅनियन जलाशय शेड बॉल्सने भरून गेले. ह्या तिन्ही जलाशयांमध्ये वापरलेले शेड बॉल्स नजीकच्या काळात बदलून, नव्या पद्धतीचे शेड बॉल्स वापरले जाण्याची शक्यता आहे.

.
शेड बॉल्स – तांत्रिक माहिती आणि त्याचे फायदे :-

– शेड बॉल्सचा व्यास ४ इंच इतका आहे. हे बॉल्स वेगवेगळ्या आकारात, मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर उपलब्ध आहेत.
– ते पूर्णपणे प्लास्टिकचे बनलेले आहेत. यासाठी खास पॉलिइथिलीन प्लास्टिक वापरले गेले आहे, जे किमान १० वर्ष तरी आरामात टिकेल असा अंदाज आहे. ह्या प्लास्टिकला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही किंवा त्यातून पाण्यात कुठली रासायनिक प्रक्रिया घडत नाही. खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठीसुद्धा पॉलिइथिलीन वापरले जाते. प्रत्येक प्लास्टिक बॉल शास्त्रीय पद्धतीने बंद केला आहे. दहा वर्षांनी किंवा बॉल्स फुटल्यावर त्या बॉल्सवर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्याजोगे करता येईल. बॉल्स बनवणार्‍या कंपन्यांनी ह्या बॉल्सचे आयुष्य साधारण २५ वर्ष असेल असा दावा केला आहे.
– एका बॉलचे वजन साधारण २४५ ग्राम इतके आहे. बॉलच्या आतील पोकळ भागात पाणी आणि हवा समप्रमाणात भरलेले आहेत, जेणेकरून ते पाण्यात बुडू नयेत किंवा हवेसोबत उडून जाऊ नयेत.
– काळा रंग शास्त्रीयदृष्ट्या अधिक परिणामकारक असल्याने निवडला गेला आहे. ह्या रंगामुळे प्लास्टिक कंपाउंडचे जीवनमान सगळ्यात जास्त बनते. तसेच काळ्या रंगामुळे पाण्याचे तापमान वाढणार नाही आणि रेडिएशन पाण्यापर्यंत पोहोचून रासायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता शून्य होते.
– प्लास्टिक उष्णता दुर्वाहक असल्याने, सूर्यप्रकाशाची उष्णता पाण्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन ९०% कमी होऊन, सध्या वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत लॉस एंजलीसमध्ये होणार आहे. हे पाणी साधारण ८,१०० लोकवस्तीला चार आठवडे पुरेल इतके आहे.
– ह्या बॉल्सचा वितळण बिंदू साधारण १२०°-१८०° सेल्सिअस असल्याने, वाढत्या तापमानाचा त्यावर परिणाम होणार नाही, याची शाश्वती डॉ. व्हाईट ह्यांनी दिली आहे.
– शेड बॉल्स तुलनेने स्वस्त (०.३६¢ प्रती बॉल) असल्याने, त्याच्या वापरावर आणि प्रयोगांवर मर्यादा सध्यातरी नाहीत.
– या घडीला XavierC, Artisan Screen Process, Orange Products ह्या तीन मुख्य कंपन्या आहेत, ज्यांनी आजवर हे प्रोजेक्ट शेड बॉल्स हाताळलेले आहे. अमेरिकेत झालेल्या प्रयोगानंतर जगभरातून ग्राहक मिळवण्यात ते यशस्वी होतीलच किंवा एव्हाना झाले असतीलच. नजीकच्या काळात स्पर्धा वाढल्याने जगभरातले मोठ्ठे बिझनेस टायकून्स, ह्या शेड बॉल्स निर्मितीमध्ये उतरणार हे वेगळे सांगणे न लगे.

शेड बॉल्सवर होणारी टीका :-

ह्या प्रयोगावर होणारी मुख्य टीका म्हणजे बाष्पीभवन थांबवण्यासाठी शेड बॉल्सचा केलेला खर्च आणि जे पाणी बाष्पीभवन होते त्याचे बाजारमूल्य. म्हणजे समजा एलएमध्ये शेड बॉल्ससाठी जवळपास ३४.५ मिलियन डॉलर इतका खर्च झाला. हे शेड बॉल्स बाष्पीभवन रोखून वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत करणार आहेत. ह्या ३०० मिलियन गॅलन्स पाण्याचे बाजारमूल्य जवळपास २ मिलियन डॉलर आहे. कंपन्यांनी जरी हा दावा केला, की ते २५ वर्ष सहज टिकतील, तरी शेड बॉल्स दर दहा वर्षांनी बदलावे लागले, तर १० वर्षात फक्त २० मिलियन डॉलर्स किमतीच्या पाण्याची बचत होणार, मग पुन्हा ३४.५ मिलियन डॉलर्सचा खर्च. सरकारने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी पिण्याच्या पाण्यात तरंगते प्लास्टिक आणि त्याचा पाण्याशी कुठलाच रासायनिक परिणाम होत नाही यावर काही लोकांचा विश्वास बसत नाही आहे आणि ते सोशल मीडियावर रोज त्याबद्दल लिहीत आहेत. यावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे काही कंपन्यांना आणि त्या कंपन्यांद्वारे सरकारी यंत्रणेला मुद्दाम फायदा पोहोचवण्यासाठी ही योजना अमलात आणली गेल्याचा. याआधी ३ जलाशयांवर हा प्रयोग केला गेला, पण त्याची इतकी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी कधीच केली गेली नाही.

ह्या प्रयोगाचे भविष्यकाळच ठरवेल, परंतु अशी काटकसर करण्याची वेळ आपणच आपल्यावर आणली आहे, ह्यावर कोणाचेही दुमत नसेल. सिमेंटच्या जंगलात राहून कामातून मुद्दाम वेळ काढून, कुठे जंगलात एक-दोन दिवस काढण्यात कसली आली आहे धन्यता? आपणच निसर्ग इतका दूर नेऊन ठेवला आहे की, तो अनुभवावा लागतो मुद्दाम वेळ काढून. प्रगतिशील होण्यासाठी अवलंबलेल्या मार्गांमध्ये आपण निसर्गाचा अक्षरशः बळी दिला आहे. त्यामुळे निसर्ग कोपतो, पाऊस पडत नाही, जास्तच पडतो अशा तक्रारी करण्यास आपण पात्र नाही. आता शक्य तितका प्रयत्न करून निसर्गाची हानी थोड्या प्रमाणात का होईना भरून काढणे हेच आपल्या हातात उरले आहे.

डॉ. व्हाईट आणि त्यांनी केलेले हे संशोधन निश्चितच एक मैलाचा दगड ठरलेला आहे, पण अजून भलामोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आशा आहे की ह्या आणि अशा अनेक प्रयोगांद्वारे कमीतकमी किमतींमध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे पाणी वाचवण्याची यंत्रणा जगभर उपलब्ध व्हावी. सगळीकडे पर्जन्यमान व्यवस्थित व्हावे. त्यापरीस सजीव सृष्टींच्या अस्तित्वाबद्दल एकूणच निसर्गाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन, त्याची अधिक हानी न होऊ देण्याची बुद्धी सगळ्यांना मिळो ही माफक अपेक्षा.

धन्यवाद !!

~ सुझे 🙂

———————————
-: लेखाचे संदर्भ :-
१. LADWP Newsroom – Shade Balls FAQ
२. National Geographic
३. Wikipedia
४. Time.com
५. Grist.org
६. Bloomberg.com

———————————

पूर्वप्रकाशितमिपा विज्ञान लेखमाला

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५