गुंतता हृदय हे….!!

साठ्ये कॉलेजमध्ये एकदम उत्सवाचे वातावरण होते. कॉलेजच्या वार्षिक युथ फेस्टिव्हल्सची तयारी जोरदार सुरु होती. रोज टीव्ही, वर्तमानपत्रात जाहिराती झळकत होत्या. एकंदरीत हा फेस्टिव्हल कॉलेजसाठी प्रतिष्ठेचा बनला आणि त्यामुळे आयोजनात कुठल्याही प्रकारची हयगय केली जात नव्हती. फेस्टिव्हलच्या थीमचा एक भाग म्हणून, कॉलेजने दरवर्षीप्रमाणे एक स्मरणिका छापायचे ठरवले आणि त्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य पाठवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले गेले. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रवेशिका पारखून निवड करणे सुरु होते. मराठी साहित्य छाटणीचे काम कॉलेज जिमखान्यात सुरु होते.

ह्या आयोजनाला सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता आणि एक से बढकर लेख, कविता आयोजाकांपर्यंत पोचल्या होत्या. इतके लेख आणि साहित्य त्यांच्याकडे पोचले की, त्यांनी अजुन प्रवेशिका घेणे बंद केले आणि तशी सूचना नोटीस बोर्डावर लावली. सगळे आयोजक कँटिनमध्ये चहा घ्यायला गेले. जेव्हा ते सगळे जण परत आले, तेव्हा त्यांना जिमखान्याच्या टेबलावर एक बंदिस्त लिफाफा आढळला. फेस्टच्या मासिकासाठी एका मुलीने कविता लिहून पाठवली होती. त्या पाकिटावर तिने नाव आणि बाकी माहिती लिहिली होती. आयोजकांपैकी एकाने ते पाकीट उघडलं आणि कविता वाचायला सुरुवात केली..

==================================
आज पुन्हा तेच स्वप्न पडलं..
मला उडता येत होत..
आसमंतात करत होती मुक्त संचार..
स्वच्छंदी मनात फक्त तुझाच विचार..

पंख काही नव्हते मला..
तरीही मी उडत होते..
हवं तसं हवं तिथे..
जणू मी हवेत तरंगत होते..

मग मनात विचार आला..
कुठे बरं जावं, काय बरं शोधावं..
क्षणाचाही विलंब जाहला नसावा..
आतून वाटले तुझा चेहरा पाहावा..

रात्रीचा गर्द अंधार..
सगळं जग निद्राधीन..
मी मात्र तुझ्या ओढीने..
उडत राहतेय दिशाहीन…

अखेर एक खिडकी दिसते..
हे तुझेच घर अशी खात्री पटते..
मला कसं कळलं विचारू नकोस..
स्वप्नातल्या गोष्टींवर अंकुश नसे..

मी तशीच विहरत त्या खिडकीपाशी येते..
तुझ्या ओढीने शोधाशोध करते..
पलंगावर तू निर्धास्त पहुडलेला..
अंधारात फक्त तुझा चेहरा उजळलेला..

डोळ्याचे पारणे फिटे पर्यंत..
मी फक्त तुला पाहते..
अरे कूस बदलू नकोस..
असंच मनोमन पुटपुटत राहते..
===============================

स्मरणिकेचे संपादक: “ह्म्म्म…..चांगला प्रयत्न आहे…प्रियकराची आठवणीत हरवलेली एक प्रेयसी. एकदम जीव ओतून लिहायचा प्रयत्न केलाय. पण… पण आपण ही कविता नाही स्वीकारू शकत. कविता उशिरा पाठवलीय. (ते शिपायाला हाक मारतात)
“पांडू, हे पाकीट ह्या पोरीला नेऊन दे आणि तिला सांग कविता नाही स्वीकारू शकत, कारण साहित्य द्यायची मुदत संपली आहे म्हणून” आणि सगळे कामात गर्क होतात.

“तो” मात्र ती कविता वाचून स्तब्ध झाला होता. त्याला राहून राहून त्या मुलीचं नाव ओळखीचे वाटत होतं. तो लगेच पांडूच्या मागून धावत गेला आणि आडूनआडून बघायला लागला की ती मुलगी नक्की कोण…पांडू एका वर्गासमोर जाऊन उभा राहतो आणि त्या मुलीला आवाज देतो. ती बाहेर येते, पण ह्याला तिचा चेहरा दिसत नाही. पांडू तिच्याशी बोलत असतो. तिला आपली कविता नाकारली आहे हे निश्चितचं आवडत नाही, आणि ती तो कागद चुरगळून बाहेर फिरकावते. हा तिला बघायचा प्रयत्न करतो, पण त्याला फक्त एक पाठमोरी आकृती दिसते, जी डोळे पुसत वर्गात जात असते. तो लगबगीने उठतो आणि धावतच त्या कागदाच्या बोळ्याजवळ पोचतो. कोणी बघत नाही हे बघून, ती कविता नीट घडी करून खिशात ठेवून देतो.

कॉलेजच्या आवारात विविध स्पर्धांच्या पात्रता फेरी सुरु होत्या. सगळीकडे नुसता गोंधळ सुरु होता. फेस्टची तयारी पुर्ण होत आली होती. आता सगळे आतुरतेने त्या दिवसाची वाट बघत होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरु होती. होता होता फेस्टिव्हलचा दिवस उजाडला. कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी अधिकृतपणे फेस्टिव्हल सुरु झाल्याची घोषणा केली. आता पुढचा आठवडाभर नुसता हैदोस घालायला सगळे मोकळे.

विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी विविध स्पर्धेतून भाग घेत होत्या, सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सायन्स म्हणा, वकृत्व म्हणा, रोबोटिक्स म्हणा की गायन म्हणा….आयोजनात काही कसूर पडली नव्हती. सगळं कसं सुरळीतपणे सुरु होतं. संयोजकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना “उत्सव” ह्या स्मरणिकेचे वाटप सुरु केलं. साहित्याची ही मेजवानी कोणी सोडेल तर शप्पथ…!!!
त्यातल्या कथा आणि कविता इतक्या उत्कृष्ट दर्ज्याच्या होत्या, की सगळ्यांना ते आवडत होत. तिला सुद्धा स्मरणिकेची एक प्रत दिली होती, पण ती तोंड पाडून लायब्ररीकडे जात होती. तिला अजिबात रस नव्हता वाचनात. तिचा प्रचंड हिरमोड झाला होता आपली कविता नाकारल्यामुळे . तासभर लायब्ररीत बसून ती घरी जायला निघाली. दरवाज्यातच तिच्या मैत्रिणी घोळक्याने उभ्या होत्या आणि काही तरी कुजबुजत, खिदळत होत्या.

तिला काही कळले नाही, तिने विचारलं तिच्या मैत्रिणीला, “काय गं.. काय झालंय?” तिच्या मैत्रिणीने काही नं बोलता, स्मरणिकेचे एक पान उघडून तिच्या पुढे केलं. कवितेचे शीर्षक “शीर्षक नसलेली कविता” होतं आणि ती तिचीच कविता होती. कोणीतरी त्या कवितेचे रसग्रहण केलं होतं.

कसला तरी शॉक लागल्यासारखं ती उभी होती, काय बोलावं तिला सुचत नव्हतं. तिने ते रसग्रहण वाचले आणि तिचे डोळे पाण्याने डबडबून गेले. काही झालं तरी तो स्वतःला सावरू शकत नव्हती. ज्याने ते रसग्रहण लिहिलं होतं, त्याने तिच्या भावना तंतोतंत हेरल्या होत्या आणि त्या सुरेख शब्दातून मांडल्या होत्या. ती धावतच जिमखान्याकडे निघाली. तिथे चौकशी केली त्या लेखाबद्दल, पण कोणालाच काही नक्की माहित नव्हते. लेखकाचे नावं अनामिक असल्यामुळे त्यावरून ओळखणे अशक्य होते. ती बावरून इकडेतिकडे बघू लागली. काय करावं, कोणाला विचारावं म्हणून मग ती कल्चरल कमिटीच्या ऑफिसकडे जाऊ लागली. निदान त्यांना नक्की माहित असेल ह्या आशेने. तिथे गेली, पण तिथे कोणीच नव्हते.

ती दरवाज्याजवळ असलेल्या बाकावर ढिम्मपणे बसली. मनात विचारांचे सत्र सुरु होतेच. कोणी केलंय हे रसग्रहण, कोण मला इतकं चांगलं ओळखत इथे. बालपणापासूनचे शिक्षण रत्नागिरीला झाल्यामुळे, हे तर माझं पहिलंच वर्ष ह्या कॉलेजमध्ये, नव्हे ह्या शहरातसुद्धा. काय करावं कळत नव्हतं. आजवर जे कोणाला तिने कधी सांगितलं नाही, ते आज तिलाच कोणीतरी समजावून सांगताय. त्या एक एक शब्दात अशी जादू होती, की तिला नकळत त्याची आठवण येऊ लागली. जुने दिवस आठवू लागले. शाळेतली शेवटची दोन वर्ष आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये असतानाचे दिवस तिच्या डोळ्यासमोर झरझर येऊ लागले.

त्या घडामोडी, ते मित्र, त्या पिकनिक्स, ती भांडणं आणि तो… हो त्याला कशी विसरणार होती ती. त्याच्या आठवणींत तिने अनेक रात्री रडून जागवल्या होत्या. कोणी कधी नकळतपणे आपल्या आयुष्यात येतो, आपल्याला धीराने सांभाळतो, आपण आपलं आयुष्य त्याच्यावर समर्पित करायला तयार असतो आणि अचानक..अचानक तो कुठेतरी दूर निघून जातो. ना त्याची काही खबर, ना कधी फोन. त्याला डोळेभरून बघायला तिचे डोळे तरसले होते, पण अचानक तो निघून गेला होता तिच्या आयुष्यातून. तिच्या मैत्रिणींनी खूप समजावलं, जाऊ दे त्याला विसर आता, त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. काही वाटत असतं तर तो गेलाच नसता तुला सोडून. तू तुझं आयुष्य बरबाद करून घेऊ नकोस… पण हिच्या मनात तो कुठेतरी खोलवर रुतून बसला होता. त्याचा आवाज, त्याची माया, त्याचा लडिवाळपणा ती अजिबात विसरू शकत नव्हती. आज इतक्या वर्षांनी तो भेटेल असं तिला वाटलं, पण तो कशाला येईल परत? जर त्याला यायचं होतं, तर सोडूनच का गेला… जाऊ दे आपण नको त्याचा विचार करायला असं मनात म्हणत ती बाकावरून डोळे पुसता उठायला लागली.

तेव्हढ्यात कोणीतरी तिला आवाज दिला,”हाय, तूच ती कविता लिहिली होतीस नं….(तो अडखळत बोलत होता)” ती डोळे पुसत म्हणाली,”Excuse Me, तू कोण.. तुला माझ्याबद्दल काय माहितेय? मी तुला ओळखते काय?” त्यावर तो म्हणाला, “नीट बघ नक्की ओळखशील..!!” तिने परत डोळे पुसले आणि त्याच्याकडे बघून आठवू लागली, की ह्याला कुठे बघितलंय म्हणून… (काहीसं आठवून..उत्साहाने) “अरे तू तर माझ्या शाळेत होतास नं, बॅकबेंचर? ना कधी कोणाशी बोलायचा, मोजक्या मित्रांबरोबर रमायचा..बरोब्बर?” 🙂

“हो बरोब्बर !! छान वाटलं तुला मी अजुन आठवतोय बघून”

“अरे मी कोणालाच विसरले नाही, पण तू किती बदललायस..म्हणून लगेच ओळखणं कठीण गेलं बस्स…कसा आहेस? तुला त्या कवितेबद्दल काय माहित आहे?”

“अरे हो हो.. किती ते प्रश्न…मला तुझ्याबद्दल बरचसं माहित आहे..त्यानेच सांगितलं होत…(तिचा चेहरा पडतो) प्रेम वगैरे एक आभास असतो, असं त्याला वाटायचं. आयुष्यात एक वय असं असतं, की प्रत्येकाला एका आधाराची गरज असतेच. त्याला तो फक्त काही क्षणांचा आभास वाटला आणि तो तुझ्या आयुष्यातून निघून गेला…शाळेचं वर ते. एक चूक म्हणून तो पुढे निघून गेला…पण मी तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी येणार पाणी बघितलंय तेव्हाही आणि आजही… तुझं त्याच्यावर असलेलं प्रेम मी तुझ्या डोळ्यात वाचलंय, तुझी होणारी तळमळ मी तुझ्या कवितेतून वाचली आणि न राहवून तो लेख लिहिला…”

“क्क्काय… तू तो लेख लिहिलास… पण का? काय गरज होती..? मला वाटलं की… त्याने ….”

“ह्म्म्म्म… मला माफ कर, पण काही गोष्टी नाही सांगू शकत. प्लिज मला कारण विचारू नकोस, मी नाही सांगू शकणार”

“तुला सांगावच लागेल, आज मला वाटलं की कितीतरी वर्षांनी तो माझ्याशी बोलतोय…तिच भावना, ते प्रेम. मला तू सांग, हा नक्की काय प्रकार आहे?”

“प्लीजजजजजज, मला नको भाग पाडू… मी नाही सांगू शकणार”

“तुला सांगावच लागेल, तुला माझी शप्पथ…” (हे बोलताना तिने हलकेच जीभ चावली. अरे ह्याला आपण असं कसं बोललो, कुठल्या हक्काने..) ती वरमून त्याला सॉरी म्हणाली, “नको सांगूस, नसेल सांगण्यासारखं”

“खरंच नाही सांगण्यासारखं, काय सांगू तुला.. तुला ते नाही आवडणार?”
“ह्म्म्म.. राहू दे, कदाचित तुला ते मला सांगण्यात, कमीपणाचे वाटत असेल. तू त्याचा मित्र, तुला त्याची बाजू बरोबर वाटणार आणि सगळी चूक माझी असेल हे गृहीत धरले असशील. असो, मला नाही काही फरक पडत. माझ्या भावना समजून घेणारं कोणीच नाही” 😦

“कमीपणा?…(त्याचा आवाज एकाएकी चढला) बोल नं काय सांगू काय? सांगू की माझं तुझ्यावर प्रेम होत आणि आजही आहे? जेव्हा आपण सगळे भेटायचो, तेव्हा त्याच्या निम्मिताने का होईना तुला बघता यायचं. तुझ्या बरोबर काही क्षण एकत्र घालवता यायचे… पण अचानक तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हरवलेले बघून खूप त्रास झाला. तुला होणारा त्रास मी बघितलाय. पण तुझी त्याच्यासाठी होणारी तळमळ इतकी निर्मळ होती, की माझं एकतर्फी प्रेम तुला कधी सांगू शकलो नाही.. कधी धीर झालाच नाही. तो असा निघून गेला तुझ्या आयुष्यातून की, काही झालेच नाही. त्याला सगळ्यांनी दूषणं दिली, पण तू त्याला कधी काही म्हणाली नाहीस. लोकं त्याच्याबद्दल काय नकोनको ते बोलत होती, पण तुझं मन फक्त त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतं आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे.. अगदी आजपर्यंत… मला काही हक्क नाही तुझ्या भावनांना लोकांसमोर आणायचा. पण.. पण त्यादिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू आणि एक विशिष्ट संताप बघितला आणि राहावलं नाही आणि ती कविता….. सॉरी !!” 😦

ती काहीचं बोलत नव्हती… खाली मान घालून हातातल्या रुमालाशी चुळबूळ करत होती… तो गप्प का झाला म्हणून तिने डोक वर काढलं, तर तिला फक्त त्याची डोळे पुसत जाणारी पाठमोरी आकृती दिसली.. ना तिने त्याला थांबवलं, नं त्याने मागे वळून बघितलं …

पूर्वप्रकाशित – दीपज्योती दिवाळी अंक २०११ (जालरंग प्रकाशन)

— सुझे !!

एका लग्नाची गोष्ट…

पिल्लू, दागिने, शालू सावरत बेडवर काहीशी अवघडून बसली होती. बाकी सगळीकडे निरव शांतता होती. तिच्या हालचालीमुळे वाजणाऱ्या बांगड्या, त्या शांततेचा भंग करत होती. ती खुप दमली होती दिवसभराच्या समारंभामुळे, पण तिला झोप येत नव्हती. ती स्वतःच्या विचारात गुंग झाली होती. गेल्या काही वर्षात घडलेल्या घडामोडी, आणि अचानक १५ दिवसात आलेल्या एका वेगवान वळणाने, तिचे आयुष्य पूर्णतः बदलून टाकले होते. तशी ती या बदलला खुप आधीपासून तयार होती, पण आज प्रत्यक्ष त्याला सामोरे जाताना तिला प्रचंड भीती वाटत होती. इतक्या वर्षांपासून असलेले तिच्या आई-बाबांचे स्वप्न आज साकार झाले होते. त्यांनी खुप थाटामाटाने आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न लावून दिले. आपल्या मुलीची जड अंत:करणाने, तिच्या सासरी पाठवणी केली होती. सगळं खुप खुप छान पार पाडलं होत. तिला किती तरी प्रसंगांना धीराने तोंड द्यावे लागले होत गेल्या काही दिवसात, ते सगळं-सगळं आठवत होत तिला.

आई-बाबांनी जेव्हा दिल्लीस्थित मंदार चे स्थळ पिल्लूला सुचवलं, तेव्हा त्यांना तिच्याकडून होकाराचीच अपेक्षा होती. कारण पिल्लूने खुप वेळ घेतला होता आधीच आणि आता त्यांना अजुन जास्त थांबता आलं नसतं. तिने ही जास्त आढेवेढे न घेता, दोन भेटीत होकार कळवला होता. दोघेही खुप खुप आनंदी झाले होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न होणार, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता आणि त्यांना आनंदी बघून पिल्लूला खुप समाधान वाटत होत. तिला काळजी होती ती फक्त त्याची. त्याला हे कसं सांगायचे, या विचारात तिने अख्खी रात्र जागून काढली आणि सकाळी त्याला मोठ्या धीराने फोन करून सांगितलं, की मला तुला भेटायचं आहे. त्यांनी बोलणे खुप कमी केल्यामुळे, अचानक पिल्लूला भेटता येणार या खुशीने तो धावतच त्यांच्या नेहमी भेटायच्या ठिकाणी निघाला. तो पोचायच्या आधीच, ती तिथे हजर होती. एका कोपऱ्यातील टेबलावर बसलेली होती. थोडीशी अस्वस्थ, नाराज, हरवलेली वाटत होती ती. हा तिच्यासमोर जाऊन बसला, आणि म्हणाला “काय झालं बाळा, तब्येत ठीक नाही आहे का? चेहरा का असा पडलाय? आज तुला तब्बल दीड महिन्यांनी बघतोय पिल्लू, किती बारीक झालीयेस…बोल ना गप्प का?” तिने मानेनेच नकार देत वेटरला ऑर्डर दिली, त्याच्यासाठी कॉफ्फी आणि तिच्यासाठी ज्यूस. त्याने तिला घरून आणलेला चिवड्याचा डब्बा दिला, तिला चिवडा खुप आवडायचा म्हणून, त्याने घरी न सांगता लपवून तो तिच्यासाठी आणला होता.

ती शांतच होती. एक मोठा सुस्कारा सोडून, तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली. “शोना, एक चांगली बातमी आहे.” तो काहीसा सावध झाला, त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मान खाली करून कॉफीकडे एकटक बघू लागला आणि चढत्या सुरात म्हणाला, “कधी ठरलं, कोण आहे मुलगा? इतकी घाई गरजेची होती का?” ती काहीशी बावरली, आणि त्याला सगळं सांगू लागली, पण तो प्रचंड चिडला होता. त्याला माहित होत हे होणार आहे, तरी त्याला राग आला होता आणि तो तडक उठायला निघाला तिथून. तिने हलकेच त्याचा हात धरला आणि म्हणाली, “सॉरी, पण हे होणारंच होत आणि तुला हे माहित होत नं शोन्या? मला तुझी साथ हवी आहे आयुष्यभरासाठी, पण एक मित्र म्हणून….” तिला पुढे काही बोलता येत नव्हते, त्याने तिचा हात धरून रिक्षात बसवलं आणि तिच्या ऑफिसपर्यंत सोडायला निघाला. वाटेत तो तिच्याशी काहीच नाही बोलला, काहीसा घुश्यातच होता. तिने त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण तो काही बोलला नाही. तिला ऑफिसच्या गेटवर सोडून, तिच्या पाठीवर एक धीराची थाप मारली आणि डोळ्यांच्या कडा पुसत तो मागे फिरला.

तिने त्याला भेटायचा, बोलायचा खुप प्रयत्न केला. पण तो खुप रागावला होता, खुप चीड चीड करत होता, सारखा तिच्याशी भांडत होता. तिला हे काहीसे अपेक्षित होते म्हणा, पण ती भांडणे इतकी वाढली की दोघांनी एकमेकांशी बोलणे कायमचे बंद केले. ती लग्नाच्या तयारीत गुंतून गेली आणि हा नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला. दोघांनाही राहवत नव्हते एकमेकांशी बोलल्याशिवाय, पण भांडणे टाळण्यासाठी मन मारत होते दोघेही. त्याने तिला साफ सांगितलं होत, की तिच्या लग्नाच्या एकाही कार्यक्रमाला तो जाणार नव्हता. ती पार कोलमडून गेली होती, त्याचे ते शब्द ऐकून. ती स्वतःला विचारायची की, हा असं का वागतोय. त्याला त्रास होतोय हे माहितेय, पण मला ही हे सगळं करणे कठीण आहे. तो मला का नाही समजून घेत आहे. तिला त्याचा खुप राग आला होता, पण मनोमन तिला वाटतं होत, राग उतरला की शांत होईल. तिचा थोडा भ्रमनिरास झाला जेव्हा तो साखरपुड्याला आला नाही, तिने त्याला फोनकरून जाब विचारला तर तो रागात म्हणाला मी तुला परत कधीच भेटणार नाही आणि फोन ठेवून दिला. ती तिकडे रडायला लागली आणि हा इथे. त्याला माहित होतं, की आपण चुकीचं वागतोय, पण तिच्यासमोर गेल्यावर स्वतःला सावरणे खुप कठीण आहे, हे ही त्याला माहित होते. म्हणूनच तो असा उद्धटपणे वागत होता. ती सुद्धा वर-वर राग दाखवून, सारखं त्याला लग्नाला यायची गळ घालत होती. पण तो काही ऐकेना, आणि शेवटी तिनेपण त्याला रागात सांगितलं नको येउस लग्नाला, आणि त्याला लग्नाची पत्रिका ही पाठवणार नाही असे सांगितले.

काही दिवस लग्नाच्या तयारीत सगळे मश्गुल झाले होते. होता होता लग्नाचा दिवस उजाडला. तिने आदल्यादिवशी रात्री २ वाजता, हळद झाल्यावर न राहवून त्याला लग्नाची पत्रिका पाठवली, आणि लिहिले नाही आलास तरी चालेल, पण तुला बोलावणे माझ कर्तव्य आहे. त्यामुळे तू न वाचताच, डिलीट करू शकतोस हा इमेल. ती लॅपटॉप तसाच सुरु ठेवून झोपली. लग्न दुपारचं असल्याने, सकाळी आरामात उठले तरी तिला चालणार होते. थकव्यामुळे तिला प्रचंड सुस्ती आली होती. ती सकाळी उठली तेव्हा इनबॉक्समध्ये एक अनरीड मेसेज होता, आणि तो त्याचाच होता.

त्याने लिहलं होत, “पिल्लू, सर्वप्रथम तुझे खुप खुप अभिनंदन. आज आयुष्याच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाला तू सामोरी जात आहेस. माझ्या तुला खुप खुप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद. मी तुला का भेटलो नाही किंवा तुझ्या लग्नाला का आलो नाही, याचं स्पष्टीकरण मागू नकोस प्लीज. मी नाही देऊ शकणार. तुला फक्त एक सांगायचं आहे, मंदारमध्ये कधी मला शोधू नकोस, नाही तर त्याला तू कधीच आपलंस करू शकणार नाहीस. काळजी घे. आणि पुनश्च अभिनंदन. सुखी रहा!!”

तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, का कोण जाणे आपण चूक करतो का असं वाटायला लागलं. तितक्यात आई आली आणि तिला लवकर लवकर तयारी करायला सांगून निघून गेली. तिने डोळे पुसले, हातावर काढलेल्या मेंदीच्या नक्षीकडे बघत स्वतःला समजवायला लागली, हेच होत नशिबात आणि आता मागे हटणे नाही आणि क्षणात तयारीत गुंग झाली. तिला हे सगळं लवकर संपवायचं होत.

लग्नघटिका समीप आली. ऊंची लग्नाचा शालू, दागिन्यांनी सजून ती लग्न मंडपात आली. एखाद्या राजकान्येसारखी दिसत होती ती. तिने सगळीकडे नजर फिरवली, तो आला नव्हता. तिला वाईट वाटलं, राग आला, पण शेवटी तो नाही आला हे बरंच झालं. कारण त्याला इथे तुटताना, कोसळताना बघून, तिला त्याला सावरायला जमलं नसतं. ती अग्निकुंडा समोर शांत बसली आणि हलकेच मंदारकडे बघितले. तो हसला, आणि मुंडावळ्या सावरू लागला. मंत्रघोषाने वातावरण भरून गेलं होत. एक एक विधि पार पडत होते. एकदम प्रसन्न वातावरण होत. त्याचं शुभमंगल सुंदररीत्या पार पडलं. आई-बाबांनी एकदम साश्रुनयनांनी पोरीचे कन्यादान केलं आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तिचे सगळे मित्र-नातेवाईक दूर दुरून आले होते, पण तो…तोच फक्त काय तो आला नव्हता…. 😦

इतक्यात थोडी कुजबुज होऊन दार बंद केल्याचा आवाज झाला, ती थोडी बावरली. अजुन जास्त अवघडून बसली. खुप सुंदर दिसत होती ती, मंदार तिच्या सौंदर्याकडे एकटक बघत राहिला होता. तो हलकेच तिच्या जवळ आला. तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, “काळजी नको करूस, तुला काय वाटत असेल, ते मी समजू शकतो. आपण एकमेकांना अजुन खुप वेळ देऊ. आपल्या दोघांना मिळून हा संसार सुखाचा करू. तुला मी सगळी सगळी सुख देण्याचा प्रयत्न करेन, मला फक्त तुझी साथ हवी आहे. खुप जपायचं आहे तुला, आनंदी बघायचं आहे तुला. माझी साथ देशील नं?”

तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली. का माहित पण, त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत होत नव्हती, पण एका क्षणात, आपल्या शरीरातील बळ एकवटून आणि मनातील घालमेल दूर सारून त्याला घट्ट मिठी मारत ती म्हणाली, “हो मंदार नक्की, नक्की साथ देईन तुझी, अगदी काही झालं तरी. मी वचन देते..”

– या आधीची स्वैरलिखाणे इथे वाचायला मिळतील.
– ही पोस्ट एका अनामिक ब्लॉग वाचकाला समर्पित, फक्त या वाचकाच्या आग्रहाखातर ही पोस्ट लिहायचं धाडस केलंय. धन्स !!

– सुझे 🙂

सई..

मंदार ऑफिसमध्ये मिटींगमध्ये खुप व्यस्त होता, त्याचं मन लागत नव्हत कशातच. तिला माहेरी जाऊन एक महिना झाला होता. आज कामाच्या गडबडीत त्याला तिला भेटता देखील आलं नाही की साधा फोन करता आला नाही. अचानक त्याचा फोन वाजला आणि तो ऑफिसमधून गडबडीत बाहेर पडला. गाडी सुरु केली आणि मंगलमूर्ती नर्सिंग होमच्या दिशेने सुसाट निघाला. पिल्लूला लेबर पेन सुरु झाले होते आणि पिल्लूच्या बाबांनी धावपळ करून तिला हॉस्पिटलला नेलं होत.

मंदार हॉस्पिटलला पोचला, पिल्लूला लेबर रूममध्ये नेलं होत. बाहेर तिचे आई-बाबा चिंताग्रस्त उभे होते. मंदार ने घरी फोन करून सांगितलं आणि त्याचे आई बाबा तडक निघाले हॉस्पिटलकडे. डॉक्टरांची धावपळ सुरु होती. नर्स आत-बाहेर करत होत्या. ह्याला खुप काळजी लागून राहिली होती. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी मंदारला आत बोलावलं पिल्लू जवळ. हा तिला धीर देत होता, तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. थोड्यावेळाने सगळ सुरळीत पार पडलं. एक पांढऱ्याशुभ्र टॉवेलमध्ये गुंडाळलेला, हात पाय मारत असलेला, जोर जोरात रडत असलेला एक छोटुसा जीव घेऊन डॉक्टर दोघांच्या पुढे आले. पिल्लू घामाने चिंब भिजलेली होती, पण चेहऱ्यावर एक समाधान होत आणि खुप आनंद पण.

डॉक्टर म्हणाले, “अभिनंदन मुलगी झालीय” मंदार ने पिल्लूच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि तिचा हात घट्ट धरून मनापासून आभार मानले. दोन वर्ष सुखाने संसार केल्यावर, त्यांनी बघितलेलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद दोघेही लपवू शकत नव्हते. मंदार बाहेर आला आणि त्याने सगळ्यांना ही गोड बातमी दिली. पिल्लूला दुसऱ्या वार्डमध्ये हलवणार होते काही मिनिटात.

तिथे प्रत्येक पलंगाशेजारी एक पाळणा ठेवला होता. पिल्लूला तिथे नेलं आणि सगळे तिच्याभोवती गोळा झाले. ती शांत पडून होती. मंदार शेजारीच बसला होता. सगळे त्या बाळाची वाट बघत होते. काही मिनिटांनी डॉक्टर तिथे त्या पिल्लूच्या छोट्याश्या बाळाला घेऊन आले. तिला पिल्लूच्या शेजारी ठेवलं. गुलाबी गुलाबी कांती, इवले इवले हात-पाय, चेहऱ्यावर एका नवीन अनोळखी जगात आल्याचे भाव. भिरभिरती नजर…पिल्लू लाडाने त्या बाळाकडे बघत होती.

सगळ्यांना खुप खुप आनंद झाला होता. सगळे मग बाहेर थांबले. पिल्लू हलकेच उठून बसली, मंदार ने काळजीपूर्वक ते बाळ तिच्या कुशीत ठेवलं. तिचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले, मंदारसुद्धा आपले अश्रू थांबवू शकत नव्हता. तिच्या शेजारी बसून तो दोघी मायलेकींना न्याहाळत बसला होता. ते बाळ पिल्लुकडे टकामका बघत होत. ती त्या बाळाच्या इवल्या हातात एक बोट देऊन खेळत होती, तोंडून आपसूक बोबडे बोल बाहेर पडत होते त्या बाळासाठी. खुप खुश होती ती.

मग तिला जाणीव झाली की समोर मंदार बसलाय. त्याला मांडी घालायला सांगून, हलकेच ते बाळ त्याच्या हाती देऊन म्हणाली, “बघ तुला मुलगी हवी होती ना. तुझ्या मनाप्रमाणे झालं आणि ती दिसतेय पण अगदी तुझ्यासारखीच” त्याने भरलेल्या डोळ्याने दोघींकडे बघितले आणि मनोमन देवाचे आभार मानले. तेव्हढ्यात ते बाळ रडू लागलं. त्याने तिला “अले अले..काय झाल बाळाला…” अस् म्हणून शांत करायचा प्रयत्न केला, पण तिने मोठ्ठ भोकाड पसरलं होत. त्याने पिल्लूकडे बघितलं. ती हसत होती आणि तिने हलकेच त्या जीवाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला शांत करू लागली.

कसली तरी आठवण झाल्याने, मंदार ने घाई घाईत मोबाईल काढला आणि एक नंबर फिरवला. पिल्लू त्याला इशाऱ्याने विचारात होती, काय झालं म्हणून. त्याने डोळे हलकेच मिटून शांत राहायला सांगितलं तिला. नंबर लागला आणि तो बोलू लागला.

“सई, आली… अभिनंदन.” आणि त्याने तो फोन सईच्या जवळ नेऊन तीच रडणं ऐकवलं. मग त्याने फोन कट केला आणि तिच्याशी खेळू लागला. पिल्लूने विचारलं “कोणाला फोन केला होतास. कोणाच अभिनंदन केलंस”?

मंदार म्हणाला, “तु रागावणार नसशील तरच सांगेन”
ती म्हणाली, “बोल ना, नाही रागवत..काय झालं?”

तो बोलू लागला, “हा फोन मी तुझ्या शोनाला केला होता, जेव्हा मला कळलं की तु हॉस्पिटलमध्ये आहेस, तेव्हाचं मी त्याला इथे बोलावून घेतलं होत. पण तो भेटणार नाही म्हणाला. तो तुझा एक भूतकाळ आहे आणि तुझ्या समोर तो यायला तयार नव्हता. तो म्हणाला मला की, बेबी झालं की मला तिचा एकदा आवाज ऐकव बस्स. मला तुमच्या दोघांबद्दल लग्नाच्या आधीच माहित होत. तोच मला भेटून सगळ सांगून गेला. त्याने मला तुझी काळजी घेण्याचे आणि मी त्याला भेटलोय हे तुला कळू न देण्याचे वचन मागितले. त्याची स्वप्न तो तुझ्या रुपात बघत जगत होता पिल्लू, इथेच तुझ्या आसपास. मला त्या क्षणी त्याचा आणि तुझा राग आला होता, पण त्याने मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तु तुझा भूतकाळ आपल्या संसारात आणणार नव्हतीस आणि तु त्यासाठी त्याच्याशी तुसडेपणाने वागलीस आणि त्याच्याशी भांडलीस. तो पण रागावला तुझ्यावर आणि परत कधी तुला भेटणार नाही म्हणून तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला, पण त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही तुझ्यावर असलेलं. त्याच्या डोळ्यात मला ते दिसायचं आणि तुझा खुप हेवा वाटायचा, पण त्याची इच्छा नव्हती की मी हे तुला कधी कळू द्याव.”

ती ओरडली अक्षरशः –  “काssssय? तु हे काय बोलतोयस मंदार. मला हे का नाही सांगितलं तु आधीच? मी त्याला साफ सांगितलं होत की एकदा माझ लग्न झालं की मी त्याची कोणी राहणार नाही आमच्या लग्नाला घरून विरोध होता आणि मी घरच्या लोकांच्या संमतीशिवाय काही करणार नव्हते आणि हे त्याचं देखील मत होत. माझा नवरा आणि त्याचे कुटुंब हेच माझ घर आणि त्यांची काळजी घेण हेच माझ कर्तव्य, अस त्याला मी ठाम बजावून सांगितलं होत. त्यामुळेचं तो माझ्या आयुष्यातून दूर निघून गेला होता आणि त्याला माझी मान्यता होती. मी त्याला पूर्णपणे विसरले नाही, पण माझ आयुष्य हे फक्त आपल्या कुटुंबापर्यंतचं मर्यादित आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहील. विश्वास ठेव मंदार !!”

मंदार : “अग हो, मी कुठे काय म्हणतोय… तु उगाच तसा काही विचार करू नकोस. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे ग. त्याचं एक स्वप्न तु पुर्ण करणार आहेस, म्हणून मी त्याला बोलावलं होत. तो खाली बागेतच बसून राहिला, वर यायला त्याने स्पष्ट नकार दिला. फक्त म्हणाला तिचा आवाज ऐकव मला. तुला बोलायचं आहे का त्याच्याशी”?

तिने मानेनेच हो म्हटले…मंदार ने फोन लावला आणि तिच्याकडे दिला. त्याने बाळाला उचलून आपल्याकडे घेतलं आणि खेळत राहिला. ती थोडी अवघडून उभी रहात खिडकीजवळ आली. तिची नजर बागेमध्ये त्याला शोधू लागली. तितक्यात बागेमधून बाहेर पडणारी एक पाठमोरी आकृती तिने लगेच ओळखली. तिने फोनवर “हॅल्लो” म्हटले…तिथून प्रतिसाद यायची वाट बघत ती त्या पाठमोरी आकृतीकडे बघत होती.

एक हलकेच दीर्घ श्वास घेऊन पलीकडून आवाज आला, “अभिनंदन पिल्लू. सईला अगदी लाडात वाढवं. तिला जास्त ओरडू नकोस, काळजी घे. तुझी आणि तिची. मंदारला सांगून ठेव, मी आता त्याला परत कधीच भेटणार नाही. मी इथून लांब जातोय कायमचा. सुखी रहा !!!”

एक दीर्घ कथा लिहायचे काही महिन्यांपूर्वी ठरवले होते. काही केल्याने जमत नव्हते, माझा कंटाळा आणि वाचकांना होणारा अतिदीर्घ कथेचा त्रास म्हणून हे आटोपशीर घेतोय. स्वैरलिखाणाच्या नावाखाली तीन लघु कथा लिहिल्या आणि हा त्या कथेचा शेवटचा भाग. अर्धवट वाटेल, पण प्रत्येक कथा सुरु होऊन तिथेच संपवायचा प्रयत्न केलाय जेणेकरून, त्या वेगवेगळया कथा वाटाव्यात. जमल्यास कधी मधले भाग टाकेन. बघुया पुढेचं पुढे 🙂

ह्या आधीचे भाग …

१. सुखी रहा

२. पहिली भेट – एक स्वैरलिखाण

३. ओढ नव्या जीवाची…

– सुझे 🙂