घरांचे ढिगारे…

एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र …कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे “मुंबईत स्वतःचे हक्काचे घर

मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही… ज्याप्रमाणे मुंबईचा विकास होत गेला, त्याप्रमाणे तेथे काम करणारा चाकरमानी दूरवर फेकला गेला. मुंबईचा पसारा अस्ताव्यस्त पसरला आणि त्यातूनच सुरु झाली जागेची बोंबाबोंब. अनेक बिल्डर्स ग्रुप्स, राजकारण्यांनी मोक्याच्या जागांवर वर्षानुवर्ष कब्जा करून ठेवला. जागांचे दर गगनाला भिडले आणि सामान्य माणसाला प्रत्यक्ष मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेले. मग जिथे परवडेल तिथे आपला संसार थाटून, तीच धावपळ नव्याने सुरु. लोकांची वस्ती वाढली आणि जिथे आवाक्यात घरं यायची, तीही परवडण्यासारखी उरली नाही. त्यातच रोज हजारो स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या लोकांचा भार मुंबई सोसते आहेच.

अश्या जमिनी बिल्डरांना, मालकांना खुणावू लागल्या नसत्या तर आश्चर्यच !! मोक्याच्या जुन्या जमिनीवर उभ्या असलेल्या २-३ मजल्यांच्या इमारती पाडून, तिथे २०-३० मजल्यांचे टोलेजंग कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. ह्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकांनी हात धुवून घेतले आणि अनेकांनी त्यांना विरोधही केला. २-३ मजल्यांच्या चाळीरुपी बिल्डींगमधून, टॉवरमध्ये राहायला जायला कोणाला आवडणार नाही? पण तिथे गेल्यावर वाढलेला खर्च खिशाला परवडणारा नव्हताच. मग अश्या लोकांनी आपली ती घरं विकून, अजून कुठेतरी लांब संसार थाटण्याची तयारी सुरु केली. ज्यांनी विरोध केला, अश्या लोकांच्या इमारतीचे पाण्याचे कनेक्शन तोडले गेले, वीज कापली गेली, इमारतीचा मेंटेनन्स बंद केला गेला… वर त्यांच्याकडून घराचे भाडं / मेंटेनन्स चार्जेस “वसूल” केले जायचे. आधीच त्या खूप जुन्या इमारती, त्यात काही मेंटेनन्स होत नसल्याने पार मेटाकुटीला आल्यागत अवस्था. अश्या हजारो इमारती आज मुंबई शहरात “थरथरत” उभ्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच इथल्या रहिवाश्यांना रहावे लागते. जेणेकरून आणखी एक वर्ष लोटता येईल.

गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री ठाकुर्ली (मातृछाया) आणि ऑगस्ट ३ तारखेला नौपाडा (कृष्णा निवास) येथे तीन मजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यात अनुक्रमे ९ आणि १२ रहिवाश्यांचा बळी गेला. आता हल्ली मुंबईकरांना इथे बॉम्ब फुटला किंवा तिथे बिल्डींग पडली, अश्या बातम्यांचीही सवय झालीच आहे म्हणा… असो मुंबईचे स्पिरीट जिंदाबाद… !!

तर ह्या दोन्ही इमारती  खूप जुन्या (४० हून जास्त वर्ष ) आणि इमारतीच्या मालकांच्या भांडणात अडकलेल्या होत्या. ह्यामधल्या मातृछाया इमारतीच्या दुर्घटनेची माहिती माझ्या मित्राकडून (प्रसन्न आपटे) मिळाली. प्रचंड पाउस सुरु असतानाच, मोठा आवाज होऊन १५-१८ संसार ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. प्रसन्नची इमारत मातृछायेच्या अगदी बाजूला लागुनच आहे. त्याला लगेच फोन केला असता, तिथला गोंधळ ऐकू येत होता. त्यालाही काय करावे सुचत नव्हते. लोकांची गर्दी, त्यात प्रचंड पाऊस. रस्ते इतके चिंचोळे, की अगदी अग्निशमन दलाची साधी गाडी ही पुढे जाऊ शकत नव्हती. कसे बसे NDRF वाले झाडे, भिंती तोडून आत पोचत होते. सगळे टीव्ही मिडिया पत्रकार बाईट्स, फोन, कॅमेरा घेऊन घडलेल्या घटनेची माहिती गोळा करण्यात गुंतले होते. बचाव दलाने शक्य तितके जीव वाचवले आणि आपले बचावकार्य संपवले. शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर अग्निशमन दल, पोलीसदेखील तेथून निघून गेले. आता मागे उरला तो फक्त एक ढिगारा !!

दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या आल्या, लोकं हळहळली असला प्रसंग कोणावरही ओढावू नये वगैरे, अश्या कमेंट्स सोशल नेटवर्कवर देऊ लागली… पण आता पुढे काय? जे वाचले त्यांचे पुनर्वसन? किमान काही मदत.. इतकी साधी अपेक्षा आपण माणुसकीच्यादृष्टीने ठेवूच शकतो ना? दुर्घटना झाल्यानंतर तीन दिवसांनी प्रसन्नकडे विचारपूस केल्यावर मला जे समजले ते फारच धक्कादायक होते. जी लोकं वाचली, त्यांची व्यवस्था एका महापालिकेच्या मराठी शाळेत एका हॉलमध्ये केली होती. तो हॉल त्यांना फक्त आठवड्याभरासाठी दिला होता, कारण तिथे ५ तारखेला एक लग्न होते आणि त्याआधी त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करावी असा आदेश पालिकेने दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होते ते वेगळेच. त्यात हॉल खाली करायची सक्ती. ठाकुर्लीमधील रहिवासी जमेल ती मदत त्या रहिवाश्यांना करत होती..त्यात काही कसूर पडू देत नव्हते…..परंतु सरकारी यंत्रणेकडून त्यांना काहीच ठोस मिळत नव्हते. प्रत्येकजण आपआपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकत होता.

त्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो. प्रसन्न आणि त्याची आई, त्या हॉलमध्ये पोहे आणि चहा घेऊन आले होते. तिथले चित्र पाहून पार अंगावर काटा आला. २५-२८ रहिवाशी मिळेल त्या अंथरूणावर झोपलेले होते. कोणी शेजारी-पाजारी किंवा हॉलच्या स्वच्छतागृहात अंघोळीसाठी, बाथरूमसाठी जात होते. हॉलच्या एका कोपऱ्यात कपड्यांचा प्रचंड मोठा ढिगारा पडला होता. त्यातूनच मिळेल ते कपडे रहिवाशी आलटून पालटून वापरत होते. दोन-तीन खोल्यांचा संसार एक-दोन प्लास्टिकच्या पिशवीपुरता उरला होता. स्थानिक नगरसेवक, राजकारणी लोकांनी दुर्घटनेनंतर त्या शाळेत जाऊन दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत देऊ केली होती. ज्यात १५ टॉवेल, १० टूथपेस्ट, १५ टूथब्रश, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आणि बिस्लरी पाणी होते आणि हो बदल्यात मदत केल्याचे फोटो काढून घेतले निर्लज्जपणे !!

तिथून आम्ही दुर्घटनेच्या ठिकाणी गेलो. तिथे साधं चिटपाखरूदेखील नव्हते. त्या रहिवाश्यांचा संसाराचा ढिगारा तसाच निपचित पडून होता. त्यांच्या मौल्यवान गोष्टी, आठवणी त्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. तेव्हा ना तिथे कोणी सुरक्षारक्षक ना कसला अटकाव. चोरांना, भंगारवाल्यांना मोकळे रान. कोणाला काहीच पडली नव्हती. ना राजकारण्यांना ना मिडीयाला. कोणीही तिथे फिरकले नव्हते दोन-तीन दिवस.

नंतर महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना (अशोक पानवलकरांना) हा सर्व प्रकार मी मेसेज करून कळवला आणि त्यांच्याकडून काही करता येईल का विचारणा केली. त्यांनी तत्परतेने दोन पत्रकार तिथे पाठवतो असे सांगितले. पत्रकार तिथे आले. त्यांनीं सर्व रहिवाश्यांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तिथे जाऊन अजून एक गोष्ट कळली, की पालिकेने ह्या इमारतीला ३-४ वर्षापूर्वी धोकादायक जाहीर केले होते आणि त्याची नोटीस इमारतीच्या मालकाला देण्यात आली होती. मालकाने सदर गोष्ट रहिवाश्यांपासून लपवून ठेवून, त्यांच्याकडून घरांची भाडी घेत राहिला. अगदी जून पर्यंतच्या पावत्या मी स्वतः बघितल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सच्या तन्मय टिल्लूला देखील त्याची एक प्रत देण्यात आली. पालिकेने दिलेल्या जेवणात झुरळे आणि तारा मिळाल्याने, त्यांनी ते जेवणही नाकारले आहे. आजूबाजूचे रहिवासी जे खायला देऊ शकतील त्यावरच त्याचा गुजारा सध्या सुरु आहे. त्याचवेळी तिथे कोणी राष्ट्रीय निवारा परिषदेचे सदस्य रहिवाश्यांच्या बाजूने उभे राहू.. गरज पडल्यास आंदोलन करू..उपोषण करू वगैरे घोषणा करू लागले. हे कुठून आले माहित नाही, पण त्यांची भविष्यातली राजकीय इच्छाशक्ती साफ दिसून येत होती. रहिवाश्यांना एक आशेचा किरण .. एक नेता (?) मिळाला आणि तुम्ही बोलू ते आम्ही करू असे सर्व बोलू लागले.

दुसऱ्या दिवशी (सोमवारी) मटाला बातमी आली.  मिडीयाचे प्रेशर आल्यानंतर तरी त्यांना त्या हॉलमध्ये राहू देण्याची माझी अपेक्षा फोल ठरली आणि बुधवारी हॉलवर लग्नकार्य असल्याने त्या २५-३० लोकांची व्यवस्था मंगळवारी तडकाफडकी पांडुरंगवाडी येथील नाईट शेल्टर्समध्ये करण्यात आली अगदी जबरदस्तीने. ह्या नाईट शेल्टर्सची अवस्था त्यांच्या इमारतीपेक्षा अधिक वाईट आहे आणि तिथे राहणे निव्वळ अशक्यप्राय आहे. तिथे हे रहिवासी राहत आहेत. ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. !!

ह्या सगळ्या प्रकियेला किती वर्षे.. दशके जाईल ह्याची कल्पना करवत नाही, पण हे सर्व सांगण्याचा मुद्दा एकच… अशी अवस्था कोणाचीही होऊ शकते. काही निवडक लोकांच्या राजकारणामुळे आज लाखो मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन अश्या घरात नाईलाजाने राहत आहेत. निव्वळ आपल्या घराची मालकी जाऊ नये म्हणून. उद्या पुढेमागे बिल्डींगचा मालक री-डेव्हलपमेंट करेल, नवीन बिल्डर आणेल. आपल्याला हक्काचे मजबूत घर मिळेल अशी एकच आशा…..तोवर घराचा ढिगारा न होता, जितके पावसाळे बघता येतील तितके बघावे अशी परिस्थिती !!!!

– सुझे !!

फोटो साभार – प्रसन्न आपटे

अखेरचा सलाम…

खरं तर हा लेख लिहायला घेतला, तेव्हा तुम्ही सुखरूप आहात आणि लवकर बरे होत आहात म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी….. पण 😦 😦

जेव्हा कोणी थोडे वयस्क मंडळी गावस्कर काय क्लास खेळायचा वगैरे चर्चा करायची, त्यात मला काडीचाही रस नसे. गावस्करला मी खेळताना बघितलं नाही. त्याने मारलेली शतके, गाजवलेले सामने मला कधी मनापासून आवडले नाही… का? कारण मी लहानपणापासून सचिनचा खेळ बघत आलोय… सचिनचा खेळ अगदी मनापासून अनुभवत मोठा झालोय आणि त्याच्या मारलेल्या एक एका फटक्यावर उत्स्फूर्तपणे दाद देत आलोय. गावस्कर आणि तेंडूलकरबद्दल माझी वैचारिक तुलना, मी घेतलेला अनुभव ह्या एकाच मापकाने केली. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात इतका आदर असण्याचे कारण….. त्यांचा थोडाफार अनुभवलेला राजकीय प्रवास. बस्स्स !!

राजकीय घडामोडी घडत राहतात. आपण लोकल, बस, ऑफिस आणि घर इथे चर्चा करत बसतो…पण काही माणसे ह्या विचारांच्या पुढे जाऊन राजकीय परिस्थिती बदलायचे प्रयत्न करतात. एक साधा कार्टूनिस्ट, एका पक्षाची स्थापना करून हिंदूहृदयसम्राट म्हणून मराठी मनावर अभिराज्य करेल हे कोणी स्वप्नात पण सांगू शकलं नसतं, पण बाळासाहेबांनी आपल्या जिद्दीने ते करून दाखवलं. हिंदुत्ववादी विचार आणि मराठी माणसाच्या मदतीला सदैव उभा राहणारा… त्यांच्या पाठीशी राहणारा एक पक्ष त्यांनी तयार केला.. शिवसेना. आज शिवसेनेची हालत काहीही असो, एक मुंबईकर ह्या नात्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आदर तसूभरही कमी झाला नाही. त्यांचा वरदहस्तामुळेच अनेक राजकारणी नेते पुढे आले आणि त्यांना एकटे सोडून गेले, पण बाळासाहेबांनी कधीही माघार घेतली नाही, आपले विचार बदलले नाही, भले कोणाला काही वाटो. त्यांची एक हाक म्हणजे मराठी मनाला मनापासून घातलेली साद असे समीकरण ठरे आणि ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत बदलले नाही. मी शिवसैनिक किंवा मनसे कार्यकर्ता नाही…. मी एक साधा सरळ मध्यमवर्गीय तरुण, जो नोकरी आणि घर ह्याच विश्वात रमणारा. त्यामुळे पूर्णवेळ राजकारणात कधी इतका रस नव्हताच, पण बाळासाहेबांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदरस्थान नेहमी मनात राहिले.

१९९२-९३ ला झालेल्या दंगली कुठलाही मुंबईकर विसरू शकत नाही. त्यावेळी कांदिवली डहाणूकरवाडीमध्ये एका चाळीत राहायचो. वय वर्ष ८. त्यावेळी पोलिसांचा कर्फ्यू वगैरे रोज चालायचं. संध्याकाळ झाली की लोकं बाहेर पडायची आणि मग खरेदी करून घरात गुडूप व्हायची. त्यादिवशी टिव्हीवर चलती का नाम गाडी हा सिनेमा एकाच दिवशी २-३ वेळा दाखवला होता आणि मी तो गाण्यांच्या तालावर नाचत बघितला ही होता. पोलिसांच्या कर्फ्यूनंतर जी लोकं आमच्या भागाची सुरक्षा सांभाळायची, ती शिवसेनेची मंडळी होती. कपाळावर भगवा टिळा, वाढलेली दाढी, दोन-तीन जीप आणि गाडीवर भगवा ज्याला सोनेरी किनार… असा ताफा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन थांबत असे. आता साहजिकच मला माहित नव्हते ही मंडळी कोण? इथे रात्रभर काय करतात? तो विषय तिथेच संपला. मग १९९५ ला पुन्हा तोच भगवा अनुभव पुन्हा आला, पण तेव्हा त्यांची तोंडओळख होती की हे शिवसेना नामकपक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यादिवशी शाळेला कुठलं तरी स्पर्धा परीक्षेत बक्षीस मिळाले होते. आम्हाला पिटीच्या महाजन सरांनी सांगितले की, शाळा सुटायच्या आधी ते मोठ्याने शिटी मारतील. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करायचा…. पण त्यादिवशी अचानक शाळा लवकर सोडायची ठरले. प्रत्येक वर्गात असलेल्या स्पीकरवरून काही तरी माहिती देत होते, पण आमच्या गोंगाटात ते ऐकू आलेच नाही आणि तेवढ्यात शिटी वाजली आणि आम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो आवाज ऐकून महाजन सर धावत वर आले. एक दोन पोरांना धपाटा घालत म्हणाले…,”अरे नालायक पोरांनो, शिवसेनेच्या मीनाताई ठाकरे गेल्या आणि शिटी मारल्यावर दोन मिनिटांचे मौन पाळायचे होते.” स्पीकरमध्ये झालेल्या बिघाडाने आम्हाला ती बातमी कळली नव्हती… पण आम्ही त्या प्रसंगाने पार हेलावून गेलो. 😦

शिवसेनेचे मुखपत्र सामना वाचत वाचत मोठा झालो. बाबांना तो पेपर खूप आवडतो. त्यात बाळासाहेबांचे अग्रलेख, त्यांची परखड मतं, लोकांना त्यांच्याबद्दल वाटणारी आत्मीयता, शिवसैनिक म्हणून मानाने मिरवणारी ती लोकं बघितली, की कौतुक वाटायचे. मराठी माणूस म्हणून आपले वाटायचे. पार्कात होणाऱ्या सभेत त्यांचे होणारे परखड भाषण. पार दिल्ली वाल्यांची फाडून टाकणारी डरकाळी. त्यांच्या भाषणात सगळ्या विरोधकांचा उद्धार, तो पण खास ठाकरी भाषेत. तेव्हा पासून जिथे जिथे त्यांची बातमी, फोटो असायचे ती आवर्जून वाचून काढायचो. बाळासाहेबांचा अभिमान वाटायचा. एक मराठी माणूस म्हणून जास्तच. त्यात ते उत्तम व्यंगचित्रकार. त्यामुळे चित्रातून राजकीय टिका करत असे, ते पण सगळ्यांना हसवत हसवत. त्यामुळे ज्यांच्यावर ती टिका असे, तोही एक क्षणभर हसून ह्या कलाकारीला दाद देत असे.

१९९५ मध्ये जेव्हा विधानसभेवर भगवा फडकला, तेव्हा सेनेचा जोर लक्षणीय होता. मुंबई उपनगरात भगव्याची लाट आली होती. शिवसेना सत्तेवर आल्यावर बाळासाहेबांनी लोकांना एक सुखद आणि हवेहवेसे सरकार दिले. वाघाने मुंबई आपल्या अधिपत्याखाली घेतली. मातोश्री (कलानगर – वांद्रे) येथून नुसत्या महाराष्ट्राच्या नव्हे, तर भारत सरकारच्या नाड्या आवळल्या… त्यालाच राजकारणी रिमोट कंट्रोल असे म्हणायचे. पण नंतर सरकार पालटले… नवीन सरकार आल्या आल्या बाळासाहेबांच्या अटकेचं वॉरंट निघाले. तेव्हा मी साठ्येला होतो. सगळीकडे धावपळ सुरु होती. कॉलेज पूर्ण रिकामी केले गेले, मला कळेनाच काय चाललंय. तेव्हा पानसे सर म्हणाले बाळासाहेबांना पोलिसांनी पकडलं. त्यांच्या आवाजातली अस्वस्थता आणि कळकळ जाणवत होती. मग दोन दिवसांनी भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून फॉर्म भरला आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनं होऊ लागली, पण मी हळूहळू त्यातून बाहेर पडलो…..इतकं होऊनही बाळासाहेबांचे आकर्षण नेहमीच राहिले. त्यांचे रोखठोक विचार पटू लागले, किंबहुना अश्या विचारांची देशाला गरज आहे याची शाश्वती झाली. त्यांचे भाषण कधी चुकवायचे नाही. सभेला नाही गेलो तर निदान टिव्हीसमोर बसून त्यांचे ते भाषण ऐकायला कान आसुसले असायचे. पहिल्यांदा कुठल्या राजकीय नेत्यामुळे मी भारावून गेलो असेन.

हा इतका मोठा प्रवास घडताना-बघताना बाळासाहेब वृद्धत्वाकडे झुकत आहेत, ह्याची जाणीव झाली नाही असे नाही… पण मनापासून वाटायचे हा माणूस तिथे पण खंबीरपणे ठाम उभा राहील आणि सांगेल “येत नाही जा… !!”

सत्तरीच्या दशकातले बाळासाहेब …

पाडव्याच्या दिवशी रात्री साधारण १० वाजता मित्राचा मेसेज आला की साहेब गेले….. म्हटलं काही पण सांगू नकोस. तो म्हणाला टिव्ही बघ तेव्हा आज तक, इंडिया टिव्हीवर ब्रेकिंग न्यूज होती की, “बालासाहेब ठाकरे की हालत गंभीर” मग एका मागून एक बातम्यांचा सपाटा लागला. मी माझ्यापरीने बातम्या काढायचा प्रयत्न केला, पण कुठेच काही कळेना. जवळचे मित्रही बोलू लागले ते गेले, आतल्या सोर्समधून बातमी काढलीय. आज सांगणार नाही, दिवाळी आहे. फेसबुक, ट्विटरवर श्रद्धांजलीचा पाऊस सुरु झाला. मी काही मित्रांशी भांडलो. म्हटलं काय त्रास देताय त्या माणसाला. त्याला हे कळलं तर काय वाटेल की, लोकं जिवंतपणी त्याला श्रद्धांजली देत आहेत. माझं तर ह्या प्रकाराने डोकं सटकलं. लोकांना सुट्टीचे डोहाळे लागले, मुंबई बंद होणार, भाऊबीज होणार की नाही … काही निर्लज्ज लोकांनी दारूचा स्टॉक करा असे आवाहन केले. मी त्या सगळ्यांशी भांडू लागलो. मला रडायला येत होते, की चुकून ही बातमी खरी निघाली तर…?

मला काहीच सुचत नव्हते… तेव्हा प्रसादने बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो, असं लिहून कोणीतरी आपल्यासारखा विचार करतोय म्हणून दाखवून दिले. जीवात जीव आला. बाळासाहेबंसाठी प्रार्थना करू लागलो. दुसऱ्या दिवशी कलानगरात जाऊन सुभाष देसाईंना भेटलो,. फार छान वाटले की, आता बाळासाहेब लवकर बरे होतील. मातोश्री बाहेर तिष्ठत उभ्या असणाऱ्या लोकांप्रमाणे, मी ज्या सुखद वार्तेची वाट बघत होतो ती घेऊन माघारी आलो. वाटायचे लवकरच ते मातोश्रीच्या खिडकीत येतील. भगवा सदरा, कपाळावर टिळा आणि हातात रुद्राक्षाची माळ आणि ते हात उंचावून सर्वांना आशीर्वाद देतील…..!!

पण….. आज जेव्हा ही बातमी कळली तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता. मी तडक सेनाभवनाकडे निघालो…रस्त्यावरची दुकानं बंद होऊ लागली. लोकं पटापटा परतीच्या प्रवासाला लागले. जसा जसा सेनाभवनाच्याजवळ आलो, तशी लोकांची गर्दी दिसू लागली. सूचना फलक लिहायचे काम सुरु होते. एक शिवसैनिक अश्रू आवरत खडूने तो फलक लिहित होता. त्याने लिहिलेल्या एका-एका अक्षराने लोकांचा बांध फुटत होता. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सगळे अधूनमधून सेनाभवनाकडे बघू लागले. आज ते फारच ओकेबोके दिसत होते. बाळासाहेबांचा फोटो आणि जय महाराष्ट्र हे शब्द धूसर दिसू लागले. लोकं उत्स्फूर्तपणे तिथे येऊन शांतपणे उभी राहत होती. साऱ्या मराठी जनतेचा विठ्ठल, आज परतीच्या प्रवासाला निघाला याचा विश्वास बसत नव्हता…. पण ते आज गेले. ज्या शिवतीर्थावर ठाकरी तोफ धडाडायची, तिथे त्यांच्या अंत्यदर्शनाची तयारी सुरु झाली 😦 😦

दिल्लीचा आदेश मुंबईने कधी मानला नाही…मुंबई थांबली ते फक्त मातोश्रीच्या आदेशाने… मुंबईच्या तक्रारी निवारण करण्यासाठी विधानसभेहून जास्त गर्दी मातोश्रीवर होते हेच सिद्ध करते. बाळासाहेबांच्या एका बोटावर मुंबई चालायची. त्यांनी हातात गुंडाळलेल्या रुद्राक्षाच्या माळेचा महिमा कोणाला सांगायची गरज नाही. ह्याच हाताने मराठी अस्मितेवर हल्ला करणाऱ्या लोकांवर शिवधनुष्य उगारले, त्याच हाताने मायेने लाडाने पाठीवरून हातदेखील फिरवला. त्यांच्या जाण्याने ज्या लोकांना भीती वाटली, ते इथे आलेले भिकारी. ज्या लोकांनी बाळासाहेबांचे कार्य बघितले, त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबून गेलेत.

सेनाभवन सायंकाळी ५ वाजता…

बाळासाहेब माझ्यासाठी कोण होते… काय वाटतं मला त्यांच्याबद्दल मला नाही लिहिता येणार…. सेनाभवनासमोर सूचना फलकावर लिहिलेली ही कविताच खूप काही सांगून जाते….

बाळासाहेबांना वंदना…

बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली….!!

– सुझे !!

शिवस्मारक – मुंबई

२००२ साली लोकसभा निवडणुका आधी कोंग्रेस सरकारने शिवाजी महाराजांचे अतिभव्य स्मारक मरीन लाईन्स इथे अरबी समुद्रात बांधायचे, असं पिल्लू सोडलं. शिवाजी महाराजांबद्दल असलेली आत्मीयता, ह्या स्मारकाच्या माध्यमाने जगभर पोचवायची होती. त्याच साली ह्या स्मारकासाठी ३५० कोटींचं बजेट मंजूर झालं देखील होतं (२०१२ चा आकडा नक्कीच हजार कोटींवर असेल, महागाई वाढलीय नं). मरीन लाईन्सला समुद्रात एक किलोमीटर आत समुद्रात भरती टाकून, हे स्मारक बांधायचे नक्की झाले. शिव “स्मारक” प्रेमी आनंदून गेले. सरकारचा उदोउदो झाला आणि त्यानंतर ते सत्तेत आले. मग पुन्हा २००९ मध्ये विधानसभा निवडणुका व्हायच्या बरोबर अगोदर, त्यांनी एकदम धुमधडाक्यात स्मारकाचा आराखडा मंजूर केला आणि व्हायचं तेच झालं. सरकार पुन्हा सत्तेत आलं. चांगली साडेतीन वर्ष सत्ता भोगून झाली, आदर्श घोटाळे करून भागले. जिथे पैसा तिथे “आपला” माणूस आदर्शपणे (हा शब्द आहे की नाही माहित नाही, असावा बहुतेक) पेरावा, हे काँग्रेसी डावपेच कोणाला माहित नाही? (संदर्भ मुंबई क्रिकेट असो.)

असो, आता पुन्हा हा स्मारकाचा विषय ऐरणीवर आलाय. तीन दिवसांपूर्वी दादा पवारांनी सांगितलं, की मरीन लाईन्सला स्मारक बांधायचं तूर्तास रद्द झालंय. त्याला पर्यावरण समितीची परवानगी, मुंबईच्या सुरक्षेची कारणे दिली गेली. वर त्यांनी हेही सांगितलं, की वरळी भागात जागेचा पर्यायी जागेचा शोध सुरु आहे. त्या दिवसभरात शिव “स्मारक प्रेमींनी” प्रचंड गोंधळ घातला, मग संध्याकाळी मुखमंत्री (अरेरेरे स्वारी टायपो झाला) मुख्यमंत्री ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, कोणी परवानगी नाकारली नाही आणि आम्ही स्मारक बांधणार म्हणजे बांधणार. आम्ही केंद्र सरकारकडे याचा नक्की पाठपुरावा करून, लवकरात लवकरात परवानगी मिळवून घेऊ. मिडियाने कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नाही, ही ब्रेकिंग न्यूज दिली. त्यावर मान्यवरांचे विचार ऐकवले, आणि स्मारकामुळे महाराजांचा आपल्याला किती अभिमान वाटतो हे आपण जगाला दाखवून देऊ, हे कळकळीने सांगितले. (डोळे पाणावल्याचा स्मायली)

शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, आरमार, सह्याद्री, महाराजांची दूरदृष्टी, त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि आपल्याला त्यांच्याबद्दल असलेला अभिमान, ह्या गोष्टी पुन्हा नव्याने सांगायला नकोत. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेलं हे किल्ल्यांच वैभव आपण नशीबवान आहोत म्हणून अनुभवायला तरी मिळतंय. महाराजांनी बघितलेलं आरमाराचे स्वप्न आणि त्यासाठी केलेली अफाट परिश्रम, म्हणूनच आपल्याला हे भव्य जलदुर्ग दिमाखात समुद्रात उभे दिसतायत. ह्या किल्ल्यांच्या तटबंदीवर, तो महाकाय समुद्र डोकं आपटून हतबलपणे मागे फिरतो. त्या सह्याद्रीच्या कुशीत उन-वारा-पाऊस ह्याची तमा न बाळगता उभे असलेले ते बुरुज बघून, कोणाची छाती अभिमानाने न फुगली तर नवलचं.

आता थोडं अवांतर २००७ साली रायगडावर फिरताना, एक पन्नाशीच्या आसपास दिसणारा माणूस किल्ल्याबद्दल, तिथल्या लोकांना काही माहिती देत होता. मी पण ती माहिती ऐकत उभा होतो, आणि त्यांची माहिती सांगून झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारले तुम्ही गाईड आहात काय? तर ते नुसते हसले आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाने त्यांची ओळख करून दिली, हे निनादराव बेडेकर. हे मोठे इतिहास तज्ञ आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही २०-३० मिनिटे थांबलो आणि ते एकदम भरभरून बोलत होते. बोलताबोलता त्यांना आम्ही किल्ल्यांच्या ह्या वाईट अवस्थेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “अरे राजा, गेली १५ वर्ष मी आपल्या सरकारकडे किल्ले पुन:बांधणीचा प्रस्ताव घेऊन फिरतोय आणि त्याला केराची टोपलीशिवाय अजून काही मिळालं नाही. मी पाठपुरावा करणे सोडणार नाही, पण ह्या लोकांची कातडी गेंड्याची आहे. मी त्यांना त्यांचा फायदा कसा होईल हे देखील समजावून सांगितले, पण काही नाही. त्यांना हा इतिहास पुसून टाकायचा आहे” आणि ते परतीच्या वाटेला निघाले. २०११ साठ्ये कॉलेजमध्ये निनादराव पुन्हा भेटले, आणि मला बघताच म्हणाले, ” आपण रायगडावर भेटलो होतो. मस्त गप्पा मारल्या होत्या आणि आता त्या प्रस्तावाचे, माझे आणि रायगडाचे वय चार वर्षांनी वाढलेय, बाकी प्रगती शून्य आहे” हे ऐकून काळजात खोलवर धस्स झाले. त्यानंतर ते पुन्हा एकदा तिथेच जनसेवा समितीच्या कार्यक्रमात भेटले होते, आणि त्यावेळी त्यांनी महाराजांचे दुर्ग आणि त्यांची बांधणी ह्यावर अभ्यासवर्ग घेतला होता. त्यावेळी त्यांनी युरोपातील जुन्या किल्ल्यांचे वैभव, कसे टिकवले आहेत हे कळकळीने सांगत होते. हाच प्रस्ताव त्यांनी आपल्या सरकारकडे दिला होता. तुम्ही किल्ले वाचवा, परत होते तसे बांधून काढा, आम्ही तुम्हाला सगळी माहिती देतो कुठे काय होतं आणि तुम्ही किल्ले बघायाला येणाऱ्या लोकांकडून प्रवेशासाठी पैसे घ्या.

शिवाजी महाराजांबद्दल असलेली आपुलकी दाखवणे म्हणजे, त्यांचे जागोजागी पुतळे उभारायचे, त्यांच्या दोन-दोन जयंत्या साजऱ्या करायच्या, त्यांच्या नावे टपाल तिकीट काढायचं, किंवा त्याचे लॉकेट-अंगठ्या घालणे होत नाही. आपल्या सरकारला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्याहून उंच पुतळा बांधून, अमेरिकेपुढे जायचं आहे हे पाहून गंमतच वाटली. चला बांधा तुम्ही स्मारक, मी नक्की भेट देईन, अगदी पहिल्याचं दिवशी. महाराजांच्या अतिभव्य स्मारकासमोर उभं राहण्यात मीसुद्धा धन्यता मानेन. पण त्या स्मारकासाठी भर समुद्रात मोठ्ठं मानवनिर्मित बेट तयार करणे (त्यासाठी लाखो टन ब्राँझ आणि १५०-२०० एकर भराव घालणे), मोठाले निधी उभारणे, निसर्गाला आव्हान देणे, सुरक्षितता (स्मारकाची आणि अनायसे मुंबईची) आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं राजकारण करणे हे कधी थांबणार?

काल सेनापतींनी (रोहन चौधरी) ठरवल्याप्रमाणे खांदेरी-उंदेरी हे दोन्ही सागरी किल्ले बघून आलो. समुद्रात खोल पाण्यात दोन नैसर्गिक बेटांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेले हे दोन किल्ले. उंदेरी किल्ला सिद्दीने बांधला, आणि खांदेरी महाराजांच्या काळात बांधायला घेतला गेला. मुंबई बंदराच्या सुरक्षतेच्यादृष्टीने हे दोन्ही किल्ले बांधण्यात आले. दोन्ही किल्ले एकदम खस्ता हाल आहेत. उंदेरी तर पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि खांदेरीवर वेताळदेव मंदिर आणि कान्होजी आंग्रे लाईट हाउस असल्यामुळे लोकांची वर्दळ आहे. उंदेरीच्या तटबंदी खूप ढासळल्या आहेत. गडावर १६ तोफा आहेत, ज्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत. काही तोफा समुद्रात पडलेल्या (फेकलेल्या) आहेत.

जलदुर्ग - उंदेरी
जलदुर्ग - खांदेरी

तटबंदीचे महाकाय दगड समुद्रात वाळूत रुतून पडले आहेत. त्यातल्या एका दगडावर शांत बसून होतो. वाईट वाटतं होतं. ह्या दोन किल्ल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे, निखळलेल्या दगडाचे सांत्वन मी तरी काय करणार आणि अश्या किती दगडांचे पर्यायाने किल्ल्यांचे सांत्वन मी करणार. आपलं नशीब की, आपल्याला ह्या तुटलेल्या तटबंदी का होईना बघायला मिळाल्या. तो इतिहास थोडाफार अनुभवता आला, पण… पुढे? 😦

जर अश्या बेटावर पर्यायाने किल्ल्यावर शिवस्मारक झाले, तर किल्ला पण सुरक्षित राहिलं आणि स्मारकाचे स्मारक देखील होऊन जाईल. मुंबई गेट वेपासून, फक्त ४०-४५ मिनिटे बोटीचा प्रवास बस्स…

पण हे होईल का? 😦 😦

– सुझे !!

(दोन्ही फोटो साभार रोहन चौधरी)