वेरूळची लेणी..

एखाद्या लांबच्या ठिकाणी भटकंतीला जायचं, म्हणजे खूप आधीपासूनच तयारीला सुरुवात करावी लागते. गाड्यांचे वेळापत्रक बघणे, तिथे राहण्याची सोय आहे की नाही, असेल तर ते परवडणार की नाही. त्या ठिकाणी अजून काय काय बघता येईल, याची इत्यंभूत माहिती काढणे.. इत्यादी इत्यादी सोपस्कार पार पाडणे ओघाने आलंच. बरं इतकी तयारी करूनसुद्धा सगळं नीट जुळून आलं नाही, तर सगळ्या तयारीचा बट्ट्याबोळ. 🙂

सेनापतींच्या बड्डे पार्टीमध्ये अनघाने हंपी आणि बदामी बघायला जाऊया, असा किडा सोडला आणि लगोलग ५-६ जण तयार सुद्धा झाले. मला इतक्या कमी कालावधीत तीन दिवसांची सुट्टी मिळणे निव्वळ अशक्य. मी नंतर सांगतो म्हणून वेळ मारून नेली. मग त्यांचे प्लान्निंग सुरु झाले, मला ईमेल अपडेट्स येत होतेच. म्हटलं जाऊ देत, हे आपल्या नशिबात नाहीत. ह्यावेळी ह्यांना जाऊ देत. मी नंतर कधी तरी जाईन, पण नंतरला अंतर असतेच. कर करता येईल म्हणून हापिसात बॉसला नवस बोललो. तो नवसाला पावला, पण एका अटीवर. आठवड्याचे कामाचे ४५ तास भरून देत, आणि मग हवं तिथे जा. मला एका दिवसाचे काम भरून काढायचे होते आणि बाकी दोन आठवड्याची हक्काची रजा. त्याप्रमाणे हापिस संपल्यावर ४-४ तास बसून सगळे तास पूर्ण करायचे ठरले.

इथे आमच्या प्लानचे पार बारा वाजले आणि ऐन मोक्याच्या वेळी हंपी आणि बदामी कटाप केले गेले. नेमका त्याचं दिवशी दोन दिवसांमधला एक दिवस ओव्हरटाईम करून आलो होतो. अजून एक दिवस केलं की झालं, ह्या विचारात मी अगदी आनंदात होतो. घरी येऊन हा ईमेल बघितला आणि म्हटलं आता काही करायला नको. ऑफिसमध्ये काम करून विकांत गपचूप घरी घालवायचा. आता गप्प बसतील ते राजीवकाका आणि अनघा कुठले. ज्यांना हंपी आणि बदामीला यायला जमणार होते, त्यांच्यासाठी नवीन प्लान तयार केला गेला…वेरूळ आणि देवगिरी !!

धावपळीत सगळी तयारी केली गेली आणि अगदी आयत्यावेळी दोन गाड्या बुक करून, औरंगाबादच्या दिशेने निघालो. राजीवकाकांनी वेरूळ येथे, वृंदावन ह्या छोटेखानी हॉटेलमध्ये दोन रुम्स बुक करून ठेवल्या. आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही पहाटे ३-४ ला पोचून, दोन-तीन तास झोप काढणार होतो, पण मुसळधार पावसाने दगा केला. निवांत प्रवास करत सकाळी ७ ला पोचलो आणि अंघोळी आटोपून ८:३० ला लेण्या बघायला बाहेर पडलो. खरे तर दोन किलोमीटर परिसरात पसरलेल्या लेण्या बघायला, दोन दिवसदेखील पुरे नाहीत….पण आता आम्हाला तेव्हढा वेळ देता येणार नव्हता. त्यामुळे काही मुख्य लेणी बघून, देवगिरीच्या दिशेने कूच करायची असे ठरले होते. 🙂

लेण्यांची पुढील माहिती विकिपीडियावरून साभार –

महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत, इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी, हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आले.

वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर (कैलास मंदिर – लेणे क्रमांक १६) जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा, एका अखंड खडक वापरण्यात आला असून. तो उघडपणे वरून खाली, म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आलाय आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली.

लेणी बघायला प्रचंड गर्दी असते, त्यामुळे विकांत सोडून तिथे जावे. लेणी बघून बाहेर पडल्यावर, रस्त्याच्या डाव्या बाजूला पाच-सहा दुकाने-हॉटेल्स सोडली तर एक तामिळ/तेलगु पाटी असलेलं हॉटेल आहे. दुरून बघितल्यार एक जुनाट गॅरेजसारखे वाटेल, पण तिथे साउथ इंडिअन पदार्थ अफलातून मिळतात. आयुष्यात आजवर खाल्लेला सगळ्यात बेस्ट सांभार इथे खाल्लाय. ते सगळे नाश्त्याचे पदार्थ आपण सांगितल्यावर बनवून देतात. उदारणार्थ पोहे, साबुदाणा खिचडी. मेदू वडा, उपमा इत्यादी. त्या अम्माच्या हाताच्या जेवणाची चव एकदा घ्याच, सुहासची आठवण काढाल 🙂 🙂

आता काही फोटो –

१. कैलास मंदिर

२.

३.

४.

५.

६.

७.

८. महाभारतातील प्रसंग…

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

– सुझे !!

(देवगिरीचा वृत्तांत आणि फटू लवकरचं… 🙂 )

अवचितगड….

अनायसे १५ ऑगस्टला गोऱ्या साहेबांच्या मेहरबानीमुळे सुट्टी मिळाली. ही आयती संधी सोडणार तरी कशी? मग ट्रेकचा प्लान सुरु झाला. आधीच्या रविवारी पालघर इथला, कोहोज आयत्यावेळी रद्द केला. त्याला कारण तोच गोरा साहेब. अमेरिकेतून हे बेणं आलं आणि फुलं उखडावी तशी काही म्यानेजर मंडळी आणि माझ्या काही मित्रांना अलगतपणे उखडून, त्यांना निरोपाचे नारळ दिले. डोक्याचा पार भुगा झाला होता. कोहोज करायचा कंटाळा आला होता. तिथे रेल्वे आणि इतर प्रवासाची शाश्वती नाही. मग दुसरा कुठला किल्ला करता येतो का बघू लागलो…. केंजळगड आणि रायरेश्वर करायचे मनात होतं, पण वेळेवर गाडी कुठे शोधणार आणि मिळालीच तर अव्वाच्यासव्वा दर लावणार. मग हो-नाही करत आदल्यारात्री सकाळी अवचितगड करतोय असे नक्की झाले. 🙂

भल्यापहाटे ४:०७ ची गाडी पकडून दादर मग कुर्ला आणि मग पनवेल असे पोचलो. पनवेलहून दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी पकडली. गाडी नेहमीप्रमाणे भारतीय वेळेनुसार अर्धा तास तास उशिरा आली. प्रचंड गर्दी होती. आता मला जाण्याचा कंटाळा आला होता, कसे तरी वाट बघत उभा होतो. एकदाची गाडी आली आणि धडपडत गाडीत चढलो. बसायला काही मिळणार नाही याची शास्वती असल्याने, आपला भर आणि भार दोन्ही पायावर राहणार, याची मानसिक तयारी केलेली होती. गाडीत उभं राहून पायाची पार वाट लागली. दोन दिवस झोप न झाल्याने मी जमेल तिथे, “डोळे मिटण्याचा” असफल प्रयत्न करत होतो…पण गाडीत भाजीवाले, चिक्कीवाले, वडेवाले आणि चहावाले दर दोन मिनिटांनी येऊन ओरडत होते. साधारण १०:१५ ला रोह्याला उतरलो आणि रिक्षा करून पिंगळसई गावी पोचलो.

गडावर बघण्यासारखे जास्त काही नाही. अवचितगड करण्याचे मुख्य कारण म्हणजे, जुलै महिन्यात झालेलं दुर्गसंवर्धन कार्य. ह्यावेळी पनवेल येथील दुर्गमित्र, ह्या सह्याद्रीप्रेमींनी एक अभूतपूर्व काम केले. १५० फुट खोल दरीत पडलेली २ टन वजनाची तोफ गडावर सुखरूप आणून ठेवली. रोह्याच्या निसर्गभ्रमण ह्या ग्रुपने ती तोफ आहे त्याच दरीत एका ठिकाणी, सुखरूप हलवून ठेवली होती. पण सह्याद्रीचे हे वैभव तिथे खितपत पडून राहू नये, आणि गडाला एकेकाळी मजबुती देणाऱ्या तोफेला गडावर आणणे गरजेचे होते. ते कार्य दुर्गमित्र संस्थेने हिमतीने करून दाखवले. ( बातमी )

गडाची वाट सोपी आहे. गडावर जाण्यास तीन मार्ग आहेत. सर्वप्रथम मुंबईहून कोकण रेल्वेने रोह्याला पोचावे आणि तिथून पिंगळसई गावापर्यंत २० रुपये दराने शेअर रिक्षा मिळते. गावात शिरताच एक गणपतीचे सुंदर मंदिर आहे, पण आम्ही गेलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. काही उत्सव किंवा पूजा असावी. जर गाडी घेऊन जात असाल तर पिंगळसई पर्यंत जाण्याची गरज नाही, रोह्याच्या आधी ६-७ किलोमीटर अंतरावर मेढा नावाचे गाव आहे. गावाची तंटामुक्ती गाव म्हणून मोठी कमान डाव्या बाजूला दिसते. तिथून शंकराच्या मंदिराकडे जावे. वाटेत एक मोठी पुष्करणीदेखील आहे. मंदिरासमोरून एक छोटं रेल्वेचे फाटक ओलांडून पुढे निघालो की थोड्या अंतरावर एक भलीमोठी विहीर आहे आणि तिथून उजव्या बाजूने जंगलातून वाट आहे. तिसरा मार्ग नागोठणे पासून पुढे रोह्याच्या दिशेने निघाल्यावर आहे. तिथे एक बंद कागद कारखाना आहे. कारखान्याच्या मागून गडावर जाण्यास मार्ग आहे. तिसऱ्या मार्गाबद्दल जास्त माहिती नव्हती. पिंगळसई मार्गाने गड माथ्यावर पोचायला किमान एक-दीड तास लागतो. माझं डोकं दोन दिवस जागरण झाल्याने गरगरत होतं, तरी आस्तेकदम करत गडावर पोचलो. 🙂 🙂

साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही, पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव येते. गडाचे स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते.

माझी तब्येत ठीक नसल्याने आधी फोटो काढत नव्हतो, मग दीपकने शाब्दिक सत्कार केल्यावर राहवले नाही 😉

हे घ्या काही फटू 🙂 🙂

१. गावात पोचताच ही स्वच्छ पाण्याची विहीर दिसली, आत डोकावून बघण्याशिवाय पर्याय नव्हता. दीपक साहेबांनी सुचवलेली पोज..

२.

३.

४. किल्ल्याचा महादरवाजा

५.

६. युध्दशिल्प..

७. कुंडलिका

८. न्हाण्याचा हौद

९. हेच ते वैभव जे दरीत पडलेलं होतं…

१०. पाण्याच्या टाक्या..एकूण ६ आहेत आणि सगळ्या टाक्या भरल्याशिवाय पाणी बाहेर पडत नाही अश्यारीतीने एकमेकांना जोडलेल्या आहेत. पिंगळसईच्या देवीची घुमटी असलेल्या पहिल्या टाक्यात थोडं जास्त पिण्यायोग्य पाणी आहे… बारा महिने पाणी उपलब्ध असते.

११.

12. प्रतिबिंब…

१३. महादेव मंदिर..

१४. कदाचित म्हसोबा..

१५. 🙂 🙂

१६. दक्षिणेकडे असलेल्या बुरुजावर असलेला शिलालेख – श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा

१७. मेढा गावाच्या दिशेने असलेल्या छोट्या बुरुजा आधी ही तोफ आहे. बाजूनेचं चोर दरवाजा आहे, जो पूर्णपणे बंद आहे..

१८. कोकण रेल्वे…

१९. भगव्यासोबत तिरंगा ..

२०.

२१. कुठल्या मार्गाने खाली उतरावे, ह्यावर झालेलं चर्चासत्र (मागे दरी आहेचं) 😉

२२. गडाचा नकाशा आणि सोबत सगळ्यांच्या सह्या..

२३. 🙂

गडाचे वैभव परत आणण्यासाठी केलेली मेहनत…. (साभार भूषण आसबे)

—————————————————————————————

– प्रचि 1,2,6,8,14,16 साभार अर्चना
– प्रचि २३ धुंडीराज
– प्रचि २२ आणि आयडियाची कल्पना दीपक परुळेकर (ब्लॉग – मनाचे बांधकाम)

– सुझे !! 🙂 🙂

रुबाबदार हरिश्चंद्रगड…

१७ जुलै हा दिवस माझ्यासाठी एकदम खास. आज विविध मराठी संस्थळावर लिहिणारा, मुक्त वावरणारा मी मुळात एक ब्लॉगर होतो, आहे आणि राहीन. ब्लॉग सुरु केल्यावर साधारण ८ महिन्यांनी पहिला मराठी ब्लॉगर मेळावा दादर, मुंबई येथे पार पडला. विविध ब्लॉगच्या नावा मागे दडलेले चेहरे सर्वप्रथम एकमेकांसमोर आले आणि आयुष्यात असंख्य जिवाभावाची माणसे जोडल्याचे समाधान मनोमन मिळाले. ह्याच वेळी मराठी ब्लॉगर्स आणि ट्रेकर्स असलेले, आम्ही काही तरुण मंडळी एकत्र आलो. सेनापतींच्या (“माबो”कर आणि “मीम”कर) सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पनेने मराठी ब्लॉगर्स ट्रेकचे आयोजन केले, आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून, ऐनवेळी बहुतेक जणांची गळती झाल्याने आम्ही मोजके ६ जण विसापूरला गेलो. तरीसुद्धा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. त्याचवेळी आम्ही ठरवले होते, की किमान हा ट्रेक तरी दरवर्षी करायचा. पुढल्यावर्षी त्याच तारखेची आठवण ठेवत, एक आठवणीतला ट्रेक नाणेघाट मारला. अत्यंत मुसळधार पावसात केलेला तो ट्रेक, कधीच विसरू शकत नाही. तसंही प्रत्येक ट्रेक, भटकंती आपल्याला काहीनाकाही नवीन शिकवून जातेच. सह्याद्री सारखा शिक्षक आपल्याला मिळणे हे मोठे भाग्याचं.

१.

२.

ह्यावर्षी १७ जुलै एकदम आठवड्याच्या मध्ये आल्याने, काय करावे असा संभ्रम होता. मग दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार-रविवारी काही जमतंय का असं बघु लागलो. मेलामेली सुरु झाली. पण राहून राहून एकच नाव समोर येत होते, कोकणकड्याचा रुबाब बाळगणारा हरिश्चंद्रगड. ह्या किल्ल्याने जवळपास चारवेळा चकवा दिला होता. आता हा करायचा म्हणून ठरले आणि ईमेल्स पाठवले. सुरुवातीला एकदम १४-१५ जण तयार झाले, आणि नेहमीप्रमाणे आदल्या दिवसापर्यंत मोजून ६ जण उरले. ह्यावेळी काही झालं तरी मी जाणार होतोच, एक हट्ट होता म्हणा हवं तर. मंडळी कमी झाल्याने खर्चाचा बोजा वाढू नये म्हणून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (आयला लई भारी वाटतंय वाचताना :D) वापरण्याचे ठरवले. आम्ही दादरहून इगतपुरी, मग तिथून राजूर आणि मग तिथून पाचनई हा मार्ग निवडला होता. पाचनईची वाट त्यामानाने सोपी आहे. परत येताना तोलार खिंडीतून येण्याचे ठरले.

ट्रेकला निघायच्या आधी दुपारी ट्रेनमध्ये जागा मिळतेय का, म्हणून आयआरसीटीसीला साकडे घातले आणि सायटीने नेहमीप्रमाणे असंबंध एरर देऊन माझा पाणउतारा केला. दीपकला फोन केला, तर त्याच्याकडे साईट ब्लॉक. मग शेवटी आनंदला फोन केला आणि सांगितले, की बघ तिकीट मिळतंय का ते. आमच्या सुदैवाने पाच जागा मिळाल्या आणि रात्री निदान तीन तास तरी पाठ टेकायला मिळेल म्हणून खुश झालो. वाराणसीला जाणारी, महानगरी एक्सप्रेसमध्ये जागा मिळाली. पावसाचे अजिबात लक्षण नव्हते. आम्ही घामाने पार बेजार झालो होतो. ट्रेनमध्ये चढताच, टिपिकल मुंबईकरांना पडणारे यक्षप्रश्न आणि त्यावर उत्तरे शोधली. सर्वप्रथम पायातले बूट बोगीतल्या पंख्यावर विराजमान झाले. आपापले बर्थ पकडून सगळे आडवे झालो आणि डोळे मिटले.

३.

इतक्यात ठाणे का कल्याण आलं आणि “ए बबूआ….ए तनिक इधर आ….सठीया गये क्या, इलाह्बाद को बहोत टाईम हैं !!!” वगैरे चर्चा कानी पडल्या किंवा फेकल्या म्हणूया आणि माझी १० मिनिटाची सुखद झोप पार तुटली ती अगदी शेवटपर्यंत. मग मी धैर्य एकवटून खाली उतरलो आणी एका खिडकीशेजारी जाऊन अवघडून बसलो. समोर असलेल्या भैय्याचे प्रश्न बाऊन्सर जात असल्याने दोनदा हो, एकदा नाही आणि मध्येमध्ये हसून वेळ मारायचे ठरवले. बाकी मंडळी निवांत झोपली होती, आणि मला ३ वाजता सगळ्यांना उठवायची जबाबदारी दिली होती, त्याचं टेन्शन ते वेगळंच. झोप येत होती, पण येऊ दिली नाही. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. मुंबईत अजिबात पाऊस नाही, ह्या विषयवार एक चर्चासत्र त्या भैयाबरोबर पार पडल्यावर एक स्टेशन आले. बघतो तर इगतपुरी…. सगळ्यांना चट-चट चापट्या मारून उठवले आणि बॅगा घेऊन खाली उतरलो. निवांत झोपेत मिठाचा खडा टाकल्याने, नेहमीच्या पठडीतल्या पाच-सहा-दहा शिव्या पडल्या हे वेगळे सांगणे न लगे 😀

तिथून गेलो जवळचं असलेल्या एसटीडेपोमध्ये, तिथे थोडा नाश्ता करून पहिल्या बसची वाट बघत बसलो.बघता बघता तिथे मुलांची गर्दी वाढली. २०-३० मिनिटात जवळपास १००-११० मुले तिथे आली. म्हटलं झालं कल्याण… काळजीपोटी सगळ्यांशी गप्पा मारत, ही लोकं कुठे जात आहेत त्याचा कानोसा घेतला. बहुतेक सगळे रतनगड (गटारीसाठी.. सोबत जेवणाचे टोप) आणि काही ५-६ जण कळसूबाईला निघाले होते. पाच वाजता पहिली एसटी आली आणि सगळेच त्यात घुसले. राजूर तिथून ४० किलोमीटर अंतरावर होते. आजवर केलेला सगळ्यात सुंदर एसटी प्रवास असं मी म्हणेन. रस्त्याच्या दुतर्फा शेती आणि मध्ये वळणावळणाचा चकचकीत डांबरी रस्ता. राजूरला पोचल्यावर तिथली मिसळ खाऊन अगदी तृप्त झालो आणि पाचनई बस उशिरा असल्याने ५०० रुपये देऊन एक गाडी केली. राजूरपासून पाचनई ३० किलोमीटर अंतर आहे. पाचनई गावातूनच समोर डोंगरांच्या कड्यांवरून कोसळणारे धबधबे आमचे स्वागत करायला तयार होते. गावात वाट विचारून सरळ गडाकडे निघालो आणि प्रचंड पाऊस सुरु झाला. गडाची वाट एकदम सोपी आहे, दीड-दोन तासात आपण गडावर पोचतो.

४.

५.

आता थोडं ह्या किल्ल्याविषयी, हरिश्चंद्र म्हटलं की आठवतो महाकाय कोकणकडा. हा किल्ला पुणे, नगर आणि ठाणे हे तिन्ही जिल्हे जिथे एकत्र मिळतात, त्यातल्या सर्वात उंचावर असलेल्या डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याचे बांधकाम साधारण पाचव्या-सहाव्या शतकातील आहे. गडावर पोचाताक्षणी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. नवव्या शतकातील हे मंदिर म्हणजे, मानवी कलाकृतीचा उत्तम नमुना. साधारण १६ मीटर उंची असलेले हे मंदिर, काळ्या कातळात असलेले ही मंदिर आपला श्रमपरिहार करते. गडावर अनेक भग्नावशेष पडून आहेत, त्यावरून जाणवते की तिथे खूप सारी मंदिरे आणि छोटेखानी महाल वगैरे होते. गावकऱ्यांच्यानुसार गडावर ५००-५५० शंकराच्या पिंड्या होत्या, त्या लोकांनी चोरून नेल्या आणि आता गडावर मोजून ३०-४० पिंड्या आहेत. लहान लहान मंदिरावर केलेली कलाकुसर निव्वळ अप्रतिम आहे. गणेश आणि महादेव ह्या दोन्ही देवांच्या अनेक लहान मोठ्या प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात. दानवरूपी असलेली काही शिल्पं ही गडावर आहेत. शंकराची खूप लहान-मोठी मंदिरे गडावर आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिरासमोर १४ कोनाडे असलेली, विष्णूतीर्थ नमक पुष्करणी आहे. मंदिराच्या बाजूला ओढ्याच्या रुपाने वाहणारी मंगळगंगा नदी आहे. तिच्या प्रवाहाला लागून उजव्या बाजूला केदारेश्वराचे लेणं लागतं. साधारण ५ फुट थंडगार पाण्यात असेलेले ते शिवलिंग बघू आपसूक हर हर महादेव अशी आरोळी निघाली.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

21.

22.

23.

24.

25.

पावसाचा जोर प्रचंड होता, त्यामुळे जास्त मज्जा घेता आली नाही. ज्या कोकणकड्यासाठी आम्ही आलो होतो, तो पार धुक्यात हरवून गेला होता. तरी तो सू…सू… हवा वर फेकत होता. काही यझ मंडळी दगड, नाणी खाली फेकून ते कसे वरती येतात ते बघा होते. त्यांची कीव आल्याखेरीज, मी अजून काही करू शकलो नाही. सांगून काही फायदा नव्हता. वाळीबा भारमल (याचे कुटुंब गडावर खाण्याची व्यवस्था बघतात), म्हणाला पावसात इथे किल्ला बघायला येऊ नये. काही दिसत नाही. ह्या पोरामुळेचं आम्हाला मुक्कामाला थांबायला गुहा मिळाली. गावाच्या पायथ्यावर हा मुलगा देवासारखा भेटला होता, त्याने सांगितलं तुमच्यासाठी एक गुहा ठेवतो आणि त्याने ते वचन पूर्ण केलं. बाकी अजून गड फिरायची इच्छा नव्हती. हा किल्ला प्रचंड मोठा आहे. गणेश गुहेपासून तारामती शिखर गाठायला तीन तास लागतात. गुहेपासून कोकणकडा अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. पावसाळा संपल्यावर, हा किल्ला विकांत सोडून कुठल्याही इतर दिवशी करायचा आहे.

आता खादाडी … 😉

२६. गडावर पोचल्यावर गरमागरम पिठलं-भाकरी..

२७. रात्री जेवणाला भात-वरण आणि बटाट्याची भाजी …

२८. दुसऱ्या दिवशी सकाळी कांदे पोहे 🙂 🙂

आता तुम्ही पावसात इथे जायचं म्हणत असाल तर जाऊ नका… पावसाळा संपल्यावर एक महिना जो असतो तेव्हा जा. तेव्हा तुम्हाला किल्ल्याशी बोलता/बघता येईल, तिथला इतिहास अनुभवता येईल, त्या तटबंदी तुमच्या मायेच्या स्पर्शाने सुखावून जातील, अजस्त्र कडे-कपारी तुम्हाला खंबीरपणाने कसे उभे राहायचे ते शिकवतील, त्या कोकणकड्याच्या मोठेपणाची जाणीव होईल, आपण निसर्गापुढे किती खुजे आहोत ते पटेल…. तेव्हा भेटूच परत….

(ह्या किल्ल्याचे वर्णन सांगणाऱ्या तत्वसार ग्रंथातील ह्या चार ओळी, किल्ल्याचे अपार महत्त्व सांगून जातात…)

हरिश्चंद्रनाम पर्वतु | तेथ महादेओ भक्तु
सुरसिद्धागणी विख्यातु | सेविजे जो ||
हरिश्चंद्र देवता | मंगळगंगा सरीता
सर्वतीर्थ पुरविते |सप्त स्थान ||

सुझे !! 🙂

(प्रचि क्रमांक ८, २३, २५ आनंद काळेकडून साभार… )