लढाई टेनिस कोर्टची..

दुसऱ्या महायुद्धात दिनांक १५ मार्च १९४४ रोजी ब्रम्हदेशातील चिंडविन नदीपासून “ऑपरेशन यू गो” ची सुरुवात झाली. जपानच्या 15 व्या आर्मीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याने ब्रिटीश भारतीय भूभागावर हल्ला करण्याची योजना बनवली होती. इंफाळ, कोहिमा, दिमापुरमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करून पुढे सैन्य कुमक वाढवत दिल्लीपर्यंत मजल मारण्याचे स्वप्न मुटागुची ह्यांनी बघितले होते. ह्या हल्ल्याला काही कोअर कमांडर्स ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता, कारण त्यात भारतातील भौगोलिक परिस्थितीचा फारच कमी अभ्यास केल्याचे निदर्शनात आले होते. त्यामुळे योजना सदोष होती आणि त्याचा फटका जपानी सैन्याला बसू नये याची त्यांना काळजी होती. इकडे मुटागुचीचा महत्त्वाकांक्षी स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. ज्यांनी ज्यांनी ह्या योजनेला विरोध केला, त्यांची जबरदस्ती बदली किंवा तात्पुरती मनधरणी करण्यात आली. तरीही म्हणावा तसा अभ्यास झाला नाही ही कुरकुर सुरूच राहिली, परंतु सरतेशेवटी तत्कालीन प्रधानमंत्री हिडेकी तोजो, ह्यांच्या संमतीने ह्या हल्ल्याला हिरवा कंदील दिला गेला. जनरल मुटागुची ह्यांनी ह्या सैनिकी हल्ल्याला “ऑपरेशन यू गो” असे नाव दिले.

कोहिमा ही भारतातील नागालँडची राजधानी.दिमापुर ओलांडल्यावर नागालँडचा निसर्गसंपन्न डोंगराळ प्रदेश सुरु होतो. दिमापूरच्या पुढे ४० किलोमीटर अंतरावर एका विस्तृत कडेपठारावर कोहिमा आणि त्याच्या दक्षिणेला ७० किलोमीटर अंतरावर मणिपूरची राजधानी इंफाळ. दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ लागलेली ही भारतातली दोनच शहरे. जपानचे हे आक्रमण मोडून काढण्यासाठी ब्रिटीश इंडियन १४ व्या आर्मीला ब्रम्हदेशातच जपानवर आक्रमण करून त्यांची पुढची वाटचाल रोखण्याचे आदेश देण्यात आले. ह्या १४ व्या आर्मीचे नेतृत्व होते लेफ्टनंट जनरल विलियम स्लिम ह्यांच्याकडे. १४ व्या आर्मीमध्ये ४ आणि ३३ अश्या दोन कोअर्स होत्या. सुरुवातीच्या काळात ४ कोअर इंफाळमध्ये आणि ३३ कोअर दिमापुर भागात होत्या. सतत दोन वर्ष युद्धभूमीवर असल्याने सर्वच तुकड्यांची शक्ती कमी झाली होती. ह्याउलट जपानने १५, ३३ आणि ३१ ह्या तीन इन्फंट्री डिव्हिजनचा वापर ह्या हल्ल्यात केला. संपूर्ण ब्रम्ह्देशावर कब्जा मिळवत त्या आगेकूच करू लागल्या. ३३ आणि १५ डिव्हिजन इंफाळमधल्या ४ कोअरला घेरण्यासाठी आणि ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमावर कब्जा करून, ब्रिटीश इंडियन आर्मीची रसदमार्ग तोडण्याच्या उद्देशाने निघाल्या.

 

 

लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची  यांच्या योजनेनुसार कोहिमावर लगेच ताबा मिळवून इंफाळमधील ब्रिटीश इंडिअन आर्मीची रसद आरामात तोडता येईल असे वाटले, पण मित्र सैन्याच्या एयर बेसवरून इंफाळला रसद आणि कुमक दोन्ही पुरवठा होऊ शकतो ही शक्यता त्यांनी गृहीत धरली नाही. इकडे जनरल विल्यम स्लिम ह्यांनी असा अंदाज बांधला की, जपानी फौजा प्रथम इंफाळवर हमला करतील आणि त्यासाठी पुरेसा सैन्यसाठा आणि रसद उपलब्ध आहे याची खात्री होती, परंतु जपानी फौजा कोहिमा आधी ताब्यात घेतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पुढे ह्याच चुका त्यांना महागात पडल्या. ठरलेल्या योजनेनुसार जपानी सैन्य (३१ इन्फंट्री डिव्हिजन) कोहिमा परिसरात घुसले. ह्या डिव्हिजनचा कमांडर कोटोकू साटो ह्या हल्ल्याबद्दल साशंक होता. त्याला काळजी वाटत होती की, जर कोहिमा वेळेत पडले नाही तर संपूर्ण डिव्हिजनचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, पण मुटागुची आता काही समजावण्याच्या पलीकडे गेल्याने ते हतबल होते.

 

हल्ल्याची योजना

                                                           हल्ल्याची योजना

 

कोहीमावर हल्ला होणार नाही ह्या आपल्या अंदाजानुसार स्लिम ह्यांनी तिथे जास्त कुमक ठेवली नव्हती. जेमतेम २५०० सैन्य तिथे होते, ज्यामधील १००० तर निव्वळ मदतनीस होते. सैन्यसंख्या कमी असून देखील त्यांनी संरक्षण फळीची मोर्चेबांधणी भक्कमपणे उभारण्यावर प्राधान्य दिले होते. कोहिमा परिसरात असलेल्या उंच टेकड्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणी सैन्य ठाणी उभारून संरक्षण फळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. जेव्हा ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमाच्या जसामापाशी धडकली, तेव्हा जनरल स्लिम ह्यांनी ५ इंडियन इन्फंट्री डिव्हिजनला विमानाने दिमापुरला हलण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या डिव्हिजनच्या १६१ इन्फंट्री ब्रिगेडला कोहीमाला हलवण्याआधीच जपानी सैन्य कोहिमामध्ये घुसले होते आणि त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली.

कोहिमा रिजवर आय जी एच स्पर, गॅरिसन हिल, कुकी पिकेट, फिल्ड सप्लाय डेपो, जेल हिल, पिंपल, जी.पी.टी. रिज, डेप्युटी कमिश्नर (डीसी) बंगला इत्यादी ठिकाणी ब्रिटीश इंडियन आर्मीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. एकामागून एक अश्या ठाण्यांवर हल्ला करत जपानी सैन्य युद्धात आघाडी घेऊ लागले. त्यांनी आय जी एच स्पर, कुकी पिकेट, जेल हिल, जी.पी.टी. रिज आणि पिंपल ही ठाणी जिंकली. ही ठाणी जिंकता जिंकता जपानी सैन्याचे  प्रचंड नुकसान झाले होते. गॅरिसन हिल हे कोहिमाचे बालेकिल्ला ठाणे होते. इथेच ब्रिटीशांचे नागालँड प्रांताचे सैनिकी मुख्यालय होते आणि त्यावेळी चार्ल्स पॉसे हे त्या मुख्यालयाचे डेप्युटी कमिश्नर होते. जपान्यांनी चौफेर हल्ला चढवून देखील गॅरिसन हिल त्यांना काबीज करता आली नाही. तेथील एका टेनिस कोर्टवर एका बाजूला जपानी आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटीश इंडिअन आर्मी असे तुंबळ युद्ध सुरु झाले. शत्रू अगदी समोर असूनदेखील ब्रिटिशांनी तिथे जोरदार प्रतिकार केला आणि जपान्यांना टेनिसकोर्टच्या एका बाजूला रोखून धरले. हे युद्ध काही दिवस अविरत सुरु होते. कधी जपानी थोडे पुढे सरकायचे आणि एखादे ठाणे ताब्यात घ्यायचे, तर कधी अधिक निकराने लढा देत ब्रिटीश इंडियन आर्मी हातचे गेलेले ठाणे जिंकून परत तिथे आपली मोर्चेबांधणी करायचे. काही केल्या गॅरिसन हिल जपान्यांचा तीव्र प्रतिकाराला जुमानत नव्हती.

 

कोहिमा परिसर आणि तटबंदी

                                                      कोहिमा परिसर आणि तटबंदी

जपानी सैन्याने ४ एप्रिलला कोहिमावर हल्ला केल्यावर तब्बल १४ दिवसांनी, म्हणजे १८ एप्रिलला १६१ इंडियन इन्फंट्री ब्रिगेड कोहीमाच्या सीमेवर येऊन पोचले. जपानी सैन्याचे इंफाळ-कोहिमा मार्ग मोकळा करण्याचे स्वप्न दुभंगले त्यामुळे सैन्याकडे रसद उपलब्ध नाही आणि ती उपलब्ध करण्याचा कुठलाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता ही नव्हती. जनरल साटोंना ह्याच गोष्टीची आधीपासून भीती होती. हीच मोक्याची संधी साधून जनरल स्लिम ह्यांनी २ ब्रिटीश इंडियन इन्फंट्रीचा तोफखाना कोहीमाजवळ हलवून जपानच्या मोर्चांवर तुफान हल्ला सुरु केला. हळूहळू जपान्यांनी ताब्यात घेतलेली ठाणी जिंकत जिंकत ते गॅरिसन हिलकडे पोचले आणि जपान्यांनी नांगी टाकायला सुरुवात केली. जनरल साटो ह्यांनी मुटागुची ह्यांना ही परिस्थिती कळवली आणि आता माघार घेण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही असे सांगितले. कोहिमा-इंफाळमधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि २२ जून पर्यंत जपानी सैन्य चिंडविन नदीच्या पार निघून गेले. ह्या लढाईत ब्रिटीश इंडियन सैन्याचे सुमारे १६,९८७ आणि जपानी सैन्याचे सुमारे ६०,६४३ सैनिक जखमी झाले किंवा मरण पावले.४ एप्रिल ते २२ जून १९४४ म्हणजेच तब्बल अडीच महिने ही लढाई सुरु होती.
टेनिस कोर्टवर झालेल्या तुंबळ युद्धामुळे, कोहीमाची लढाई “टेनिस कोर्टची लढाई” म्हणूनदेखील ओळखली जाते. जनरल स्लिम, ह्यांच्या निग्रह युद्धनीतीमुळे सैन्याला पुरेशी रसद आणि वाढीव कुमक वेळोवेळी मिळत गेली आणि ती मिळेपर्यंत निकराने जमेल तितकी ठाणी त्यांनी लढवत ठेवली आणि शत्रूला थोपवून ठेवले. इतक्या बिकट अंतरावर शत्रूला दीर्घकाळासाठी थोपवून धरल्याची फार थोडी उदाहरणे इतिहासात सापडतील. लष्करी संरक्षण ठाणी लढवणाऱ्या, कुठल्याही देशाला कोहीमाची लढाई आजही प्रमुख मार्गदर्शक मानली जाते. जपानी सैन्याचा निर्णायक पराभव करणारा बालेकिल्ला म्हणजेच गॅरिसन हिल इथे १४२० सैनिकांच्या बलिदानाचे स्मृतीस्थळ बांधलेले आहे, जे तिथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. आजही जगभरातून लाखो लोक ह्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी येतात.

Kohima War Cemetery

                                                      Kohima War Cemetery

 

१९६२ च्या भारत-चीन युद्धात जर सेलासारखा बालेकिल्ला कोहीमाचा आदर्श समोर ठेवून निग्रहाने लढवली गेली असता, तर चीनी फौजा भारतात इतक्या आत घुसू शकल्या नसत्या. त्या युद्धात भारताकडून फॉरवर्ड पॉलिसीचा वापर केला गेला आणि तोच आपल्या अंगाशी आला. वेळ पडल्यावर बचावात्मक माघार घेऊन शत्रूला आपल्याच हद्दीत, पण त्यातल्यात्यात थोडे बाहेरच्या बाजूला लढत ठेवले असते, तर चीनचा डाव भारताला खूप आधीच उधळता आला असता.  २०१३ मध्ये ब्रिटनच्या नॅशनल आर्मी म्युझियमने कोहिमा लढाईला आजवर लढलेली सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून घोषित देखील केले गेले. ह्या लढाईचे विविध पैलू जगभरातील सैन्य आपल्या अभ्याक्रमात वापरतात. आजही जपान कोहिमा-इंफाळ लढाईला आपला सर्वोच्च पराभव मानतात ह्यातच सर्व काही आले.

कोहिमा आणि इंफाळ ही शहरे त्यावेळी जपानी सैन्याच्या ताब्यात गेली असती, तर आज भारताचा इतिहास नक्कीच पूर्णपणे वेगळा असता.    🙂   🙂

——————————-

लेखन संदर्भ :
१. मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे लिखित – न सांगण्याजोगी गोष्ट (१९६२च्या पराभवाची शोकांतिका) :  नकाशे आणि माहिती  (पान क्र. २५३ -२५९)
२: विकिपीडिया
३. प्रचि Renya Mutaguchi, William Slim, Kohima War Cemetery   – गुगलकडून साभार
पूर्वप्रकाशित: (दिवाळी अंक) ईसृजन.कॉम
~ सुझे !!

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५

बोर्डरूम ड्रामा…

हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात. त्याही एक ते दोन दिवसात. हे क्षेत्र दिवसेंदिवस आपल्या कक्षा विलक्षण रुंदावत आहे आणि त्यातून होणारी रोजगार निर्मितीही अनेक तरुणांना आकर्षित करत आहे.

ह्याच तंत्रज्ञानाचा वापर पुढे घरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्याप्रमाणांवर केला जाऊ लागला. भारतातील रिअल इस्टेटचा भाव जसा चढत्या दिशेने वधारू लागला, तसा मोठमोठ्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या आणि आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ह्या क्षेत्रात  www.99acres.comwww.magicbricks.com, www.indiaproperty.com,  www.makaan.comwww.commonfloor.com  अश्या कंपन्या नावाजलेल्या होत्या. त्यांनी आपला एक ठसा विशिष्ट ग्राहकांवर उमटवला होता. त्यासाठी निव्वळ हटके मार्केटिंग कँम्पेन्स वापरात येत गेल्या आणि त्यासाठी देशी-विदेशातल्या मार्केटिंग कंपन्यांना टेंडर्स देण्यात आले. साधारण ह्या वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्यात अचानक एका कंपनीच्या जाहिराती झळकू लागल्या. जिकडे पाहावे तिकडे भडक रंगसंगतीचे बॅनर्स, त्यावर एक वरच्या दिशेला निदर्शित करणारा बाण आणि सोबत फक्त एक हॅशटॅग #lookup

Housing.com

 

त्यानंतर काही दिवसांनी Housing.com अशी कंपनीची ओळख करून देण्यात आली आणि रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये अजून एका ब्रँडची भर पडली.  राहुल यादव आणि त्याच्या मित्रांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरु केली होती. एकदम गाजावाजा करत ह्या ऑनलाईन रिअल इस्टेट कंपनीने पहिली मोठी उडी घेतली आणि सर्वांना अवाक केले. त्यानंतर काही महिन्यातच त्यांचे अंतर्गत कलह, विरोधकांशी झालेले वादविवाद सोशल मिडियावर उघडे पडले. त्याची चर्चा वृत्तपत्रांमधून, बातम्यांमधून, शेअर बाजारात चर्चिल्या जाऊ लागल्या. ह्या सर्वाचा हाऊसिंग.कॉमवर, रिअल इस्टेट मार्केटवर आणि प्रतिस्पर्ध्यांवर झालेला परिणाम म्हणजेच हा बोर्डरूम ड्रामा.

 

  • राहुल यादव – नाम तो सुना ही होगा. काही महिने हे नाव रोज पेपरात यायचे. मुख्यत्वे टाईम्स ग्रुप्सच्या पेपरांमध्ये. आता टाईम्स ग्रुपच का? ते बघूच पुढे…. सुरुवातीला राहुलची ओळख करून घेऊ. राहुल यादव हाऊसिंग डॉट कॉमचा पहिला सीईओ. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ही संकल्पना तयार केली. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत राजस्थानतून पहिला आल्यावर, सरकारतर्फे पुढील शिक्षणासाठी ७५ टक्के खर्च स्कॉलरशिप म्हणून त्याला मिळाला. तो हुशार आणि चुणचुणीत होताच. शैक्षणिक दरमजल करत तो २००७ मध्ये आयआयटी मुंबईत (IITB) मध्ये दाखल झाला. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम त्याने http://exambaba.com/ नावाची वेबसाईट सुरु केली. ज्यावर आयआयटीचे सर्व जुने पेपर्स आणि त्यांचे सोल्युशन्स, तिथे शिकणाऱ्या मुलांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्याचे प्रचंड कौतुक झाले. २०११ मध्ये त्याने आयआयटीमधले आपले शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडला स्वतःचे असे काही सुरु करण्यासाठी.

 

Rahul Yadav

 

 

  • त्या काळात आयआयटीच्या परिसरात घर घेणे, जेणेकरून तिथे येणे जाणे सोप्पे होईल म्हणून त्याने तो शोध सुरु केला. प्रचंड कष्ट केल्यावर त्याला हवेतसे घर मिळाले, पण आपल्याला एक शोधायला किती त्रास झाला, ह्या संकल्पनेतूनच Housing.com चा जन्म झाला. जो त्याने ऑगस्ट २०१२ मध्ये आपल्या ११ मित्रांच्या सहाय्याने पूर्णत्वास नेला. त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते पोर्टल तयार केले आणि मग शोध सुरु झाला इन्व्हेस्टर्सचा. कारण पैश्याशिवाय त्या पोर्टलला सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचण्यात प्रचंड अडचणी येणार होत्या.
  • राहुलसह सर्व मित्रांनी मार्केट पालथे घालण्यास सुरुवात केली. आपाल्या प्रोडक्टचे प्रेझेन्टेशन निरनिराळ्या कंपन्यांना ते देऊ लागले आणि त्यांना यश मिळाले फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये एंजल इन्व्हेस्टर्स, फ्युचर बाजारचे झिशान हयात आणि नेटवर्क १८ चे हरेश चावला, ह्यांनी मोठी रक्कम हाऊसिंगमध्ये गुंतवली. ह्या पैश्यातूनच हाऊसिंगचे पुणे, हैद्राबाद आणि गुरगावमध्ये यशस्वीपणे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यातच नेक्सस वेंचर पार्टनर्स ह्यांनी १५.९ करोड आणि हेलीओन वेंचर्स-क्वाल्कोम वेंचर्स पार्टनर्स, ह्यांनी तब्बल ११५ करोड हाऊसिंगमध्ये गुंतवले.

 

  • १५ डिसेंबर २०१४ ला जपानच्या सॉफ्टबँक कॅपिटलने $90 मिलियन (५७२ करोड) इतकी प्रचंड मोठी रक्कम Housing मध्ये गुंतवून, कंपनीला पैश्यांचा भक्कम असा पाठींबा जाहीर केला. भारतासोबत संपूर्ण आशियातील ग्राहकांना हाऊसिंगकडे आकर्षित करण्याचा त्यांचा मानस होता. ह्याच पैश्याच्या जोरावर देशभरातील आयआयटीयन्सला हाऊसिंगमध्ये नोकरी देऊन त्यांनी आपली टीम वाढवली आणि मार्चमध्ये देशातल्या ७ शहरात जाहिरातींचा अक्षरशः पाऊस पाडला.
  • इतक्या झपाट्याने वाढ होत असताना, प्रतिस्पर्धी कंपन्या शांत बसणे शक्यच नव्हते. त्यांनी हाऊसिंगचे इंजिनियर्स फोडण्याचा प्रयत्न केला, त्याला राहुल ने सोशल मिडियावर जाहीरपणे उत्तर देऊन शिवीगाळ केली. त्याचवेळी टाईम्स ग्रुपच्या एकॉनॉमिक्स टाईम्सनेcom चे इन्व्हेस्टर्स राहुलला काढून टाकण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी दिली. राहुलने आणि हाऊसिंगने त्वरित त्या वृत्ताचा इन्कार केला आणि राहुल यादवने कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांना एक ईमेल पाठवला आणि तो ईमेल सोशल मिडियावर लिक केला गेला.

 

rahul Vs times

 

  • आता टाईम्सचा हाऊसिंगमध्ये इतका इंटरेस्ट का याचे करणार कळले असेलच. ह्या ईमेल प्रकारानंतर हाऊसिंगवर टाईम्सने १०० करोडची कायदेशीर नोटीस बजावली. कंपनीची बदनामी केल्याबद्दल.
  • ही नोटीस आल्यावर राहुल यादव भडकला आणि त्यांनी अनेक सोशल वेबसाईट्सवर आक्रमकपणे टाईम्स ग्रुपवर उघडपणे हल्ला करायला सुरुवात केली. काही झाले तरी टाईम्स ग्रुप काही छोटी कंपनी नव्हती, हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही. अखेरीस ४ मे २०१५ ला राहुल ने तडकाफडकी हाऊसिंगमधल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि त्याचा तो ईमेल सोशल नेटवर्क साईट्सवर फिरू लागला. अतिशय बोचरी टिका त्याने आपल्या मित्रांवर आणि इन्व्हेस्टर कंपन्यांवर केली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या बोर्डमिटिंगनंतर त्याने आपला राजीनामा परत घेतला असे जाहीर केले आणि सर्व सहकाऱ्यांची माफी मागितली.

 

  • ह्या राजीनामा सत्रानंतर राहुल यादवचे पर्यायी हाऊसिंगचे सोशल नेटवर्कवर प्रचंड हसे झाले. एक यशस्वी ब्रँड स्टार्टअप म्हणून उदयाला आलेल्या हाऊसिंगसाठी हा प्रकार लाजीरवाणा ठरला होता. त्याच महिन्यात राहुल यादवने स्वतःकडचे हाऊसिंग डॉट कॉमचे एकूण एक शेअर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या आपल्या २२५१ सहकाऱ्यांना वाटून टाकले. ज्याची किंमत साधारण १५०-२०० करोड होती.
  • राहुलच्या ह्या लहरी वागण्याचा आता सगळ्यांना कंटाळा आला नसता तर नवलच. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना सोशल मिडीयावर शिवीगाळ करणे, ई-कॉमर्स क्षेत्रात असलेल्या दिग्गजांना उगाचच ज्ञान पाजाळने, त्यांच्याशी सतत राहुलचे खटके उडणे, मिडियाशी राहुलचे असलेले वर्तन, अश्या अस्नेक गोष्टी विचारात घेऊन १ जुलैच्या बोर्ड मिटिंगमध्ये राहुलला हाऊसिंगमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

 

ह्या सर्व नाट्यमय घडामोडींवर त्याच्या काही मित्रांनी राहुल विरुद्ध उघड पवित्रा घेतला. राहुलविरुद्ध ब्लॉग्गिंग सुरु झाले. तो कसा वाईट होता, बनेल वृत्तीचा होता आणि हाऊसिंगला तो कसा धोकादायक ठरला असता याचे विश्लेषण केले जाऊ लागले. त्याचवेळी राहुलच्या समर्थनासाठीसुद्धा खूप जण पुढे आले, त्यात हरेश चावला यांचे नाव अग्रगण्य आहे. त्यांनी राहुलचे केलेले विस्तृत विश्लेषण इथे वाचता येईल. हाऊसिंगमध्ये इन्व्हेस्टर मंडळींच्या हातचे बाहुली न बनण्यापेक्षा बाहेर पडून, अजून एक नवीन सुरुवात राहुल करेल असा त्यांनी विश्वास दर्शवला.

म्हणायला गेलं तर ह्या सर्व बोर्डरूम घडामोडींचा आपल्या आयुष्यावर सरळसरळ परिणाम होत नाही. रोज बाजारात हजारो नव्या कंपन्या येतात आणि बंद देखील होतात. राहुल यादव स्वतः नवीन प्रोजेक्टवर काम करतोय, त्याला मुकेश अंबानी ह्यांनी देखील भेटायला बोलावले होते. त्याचे अपडेट्स त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर बघता येतीलच. हाऊसिंगचे नक्कीच नुकसान झाले मोठ्या प्रमाणावर, पण आशा करू ते त्यातून बाहेर येतील आणि पुन्हा आपला दबदबा निर्माण करतील. कारण त्यांच्याकडे अजूनही चांगली टीम आहे.

ह्या बोर्डरूम ड्रामावरून एक लक्षात येते की, ही एक भली मोठी शर्यत आहे, शर्यत जिंकायची असेल, तर तुम्हाला धावत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यात तुम्ही थांबलात तर १००१ टक्के संपलात… !

——————–

(लेखाचे सर्व संदर्भ : गुगलकडून साभार)

~ सुझे

पुर्व्रप्रकाशित – कलाविष्कार ई दिवाळी अंक २०१५