प्रोजेक्ट शेड बॉल्स…

गेल्या दहा वर्षात पर्जन्यमानाची वाढती अनियमितता हा सर्वच प्रगतिशील देशांसाठी मोठा प्रश्न ठरलेला आहे. अगदी आपल्याकडचेच उदाहरण घ्यायचे तर, गेल्या वर्षी महाराष्ट्रात जवळपास ३५-४०% कमी पर्जन्यमान झाल्याने भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, ह्याउलट चेन्नई तामिळनाडू भागात पर्जन्याचे प्रमाणे २०-२५% ने वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण शहर १०-१२ दिवस पाण्याखाली गेले. जगभरातील विविध देशांमध्ये अशीच अवस्था बघायला मिळतेय आणि ह्या बदलत्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.

सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला आजवरच्या सर्वात वाईट दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत येथील पावसाचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याने, पाणीसाठे, जलस्रोत आणि जमिनीतील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत जात आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या कॅलिफोर्नियाच्या एकूण पाण्याच्या वापरानुसार ६० टक्के पाणी हे विहिरी, बोअर्स वगैरे तत्सम जमिनीतील स्रोतांवर आणि ४० टक्के पाऊस/बर्फवृष्टी यावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण असेच घटत गेल्यास परिस्थिती अधिकच भयंकर होईल ह्यात शंका नाही. जिथे आधी ३००-३५० फुटावर पाणी उपलब्ध व्हायचे, तिथे १५०० फूट खोल विहिरी खणून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारतर्फे विहिरी खोदण्यासाठी सक्त बंदी केली गेली आहे आणि समजा तुम्हाला परवानगी मिळाली असल्यास त्याचा सध्याचा खर्च जवळपास $३००,००० इतका प्रचंड आहे. नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सने दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण अमेरिकेतील जमिनीतील पाण्याची पातळी २००४ ते २०१३मध्ये अक्षरशः निम्म्यावर आली आहे आणि नैसर्गिक पावसाचे प्रमाण असेच कमी होत गेल्यास २०२०पर्यंत ही पातळी ३५ टक्के आणि २०४० पर्यंत ७-५ टक्के इतकी कमी होऊ शकते. परिस्थिती इतकी गंभीर झाल्यानेच, आहे ते पाणी वाचवणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करता येणे हा एकच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. गेली काही वर्षे त्यावर बरेच संशोधन सुरू होते.

त्यामधल्या एका संशोधनाचा प्रत्यक्ष प्रयोग ११ ऑगस्ट २०१५ रोजी स्थानिक पालिकेकडून राबवला गेला. त्यांनी लॉस एंजलीस ह्या कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठ्या आणि अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या शहरात असलेल्या मुख्य जलस्रोतावर अक्षरशः एक भलीमोठी चादर अंथरली. त्यानंतर सगळीकडे त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. अनेकांनी ह्या प्रयोगावर टीकेची प्रचंड झोड उडवली, तर अनेकांनी त्याचे भरभरून समर्थन केले. त्या प्रयोगाचे नेमके उद्दिष्ट, त्यामुळे होणारे फायदे-नुकसान, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि महत्त्वाच्या इतर घडामोडींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ह्या वादात (?) सापडलेल्या प्रयोगाचे नाव ‘प्रोजेक्ट शेड बॉल्स’.

.
वर दिलेला फोटो हा लॉस एंजलीस शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलाशयचा आहे. ह्या जलाशयातूनच शहराची पाण्याची तहान भागवली जाते. त्यावर आपण जो काळा छोट्या छोट्या चेंडूंचा थर बघतोय, तीच ती भलीमोठी चादर. त्या काळ्या चेंडूना शेड बॉल्स (Shade Balls) म्हटले जाते. ह्याक्षणी १७५ एकरावर पसरलेल्या जलाशयाचा पृष्ठभाग ९,८०,००,००० शेड बॉल्सने आच्छादलेला आहे. दुरून बघताना संपूर्ण जलाशयावर एक भलीमोठी चादर अंथरल्याचा भास निर्माण होतो.

शेड बॉल्सची पार्श्वभूमी :-

शेड बॉल्सचे जनक म्हणजे लॉस एंजलीस डिपार्टमेंट ऑफ वॉटर अँड पॉवरमधून हल्लीच निवृत्त झालेले जीवशास्त्रज्ञ डॉ. ब्रायन व्हाईट. डॉ. व्हाईट ह्यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या हवाई दलाच्या ठिकाणी असलेल्या छोट्या पाण्याच्या स्रोतांवर बॉल्सचे आवरण पसरवून, २००३ साली ह्याची यशस्वी चाचणी केली होती. त्या वेळी हवाई तळाजवळ असलेल्या जलाशयांवर पक्षी बसू नये यासाठी ह्या बॉल्सचा उपयोग केला जायचा. त्यामुळेच त्यांना ‘बर्ड बॉल्स’ असे संबोधले जायचे. हवाई तळावर सतत विमानांची ये-जा सुरू असते आणि फायटर विमानांचा कर्णकर्कश आवाज ऐकून पक्ष्यांचे थवे सैरावैरा उडून ते विमानांना आपटून दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असायची. यासाठी सर्वप्रथम फेअरचाईल्ड ह्या हवाई तळावर ह्या बर्ड बॉल्सचा यशस्वी वापर केला गेला आणि मग अमेरिकेत सैनिकी क्षेत्रांसाठी सगळीकडे हेच तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले.

शहरी भागात शेड बॉल्सचा उपयोग :-

विविध हवाई तळांच्या यशस्वी चाचणीनंतर शहरी भागातील जलाशयांवर ह्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल यावर संशोधन सुरू होतेच. २००४ पासून कॅलिफोर्नियामधील पावसाचे प्रमाण लक्षणीय घटल्याने, जलाशयांमध्ये साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यावर बुरशीची किंवा तत्सम एकपेशीय वनस्पतींची वाढ होऊ नये, पाण्यातील क्लोरीन आणि सूर्यप्रकाश यांची एकत्रितपणे ब्रोमेटसारखी रासायनिक प्रक्रिया होऊ नये यासाठी ह्या शेड बॉल्सचा वापर करता येईल, असा निष्कर्ष निघाला. शेड बॉल्सच्या आवरणाखाली पाणी सुरक्षित राहील आणि सूर्यकिरणांचा थेट पाण्याशी संपर्क न होता पाण्याचे तापमान कमी राहील, ह्या अनुषंगाने त्याची चाचणी करण्याचे ठरवले गेले. सन २००८ ते २०१२मध्ये हेच तंत्रज्ञान, थोडे बदल करून शहरी भागातील पाण्याच्या स्रोतांवर प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात झाली. त्यात लॉस एंजलीसमधील आयव्हनहो, एलिसिअन, अप्पर स्टोन कॅनियन ह्या जलाशयांवर शेड बॉल्स वापरण्यात आले. २००८ मध्ये सर्वप्रथम आयव्हनहोमध्ये ३,०००,००० शेड बॉल्स वापरल्यावर एका वर्षाने तेथील परिस्थिती खाली दिलेल्या प्र.चि. २मध्ये बघता येईल आणि पाण्याचे तापमानदेखील खूप कमी झाल्याचेसुद्धा डॉ. ब्रायन ह्यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर लगेच २००९ मध्ये एलिसिअन आणि २०१२ मध्ये अप्पर स्टोन कॅनियन जलाशय शेड बॉल्सने भरून गेले. ह्या तिन्ही जलाशयांमध्ये वापरलेले शेड बॉल्स नजीकच्या काळात बदलून, नव्या पद्धतीचे शेड बॉल्स वापरले जाण्याची शक्यता आहे.

.
शेड बॉल्स – तांत्रिक माहिती आणि त्याचे फायदे :-

– शेड बॉल्सचा व्यास ४ इंच इतका आहे. हे बॉल्स वेगवेगळ्या आकारात, मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर उपलब्ध आहेत.
– ते पूर्णपणे प्लास्टिकचे बनलेले आहेत. यासाठी खास पॉलिइथिलीन प्लास्टिक वापरले गेले आहे, जे किमान १० वर्ष तरी आरामात टिकेल असा अंदाज आहे. ह्या प्लास्टिकला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही किंवा त्यातून पाण्यात कुठली रासायनिक प्रक्रिया घडत नाही. खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठीसुद्धा पॉलिइथिलीन वापरले जाते. प्रत्येक प्लास्टिक बॉल शास्त्रीय पद्धतीने बंद केला आहे. दहा वर्षांनी किंवा बॉल्स फुटल्यावर त्या बॉल्सवर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्याजोगे करता येईल. बॉल्स बनवणार्‍या कंपन्यांनी ह्या बॉल्सचे आयुष्य साधारण २५ वर्ष असेल असा दावा केला आहे.
– एका बॉलचे वजन साधारण २४५ ग्राम इतके आहे. बॉलच्या आतील पोकळ भागात पाणी आणि हवा समप्रमाणात भरलेले आहेत, जेणेकरून ते पाण्यात बुडू नयेत किंवा हवेसोबत उडून जाऊ नयेत.
– काळा रंग शास्त्रीयदृष्ट्या अधिक परिणामकारक असल्याने निवडला गेला आहे. ह्या रंगामुळे प्लास्टिक कंपाउंडचे जीवनमान सगळ्यात जास्त बनते. तसेच काळ्या रंगामुळे पाण्याचे तापमान वाढणार नाही आणि रेडिएशन पाण्यापर्यंत पोहोचून रासायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता शून्य होते.
– प्लास्टिक उष्णता दुर्वाहक असल्याने, सूर्यप्रकाशाची उष्णता पाण्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन ९०% कमी होऊन, सध्या वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत लॉस एंजलीसमध्ये होणार आहे. हे पाणी साधारण ८,१०० लोकवस्तीला चार आठवडे पुरेल इतके आहे.
– ह्या बॉल्सचा वितळण बिंदू साधारण १२०°-१८०° सेल्सिअस असल्याने, वाढत्या तापमानाचा त्यावर परिणाम होणार नाही, याची शाश्वती डॉ. व्हाईट ह्यांनी दिली आहे.
– शेड बॉल्स तुलनेने स्वस्त (०.३६¢ प्रती बॉल) असल्याने, त्याच्या वापरावर आणि प्रयोगांवर मर्यादा सध्यातरी नाहीत.
– या घडीला XavierC, Artisan Screen Process, Orange Products ह्या तीन मुख्य कंपन्या आहेत, ज्यांनी आजवर हे प्रोजेक्ट शेड बॉल्स हाताळलेले आहे. अमेरिकेत झालेल्या प्रयोगानंतर जगभरातून ग्राहक मिळवण्यात ते यशस्वी होतीलच किंवा एव्हाना झाले असतीलच. नजीकच्या काळात स्पर्धा वाढल्याने जगभरातले मोठ्ठे बिझनेस टायकून्स, ह्या शेड बॉल्स निर्मितीमध्ये उतरणार हे वेगळे सांगणे न लगे.

शेड बॉल्सवर होणारी टीका :-

ह्या प्रयोगावर होणारी मुख्य टीका म्हणजे बाष्पीभवन थांबवण्यासाठी शेड बॉल्सचा केलेला खर्च आणि जे पाणी बाष्पीभवन होते त्याचे बाजारमूल्य. म्हणजे समजा एलएमध्ये शेड बॉल्ससाठी जवळपास ३४.५ मिलियन डॉलर इतका खर्च झाला. हे शेड बॉल्स बाष्पीभवन रोखून वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत करणार आहेत. ह्या ३०० मिलियन गॅलन्स पाण्याचे बाजारमूल्य जवळपास २ मिलियन डॉलर आहे. कंपन्यांनी जरी हा दावा केला, की ते २५ वर्ष सहज टिकतील, तरी शेड बॉल्स दर दहा वर्षांनी बदलावे लागले, तर १० वर्षात फक्त २० मिलियन डॉलर्स किमतीच्या पाण्याची बचत होणार, मग पुन्हा ३४.५ मिलियन डॉलर्सचा खर्च. सरकारने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी पिण्याच्या पाण्यात तरंगते प्लास्टिक आणि त्याचा पाण्याशी कुठलाच रासायनिक परिणाम होत नाही यावर काही लोकांचा विश्वास बसत नाही आहे आणि ते सोशल मीडियावर रोज त्याबद्दल लिहीत आहेत. यावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे काही कंपन्यांना आणि त्या कंपन्यांद्वारे सरकारी यंत्रणेला मुद्दाम फायदा पोहोचवण्यासाठी ही योजना अमलात आणली गेल्याचा. याआधी ३ जलाशयांवर हा प्रयोग केला गेला, पण त्याची इतकी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी कधीच केली गेली नाही.

ह्या प्रयोगाचे भविष्यकाळच ठरवेल, परंतु अशी काटकसर करण्याची वेळ आपणच आपल्यावर आणली आहे, ह्यावर कोणाचेही दुमत नसेल. सिमेंटच्या जंगलात राहून कामातून मुद्दाम वेळ काढून, कुठे जंगलात एक-दोन दिवस काढण्यात कसली आली आहे धन्यता? आपणच निसर्ग इतका दूर नेऊन ठेवला आहे की, तो अनुभवावा लागतो मुद्दाम वेळ काढून. प्रगतिशील होण्यासाठी अवलंबलेल्या मार्गांमध्ये आपण निसर्गाचा अक्षरशः बळी दिला आहे. त्यामुळे निसर्ग कोपतो, पाऊस पडत नाही, जास्तच पडतो अशा तक्रारी करण्यास आपण पात्र नाही. आता शक्य तितका प्रयत्न करून निसर्गाची हानी थोड्या प्रमाणात का होईना भरून काढणे हेच आपल्या हातात उरले आहे.

डॉ. व्हाईट आणि त्यांनी केलेले हे संशोधन निश्चितच एक मैलाचा दगड ठरलेला आहे, पण अजून भलामोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आशा आहे की ह्या आणि अशा अनेक प्रयोगांद्वारे कमीतकमी किमतींमध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे पाणी वाचवण्याची यंत्रणा जगभर उपलब्ध व्हावी. सगळीकडे पर्जन्यमान व्यवस्थित व्हावे. त्यापरीस सजीव सृष्टींच्या अस्तित्वाबद्दल एकूणच निसर्गाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन, त्याची अधिक हानी न होऊ देण्याची बुद्धी सगळ्यांना मिळो ही माफक अपेक्षा.

धन्यवाद !!

~ सुझे 🙂

———————————
-: लेखाचे संदर्भ :-
१. LADWP Newsroom – Shade Balls FAQ
२. National Geographic
३. Wikipedia
४. Time.com
५. Grist.org
६. Bloomberg.com

———————————

पूर्वप्रकाशितमिपा विज्ञान लेखमाला

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५

महाराजांचा दक्षिण दिग्विजय …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहिमा पार पडल्या. त्या अनेक मोहिमांची शात्रोक्त पद्धतीने कारणीमिमांसा ही केली गेली. त्यावरून महाराजांच्या पराक्रमाची महती कळतेच, पण त्यामागील द्रष्टेपणा ही त्यांची जमेची बाजू होती हेही आपल्याला कळून येते. त्यातल्याच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल आपण आज थोडी माहिती जाणून घेणार आहोत, ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय अर्थातच “कर्नाटक मोहीम” !!

त्याकाळी संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून संबोधला जाई. त्यात सद्य भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होत असे. शिवकालीन कालखंडाच्या आधीपासून इस्लामीकरणाची एक लाट जगभर पसरली होती. अगदी मोरोक्को ते इंडोनेशियापर्यंत त्याचा प्रभाव जाणवायला लागला होता. ह्या लाटेला बऱ्यापैकी अपवाद ठरला तो महाराष्ट्र आणि हिमालय-नेपाळच्या आसपासचा प्रदेश. सन १३१० मध्ये मलिक काफुरने दक्षिण भारतात स्वारी करून, अनेक हिंदू राजघराण्यांचा पाडाव केला. सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क ह्यांनी एकत्रितपणे ९ वर्ष मुसलमानांविरुद्ध लढा देऊन विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग हा विजयनगर म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच वेळी उत्तरेच्या भागात बहामनी राज्याची स्थापना झाली. पुढे बहमनी राज्याचे तुकडे होऊन त्याचे पाच भाग झाले – आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही. ह्या सर्व शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला आणि ते साम्राज्य आपापसात वाटून घेतले. पुढे काळाच्या ओघात पाचपैकी दोन बलाढ्य शाह्या टिकून राहिल्या आदिलशाही आणि कुतुबशाही. ह्यातल्याच तुलनेने कमी बलवान अश्या आदिलशाहीमध्ये शहाजीराजांनी जहागिरी स्वीकारली होती आणि तिथल्या राजकारणात आपले महत्त्व हळूहळू वाढवले.

दरम्यान मोघलांनी हळूहळू महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात आपला जम बसावा असे प्रयत्न सुरु केले होते. ह्याचा परिणाम म्हणजे दक्षिणेकडील दोन्ही शाह्या अस्थिर झाल्या. आदिलशाहीमध्ये फुट पडून सुन्नीपंथीय पठाण सरदारांनी, मोगल सरदारांना पाठींबा दिला आणि ते मोघलांना सामील झाले. त्याच आदिलशाहीमधील दक्षिणेकडील सरदार जे प्रामुख्याने शियापंथीय होते, त्यांचा मोघलांना कडवा विरोध होता. त्यासाठी त्यांनी सुन्नीपंथीय सरदारांच्या विरोधात बंड करून, त्यांच्या वजीराला म्हणजेच खवास खानाला वजीर पदावरून हटवले आणि पुढे त्याचा खून झाला. खवास खानाच्या खुनानंतर शियापंथीय बहलोलखान खान आदिलशाहीचा वजीर झाला. मोघलांना सामील होण्यात कुतुबशाही सरदार ही मागे नव्हते. सर्व प्रमुख सरदार मोघलांना सामील झाल्यावर, कुतुबशाहीची सूत्रे दोन हिंदू भावंडांच्या हाती आली. मादण्णा कुतुबशाहीचा वजीर झाला आणि आकण्णा हा त्याचा भाऊ कुतुबशाहीचे साम्राज्य भावासोबत सांभाळू लागला.

६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर अगदी थाटामाटात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी तब्बल १ कोटी खर्च आला होता. इतका अवास्तव खर्च होऊ नये अशी राजांची इच्छा होती, पण स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना हे करावे लागले. महाराजांचे शिक्के असलेले चलन वापरात आणले जाऊ लागले. स्वराज्याला एक निश्चित आकार मिळाला. अर्थातच महाराजांचा हा उदय मोघलांना सहजासहजी रुचणारा नव्हताच. त्यामुळे मोघलांचे स्वराज्यावर हल्ले वाढले. मोघल सत्ता अधिक आक्रमक होत जाऊन, त्यांनी अनेक आघाड्यांवर युद्ध पुकारून चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना दक्षिणेकडील सद्यस्थिती माहित होतीच आणि बहलोलखान वजीर झाल्याबरोबर महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. कुतुबशाहीची सर्व सूत्रे असलेल्या हिंदू भावंडांचाही हिंदवी स्वराज्य, ह्या संकल्पनेला पाठींबा होता. म्हणजे आता दक्षिणेत महाराज, आदिलशाही व कुतुबशाही हे प्रमुख घटक होते आणि त्यांचा लढा हा उत्तरेतून आलेल्या मोघालांशी होता. त्यामुळे दक्षिणेकडील सर्व शाह्या एकत्रितपणे मोघलांविरुद्ध सामील व्हाव्या अशी महाराजांची इच्छा होती. त्यात शिवाजी महाराजांनी आपली रणनीती जाहीर केली. ज्यात त्यांनी सांगितले, “दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती”. ह्यास कुतुबशाही अनुकूल होती, पण आदिलशाही त्यास इतकी अनुकूल नव्हती. महाराजांना त्याची इतकी काळजी नव्हती. कारण दोन्ही शाह्यांची झालेली वाताहत आणि सद्यस्थिती बघता, अंतिम लढाई ही आपण आणि मोघल ह्यात होणार हे त्यांनी आधीच ताडले होते. त्यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेण्याचे पक्के केले.

ह्या मोहिमेसाठी अफाट खर्च होणार याची राजांना कल्पना होतीच, पण त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्या मोहिमेला लागणारा कालावधी. किमान वर्षभरासाठी महाराजांना स्वराज्य सोडून दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे स्वराज्याची योग्य व्यवस्था लावणे ही प्राथमिकता होती. महाराजांचे संपूर्ण कुटुंब रायगडावर राहणार होते. ह्या अंतर्गत स्वराज्याचे तीन भाग केले गेले. त्यानुसार रायगडाच्या उत्तरेकडील प्रदेश मोरोपंत पिंगळे, रायगडाच्या दक्षिणेकडचा प्रदेश अण्णाजी दत्तो आणि पन्हाळ्यापासून देशावरचा इतर प्रदेश दत्ताची त्र्यंबक, ह्यांच्याकडे सोपवून त्यांना भरपूर शिबंदी, सैन्य आणि दारुगोळा दिला गेला. हा झाला प्रश्न स्वराज्याच्या व्यवस्थेचा, पण मुख्य मोहिमेचा खर्च अधिक होता आणि त्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी स्वराज्याचा मुलुख सोडून दक्षिणेत हालचालींसाठी, रसद महसूलांसाठी प्रदेश मिळवणे गरजेचे होते. खजिन्यातली तूट भरून काढणे आणि स्वराज्याचा विस्तार करणे ही दोन प्रमुख करणे त्यामागे होती. नवीन जिंकलेला मुलुख व किल्ले यांची व्यवस्था करण्यासाठी शेकडो कारकून मंडळीही मोहिमेत सहभागी होणार होती. अजून एक महत्वाची गोष्ट जी महाराजांनी केली, ती म्हणजे ह्या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळून, बाहेर चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. ती म्हणजे, “महाराज तंजावर येथे आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे ह्यांना भेटण्यास निघाले आहेत आणि ह्या भेटीत जहागीरीतील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा अशी मागणी त्यांना करणार आहेत. मोहिमेचा हा एकच उद्देश आहे असे सांगण्यात आले.”

ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर ६ ऑक्टोबर १६७६ या दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. त्यावेळी मोघलांची एक लढाई नळदुर्ग भागात, आदिलशाही विरोधात सुरु होती. याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहिमेचा श्रीगणेशा केला. ह्या मोहिमेत महाराजांसोबत २५००० घोडदळ आणि ४०००० पायदळ होते. मोहीमेच्या सुरुवातीला महाराजांनी रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव येथील मौनीबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेऊन, आंबोली भागातून देशावर आले आणि इथेच त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भागानगरकडे रवाना झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवला. हंबीररावांनी आदिलशाही भागातला भलामोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलुखात शिरले. मोहित्यांना आदिलशाही मुलुखात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली. ती लढाई म्हणजे हुसेनखाण मियाणाविरुद्ध, दुआबातील कोप्पळ ह्या महत्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात. हुसेनखानाने मोहित्यांना अनेपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता. अटीतटीच्या लढाईत मोहित्यांनी पराक्रमाची शर्थ करून मियाणाचा पराभव केला आणि त्याचे सर्व उच्चप्रतीचे हत्ती, घोडे, युद्धसामुग्री अन भलामोठा खजिना हस्तगत केला. नंतर ते पुढे महाराजांना भागानगरमध्ये जाऊन मिळाले.

महाराजांचा भागानगरपर्यंत (कुतुबशाही) चा प्रवास आजतागायत उलगडलेला नाही. महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळल्याने त्याबद्दल जास्त कागदपत्रं उपलब्ध नाहीत, किंवा ती अजून सापडलेली नसावीत. तरी ह्या “संभाव्य” प्रवासाचे मार्गक्रमण खालील नकाशा क्रं. १ मध्ये दिलेला आहे.

नकाशा क्रमांक १

महाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाहांनी महाराजांचे स्वागत करायला मादण्णा आणि आकण्णा यांना पाचारण केले होते. त्यांनी दोन चार गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदरसत्कार केले. तब्बल एक महिना भागानागरात कुतुबशाहने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे, कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ह्यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहा अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. त्यासोबतच गोवळकोंड्याच्या सेनापती मिर्झा महमद अमीनच्या नेतृत्वाखाली पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोफखाना, चार हजार पायदळ आणि एक हजार घोडदळ महाराजांना दिला गेला. इथून पुढे कर्नाटक मोहिमेतील महत्वाचा प्रांत काबीज करण्यास खरी सुरुवात झाली. त्याआधी वाटेत महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पैकी, एक श्रीशैलचे दर्शन घेतले. त्यासाठी त्यांनी कर्नुळजवळ कृष्णा नदी ओलांडली आणि मग आत्माकुर येथे मुक्कामाला थांबले.

आताच्या चेन्नईच्या दक्षिणेला पालार नदी ही दोन्ही शाह्यांमधली मुख्य सीमा होती. नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर. जिंजीबद्दल सांगायचे तर, हा प्रचंड मोठा विस्तृत तालेवार गिरीदुर्ग आहे. ह्या किल्ल्याचा किल्लेदार नासिर महमंद, हा आदिलशाही वजीर खवास खानाचा भाऊ. खवास खानाच्या खुनानंतरच बहलोल खानाने त्याच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने सरदार शेरखानाची नेमणूक केली होती. महाराज जिंजीला पोचायच्या आधीच किल्लेदाराने कुतुबशाहीकडे मदतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि अनायासे महाराजांरूपाने त्याला एक मोठा आशेचा किरण मिळाला होता. त्याने महाराजांकडून पैसे घेऊन, किल्ला महाराजांच्या हवाली केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंजी स्वराज्यात सामील झाला. किल्ला ताब्यात येताच महाराजांनी किल्ल्यावरचे जुने बांधकाम पाडून, तो किल्ला नव्याने उभा केला गेला. जिंजीच्या उत्तरेला वेल्लोर हा अतिशय दुर्गम भुईकोट किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या चहूबाजूंनी प्रचंड मोठा पाण्याचा खंदक आहे आणि किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विहिरीदेखील होत्या. हा किल्ला म्हणजे विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी, जिथे त्यांचे सिंहासनही होते. ह्या किल्ल्याचा किल्लेदार अब्दुल्ला महाराजांना शरण आला नाही आणि त्याने किल्ला लढवायचा ठरवला. किल्ल्यात रसद आणि पुरेशी शिबंदी असल्याने किल्लेदाराला काळजी नव्हती. महाराजांनी अनेक प्रकारे तो किल्ला मिळवायचा प्रयत्न केला, पण तो किल्ला सहजासहजी पडत नव्हता. महाराजांनी किल्ल्याजवळ दोन टेकड्यांवर साजिरा-गोजिरा नावांनी दोन गढ्या बांधल्या, जेणेकरून किल्ल्यात तोफा डागायला सोप्पे पडेल. परंतु किल्ला भक्कम होता आणि त्याचा वेढा तसाच ठेवून महाराज पुढे निघाले. इथून कुतुबशाही सेना आणि सेनापती मागे फिरले. त्यांना वाटले की महाराज हा प्रदेश त्यांच्या हवाली करतील, पण तसे झाले नाही. जिंकलेल्या सर्व प्रदेशाची उत्तम प्रशासकीय व्यवस्था करूनच महाराज पुढे दक्षिणेकडे सरकत होते.

ह्यापुढे महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ह्या परिसरात असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तिरुवाडी. तिथे शेरखान हा आदिलशाही सरदार होता. एव्हाना महाराजांच्या धडाकेबाज मोहिमेची माहिती त्याला मिळाली होती आणि त्याला वाटले की बहलोलखान महाराजांसोबत सैन्य घेऊन युद्धाला येईल, म्हणून त्याने काही सैन्य तुकड्या जंगलात उभ्या केल्या. पण त्याचा अंदाच चुकला आणि बहलोलखान आलाच नाही. महाराज आपले सैन्य घेऊन एकटेच पुढे आले. त्यांनतर मधल्यामध्ये शेरखानाच्या मुख्य सैन्य तुकड्या अडकून पडल्या आणि महाराजांनी तिरुवाडीला वेढा दिला. ह्या अनपेक्षित प्रकारामुळे शेरखान महाराजांना शरण आला. त्याने तो किल्ला, संपूर्ण प्रदेश आणि २००० पगोडे देण्यास तयार झाला. तिथूनच पुढे महाराजांनी मोहिमेची सुरुवात ज्या कारणासाठी केली होती, त्याप्रमाणे आपाल्या सावत्र भावाची, म्हणजेच व्यंकोजी राजांची तिरुपतोरा येथ शिव मंदिरात भेट घेतली. दोघांच तिथे तब्बल आठ दिवस मुक्काम होता. शहाजीराजांचे इतर पुत्र देखील व्यंकोजी राजांसमवेत शिवाजी महाराजांना भेटण्यास आले होते. एकेदिवशी महाराजांनी वारसा हक्काप्रमाणे शहाजीराजांच्या अर्ध्या जहागिरीवर आपला हक्क असल्याचे व्यंकोजींना सांगितले, पण व्यंकोजी राजांनी ही मागणी धुडकावून लावली. त्याच रात्री महाराजांना न सांगता, कोलरेन नदी तराफ्यावरून पार करून तंजावर गाठले. व्यंकोजींच्या ह्या वागण्याने महाराज अचंबित झाले. काही केल्या व्यंकोजीराजे ऐकत नसल्याचे पाहून, कोलरेन नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील ठाणी व प्रदेश महाराजांनी काबीज केले.

इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम तसेच शहाजीराज्यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही. हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

नकाशा क्रमांक 2

ह्या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त मुलुख मिळवला. ज्याला पुढे जिंजीचे राज्य म्हणून ही ओळखले जाऊ लागले. तसेच ह्या मोहिमेत महाराजांनी मोघल, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही सर्वांचाच चोख बंदोबस्त केला. साल्हेरपासून जिंजीपर्यंत एकसलग किल्ल्यांची साखळी निर्माण झाली. ज्याचा प्रत्यय आपल्याला महाराजांच्या मृत्यनंतर दहा वर्षांनी आला. औरंगजेबाने संभाजी राजांची निर्घुण हत्या केल्यानंतर सबंध स्वराज्याला एक विचित्र अवकळा आली होती, पण किल्ल्यांच्या सलग साखळीमुळे अनेक आघाड्या मराठ्यांनी लढवत ठेवल्या. साहजिकच औरंगजेबाची ताकद ह्या निरनिराळ्या आघाड्यांविरुद्ध विखुरली गेली, त्यामुळे औरंगजेबाला स्वराज्यात पूर्णपणे मुसंडी मारता आली नाही. राजाराम महाराजांना जेव्हा रायगड सोडावे लागले, तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये वास्तव्य केले होते आणि तेव्हा जिंजी स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आली होती. यातूनच महाराजांची दूरदृष्टी, लढाईचे मर्म, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते.औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले याचे निर्विवाद श्रेय महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाते.

-: लेखाचे संदर्भ :-
– जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग संदर्भपुस्तिका (१६ डिसेंबर २०१२)
– अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते श्री. चंद्रशेखरजी नेने, श्री. महेशजी तेंडूलकर आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे यांचे भाषण.

पूर्वप्रकाशित :- मिसळपाव दिपावली अंक २०१४

~ सुझे !!