भय इथले संपत नाही….

स्थळ: कांदिवली रेल्वे स्टेशन

वेळ: साधारणतः संध्याकाळचे ५:२५

५:२१ च्या चर्चगेट लोकलची वाट बघत उभा होतो. गाड्या जरा उशिराने धावत होत्या, पण गर्दी नव्हती. मला ६ पर्यंत दादरला पोचायचे होते, आणि बोरिवलीला जाऊन फास्ट लोकल पकडायचा प्रचंड कंटाळा आला होता. शेवटी ट्रेन आली आणि विरुद्ध दिशेची, पण खिडकीची जागा मिळाली. नवीन लोकल असल्यामुळे हवा “खेळती” राहते हे विशेष. ट्रेन रडत रडत सुरु झाली. जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा हे असं घडतंच. माझ्या बरोब्बर समोर प्रथम दर्ज्याचा (मराठीत फर्स्ट क्लास) डबा होता. त्यात मोजुन १०-१२ लोकं बसली असतील, आणि ती पण एकदम विखुरलेली. कोणी आपला करवंदाचे अपडेट्स बघतोय, कोणी फोनवर, कोणी डोळे मिटून गाणी ऐकतंय तर कोणी इकोनॉमिक टाईम्स वाचत आहेत. नेहमीप्रमाणेचं दृश्य, काही नवीन नाही म्हणा यात. 🙂

जशी ट्रेन सुरु झाली, तसे तीन मित्र हसत-खिदळत जागेवर बसायला आले. माझ्या बरोब्बर समोर असलेल्या प्रथम दर्ज्याचा जागा पूर्णपणे रिकाम्या होत्या. ते तिघे तिथे येऊ लागले, आणि अचानक थांबले. थोडी कुजबुज झाली त्यांच्यात आणि डब्याच्या एकदम मागच्या दरवाज्यात जाऊन उभे राहिले. मी म्हटलं तिथे घाण वगैरे असेल, म्हणून ती लोकं बसली नाहीत. मी त्यांच्याकडे बघत राहिलो, आणि मालाड आल्यावर ते तिघे घाईघाईने उतरले आणि फलाटावर जाऊन उभे राहिले. मालाडमध्ये दोघे जण ट्रेनमध्ये चढले आणि ते दोघे त्याच जागेच्या दिशेने वळले, कारण दोन खिडकीच्या हवेशीर जागा त्यांना सोडवल्या नसाव्यात. दोघेही दोन खिडक्यांना एकदम अवघडून बसले होते, आणि समोर असलेल्या रिकाम्या जागेकडे बघत होते.

हे सगळं मी दुसऱ्या दर्जाच्या डब्यातून (मराठीत सेकंड क्लासमधून) बघत होतो. मला वाटलं कोणी बेवडा वगैरे झोपला असावा तिथे. दोघांपैकी एक जेमतेम माझ्या वयाचा मुलगा होता आणि दुसरा कोणी तरी मारवाडी का भैय्या (पुढे टक्कल आणि मागे थोड्या केसांची वेणी बांधलेली) साधारण चाळीशीच्या आसपास. मी त्या मुलाला खुणेने विचारले, काय झालं? त्याने कसतरी जबरदस्ती हसत खुणेनेच उत्तर दिले, इथे एक बॅग आहे. त्याची एकूणच तंतरली होती, आणि मारवाड्याची पण. तो जरा घाबरत घाबरत दरवाज्याजवळ गेला आणि तिथे लावलेली पोलिसांची नोटीस बघू लागला. कदाचित तो नंबर शोधत असावा. तो मुलगा माझ्याकडे बघत होता, माझ्या बाजूला बसलेल्या दोघांना हा प्रकार कळला. सगळे उठून उठून डोकावू लागले त्या डब्यात. तितक्यात ट्रेन थांबली, साला ३ मिनिटं झाली पण गोरेगाव आलं नव्हतं.

आता त्या डब्यात पण खळबळ उडाली, सगळे मागे सरकू लागले. डब्याच्या विरूध्द बाजूला एकवटू लागले. इथे तो मारवाडी, तो मुलगा आणि एक हौशी गृहस्थ होता. एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी होती, आणि त्यात एक काळ्या रंगाची अजून एक पिशवी होती. मी त्या मुलाला म्हणालो, तुमच्या त्या बाजूला लेडीज डब्बा आहे, तिथे हवालदार असेल. त्याला आवाज दे. तो नुसता जबरदस्ती हसला आणि कपाळावरचा घाम पुसत दरवाज्याकडे त्या मारवाड्याकडे जाऊन उभा राहिला. इथं तो हौशी माणूस पिशवी बघायला पुढे सरसावला, तर त्या मारवाड्याने त्याला हटकलं. बॅग मत छुना, बम हो सकता हैं. तो हौशी माणूस त्या पिशवीसमोर बसून राहिला, आणि आता डोकवायचा प्रयत्न करू लागला.

तो हिमतीने म्हणाला, “फेक देता हुं बाहर”

त्यावर तो मारवाडी म्हणाला, “तू थैली उठाया, और प्रेशर निकल गया तो बम फट गया तो…रेहने दे”

यावर तो हौशी माणूस, “मरेंगे तो सिर्फ तीन जन ना?”

मायला आम्ही त्या पिशवीला खेटून पलीकडच्या बाजूला असलेल्या लाकडी बाकावर बसलो होतो, आमची काही गणतीच नाही का? असा विचार मनात तरळून गेला. असो…!!

ट्रेन अजून थांबली होती, मी आपला मोबाईल हातात फिरवत तिथे काय होतंय ते बघत होतो. शेवटी तो हौशी माणूस चवताळून उठला आणि त्याने ती बॅग बाहेर भिरकावून दिली. काही झालं नाही, तो हसत जागेवर जाऊन बसला. मारवाडी आणि तो तरुण मुलगा आत्मविश्वासाने पुन्हा जागेवर येऊन बसले. त्या मुलाने परत माझ्याकडे बघितले आणि हुश्श्श करत हसला. 🙂 🙂

मला आधी वाटलं काय लोकं घाबरतात यार, साधी पिशवी ती. कोणी तरी विसरलं असेल…. पण क्षणात जाणवलं की माझ्या हातापायांना सुद्धा घाम आलाय. कपाळावरून घाम ठिबकत आहे. ११ जुलै २००६ साली मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. एकदम सुन्न झालो. मुंबईकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात, हे असे क्षण येणं क्रमपात्र आहे (संदर्भ – बडे बडे शहरो मैं, छोटी छोटी बातें होती रेहती है) आणि मुंबईकरांकडे पेश्शल स्पिरीट आहे हे वेगळे सांगणे न लगे. 😦

मी त्या हौशी माणसाचे आणि देवाचे मनोमन आभार मानले. गोरेगाव आलं, लोकांच्या झुंडी डब्यात शिरल्या आणि एका क्षणात डबा भरून गेला. ते शांत वातावरण मोबाईल, गप्पा ह्यांनी भरून निघालं आणि दिलाला बरं वाटलं. दादरला उतरलो आणि दीपक म्हणाला कबुतर खान्याला ये. तिथे पोचलो, आणि आपसूक पावले जड होत गेली. मनात ट्रेन बॉम्बस्फोटाचे विचार सुरु होतेच आणि कबुतर खान्याला गेल्यावर्षी १३ जुलैला इथे बॉम्बस्फोट झाला होता, पण आज त्याच्या काही खुणा शिल्लक नव्हत्या. मी त्या पूर्ण चौकाला एक फेरी मारली, आणि तितक्यात दीपकने आला…अनघाच्या घरी पोचेपर्यंत मनात विचारांचा कल्लोळ सुरु होता, म्हटलं काय साला आयुष्य आहे आपलं. आज वाचलो म्हणून देवाचे आभार मानायचे आणि आहे तो दिवस ढकलायचा? कधीपर्यंत? 😦 😦

जाता जाता एका स्टुपिड कॉमन मॅनची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही…

– सुझे !!!

पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !!

पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !! 

मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम…
हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम…
बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम…
तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम…
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुंबईकरांना सलाम…
सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्‍या सुरक्षा यंत्रणेला सलाम…
कोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम…
सीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम…
शहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम…
जाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्‍या लास्ट बुलेटला सलाम…
हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम…
त्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम…
मुंबईवर हल्ला करणार्‍या पाकिस्तानला सलाम…
पुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्‍या आपल्या नेत्यांना सलाम…
हल्लेखोर आम्ही नव्हेच म्हणणार्‍या त्यांच्या नेत्यांना सलाम…
हल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्‍याला मीडीयाला सलाम…
त्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम…
वर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्‍या प्रत्येकाला सलाम…
कोरडे अश्रू ढाळणार्‍या लोकांना सलाम…
शहीदांच्या पराक्रमांचे बॅनर लावणार्‍या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम…
कसाबला जिवंत पकडणार्‍या पोलिसांना सलाम..
त्याला पोसणार्‍या आपल्या सरकारला सलाम…
त्याला फाशी देणार्‍या आपल्या न्यायदेवतेला सलाम…
त्याला सुधारू द्या असा म्हणणार्‍या मानवाधिकार समितीला सलाम..
बॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्‍यांना सलाम…
मृतांचे फोटो पुन्हापुन्हा प्रदर्शित करणार्‍या वृत्तपत्राला सलाम..
पोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्‍याला सलाम..
उद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्‍याला सलाम…
फेसबुकवर स्टेटस टाकून श्रद्धांजली देणाऱ्याला सलाम…
कमीत कमी शब्दात जास्त सांगून जाणारे ट्विट करणाऱ्याला सलाम…
कॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
ज्यांना सलाम करायचा राहिला त्या सगळ्यांना सलाम..
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..

 सलाम तुम्हा सर्वांना सलाम…  सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!!

रिझवान चाचा – भाग अंतिम

रिझवान चाचा – भाग पहिला

इम्रानचं ऑफिस सुरु झालं, चाचा आपलं पोरगा मार्गी लागला म्हणून खूप खुश असतात. जग्याकडे इम्रानचं कौतुक करताना, त्यांना शब्द सापडत नव्हते आणि जग्या डोळे भरून ते बघत होता. कितीतरी वर्षांनी स्वतःच्या पोरामुळे, ह्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला होता त्याने…

=================================================

होता होता ५ महिने झाले इम्रानचं ऑफिस सुरु होऊन, पण चाचा उदास होते. त्यांचा धंदा खूप कमी झाला होता, गिऱ्हाईक मिळेनासे झाले होते. त्यांना पैश्याची कमी नव्हती, पण पिढीजात धंदा बुडताना त्यांना बघवत नव्हता. काही झालं तरी ते वखार बंद करायच्या विरुद्ध होते. इम्रान गेली दोन वर्ष त्यांच्या मागे लागला होता, विकून टाका ही जागा बिल्डरला आणि इथे मोठा टॉवर बांधूया, पण नाही चाचांना ते मान्य नव्हते. त्यांना इम्रानचे ते शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते. रात्रीची झोप उडाली होती, दिवाळी एका दिवसांवर येऊन ठेपली होती. चाचा रात्रभर जागेच होते. शेवटी वैतागून ३-३:३०च्या सुमारास ते उठले आणि खोलीत फेऱ्या मारू लागले. सहज त्यांनी बाहेर डोकावलं. इम्रानच्या ऑफिसबाहेर खूप गर्दी दिसली. दोन मोठे टेंपो, चार-पाच गाड्या, २०-२५ माणसं असा लवाजमा होता. त्यांना वाटले आपण जाऊन बघुया काय झालं, पण पोरगा रागावेल म्हणून तिथेच खोलीत बघत उभे राहिले. इम्रान आणि प्रथमेश खूप घाईघाईने बोलत होते आणि त्या लोकांना काही तरी देऊन निघायला सांगत होते. चाचा विचार करत होते, इतक्या सकाळी सकाळी ही लोकं काय करतायत? पण कुठल्यातरी जागेवर काम करणारी मंडळी असतील म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, आणि आरामखुर्चीत शरीराला झोकून दिलं.

कळलंच नाही त्यांना की गाढ झोप कधी लागली ते, सकाळी जग्या त्यांना उठवायला आला.

“चाचा आज धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस. आज आणि उद्या धंदा बंद असेल. आईने पणत्या विकायला आणल्या आहेत. तिच्यासोबत जाईन मी मार्केटला. तेव्हढीच तिला मदत होईल माझी. तुमच्यासाठी हे चार दिवे आणले आहेत. संध्याकाळ झाली, की अंगणात लावा. लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी घरात येईल.”

चाचा – “तुझा खरंच विश्वास आहे यावर? मी विचार करतोय ही वखार कोणाला तरी चालवायला देऊ भाड्याने… ”

“विश्वास आहे आणि तुमचा पण बसेल. तुम्ही कोणाचं वाईट नाही नं केलं, तर देव पण तुमचं काही वाईट करणार नाही. वखारीला मागणी कमी आहे मान्य आहे, पण तुम्ही ती दुसऱ्याच्या हवाली करावी हे मला पटत नाही”

“ह्म्म्म्म, तुझा बाप पण हेच बोलायचा मला.. बिचारा लवकर सुटला. असो, जा तू…”

=================================================

संध्याकाळी सहाच्या सुमारास रिझवान चाचांचा एक कारागीर धावत पळत आला…

“मालिक ओ मालिsssक…. किधर हैं आप… मालिक..”

“क्या हुवा? मैं दिये जला रहा था… जग्या आयेगा तो मुझे दाटेगा… आज दीपावली हैं नं. तू बोल, क्या मुसिबत आयी तुझ पें?”

“मालिक, अल्ला का केहर हो गया.. पुरे शहर मैं धमाके हुये हैं..”

“या अल्लाह.. ये कैसे घडी हैं, आज तो त्योहार का दिन और ऐसी आपदा?”

“मालिक, हजारो जाने गयी और उसमें.. उसमें…”

“उसमें उसमें मैं क्या? ठीक सें बोल…. इम्रान ठीक हैं नं?”

“मालिक, इम्रान की तो कोई खबर नही, पर जगदीश अल्लाह को प्यारा हो गया.. उसने उसकी अम्मी को घर भेज दिया, आपको प्रशाद देने कें लिये.. और मार्केट मैं…:(”

(चाचा एकदम थंडगार पडतात) ” या अल्लाह… उस नन्ही जान का क्या कसूर था, मुझे उठा लिया होता” (रडत रडत छाती बडवायला लागतात..)

“मालिक.. मालिक संभालो अपने आप को… आपको खुदा का वास्ता”

“किस खुदा का वास्ता दे रहे हो, जो मेरे बेटे जैसे जग्या को मुझसे दूर ले गया…नफरत हैं उसासे मुझे, नफरत हैं..”

=================================================

त्यादिवशी रात्री रिझवान चाचांचा डोळ्याला डोळा लागला नाही, इम्रान मित्राकडे थांबतोय म्हणून फोन आला होता बस्स. चाचा एकटेच आपल्या खोलीत आरामखुर्चीत बसून, छताकडे टक लावून बघत होते. त्यांची नजर शून्यात हरवली होती. त्यांना वाटलं एक मस्त ग्लास दारू पिऊन नशेत हरवून जाऊ, पण जग्याला ते आवडतं नसे म्हणून त्यांनी बाटली तशीच ठेवून दिली. काय करावे त्यांना सुचत नव्हते. रोज तो पोरगा सकाळ-संध्याकाळ त्यांच्या घरात हक्काने फिरत असे, काय हवं काय नको ते बघत असे. आज तो आपल्यात नाही, कसं पचवणार हे. त्याच्या आईने कोणाकडे बघावं. तिचं तर कोणीच नाही या जगात. विचार करून करून त्याचं डोकं भणभणायला लागलं. त्यांनी झोपेची गोळी घेतली आणि खुर्चीत पडून राहिले. सकाळी ९ च्या आसपास त्यांना जाग आली. इम्रान कोणाशी तरी फोनवर बोलत होता. चाचांनी इम्रानला आपल्याकडे बोलावले…

“बेटा, तुला माहित आहे का, आपलं जग्या आता ह्या जगात नाही. कालपरवापर्यंत घरभर फिरणारी ती पावलं परत दिसणार नाहीत”

“पता हैं अब्बा, मोहसीन ने बताया. बहोत बुरा हुआ..”

“त्याच्या मर्जीसमोर कोणाचं काही चालत नाही… अच्छा हुआ तुने फोन कर दिया. मुझे बहोत फिक्र हो रही थी, पर तू कहां था इतने देर?”

“अब्बा, मित्राकडे होतो माहीमला, नवीन जागेच काम बघायला गेलो होतो आणि मग हे असं झालं, मित्राकडेच थांबलो रात्री”

“अच्छा…”

“खूप लोकं गेली, अल्लाह उन्हे जन्नत बक्शे, चलो अब्बा बहोत काम पडा हैं”

“अरे आज तो जग्या के घर चल…”

“अब्बा, तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार. एक तर आता कुठे धंद्यात जोम बसतोय आणि तुम्ही…”

“ठीक आहे…ठीक आहे… जा तू”

=================================================

रिझवान चाचा जग्याच्या आईचे सांत्वन करून घरी येत असताना, ५-६ लोकं आपल्या घरात शिरताना दिसतात. ते लगबगीने घरात जातात. इम्रानच्या ऑफिसमधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत असतो. दोन जाडसर लोकं साहेब लोकं, इम्रानची पाठ थोपटत असतात. रिझवान चाचांना आपल्या मुलाचा गर्व वाटतो, लेकाने नक्कीच मोठं काम केलंय. म्हणून तर ही साहेब मंडळी घरी आली आहेत त्याचं कौतुक करायला. ते त्याचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करतात.

तो साहेब म्हणत असतो,”इम्रान तुने बहोत बेखुबी सें अपना काम किया हैं. अल्लाह ताला तुम्हे बहोत तरक्की दे.”

“क्यों शरमिंदा कर रहे हो साब, सब आपकी वजह से तो हुआ हैं.”

“खुश रहो… मैने सुना तुम्हारा कोई नजदिकी रिश्तेदार गुजर गया इस ब्लास्ट मैं..”

“नही नही..कोई नही.. अब्बा का एक नौकर मर गया इसमें”

“अच्छा… ठीक हैं. जनरल तुम्हारे काम सें बहोत खुश हैं. तुम्हे इनाम मैं ये दस करोड रुपये भेजे हैं.” (एक मोठी बॅग इम्रानकडे सरकवतो, इम्रान हात मिळवतो)

इकडे रिझवान चाचांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, आपल्या पोराने इतक्या लोकांचे जीव घेतले आणि त्याला त्याचे काहीही वाटत नाही. तो बेशरमपणे फिरतोय जगभर. स्वतःची कीव वाटली त्यांना. काय करावं सुचत नव्हते. कोणा एका माणसाचे आयुष्य संपवण्याचा अधिकार देवाने आपल्याला कधी दिला? धर्माच्या नावाखाली लोकं राजकारण करून मोकळे होतात, पण त्याचे परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागतात. काय करायचं अश्या धर्माचं? आपल्या खोलीत डोक्याला हात लावून बसले होते. डोकं बधीर झालं होत, आपल्या संस्कारात काय कमी पडलं आणि अशी औलाद निपजली आपल्या पोटी असा अल्लाहला वास्ता देत होते. राहून राहून त्यांना जग्याच्या प्रेताजवळ धायमोकलून रडणारी ती आई दिसतं होती. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा थांबायचं नावं घेत नव्हत्या. मध्यरात्री उशिरा गपचूप ते जग्याच्या घराजवळ गेले आणि तिथे एका बॅगेत आपली आजवरची मिळकत ठेवली. माहित होत त्यांना ह्याने जग्या परत येणार नाही, पण… पण त्या मातेला कोणासमोर हात पसरायला लागू नये म्हणून त्यांनी …. तिथे ओसरीवर शांत बसले थोडावेळ, तिथून जग्याची चहाची टपरी दिसत होती. एकदम गिऱ्हाइकांची गर्दी सांभाळणारा जग्या डोळ्यासमोर आला. त्यांनी डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि घराकडे चालू लागले. इम्रानच्या ऑफिसमध्ये जोरजोरात गाणी सुरु असल्याचा आवाज आला.

चाचा आत डोकावून बघतात, इम्रान नशेत एकदम टून् झालेला असतो. बोलता येत नव्हती, पण गाणी बोलायचा प्रयत्न करत होता. त्याचं असं हे रूप बघून चाचांना राहावलं नाही, त्यांच्या डोळ्यात रागाने रक्त साकळलं होतं. क्षणात त्यांनी बाजूला पडलेली लोखंडाची शीग उचलली आणि त्याच्या डोक्यात मारली.

“मर साल्या मर… तुला ह्या दिवसासाठी नव्हता मोठ्ठा केला… तुझी अम्मी वर रडत असेल. का केलंस तू असं? काय मिळालं तुला हकनाक लोकांना मारून?”

(इम्रान वेदनेने कळवळत होता) “अब्बा, मुझे अस्पताल ले चलो. आप की कुछ गलतफैमी हुयी है. हमें बहोत पैसा मिलेगा. हम अमीर होंगे.. मैं आप को सब बताता हुं.. मुझे ले चलो.. अ ssss ब्बा”

“या अल्लाह, क्या करुं इस पापी का. अब भी इसे अपने गलती का एहसास नही हो रहा”

असं बोलून त्यांनी जोरदार घाव घातला आणि इम्रानचा देह शांत झाला. ते लहान मुलासारखे रडत बाहेर आले. आपल्या वखारीवर नजर फिरवली, आजवर बापदाद्यांनी केलेली मेहनत त्यांच्या समोर होती.. त्यांनी किचनमधून एक कॅनभरून रॉकेल आणलं आणि वखारीच्या लाकडाच्या ढिगांवर रितं केलं. काडीपेटी पेटवून, त्या ढिगावर फेकली. संपूर्ण वखार सुं सुं सुं करत पेटली, त्या आगीच्या प्रकाशात चाचांचा चेहरा शांत भासत होता. ते शांतपणे आपल्या खोलीत गेले, आणि स्वतःला गळफास लावून आपले जीवन संपवले…

एका आईच्या मुलाच्या हत्तेचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं…एका आईच्या मुलाच्या हत्तेचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं !! 😦 😦

=================================================

– समाप्त –

पूर्वप्रकाशित मोगरा फुलला दिवाळी अंक २०११

– सुझे !!!