नमस्कार मंडळी…
आज अचानक हा ब्लॉग बेडकासारखा वर आल्यासारखा दचकू नका. माहितेय गेल्या संपूर्ण वर्षात माझ्याकडून लिखाण झालेले नाही…म्हणजे अगदी ८-९ महिने पार कोरडेच गेलेत ब्लॉगवर. म्हटलं तर लिहायला खूप सारे आहे….होते….पण प्रचंड कंटाळा, त्यात हापिसात वाढलेली मजुरी आणि मुजोरी. अगदी कोंडीत सापडल्यासारखी अवस्था झालीय. असो..आता काय तेच तेच रडगाणे गात बसणार.
खूप सारे मराठी ब्लॉग्स ओस पडलेत त्यात माझी एक भर होती असे मानू. आता पुन्हा ब्लॉगकडे वळण्याचे कारण एकच, स्वतःने ठरवून स्वतःसाठी काढलेला वेळ. काहीबाही मनाला येईल ते खरडत राहायचे. कोणी वाचले तर वाचले नाही तर नाही. मागे महेंद्रकाकांनी ब्लॉगचे आयुष्य याबद्दल एक मस्त लेख पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी निरनिराळी कारणे दिली होती ब्लॉग सुरु राहण्याची. मी कुठल्या गटात मोडतो हे त्या पोस्टवर नाही सांगू शकलो अजून… पण तो विचार करता करता दुर्दैवाने त्यांच्या ब्लॉगवर पुढचा लेख थोडी विश्रांती असा आला होता. 😦
प्रत्येकाची ब्लॉग सुरु करायची कारणे वेगळी आणि तो तसाच नियमित न सुरु ठेवण्याचीही. सुरुवातीची तीनव र्ष अगदी न चुकता महिन्याला दोन-तीन लेख पोस्ट करायचा मी प्रयत्न करत होतो. तसा नियम करून घेतला होता. आपण आपल्या आनंदासाठी लिहावे. कोणाला आवडले तर ठीक आणि नाही आवडले तरी ठीक… पण गेल्या वर्षात काही जमले नाही. वाटलं हा वेळ बाकी ऑफिस आणि घरकामासाठी द्यावा, पण छे डोक्यावरचा ताण तसूभरही कमी झाला नाही….हो केस मात्र कमी होत गेलेत विचार करून करून. 😉
म्हणजे अगदी आजच नाही गेले काही दिवस विचार करतोय की ह्या सगळ्या प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टींच्या गराड्यात स्वतःच कुठे तरी हरवून बसलोय, की बाहेर पडायची इच्छाच मरून गेलीय. हेच आयुष्य आणि आता आयुष्य ह्यातच रमायचं. जे काही छंद होते म्हणजे लिहिणे, वाचन, भटकणे आणि खादाडी, यासाठी वेळ देऊच शकलो नाही ह्या सगळ्या रामरगाड्यात. आता ह्यात बदल करणे नितांत गरज आहे आणि ती वेळ आज आलीय 🙂 🙂
जास्त लांबण लावत नाही….. आज हा ब्लॉग सुरु होऊन चार वर्षे उलटली… हो चार वर्ष. कळालेच नाही ह्या छंदाचे, एका सवयीत रुपांतर कधी झाले होते. तुम्हाला ह्या ब्लॉगच्या निमित्ताने काय काय लेख वाचावे लागलेत ह्याची कल्पना मला आहे. 😉
खूप चांगल्या-वाईट काळात ब्लॉगर्स मित्र…नाही नाही.. मित्र जे ब्लॉगर्स आहेत ते ( 🙂 ) सोबतीला होते आणि आजही आहेत, ही भावना फार फार सुखद आहे. तुम्ही वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले नसते तर मी ब्लॉग लिहिणे कधीच बंद केले असते. जे झाले ते चांगलेच झाले असे म्हणूया. इतकावेळ ह्या छंदासाठी देऊ शकलो आणि तो वेळ सार्थकी लागला त्यातच सगळे आले. आता सर्व मित्रांनी जरा लेखणी परत उचलावी आणि ब्लॉगवर लिहायला सुरुवात करावी. प्लीज…प्लीज !!
ह्या वर्षात ब्लॉगवर सतत लिखाण करण्याचा प्रयत्न करेन आणि तो तुम्ही इमानेइतबारे झेलावा अशी नम्र विनंती. _/|\_
तुमचाच,
सुझे 🙂 🙂