द्रोहपर्व – एक विजयगाथा

इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो. आजवर या इतिहासाने आपल्याला बरंच काही शिकवलंय, अजूनही शिकवतोय आणि पुढेही शिकवत राहील. १४ जान्युअरी १७६१ ला पानिपतला झालेला महासंग्राम कोणीही विसरू शकत नाही. मराठ्यांच्या तब्बल सव्वा लाख बांगड्या त्या संग्रामात फुटल्या. सदाशिवराव भाऊंच्या नैतृत्वाखाली मराठे पानिपतात त्वेषाने लढले आणि तेही कोणाबरोबर? धर्माचे रक्षण करण्यासाठी चिथावून आणलेल्या पराक्रमी अब्दालीशी. त्यावेळी भाऊ हे एका धर्माविरुद्ध नाही, तर देशहितासाठी लढले. त्यावेळी त्यांनी तमाम मराठा सरदारांना एकजुटीचे आव्हान दिले होते, पण सगळ्यांनी त्यांची साथ दिली नाही, आणि दिली असली तरी ऐनवेळी त्यांनी पळ काढला होता. भाऊंना ह्या गोष्टीचे शेवटपर्यंत शल्य वाटत राहिले, पण संपूर्ण हिंदुस्थानाची सुरक्षेची जबाबदारी मराठ्यांनी स्वतःवर घेतलेली होती. त्यामुळे त्यांना मागे हटता येणार नव्हती. अनेकांनी त्यांच्या ह्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, पण त्यांनी जो पराक्रम दाखवला त्यानंतर वायव्येकडून कुठलही परकीय आक्रमण हिंदुस्थानावर झालं नाही.

पानिपतानंतर १७७३ ते १७७९ ह्या काळात मराठा साम्राज्यात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा, लेखक अजेय झणकर ह्यांनी द्रोहपर्व ह्या कादंबरीच्या रूपाने घेतला आहे. ह्या स्पर्धेच्या निम्मिताने, ह्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतोय. आशा आहे तुम्ही गोड मानून घ्याल. पुस्तक परीक्षण स्पर्धेची घोषणा झाली, त्याचवेळी नेमकं हे पुस्तक वाचत होतो. सुरुवातीला ह्या पुस्तकावर लिहिणे आपल्यास जमणार नाही म्हणून दुसरे पुस्तक वाचायला घेतले आणि ते संपवलेदेखील. पण वाटलं नाही त्यावर लिहावं…म्हणून परत द्रोहपर्व वाचून काढलं आणि ठरवलं आपल्यापरीने पुस्तकाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. ह्या पुस्तकावर आधारित लवकरचं एक आंतरराष्ट्रीय सिनेमा निर्मितीच्या मार्गावर आहे (सिनेमा युद्धावर नाही आहे, त्यातील एका प्रेम कथेवर आहे – Singularity). तर मग सुरु करूया थोडक्यात ओळख, एका अभूतपूर्व विजयगाथेची.

पानिपतच्या लढाईनंतर काहीकाळ मराठ्यांची देशावरची बाजू साफ उघडी पडली आणि मराठ्यांवर चोहोबाजूंनी लहानसहान आक्रमणे होऊ लागली. निजाम तर संपूर्ण मराठेशाहीला संपवायच्या हिशोबाने चालून आला. मराठ्यांची देवस्थाने, तीर्थक्षेत्र यांची निजामाने पार विटंबना सुरु केली आणि ह्यामुळे निजामाकडे सेवेत असलेले चव्हाण, जाधव असे ताकदीचे मराठा सरदार नाराज झाले. जेव्हा निजाम पुण्याच्या आसपास उरळीस आला, तेव्हा निजामाविरुद्ध उठाव करून, त्याचा कायमचा बिमोड करायच्या हेतूने सारे मराठे सरदार एकत्र झाले. ह्या स्वारीची जबाबदारी राघोबादादांकडे होती. सर्व मराठ्यांनी मिळून ह्या मोगलाचा कायमचा निकाल लावावा असा युद्धाचा आवेश होता. निजामाने घाबरून तहाची बोलणी सुरु केली होती. ती राघोबादादांनी साफ झिडकारून लावावी, अशी सर्वांची इच्छा होती… पण.. पण राघोबादादांनी परस्पर सुलूख घडवून आणला आणि निजाम वाचला. ह्या अवसानघातामुळे अवघ्या पेशवाईस संताप आला, पण करणार काय?

पेशवाईची राजगादी त्यावेळी माधवरावांकडे होती. त्यांनी ही परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली होती. राघोबादादांना वाड्याच्या बदामी महालात बायकोसोबत नजरकैदेत ठेवले गेले. पुढे काही महिन्यांनी आजारपणामुळे माधवरावांचे निधन झाले आणि मग राजगादीची जबाबदारी त्यांच्या धाकट्या भावावर. नारायणरावांवर येऊन पडली. नारायणराव जसे ह्या राजगादीसाठी वयाने लहान (वय वर्ष १७), तसेच स्वभावाचे खूप कच्चे. त्यामुळे त्यांचे कामकाजात जास्त लक्ष नसायचे. कारभारी नाना फडणीस हे सगळी काम बघायचे आणि नारायणराव त्यांच्या हो ला हो म्हणायचे. नाना फडणीस मात्र अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व होतं. त्यांचा सर्व कारभारावर वचक असायचा आणि त्यामुळे मोठ्ठे मोठ्ठे सरदारदेखील त्यांना बिचकून असायचे. त्यांच्या निव्वळ आगमनाने मोठे सरदार ताठरून जायचे. त्यांच्या कारभारात कमालीची एकसूत्रता, गोपनीयता आणि शिस्त असायची. नानांना साधी तलवार किंवा भाला चालवता येत नसे, पण निव्वळ तल्लख बुद्धीच्या जोरावर ते हा सर्व कारभार सांभाळत असे. वास्तविक पाहता राघोबादादांना (नारायणरावांचे काका) राजगादीवर बसायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक वाईट मार्गांचा अवलंबही केला होता, पण ते चुलते असल्याने त्यांना तो मान मिळत नव्हता आणि नारायणराव हे राजगादी मिळवण्यामध्ये असलेला त्यांचा शेवटचा अडसर. तो अडसर कसा दूर करता येईल ह्यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे, पण नाना असताना त्यांना ते कधी तडीस नेता येणार नव्हते. नानाचे निव्वळ अस्तित्व त्यांना भीतीदायक वाटत असायचे.

नंतर शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात चक्रे फिरू लागली. राघोबादादांच्या निवडक लोकांमध्ये पत्रव्यवहार सुरु झाले. सणासुदीचा काळ असल्याने शहरात आणि वाड्यात सैन्याचा पहारा जेमतेम होता आणि नेमकं त्याचवेळी नाना काही कामानिम्मित लोहगडावर मुक्कामी होते. गणेशोत्सव असल्याने, वाड्यावर असलेल्या सगळ्या चौक्या गारद्यांच्या हवाली झाल्या होत्या. गारदी सैनिक पेशवाईच्या लहरीपणाला कंटाळले होते, त्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने ते असंतुष्ट होते. शेवटी राघोबादादांनी एक शेवटचे पत्र लिहिले आणि त्यात त्यांनी सर्वांना आदेश दिला होता की, “नारायणरावास धरावे” पण राघोबादादांच्या कपटी बायकोच्या मनात काही वेगळेच होते. आनंदीबाईनी “ध” चा “मा” करून, प्रकरणाला वेगळीच कलाटणी दिली. श्रींच्या विसर्जनाच्या आदल्यारात्री गारद्यांनी शनिवारवाड्याचा ताबा घेतला आणि नारायणरावांची अमानुष हत्या केली. श्रीमंतांच्या देहाची अक्षरशः खांडोळी केली. तुळजा नामक सेवेकरणीने ह्या खुनाच्या आदल्यादिवशीच, नारायणरावांना सावध करायचा प्रयत्न केला होता, पण नारायणरावांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि आज जीवानिशी गेले. काकाने राजगादीच्या लोभापायी पुतण्याचा जीव घेतला.

तुळजाचे बाबा धनाजी नाईक नानांकडे जासूद म्हणून काम करत असे. त्यांनी स्वत: आपल्या मुलीला संपूर्ण युद्धकौशल्य शिकवलं होतं आणि ती त्यांच्या देखरेखीत एकदम तयार झाली होती. नानांनी मुद्दामून तिला सुरक्षेच्यादृष्टीने सेवेकरीण म्हणून वाड्यात नोकरीला ठेवलं होतं. जेणेकरून खाश्या स्त्रियांची सुरक्षा चांगल्याप्रकारे करता येईल. ज्या दिवशी नारायणरावांचा खून झाला, त्यावेळी तुळजा नारायणरावांची पत्नी गंगाबाई समवेत होती. गंगाबाई त्यावेळी गर्भवती होत्या, त्यांच्या पोटी भविष्यातला पेशवा होता. त्यांची सुरक्षा करणे हेच तिचं प्रमुख काम होतं, आणि नेमकं नाना लोहगडावर असल्याने, तिला स्वत:चं सगळे डावपेच आखावे लागत होते. ऐन गणेशोत्सवात ग्रहणासारखे वातावरण पुण्यात झाले होते.

खुनाच्या दुसऱ्याच दिवशी राघोबादादांनी स्वत:च्या नावाची द्वाही पुण्यात फिरवली आणि साताऱ्याच्या छ्त्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मागवण्यासाठी पत्र पाठवलं.नाना पेशव्यांच्या वंशात कोणी उरले नसल्याने, तो मान आपसूक राघोबादादांकडे जाणार होता. कोणी काही करू शकलं नाही. सगळे फक्त मनोमन प्रार्थना करू लागले, की गंगाबाईच्या पोटी पुत्र जन्माला यावा आणि मग त्याने पेशवाई राजगादीवर बसावे. तोपर्यंत त्यांच्या जीवाला जपणे जास्त महत्वाचे होते. साक्षात श्रीमंतांचा खून होतो, तिथे गंगाबाई विरुद्ध कपट करणे कठीण नव्हते. पेशवाईची घोषणा करताच, श्रीमंत राघोबादादांनी आपला दरारा आणि पत निर्माण करण्यासाठी, एका मोठ्या मोहिमेची आखणी केली. साबाजी भोसले आणि निजाम एकत्र आल्याने, त्यांचा पाडाव करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ह्या मोहिमेचे आयोजन केले गेले असे कारण सांगितले गेले. सगळे मात्तबर सरदार, ४०-५० हजारांची फौज आणि शनिवारवाड्यातला जवजवळ सगळा खजिना घेऊन ते मोहिमेला निघाले.

त्याचदरम्यान नानांना इंग्रजांची राघोबादादां समवेत इंग्रजांची वाढती उठबस सलत होती. इंग्रज वकील त्यांच्या गुप्तहेर खात्याची एक तुकडी खास इंग्रज, डच ह्या व्यापारी लोकंवर लक्ष ठेवून असायची. त्यामागे नानांचा दूरदृष्टीपणा होता. ही लोकं कधीनाकधी काही तरी गोंधळ घालणार ह्याची त्यांना खात्री पटली होतीच. त्यांच्या मते परदेशातून इथे हिंदुस्थानात येऊन मातीचे नमुने गोळा करणे, मसाले विकत घेणे, त्यांच्या कागदोपत्री नोंदी ठेवणे, स्वत:च्या रक्षणापुरती शस्त्रे बाळगणे आणि रात्री मनोसक्त दारू पिऊन झोपणारी ही लोकं जास्त धोकादायक होती.

इथे रामशास्त्री प्रभूण्यांनी नारायणरावांच्या खुनाची चौकशी सुरु केली आणि मुख्य आरोपी म्हणून श्रीमंत राघोबादादांच्या नावाची घोषणा करून, त्यांना देहांत दंड भर दरबारात सुनावला. त्याच दरबारात राघोबादादांनी पेशवाईची वस्त्रे घेतली होती आणि आपला शिक्का बनवून घेतला. आता मुख्य आरोपी म्हणून घोषित झाल्यावर ते चवताळले. गेल्या कित्येक वर्षापासून ही राजगादी मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छा, आता कुठे पूर्ण झाली होती आणि ती संधी अशी सहजासहजी कशी सोडणार. प्रभूण्यांनी कारभाऱ्यांना शिक्षेची अंमलबजावणी करावी असे सांगितले आणि तोवर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ते दरबारात फिरकणार नाही असे ठणकावून बाहेर पडले.

नानांसमोर पेशवाईच्या वारसाची रक्षा करणे ही प्रमुख जबाबदारी होती. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी गंगाबाई ह्यांना पुरंदरवर हलवले आणि तिथे आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त केला गेला. देवा-ब्राम्हणांना नवस बोलून झाले आणि हे सार सुरु असताना राघोबादादा गतीने पुढे पुढे सरकत राहिले. पगार वेळेवर न झाल्याने सैन्यामध्ये आणि काही सरदारांमध्ये नाराजी होती. त्यांच्याकडे जेमतेम ७-८ हजारांची फौज उरली होती, तरी त्याचा खर्च करणे त्यांना परवडत नव्हते. हरिपंत दादा हे राघोबांच्या हालचालीवर कायम लक्ष ठेवून असायचेच. कधीतरी मध्येच त्यांना गनिमी काव्याचा हिसका दाखवून जंगलात पळून जायचे.

दरम्यान पुरंदरावर सुरक्षित असलेल्या गंगाबाई प्रसूत झाल्या आणि त्यांनी एका तेजस्वी बाळाला जन्म दिला. देवकृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले जो पुढे राजगादीवर बसणार होता आणि त्याचवेळी साताऱ्याच्या छत्रपतींनी राघोबादादांची पेशवाई रद्द केली आणि अवघ्या मराठेशाहीत जल्लोष सुरु झाला. सगळीकडे आनंदोत्सव सुरु झाला. राघोबादादांची सर्व बाजूंनी कोंडी करायचा प्रयत्न नाना करत होते, पण काहीनाकाही कमी पडायचे आणि राघोबादादा त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटून जायचे. हा पाठलाग कित्येक महिने सुरूच राहिला. राघोबादादांनी शेवटचा पर्याय म्हणून इंग्रजांशी बोलणी सुरु केली.

इंग्रजांनी सुरुवातीला हो नाही हो नाही केले, पण त्यांची इच्छा राज्य करण्याची होतीच आणि राघोबादादा आयतेच त्यांच्याकडे मदतीला चालून आले होते. दादांनी पलायन करत करत मदतीसाठी मुंबई गाठली होती. प्रदीर्घ चर्चा आणि वाद झाल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी दादांना मदत करतो असे वचन दिले. त्याबदल्यात इंग्रजांना किनारपट्टी परिसरात असलेले महत्त्वाचे किल्ले जसे वसई, साष्टी आणि युद्धाचा संपूर्ण खर्च देण्याचे कबूल झाले. इंग्रजांनी आपल्या कवायती तुकड्या सज्ज केल्या आणि ते मराठ्यांविरुद्ध लढायला तयार झाले. नानांना ह्या सर्व गोष्टीची कल्पना होतीच आणि अवघ्या मराठी सरदारांनी पुन्हा एकत्र येऊन ह्या इंग्रजांचा पाडाव करावा असे आवाहन केले. ह्या मोहिमेची सर्व सूत्रे पाटीलबाबा म्हणजे महादजी शिंद्यांकडे होती.

इंग्रजांच्या आधुनिक हत्यारांपुढे हे युद्ध मराठ्यांना जरा कठीणच जाणार होते, पण मराठ्यांकडे सैन्य भरपूर होते आणि मुंबई पुण्याची वाट घनदाट जंगलातून आणि दरी खोऱ्यातून होती. त्यामुळे शत्रूला गनिमी काव्या युद्धतंत्र वापरून शत्रूला नामोहरम करायचे आणि त्यांची ताकद कमी करत रहायची अशी योजना होती. इंग्रजांच्या वाटेवर असलेली सर्व खेडी-गावे रिकामी करून त्या सर्वांना चिंचवड परिसरात स्थलांतरित केले गेले. इंग्रजांना आयती रसद मिळू नये, हेच त्यामागचे उद्दिष्ट. उभी पिकं मराठ्यांनी जड अंत:करणाने जाळून टाकली, विहिरी, तलावात विष टाकले आणि इंग्रजांचा सामना करण्यास सज्ज झाले.

कार्ला लेणी परिसरात पुढे वडगावात ही निर्वाणीची लढाई झाली. ही लढाई मराठे जिंकले. इंग्रजांना अगदी कोंडीत पकडून, सपशेल माघार घ्यायला लावली मराठ्यांनी. योगायोगाची गोष्ट म्हणजे हा विजय मकरसंक्रांतीच्या दिवशीच मिळाला. अठरा वर्षापूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी पानिपतावर मराठ्यांच्या घरातल्या बांगड्या फुटल्या आणि १७७९ साली मकरसंक्रांतीच्या दिवशी मराठ्यांच्या घराघरांवर गुढ्या.. तोरणं उभारली गेली…त्याचीच ही कादंबरीमय विजयगाथा.

ह्या युद्ध्याच्या विजयगाथेने ह्या कादंबरीचा शेवट होतो. लढाई कशी झाली ह्यावर सविस्तर मी मुद्दाम इथे लिहित नाही, कारण ते तुम्ही स्वत: वाचून अनुभवायला हवे. अजेय सरांनी ह्या युद्धाचे अतिशय विस्तृत वर्णन ह्या कादंबरीत केलेलं आहे. त्यासाठी अनेक नकाशे आणि इंग्रज दरबारी असलेली कागदपत्रेही सोबत दिली आहेत. ही लढाई इंग्रजांनी इतिहासाच्या पानात दडवून ठेवलेली होती. मराठ्यांच्या ह्या अभूतपूर्व पराक्रमाची ओळख करून देणारी ही कादंबरी नक्की वाचा.

– सुझे !!

( पूर्वप्रकाशित – मीमराठी.नेट पुस्तक परीक्षण स्पर्धा )

MH-02-XA-40X2 – भाग अंतिम

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला

भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

भाग तिसरा – MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

अरुणने रात्री उशिरा केलेले आणि पहाटे केलेले फोन त्यांच्यासाठी एक महत्वाचा दुवा होता. अचानक काहीसे आठवून त्यांनी ऑपरेटरला फोन लावला आणि तपासाला काही तरी दिशा मिळाल्याचे एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तराळले…

इन्स्पेक्टर भालचंद्र रावत जातीने ह्या प्रकरणात लक्ष घालत होते. त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्यादेखील होत्या, पण ही केस त्यांनी अगदी प्रतिष्ठेची करून घेतली होती. जमेल तितके पुरावे आणि माणसांची जबानी ह्यात घेतली गेली. दोन दिवसांनी मुंबईला जाऊन एकनाथची साक्ष घेण्याचे मनसुबे उद्ध्वस्त झाले. कारण चार दिवसांनी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एका खाजगी कार्यक्रमासाठी नागपुरात येणार होत्या. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी आणि त्या जिथे जिथे कार्यक्रमाला जातील, त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. अचानक आलेल्या या जबाबदारीमुळे त्यांच्या तपासातली एकसूत्रता भंग पावली. रस्त्याची गस्ती, संशयित लोकांची धरपकड आणि हॉटेल्सची झडती हीच कामे त्यांच्या मागे लागली.

इकडे मुंबईत बॉबी आणि जयेशभाई आपल्या धंद्यात गुंतले. रोजची गाडीभाडी, बस तिकीट बुकिंग आणि सोबतीला सायबर हे वेळापत्रक सुरु झाले. मध्यंतरी दोन-तीनदा बॉबीने रावतांना फोन केला, पण तो त्यांनी कामात असल्यामुळे कट केला. गाडी जाऊन आता १४-१५ दिवस झाले होते. इतक्या दिवसात गाडी पूर्ण सुटी करून किंवा जशीच्यातशी कोणाला तरी विकली असेल. त्यामुळे पोलिसांचा तपास पुढे जाणार नाही याची त्यांना खात्री पटली. रोज सकाळ-संध्याकाळ जयेशभाई बॉबीच्या ऑफिसात मेरा नुकसान हो गया, कर्जे मैं डूब गया म्हणून रडगाणं गात असे. बॉबीला ते निमुटपणे ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. असे दिवस जात राहिले.

होता होता महिना झाला. सकाळी सकाळी रावतांनी जयेशभाईंना फोन केला. “रावत बोलतोय… दाढी खूप वाढलीय. चारकोपला येतोय दाढी करायला. ” जयेशभाई काही म्हणेपर्यंत समोरून फोन कट झाला होता. जयेशभाईंना काय कळावे सुचले नाही. ते तडक बॉबीकडे निघाले. त्याचं ऑफिस त्याच्या घरापासून अगदी दोन इमारती सोडून होतं. बॉबी ऑफिसमध्ये सिगारेट पीत बसला होता. जयेशभाईंचा असा प्रश्नार्थक चेहरा बघून तो तडक बाहेर आला आणि हातातली सिगारेट फेकून दिली. “क्या हुआ जयेशभाई??”

त्यांनी झालेला प्रकार बॉबीला सांगितला. आता बॉबीदेखील विचारात पडला. बॉबीचा सायबर जिथे होता, त्या इमारतीत एक दुधवाला, एक ब्युटीपार्लर, एक दातांचा दवाखाना, एक किराणामाल दुकान, एक दागिन्यांचे दुकान आणि एक हेअर कटींग सलून होते. सगळे तसे बॉबीला चांगले ओळखायचे आणि त्याला मानायचेसुद्धा. बॉबीने तातडीने रावतांना फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन बिजी आला. त्याने वैतागून फोन कट केला आणि सिगारेट पेटवली.

पाच मिनिटांनी जे दृश्य बॉबी आणि जयेशभाईंना दिसले, त्यावर त्यांचा स्वत: विश्वास बसत नव्हता. डोळे फाडून ते एकटक तिथे बघत राहिले. इन्स्पेक्टर भालचंद्र रावतसमोर एका गाडीत बसलेले आणि ही तीच गाडी जी चोरीला गेली होती. जयेशभाईंच्या उत्साहाला पारावर उरला नाही. ते धावत गाडीपाशी गेले आणि गाडी न्याहाळू लागले. रावत त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, “हो हो तुझीच गाडी आहे.” आणि ते बॉबीच्या दिशेने निघाले. बॉबीशी हात मिळवत, बाजूला असलेल्या खुर्चीवर बसले. मागून एक पोलिसांची जीप आली आणि ती थोडं अंतर ठेवून उभी राहिली. पोलिसांच्या गाडीतून कोणी उतरले नाही, सगळे होते तसेच बसून राहिले. नंतर दोन मिनिटांनी रिक्षातून एकनाथ उतरताना दिसला. तो पूर्णपणे घामाने थिजलेला होता. त्याचा एक गाल लालसर सुजला होता. हाताने गाल दाबत तो बॉबीच्या ऑफिससमोर आला. बॉबीला त्याच्या सुजलेल्या गालाची कहाणी न सांगता कळली होती.

रावत एकदम गडबडीत उठले आणि बाजूला असलेल्या हेअर कटींग सलूनमध्ये घुसले. जीपमधून एक हवालदार उतरून त्या सलूनच्या बाहेर उभा राहिला. रावतांनी बॉबी, जयेशभाई आणि एकनाथला आवाज दिला आणि सलूनमध्ये यायला सांगितले. एअर कंडीशन वातावरणामध्ये ते एका खुर्चीवर जाऊन बसले. सलूनवाल्याने न सांगता स्पेशल दाढीची तयारी सुरु केली. रावतांनी हातातले घड्याळ आणि अंगठी समोर काढून ठेवली. युनिफॉर्मच्या शर्टाची दोन बटणे काढून, त्या खुर्चीत निवांत बसले. सलूनमध्ये अजून दोन कारागीर होते, जे टीव्ही बघण्यात मग्न होते. रावतांना समोरच्या आरश्यात मागे उभ्या असलेल्या तिघांचे चेहरे साफ दिसत होते. दाढीचा एक हात मारून झाला.रावत काहीच बोलले नाही. एव्हाना मागे उभ्या असलेल्या ह्या तिघांची चुळबूळ सुरु झाली. एकनाथने धीर एकवटून विचारले, “साहेब, मी बाहेर थांबू का? मला एसी चालत नाही. लगेच सर्दी होते” रावतांनी समोरच्या आरश्यात काहीसे नाराजीने बघितले, आणि त्यांची आणि एकनाथची नजरानजर झाली. एकनाथ काय समजायचं ते समजला.

दाढी करणाऱ्या पोरालामध्येच थांबवून, रावत मागे वळले, “मग जयेशभाई, तुमची गाडी मिळाली. एकदम सुखरूप. गाडीवर एक साधा ओरखडादेखील नाही. खुश नं?” जयेशभाई तडक पुढे झाले आणि रावतांशी हात मिळवत म्हणाले, ” खूप उपकार झाले, बहोत बहोत शुक्रिया. पर गाडी मिली कहां पें. खुनी पकडे गयें?” रावत नुसते हसले, “मानेने होकार देत, परत दाढी करायला बसले” त्या पोराने तोंडाला फेस लावला आणि वस्तरा घेऊन दाढी सुरु केली. दाढीनंतर आपल्या तुळतुळीत चेहऱ्यावर हात फिरवत त्यांनी पोराला दाढीचे पैसे दिले. आता ते जयेशभाईकडे वळले आणि बोलू लागले..

“मी मुंबईला कालच आलो. जेव्हा आलो तेव्हा तडक एकनाथचं ऑफिस गाठलं. निव्वळ पैश्यासाठी धंदा करणारा हा मनुष्य, त्यामुळे त्याला जिथून फोन आला, त्या नंबर व्यतिरिक्त मला काही सापडले नाही. पण एकनाथने गुन्हा केला होता आणि त्याची त्याला काहीतरी शिक्षा मिळायला हवी म्हणून त्याला पोलिसी हिसका दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, दोन दिवसांपूर्वी अशीच एक गाडी गोराईइथून मिसिंग आहे. हंपीला जातो म्हणून ती गाडी भाड्याने घेतली गेली, पण ती निर्वाचित स्थळी कधी पोचलीच नाही. गाडीची अजून काही माहिती नाही, आणि ड्रायव्हरशी काही संपर्क होत नाही. परवा रात्री त्याने शेवटचा फोन केला… बस्स्स !!! शेवटच्या फोनवरून आठवलं की अरुणने रात्री झोपताना आणि सकाळी निघताना जयेशभाईंना फोन केला होता. त्या फोन रेकोर्डच्या आधारे, जवळ असलेल्या मोबाईल टॉवरमधून कनेक्ट झालेले सगळे फोन आम्ही तपासले. जवळजवळ ७४० फोन नंबर्स आम्हाला मिळाले. सर्वांचा अभ्यास सुरु झाला. प्रत्येक नंबरचा मालक कोण, मालकाची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही ते तपासले. ७४० फोन्स मधून आम्ही ५ संशयित नंबर बाजूला काढले. ४ फोन्स मध्यप्रदेशातले आणि एक मुंबई इथला. फोन रेकॉर्डिंग मिळणे अशक्य असल्याने, आम्ही परस्पर त्या मोबाईलच्या पुढच्या हालचालींवर काही दिवस नजर ठेवून राहिलो.”

“बाकी जरावेळाने सांगतो, पण आधी गाडी कशी मिळाली ते सांगतो. मध्यप्रदेश कोर्टात जेव्हा तपासाची एक कॉपी द्यायला गेलो. तेव्हा कोर्टाच्या आवारात गाडीतच बसून मी आणि माझे सहकारी चहा पीत बसलो. इतक्यात माझ्या गाडीसमोर एक कोरी करकरीत ईनोव्हा येऊन थांबली. नेहमीप्रमाणे माझी संशयी नजर गाडीवरून फिरली. गाडीला MP ची पिवळी नंबर प्लेट होती, त्यामुळे ही ती गाडी नाही म्हणून मी चहा पिऊ लागलो. अचानक काही तरी ओळखीचं बघितल्यासारखं मी गाडीकडे बघितलं. गाडीच्या मागच्या काचेवर एका कोपऱ्यात हनुमानाचा फोटो होता आणि फोटोखाली गुजरातीत लिहिलं होतं जय बजरंग बली !!”

“गाडीच्या ड्रायव्हरकडे चौकशी केल्यावर कळले, की मध्यप्रदेशातले नावाजलेले वकील रामप्रकाश गुप्ता यांची ती गाडी आहे आणि दहा दिवसांपूर्वीच विकत घेतली आहे. रावतांनी गाडीचे पेपर बघितले आणि ते बरोबर होते. हे पेपर बनवणे किती सोप्पं आहे, हेही ते ओळखून होते. गाडीचा मालक वकील असल्याने मी तिथे जास्त चौकशी केली नाही” कोर्टाचे काम संपल्यावर वकील आपल्या गाडीत बसून निघाले आणि मागोमाग आम्ही निघालो. एका निर्जन रस्त्यात त्यांना गाठून वकिलांची पोलिसीतऱ्हेने चौकशी केली आणि त्यात तो वकील भडाभडा ओकला. त्याला स्वतःची बदनामी करायची नव्हती, त्यामुळे त्याने ती गाडी कुठून घेतली वगैरे सांगितले आणि एका तासात आम्ही त्या तिघांपैकी एकाला पकडला आणि बाकी दोघे पळून जाण्यात यशस्वी ठवले. त्या तिघांनी ही गाडी ७ लाखांना विकली होती. गाडी चोरल्यावर पाच दिवसात गाडीचे पेपर बनवून तिचे MP पासिंग करून, ट्रान्सपोर्ट परमिट घेतले होते. वकील साहेबांचे जितके चांगले संबध चांगल्या लोकांशी तितकेच चांगले संबंध गुन्हेगार लोकांशी होते. त्या वकिलाकडून कोऱ्या कागदावर सही आणि शिक्का घेऊन त्याला गाडी हवाली करायला सांगितली. वकिलाच्या माहितीनुसार ज्याला पकडला तो याक्षणी बाहेर गाडीत बसून आहे.”

एकनाथ मध्येच त्यांना तोडत म्हणाला, “मग तो फोन त्यानेच केलेला का?”

रावते गालात हसले, “ज्याने फोन केला, त्या माणसाला गाडीची आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांची माहिती होती. कुठल्या गाफीलक्षणी आपण ती गाडी पळवून नेऊ शकू याचे त्यांनी विशेष प्लान्निंग केले होते. तुला ज्या नंबरवरून फोन आला गाडीसाठी, त्याचं नंबरवर रात्री आणि पहाटे असे एक एक फोन गाडीतून आले. ते फोन चारकोपमध्येच उचलले गेले अशी माहिती आम्हाला मोबाईल कंपनीने दिली. नंतर काही काळाने तो फोन बंद झाला आणि त्याच लोकेशनवर दुसरा फोन डिटेक्ट झाला तोच तो संशयित नंबर मुंबईचा. त्या टॉवरवर तो नंबर लोकेट झाला आणि गाडीतून त्या नंबरवर एक फोन केला गेला. सकाळी ८:३०ल देखील मध्यप्रदेशमधून त्या नंबरवर फोन केला गेला”

“मग तो नंबर कोणाचा??” एकनाथ उत्सुकतेने विचारू लागला..

“तो नंबर इथलाच, ह्या सलूनमधला. हाच तो पोरगा जो त्या टोळीला गाड्यांची माहिती देत होता. धंद्यात नवीन आहेत साले, कळत नाही कोणाशी पंगा घेतलाय त्यांनी.. थोड्याश्या पैश्याच्या मोबदल्यात नवीन गाड्यांची माहिती काढायची आणि मग ती त्या टोळीला कळवायची” हे ऐकताच बॉबीला धक्का मारून तो मुलगा पळून जाऊ लागला, पण बाहेर हवालदाराच्या काठीचा एक फटका बसल्यावर जागच्याजागी विव्हळत बसला.त्याने सगळा गुन्हा कबूल केला आणि २० हजाराच्या मोबदल्यात हे काम केल्याचे सांगितले. लवकर श्रीमंत व्हायची इच्छा हेच गुन्हा करण्यामागे मुख्य कारण होते.

इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आणि तिघेजण बाहेर आले. बाहेर बेड्या घातलेला तो तरुण हमसून रडत होता, आणि हात जोडून माफी मागत होता. रावतांनी त्याच्याकडे तुच्छतेने बघितले आणि शिवी हासडून म्हणाले, “भेट भडव्या पोलीस कोठडीत, नागवा करून ह्या बेल्ट ने फोडतो तुला” एव्हाना रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्याने, रावतांनी हवालदाराला इशारा केला आणि हवालदार पोराला जीपमध्ये कोंबून चारकोप पोलीस स्टेशनकडे भरधाव निघाले. रावतांनी बॉबी, जयेशभाईंचे आभार मानले. एकनाथच्या सुजलेल्या गालावर हलकेच चापटी मारत म्हणाले, “मी कधीतरी गाडी हवी म्हणून खोटा फोन करेन आणि जर तू आता केलेला प्रकार पुन्हा केलास, तर माझा हात आहे आणि तुझे गाल आहेत… समजल??” एकनाथने शरमेने होकारार्थी मान हलवली.

रावत पोलीस स्टेशनकडे निघता निघता मागे फिरले, “Bobee, Can I have one smoke?” बॉबीने संपूर्ण पाकीट त्यांना देऊ केले, “नको नको, एक पुरेशी आहे. नवीन बाबा झालोय. बायकोला कळलं तर माझ्या बाळाला मला जवळ घेऊ द्यायची नाही. सिगारेट सोडायची आहे. तू पण सोड…. चल Byeee”

!! समाप्त !!

तळटीप – ह्या सर्व प्रकारानंतर जयेशभाईंनी पनवती गाडी विकायची ठरवली आणि ती गाडी बॉबीने विकत घेतली. गाडी पळवणाऱ्या टोळ्यांना ही गाडी म्हणजे एक चपराक होती आणि त्याचा बदला म्हणून ह्या गाडीवर आजही विशेष पाळत असते. पण गाडी बॉबीच्या ताब्यात आहे आणि तो ती कुठल्याही अनोळखी लोकांना देत नाही. हल्लीच नाशिकला जाताना बॉबीकडे गाडी मागितल्यावर त्याने विश्वासाने ही गाडी मला दिली. तेव्हा मला भाग तीन आणि चारचा सविस्तर वृत्तांत राजूकडून कळला. तरी भाग तीन आणि चार हे बऱ्यापैकी काल्पनिक आहेत. आजही राजू दिमाखात आणि निर्धास्तपणे ती गाडी चालवतोय आणि चालवत राहील ह्यात शंका नाही….!!

— सुझे !! 🙂 🙂

MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

सर्वप्रथम कथेचा हा भाग पोस्ट करण्यास झालेल्या विलंबासाठी दिलगिरी व्यक्त करतो. काही वैयक्तिक कारणांमुळे लिहिणे शक्य झालं नाही आणि उगाच घाईघाईने कथा संपवायची नव्हती. दरम्यानच्या काळात अनेक मित्र-मैत्रिणींनी, वाचकांनी कान उघडणी केल्यावर आज भाग लिहायला घेतोय 🙂

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला
भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

“ओ साहेब मारू नका साहेब, आह !! मी… मी काही नाही केलं. तुम्ही मला का इथे चौकशीला. सा sss हे ss ब …!! ” (कोणी तरी मोठ्याने ओरडले) आवाज इन्स्पेक्टर रावतसाहेबांच्या केबिनमधून येत होता.

बॉबी, जयेश भाई आणि राजू बाहेर बसून होते एका बाकावर. तीन दिवस झाले त्यांना नागपूरला येऊन. इतक्या घडामोडी घडून गेल्या होत्या ह्या तीन दिवसात. बॉबी आपल्या पांढऱ्या दाढीवर हात फिरवत, आपला मोबाईल उगाच न्याहाळत होता. त्याची बायको खूप रागावली होती आणि त्याला परत बोलावत होती, पण इथून त्याला लगेच निघता येणार नव्हते आणि तसेही प्राथमिक चौकशी झाल्याशिवाय पोलीस त्यांना सोडणार नव्हतेच. सिगारेटची तलप त्याला अस्वस्थ करत होती, पण इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना भेटायला बोलावल्याने तो गप्पा बसून होता. मुंबईत त्याचा धंदा पण बुडत होता. सुहासने एक दिवस त्याला मदत केली, पण नंतर त्याला स्वत:च्या ऑफिसला जायचे होते त्यामुळे सायबर पूर्णवेळ बंद झाला.

राहून राहून त्याला अरुणचे वाईट वाटत होते. कोणाचा शेवट असा कसा होऊ शकतो? त्याच्या अंत्यविधीसाठी घरून कोणीच आले नाही. कोणी कोणावर इतकं रागावू शकतं? आकस ठेवू शकतो? सावत्र आई होती, भाऊ होता, बायकोसुद्धा होती..पण कोणीच नाही आले. त्यांना त्याच्या जाण्याने काहीच फरक पडला नसेल? पडला असता तर ते इथे असते. किमान त्याचे शेवटचे विधी तरी… पण जाऊ देत. तो स्वतः स्वतःला प्रश्न विचारून, त्यांना बगल देत होता. दोन-तीन दिवस झोप नसल्याने त्याचे डोळे लाललाल झाले होते. हाताच्या बाह्या मळकट झालेल्या आणि ह्यावेळी स्वत:कडे लक्ष तरी कसे देणार… त्याच्या हातात पोलिसांच्या एफआयआरची एक प्रत होती.

पोलिसांच्या एफआयआरमध्ये अरुणचा तारेने गळा आवळून खून झाल्याचा रिपोर्ट तयार केला गेला. खून सकाळी ६-७ च्या आसपास झाला होता. मारताना त्याला प्रतिकाराची काही संधी दिली नव्हती, कारण जास्त झटापटीच्या खुणा नव्हत्या. त्याला गुंगी व इतर तत्सम गुंगीचे औषध दिले नव्हते, पण रक्त तपासणीमध्ये दारूचे प्रमाण आढळले. त्यामुळे दारूच्या धुंदीत सकाळी अनावधानाने त्याच्यावर मागून हल्ला करून, चोरीच्या उद्देश्याने त्याचा खून झाल्याचा रिपोर्ट तयार केला आणि तीन अनोळखी लोकांवर एक आरोप पत्र तयार केले गेले. त्याची एक प्रत कोर्टाला देण्यात आली आणि तपासाची प्राथमिक पूर्तता झाल्याशिवाय बॉबी आणि जयेशभाईंना नागपूर सोडण्याची मनाई केली गेली.

तितक्यात हवालदार साळवी रावतांच्या केबिनमधून बाहेर आले, “इथे बॉबी कोण? तुम्हाला साहेबांनी बोलावलं आहे” तो आवाज ऐकताच तिघेही उठून केबिनकडे जायला लागले. ते पाहून साळवी खेकसले, “तीन-तीन बॉबी? फक्त बॉबीने आत जायचं आहे. बाकीच्या दोघांनी इथेच बसून राहायचं” एखाद्या रोबोटप्रमाणे जयेश भाई आणि राजू मागे फिरले आणि परत त्या बाकावर बसले.

केबिनच्या दारावर टक टक करत बॉबी म्हणाला, “Sir, may I come in”

आतून फक्त “या..!!” इतकाच आवाज आला. बॉबी दरवाजा लोटून आत आला, समोर मोठ्ठं टेबल, तीन खुर्च्या, फायलींचा पसारा पडून होता. भिंतीवर भगतसिंग, सावरकर, गांधीचे फोटो त्याच्याकडे टक लावून बघत होते. बॉबीची नजर पूर्ण केबिनभर भिरभिरत होती, तेवढ्यात त्याच्या उजव्या बाजूने शर्टाची बटणे नीट लावत इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आले.

“बसा..” खुर्चीकडे हात दाखवून रावत आपल्या खुर्चीकडे वळले. सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढून, ती पेटवायला माचीस शोधू लागले. बॉबीने लगेच खिश्यातून माचीस काढून, पेटवली आणि विझू नये म्हणून दुसऱ्या हाताने माचीसची ज्योत सांभाळत रावतांच्या पुढे झुकला. रावत थोडे पुढे झाले आणी सिगारेट शिलगावून मागे झाले.

“Thanks !! बोला, तर तुम्ही बॉबी मुंबईहून इथे आपल्या मित्राच्या ड्रायव्हरच्या खुनाची तक्रार घेऊन आलात. त्यामागे काही विशेष कारण? तुमचा मित्र आणि पोलीस काय बघायचे ते बघून घेतील. तुम्ही इथे का थांबून आहात? जयेशभाई सारखे बॉबीभाई बॉबीभाई करत असतात. खूप फेमस दिसताय.

“सर, मला मराठी जमते नाही. मला समजते तुम्ही काय विचारलेत, पण इतकं क्लिअर बोलता नाही येतो. इंग्रजी किंवा हिंदीत बोलू शकतो”

(सिगारेटच्या धुराचा लोट हवेत सोडत) “कसं आहे नं. तुम्ही भाषा कुठलीही वापरा. मला माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली म्हणजे झालं. आधीच ह्या प्रकरणाला इथल्या पेपरवाल्यांनी खूप मसाला लावून छापलंय. ह्या भिकारचोटांना फक्त आपला धंदा समजतो, इथे पोलिसांची काय हालत होते कोण सांगणार”

बॉबी शांत बसून होता. रावतांचे वर्चस्व त्याला प्रत्येक क्षणाला जाणवत होते. शेवटी धीर करून तो बोलू लागला “Sir, I am running my small business of Cyber Cafe and Tours & Travels is just a side business.”

“Stop… Stop….” रावत एकदम त्याला थांबवत म्हणाले “मला कथाकथन नकोय…Story Telling… Just Keep it short, simple and to the point” सिगारेटचं पाकीट त्याच्यापुढे धरत, “Have one..”

बॉबीने सिगारेट पेटवली आणि सिगारेटचा धूर बाहेर सोडताना, तो स्वत: मोकळा होत गेला. आता तो बराच आत्मविश्वासाने बोलत गेला. झालेला सगळा प्रकार त्याने रावतांना कथन केला. रावत खुर्चीतून उभे राहिले, आणि खोलीत येरझारा घालत म्हणाले, “तुम्ही साला सगळे लोकं पोलीस म्हणजे राक्षस असेच समजता. आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत आणि आम्हीही माणसे आहोत. मला ही मुलगी झाली दोन महिन्यांपूर्वी. बायको आणि पोरगी मुंबईला आहे, खूप दिवस झाले…” विषयांतर होत असलेले बघून रावत थांबले, बॉबीला किती कळले, नाही कळले माहित नाही. त्यांनी बॉबीला बाहेर जायला सांगितले आणि जयेशभाईंना आत पाठवायला सांगितले. बाहेर पडताना त्यांनी बॉबीशी हस्तांदोलन केले. अश्या मर्डर केसेस रावतांना नवीन नाहीत, ६ वर्षाच्या नोकरीमध्ये त्यांनी अश्या अनेक किचकट केसेस सोडवल्या होत्या. ही मर्डर केस एक नवीन आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभी होती.

नंतर जयेशभाई काहीसे घाबरत आत आले. रावतांनी त्यांच्यावर एकदम प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. जयेशभाई ह्याने पुरते खचले होते. अडखळत, घाबरत त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. चौकशीशिवाय कोणाला गाडी देण्याचे दुष्परिणाम त्यांना आज भोगावे लागत होते. ह्या चुकीमुळे एक जीव आणि १५ लाखाची नवी कोरी करकरीत गाडी हातची गमावून बसले. अश्याप्रकारे गाडी भाड्याने देणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी गाडीला पिवळी नंबर प्लेट असणे म्हणजे ट्रान्सपोर्ट परवाना असणे गरजेचे असते, पण तीही इथे नव्हती. त्यामुळे जर कोणी पलटून काही बोलले, तर जयेशभाई गोत्यात येणार होते.

“साळवी… बॉबीला आत घेऊन या आणि जरा चहा पाठवा आत तीन” रावत ओरडले. बॉबी आत आला. दोन मिनिटांनी चहा घेऊन एक पोरगा हजर झाला. साळवी केबिनच्या दाराशी उभे राहिले. चहाचा एक घोट घेत रावतांनी सिगारेट पेटवली,”जयेशभाई, जेव्हा तुम्ही तक्रार नोंदवली, त्याच दिवशी आम्ही काही संशयित ताब्यात घेतले आहेत. मगाशी ज्याला प्रसाद देत होतो, तो त्यापैकीच एक. गाड्या पळवून त्याचे भाग सुटे करून विकणे किंवा गाडी चोरून पर राज्यात नेऊन विकणे असे धंदे ह्या लोकांचे. आजवर खून करण्याइतकी मजल त्यांनी मारली नव्हती. ज्यांना ताब्यात घेतले, त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्यापैकी कोणाचेही हे काम नाही..”

“ये आप इतने यकीन कें साथ कैसे बता सकते हैं?” जयेशभाई रावतांचे बोलणे तोडत मध्येच म्हणाले…

त्यांना ते फारसे आवडले नाही, ते एकदम खेकसून ओरडले “तपासातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावी, ह्याचे मला बंधन नाही. आम्ही फोनचे रेकॉर्डस्, टोल नाक्यावरचे टीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतोय. कोणी संशयित सापडला तर लगेच त्याला अटक करून चौकशी करतोय. अजून तपास सुरु राहील, कारण ह्या सगळ्याला थोडावेळ जाऊ शकतो आणि गाडी बुक करणाऱ्याला फक्त एकनाथने पाहिलं आहे. त्याच्याकडे जरा बघावे लागेल. पोलिसी हिसका दाखवला की, सगळे पोपटावानी बोलू लागतात. तूर्तास आम्ही तपास सुरु केलाय हेच तुम्हाला सांगायचे होते. तुम्ही आता जाऊ शकता मुंबईला. मी ५-६ दिवसांनी येतोय तिथे. अरुणच्या परिवाराची आणि त्या एकनाथची भेट घ्यायची आहे. तेव्हा बाकीच्या गोष्टी तिथेच बोलू… कसं?”

दोघांनी होकारार्थी मान हलवली. बॉबीने रावतांचे मनापासून आभार मानत निरोप घेतला आणि ते लगेच परतीच्या प्रवासाला लागले. त्यांना आता त्या जागेची चीड येऊ लागली होती. तीन-चार दिवस झोप नाही, नीट जेवण नाही. प्रचंड मानसिक आणि शारीरिक दगदग झाल्याने सगळे दमल्यासारखे झाले होते. पोलिसांनी आपले काम चोख सुरु केले, हीच एक समाधानाची गोष्ट. राजू गाडी दामटवत होता, बॉबीने त्याला आरामात चल म्हणून सांगितले. रस्तात एका छोटेखानी हॉटेलासमोर गाडी थांबली. बॉबी हात-पाय ताणत उतरला आणि सोड्याची बाटली घेऊन, त्याचे हबके तोंडावर मारू लागला. जयेश भाई आणि राजू एका टेबलावर बसत, चहा आणि कांदा भजी आणायची ऑर्डर सोडतात.

जयेशभाई, “बॉबी भाई, आपने बहोत मदत की हैं मेरी. मैं अकेला ये नही कर पाता” बॉबी शांत होता. एकही शब्द न बोलता, तो सिगारेट प्यायला बाहेर पडला. जयेशभाई उठून त्याच्या मागे जाणार, इतक्यात त्यांना थांबवून फोन पें बात कर रहा हुं, असे म्हणून बाहेर निघाला.. “Yes Sir..” इतकंच जयेशभाईंना ऐकू आले.

थोड्यावेळाने बॉबी परत आला आणि मग त्याने आपल्या बायकोला फोन केला आणि सकाळी घरी पोचतो म्हणून सांगितलं आणि मग त्याच्या मुलीशी सिमूशी बोलू लागला. तिच्यासाठी तो ट्रीपसाठी गेला होता, त्यामुळे तिला हव्या असलेल्या गोष्टी ती त्याला सांगू लागली. बॉबी एकदम हळवेपणाने ते ऐकून घेत होता. त्याला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती, पण ती त्याला उद्या शिवाय दिसणार नव्हती. कितीही मानसिक त्रास झाला तरी, त्याची मुलगी त्याच्यावर उतारा असायची. ती समोर आली की बॉबी एकदम हरवून जात असे. तिला कडेवर घेऊन मिरवणे त्याला खूप आवडत असे, पण आज त्याच्या खांद्यावर एक विलक्षण ओझे होते. तिचा पाकिटात असलेला फोटो बघून तो एकदम हलकेच हसला. जयेशभाई राजूशी बोलताना सारखे निव्वळ पैश्याच्या बाता करू लागले. अरुण गेला याचे त्यांना आता काही वाटत नव्हते आणि का वाटावे म्हणा. त्यांची १५ लाखांची गाडी गेली होती. अरुण त्यांचा कोणी सगेवाला नव्हता. तो फक्त होता एक बदली ड्रायव्हर… बस्स !!

रात्रीचे १० वाजले इन्स्पेक्टर रावत फायलींचा पसारा घेऊन केबिनमध्ये बसून होते. हवालदार साळवी त्यांना फोनचे रेकॉर्डस् फाईल करून देत होते. टोल नाक्यावरच्या व्हिडीओ फुटेजमध्ये अरुणशिवाय एक अंगाने शिडशिडीत असलेली व्यक्ती दिसत होती, पण तिचा चेहरा सुस्पष्ट नव्हता. नेहमी त्याचा एक हात खिडकीबाहेर सिगारेट हातात घेऊन असायचा. हातात एक दोन अंगठ्या असाव्यात, पण अजून काही कळत नव्हते. मागे बसलेल्या दोन व्यक्ती नेहमीच गूढ राहिल्या. गाडीचे फोटो, त्यावर काय काय ओळखीच्या खुणा होत्या त्या नोंदवून घेऊ लागले. सोबत त्यांनी चेसी नंबर घेऊन ती गाडी जयेशभाईंची आहे याचीदेखील खात्री करून घेतली होती. गाडीचे इन्शुरन्स पेपर, पासिंग पेपर आणि गाडीचे लोन हे सगळे पेपर ते नजरेखालून घालू लागले. असेन शंका त्यांच्या मनात येत होत्या, पण एका ठाम निष्कर्षापर्यंत ते पोचत नव्हते. शेवटी परत ते फोन रेकॉर्डस् असलेल्या फायली बघू लागले.

अरुणने रात्री उशिरा केलेले आणि पहाटे केलेले फोन त्यांच्यासाठी एक महत्वाचा दुवा होता. अचानक काहीसे आठवून त्यांनी ऑपरेटरला फोन लावला आणि तपासाला काही तरी दिशा मिळाल्याचे एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तराळले…

क्रमश:

(हा शेवटचा क्रमश: आहे… उगा चवताळून जाऊ नये. पुढचा भाग दोन दिवसात नक्की टाकतो. 🙂 🙂 )

– सुझे !! !

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला

भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

भाग अंतिम – MH-02-XA-40X2 – भाग अंतिम