किल्ले रोहिडा…

“बस्स्स… ठरलं. हाच ट्रेक फायनल कर…”

“हो…हो…मी सगळ्यांना ईमेल करतो आणि हरिश्चंद्रगड बघुनच ह्या वर्षीचे पावसाळ्यातले ट्रेक सुरु करायचे…”

“व्वा व्वा… इतके कन्फर्म झाले पण?. सही आहे. गडाच्या वाटेची सगळी माहिती काढ, नकाशा घे आणि गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या नामदेवला फोन करून सांग आम्ही येतोय.

(ट्रेकच्या आदल्या दिवशी)

“अरे सुदा, हा नाही रे जमणार ह्याला किमान दोन-अडीच दिवस तरी हवेत”

“…??”

“तू ऑफिसला पोच मी आणि दिप्या दुसरा प्लान करतो आणि तुला कळवतो….”

“…..!!!”

अगदी शेवटच्या क्षणी हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा विचार बदलला आणि आम्ही निघालो ऐन मावळात वसलेल्या रोहिड्याकडे. 🙂

किल्ले रोहीडा (विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला). पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर भोर गावी वसलेला हा गडकोट. दुरून बघावा तर लाल-काळ्या मातीचा मोठ्ठा मुरूम ठेवल्यागत हा किल्ला दिसतो. ह्या किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. स्वराज्याच्या इतिहातलं एक रत्नजडित सोनेरी पान म्हणा हवं तर. ह्या किल्ल्यावर घडलेल्या एका प्रसंगाची थोडक्यात माहिती देतो, तेव्हा तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. सदर माहिती रणजित देसाईंच्या, पावनखिंड ह्या पुस्तकात अगदी विस्ताराने वाचता येईल.

ह्या गडावर कृष्णाजी बांदल ह्यांची जहागिरी होती. भोरच्याजवळ असलेल्या सिंध येथील बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे थोरले बंधू फुलाजी देशपांडे, हे बांदलांकडे सरदार म्हणून कार्यरत होते. दोघेही शूरवीर आणि आपल्या धन्यासाठी काहीही करायची त्यांची सदैव तयारी असे. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांना स्वराज्यात सामील व्हा, म्हणून आमंत्रण धाडले. इकडे बांदलांच्या दरबारात राजेंच्या खलित्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. त्यांच्या मागणीबद्दल काय करावे, म्हणून कृष्णाजींनी बाजींना त्यांचे मत विचारले. बाजी उत्तरले, “राजे, जगायचं, तर मानानं जगावं. आमचं स्पष्ट मत आहे, शिवाजी मोठा होण्याआधीच त्याचा पुंडावा मोडायला हवा. त्याला बांदलांचे एकच उत्तर जाईल…..उद्या चाल करून येणार असाल, तर आजच या. आम्ही वाट बघतो”

छत्रपतींना बांदलांकडून नकाराचा खरमरीत खलिता पाठवला गेला. भर सदरेत खासे लोकांसमोर तो खलिता जेव्हा महाराजांसमोर वाचला गेला, तेव्हा महाराजांनी नाईलाजाने तडक रोहीड्यावर आक्रमण करायचा निर्णय घेतला. त्याच रात्री आबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने किल्ल्यावर अचानक आक्रमण केले गेले आणि किल्ल्यावर एकच धावपळ सुरु झाली. बघता बघता एक एक चौकी बांदलांच्या हातून जात होत्या. आबाजींच्या पट्ट्याचा मानेवर वार होऊन, गडाचा धनी कृष्णाजी बांदल पडला आणि बांदलांचे बळ सरले. त्याचवेळी धिप्पाड देहाचे बाजी त्वेषाने पुढे आले आणि आबाजींना मैदानात उतरायला ठणकावले.

तितक्यात राजे आपल्या धारकऱ्यांसह तिथे आले आणि त्यांनी आबाजीला मागे होण्याचा हुकुम दिला. आता साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी समोरासमोर ठाकले होते. ही बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट. महाराजांनी त्यांना समजावले, की गड आमच्या ताब्यात आहे. त्यावर बाजी म्हणाले, “असं तुम्ही समजता, राजे. जोवर हा बाजी उभा आहे, तोवर गड तुमच्या ताब्यात आलाय असे समजू नका.” बाजींनी महाराजांना युद्धाला पुढे व्हा असे ठणकावले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. एक हातात तलवार आणि एका हातात पट्टा घेऊन ते राजासमोर उभे होते,”मी निष्ठेने माझ्या धन्याची सेवा केली आणि तो गेल्यावरसुद्धा आमच्या निष्ठेत काडीमात्र बदल होणार नाही.” महाराजांनी आपली तलवार म्यान केली आणि बाजींना सांगितलं, “झालं ते विसरून जा. ही भवानी तलवार फक्त अन्यायाविरुद्ध बाहेर पडते. आम्हाला तुमच्यासारख्या अनुभवी लोकांची गरज आहे, आम्हाला योग्यवेळी सल्ला देण्यासाठी, ह्या आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी, इतल्या माणसात इभ्रत मिळवण्यासाठी. आपल्या आयाबहिणींची अब्रू रक्षण करण्यासाठी, आपले देव आणि देवळं सुरक्षित राखण्यासाठी…कृष्णाजी आम्हाला सामोपचाराने मिळाले असते तर बरं झालं असतं. आम्हाला राजेपणाची हौस नाही. ना जुलूम-जबरदस्तीची, पण बांदलांनी वैर पत्करलं” राजेंच्या ह्या उत्तराने बाजींच्या हातातला पट्टा गळून पडला आणि ते राजांच्या मिठीत बद्ध झाले. महाराजांनी बांदलांची वतनदारी कायम राहील असे सांगितले आणि त्यांच्या वतनाला काहीही धक्का लागणार नाही असे वचन दिले.

किल्लाची चढाई सोप्पी आहे. एका तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो. गडाचे प्रवेशद्वार गोमुखी आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या उजवीकडे एक पाण्याचे खोल टाकं आहे. असं म्हणतात की ते पाणी पिण्यायोग्य आहे, पण आत उतरून बघितल्यावर असं वाटलं नाही. तिसऱ्या प्रवेशद्वारावर दोन राजमुखे आहेत. तिथे एक देवनागरी शिलालेखदेखील आहे. गडावर अनेक भग्न अवशेष पडून आहेत, त्यातल्यात्यात दुर्ग संवर्धन समितीने गडावर स्वच्छतेचे बऱ्यापैकी काम केले आहे. गडावर असलेले रोहीडमल्ला मंदिर बंद होते. मंदिराची डागडुजी करून ते भक्कम बांधलेलं आहे. गडावर पाण्याच्या मुबलक टाक्या आहेत. तटबंदी ढासळलेली आहे, पण काही बुरुज ताठ मानेने उभे आहेत.

फत्ते बुरुजावरून लांब नजर टाकल्यावर एक मंदिर दिसले. दोन डोंगरांच्या बरोब्बरमध्ये हे छोटेखानी मंदिर होते. एका पायवाटेने त्या मंदिराकडे जाता येत होते. किल्ल्यावर असलेल्या नकाशाचा योग्य अंदाज न आल्याने, आम्ही त्या मंदिराला रायरेश्वर समजून तिकडे तडक निघालो. वाटेत मोदक, सागर PDY, किसन देव, श्री व सौ राज जैन आणि दूरन येणाऱ्या गणेशाला हात दाखवून त्या मंदिराकडे निघालो. पाऊस नव्हता आणि पायवाट अतिशय भुसभुशीत होती. जरा पाऊल चुकीचे पडलं, तर कपाळमोक्षच. तरी तिथे घाईघाईत पोचलो आणि नंतर समजले हे ते मंदिर नव्हे. पण त्या मंदिराच्या ओढीने आम्ही तो लांबलचक खडतर प्रवास २०-२५ मिनिटात पूर्ण केला होता. कारण आम्हाला जमल्यास किल्ले पुरंदरला सुद्धा भेट द्यायची होती.

सरतेशेवटी काही कारणास्तव ती भेट हुकली, पण ट्रेक पर्वाची अतिशय सुंदर सुरुवात झाली. वडिलांच्या आजारपणामुळे आणि हापिसच्या कटकटीतून सुटका न झाल्याने, वर्षभर काहीच ट्रेक झाले नाहीत. यावर्षी त्याची यथेच्छ भरपाई करायचे वचन देऊनच माघारी फिरलोय.

अरे हो फोटो राहिले….. 🙂 🙂

१.

२.

किल्ले रोहिडा….

३.

सूर्योदय….

४.

५.

६.

किल्ल्याचे प्रवेशद्वार….

७.

८.

प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेले पिण्याचे पाण्याचे टाकं.

९.

तिसरे प्रवेशद्वार. इथे देवनागरी शिलालेख आहे.

१०.

देवनागरी शिलालेख..

११.

राजमुख….

१२.

१३.

१४.

फत्ते बुरुज…

१५.

१६.

तीन जोड टाक्या…

१७.

१८.

मंदिराकडे ताठ मानेने उभा असलेला फत्ते बुरुज …

१९.

हेच ते मंदिर…

२०.

आम्ही सगळे फत्ते बुरुजावर …. (फोटो साभार धुंडीराज)

२१.

परतीच्या वाटेला… (फोटो साभार धुंडीराज)

– सुझे !!! 🙂

(पुन्हा) शाळेला जातो मी…

आठवतो काय आजचा दिवस? काय म्हणता नाही? काय हे कसं विसरू शकता तुम्ही?

एक-दीड महिना मामाच्या गावी मस्त धम्माल, मज्जा करून शाळेच्या पुढल्या वर्गात जाणारे आपणचं.. गावाला जाऊन आलो, की सर्वात आधी धावपळ शाळेच्या खरेदीची – पुस्तके, वह्या, दप्तर, रेनकोट, पावसाळी बूट, गणवेश, नवीन डबा. मज्जा ना एकदम… 🙂 🙂

पहिला दिवस शाळेचा - साभार गुगल

जून महिन्याची १३-१४ तारीख म्हटली, की सगळी छोटी मंडळी शाळेच्या गेटवर आपापली दप्तरं सांभाळत, हातात रंगीबेरंगी वॉटरबॅग घेऊन आणि चेहऱ्यावर काहीश्या त्रासिक आणि काहीश्या आनंदी मुद्रा घेऊन उभे ठाकलेले दिसतात. पावसाला हलकेच सुरुवात झाली असते, आकाशातले ढग कुतूहलाने शाळेच्या भोवती जमा होऊन ह्या चिमुरड्यांना बघत बसतात. पिल्लू एका वर्षाने मोठ्ठं झालं, म्हणून आई-बाबांच्या डोळ्याच्या कडा हळूच पाणावत असतात. दूर लांभ उभे राहून, शाळेतल्या रांगेत उभ्या आपल्या चिमण्या-चिमणीकडे एकटक बघत उभे असतात. त्याने/तिने आपल्याकडे बघितले की, हात उंचावून त्याला प्रतिसाद देतात. सगळं नीट ठेव, मस्ती करू नकोस असे खुणेनेच बजावून सांगतात. 🙂 🙂

इकडे प्रत्येक लहानग्याच्या मनात एक उत्सुकता असते. नवीन वर्गात जायला मिळणार, नवीन जागा मिळणार. माझ्या बाकाला कप्पा मोठा असेल नं, त्यात दप्तर राहील नं, मला खिडकीतून बाहेर बघता येईल नं, पाण्याची बाटली नीट राहील नं, आज डब्यात आईने काय खाऊ दिला असेल, मधल्या सुट्टीत काय खेळायचं, तासानुसार पुस्तकं-वह्या काढून ठेवायची आणि सगळ्यात शेवटी पेन/पेन्सिल ठेवायला बाकाला असलेल्या जागेत, एखादी भडक पेन्सिल काढून Trespassers will be prosecuted अश्या थाटात बसायचं 😀

खरंच तो दिवस आजही आठवतो, आदल्या दिवसापर्यंत चालेलेली तयारी. शाळेच्या गणवेशापासून, जेवणाच्या डब्याची तयारी. आदल्या रात्री बाबांनी नवीन पुस्तकाना घालून दिलेली चापचोप कव्हर्स आणि आपण फक्त स्टिकर लावण्याची घेतलेली मेहनत (भारताच्या पंतप्रधानांसारखं). मग ती कव्हर्स फिट्टं बसावीत म्हणून, गादीखाली ठेवून स्वत: त्यावर चिरनिद्रा घ्यायची 😉

पाण्याची वॉटरबॅग ( 😀 ) आणि कंपासपेटी, हे शालेय जीवनात बघितलेले आणि अनुभवलेले एक प्रकारचे सायफाय फिक्शन. कुठून बटण दाबून, कुठून काय बाहेर येईल, याचा काही नेम नाही. शाळेचे दप्तर म्हणजे Treasure hunt चा एक नकाशा. दप्तराला जमेल तितके जास्त खण हवेत आणि आपण ते कशासाठी वापरायचे ते आणल्याबरोबर ठरवून मोकळं व्हायचं. मग निदान पहिले १०-१५ दिवस नित्यनेमाने ते ठरवून करायचं देखील. मग आहेचं ये रे माझ्या मागल्या. नंतर स्वतःलाचं शिव्या देतो, झक मारायला एवढे खणाचे दप्तर घेतले. एक गोष्ट सापडेल तर शप्पथ 😀

नवीन पुस्तकांचा वास तो काय वर्णावा…एका हातात पुस्तक घट्ट धरून, डोळे बंद करून, नाकाजवळून त्याची पानं सळसळत फिरवायची… स्वर्गसुख !!! मग एक एक तास सुरु होतात. प्रत्येक विषयाला नवीन कोरी वही आणि वहीच्या पहिल्या पानावर सुबक हस्ताक्षरात आपले नाव आणि नंतर पुढली सगळी पानं डॉक्टरी लिपीत :p

मग एक-एक तास संपल्याची घंटा वाजते, एक-एक दिवस पुढे जातो आणि सगळी बच्चेकंपनी एक-एक दिवसाने मोठी होऊ लागतात. एक मंद पण सुखावणारा प्रवास. निदान अश्या गोष्टींसाठी तरी कधीच मोठ होऊ नये.. काय म्हणता? 🙂

–सुझे 🙂

(जुनी पोस्ट पुन्हा नव्याने :D)