साठ्ये कॉलेजमध्ये एकदम उत्सवाचे वातावरण होते. कॉलेजच्या वार्षिक युथ फेस्टिव्हल्सची तयारी जोरदार सुरु होती. रोज टीव्ही, वर्तमानपत्रात जाहिराती झळकत होत्या. एकंदरीत हा फेस्टिव्हल कॉलेजसाठी प्रतिष्ठेचा बनला आणि त्यामुळे आयोजनात कुठल्याही प्रकारची हयगय केली जात नव्हती. फेस्टिव्हलच्या थीमचा एक भाग म्हणून, कॉलेजने दरवर्षीप्रमाणे एक स्मरणिका छापायचे ठरवले आणि त्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य पाठवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले गेले. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रवेशिका पारखून निवड करणे सुरु होते. मराठी साहित्य छाटणीचे काम कॉलेज जिमखान्यात सुरु होते.
ह्या आयोजनाला सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता आणि एक से बढकर लेख, कविता आयोजाकांपर्यंत पोचल्या होत्या. इतके लेख आणि साहित्य त्यांच्याकडे पोचले की, त्यांनी अजुन प्रवेशिका घेणे बंद केले आणि तशी सूचना नोटीस बोर्डावर लावली. सगळे आयोजक कँटिनमध्ये चहा घ्यायला गेले. जेव्हा ते सगळे जण परत आले, तेव्हा त्यांना जिमखान्याच्या टेबलावर एक बंदिस्त लिफाफा आढळला. फेस्टच्या मासिकासाठी एका मुलीने कविता लिहून पाठवली होती. त्या पाकिटावर तिने नाव आणि बाकी माहिती लिहिली होती. आयोजकांपैकी एकाने ते पाकीट उघडलं आणि कविता वाचायला सुरुवात केली..
==================================
आज पुन्हा तेच स्वप्न पडलं..
मला उडता येत होत..
आसमंतात करत होती मुक्त संचार..
स्वच्छंदी मनात फक्त तुझाच विचार..
पंख काही नव्हते मला..
तरीही मी उडत होते..
हवं तसं हवं तिथे..
जणू मी हवेत तरंगत होते..
मग मनात विचार आला..
कुठे बरं जावं, काय बरं शोधावं..
क्षणाचाही विलंब जाहला नसावा..
आतून वाटले तुझा चेहरा पाहावा..
रात्रीचा गर्द अंधार..
सगळं जग निद्राधीन..
मी मात्र तुझ्या ओढीने..
उडत राहतेय दिशाहीन…
अखेर एक खिडकी दिसते..
हे तुझेच घर अशी खात्री पटते..
मला कसं कळलं विचारू नकोस..
स्वप्नातल्या गोष्टींवर अंकुश नसे..
मी तशीच विहरत त्या खिडकीपाशी येते..
तुझ्या ओढीने शोधाशोध करते..
पलंगावर तू निर्धास्त पहुडलेला..
अंधारात फक्त तुझा चेहरा उजळलेला..
डोळ्याचे पारणे फिटे पर्यंत..
मी फक्त तुला पाहते..
अरे कूस बदलू नकोस..
असंच मनोमन पुटपुटत राहते..
===============================
स्मरणिकेचे संपादक: “ह्म्म्म…..चांगला प्रयत्न आहे…प्रियकराची आठवणीत हरवलेली एक प्रेयसी. एकदम जीव ओतून लिहायचा प्रयत्न केलाय. पण… पण आपण ही कविता नाही स्वीकारू शकत. कविता उशिरा पाठवलीय. (ते शिपायाला हाक मारतात)
“पांडू, हे पाकीट ह्या पोरीला नेऊन दे आणि तिला सांग कविता नाही स्वीकारू शकत, कारण साहित्य द्यायची मुदत संपली आहे म्हणून” आणि सगळे कामात गर्क होतात.
“तो” मात्र ती कविता वाचून स्तब्ध झाला होता. त्याला राहून राहून त्या मुलीचं नाव ओळखीचे वाटत होतं. तो लगेच पांडूच्या मागून धावत गेला आणि आडूनआडून बघायला लागला की ती मुलगी नक्की कोण…पांडू एका वर्गासमोर जाऊन उभा राहतो आणि त्या मुलीला आवाज देतो. ती बाहेर येते, पण ह्याला तिचा चेहरा दिसत नाही. पांडू तिच्याशी बोलत असतो. तिला आपली कविता नाकारली आहे हे निश्चितचं आवडत नाही, आणि ती तो कागद चुरगळून बाहेर फिरकावते. हा तिला बघायचा प्रयत्न करतो, पण त्याला फक्त एक पाठमोरी आकृती दिसते, जी डोळे पुसत वर्गात जात असते. तो लगबगीने उठतो आणि धावतच त्या कागदाच्या बोळ्याजवळ पोचतो. कोणी बघत नाही हे बघून, ती कविता नीट घडी करून खिशात ठेवून देतो.
कॉलेजच्या आवारात विविध स्पर्धांच्या पात्रता फेरी सुरु होत्या. सगळीकडे नुसता गोंधळ सुरु होता. फेस्टची तयारी पुर्ण होत आली होती. आता सगळे आतुरतेने त्या दिवसाची वाट बघत होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरु होती. होता होता फेस्टिव्हलचा दिवस उजाडला. कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी अधिकृतपणे फेस्टिव्हल सुरु झाल्याची घोषणा केली. आता पुढचा आठवडाभर नुसता हैदोस घालायला सगळे मोकळे.
विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी विविध स्पर्धेतून भाग घेत होत्या, सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सायन्स म्हणा, वकृत्व म्हणा, रोबोटिक्स म्हणा की गायन म्हणा….आयोजनात काही कसूर पडली नव्हती. सगळं कसं सुरळीतपणे सुरु होतं. संयोजकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना “उत्सव” ह्या स्मरणिकेचे वाटप सुरु केलं. साहित्याची ही मेजवानी कोणी सोडेल तर शप्पथ…!!!
त्यातल्या कथा आणि कविता इतक्या उत्कृष्ट दर्ज्याच्या होत्या, की सगळ्यांना ते आवडत होत. तिला सुद्धा स्मरणिकेची एक प्रत दिली होती, पण ती तोंड पाडून लायब्ररीकडे जात होती. तिला अजिबात रस नव्हता वाचनात. तिचा प्रचंड हिरमोड झाला होता आपली कविता नाकारल्यामुळे . तासभर लायब्ररीत बसून ती घरी जायला निघाली. दरवाज्यातच तिच्या मैत्रिणी घोळक्याने उभ्या होत्या आणि काही तरी कुजबुजत, खिदळत होत्या.
तिला काही कळले नाही, तिने विचारलं तिच्या मैत्रिणीला, “काय गं.. काय झालंय?” तिच्या मैत्रिणीने काही नं बोलता, स्मरणिकेचे एक पान उघडून तिच्या पुढे केलं. कवितेचे शीर्षक “शीर्षक नसलेली कविता” होतं आणि ती तिचीच कविता होती. कोणीतरी त्या कवितेचे रसग्रहण केलं होतं.
कसला तरी शॉक लागल्यासारखं ती उभी होती, काय बोलावं तिला सुचत नव्हतं. तिने ते रसग्रहण वाचले आणि तिचे डोळे पाण्याने डबडबून गेले. काही झालं तरी तो स्वतःला सावरू शकत नव्हती. ज्याने ते रसग्रहण लिहिलं होतं, त्याने तिच्या भावना तंतोतंत हेरल्या होत्या आणि त्या सुरेख शब्दातून मांडल्या होत्या. ती धावतच जिमखान्याकडे निघाली. तिथे चौकशी केली त्या लेखाबद्दल, पण कोणालाच काही नक्की माहित नव्हते. लेखकाचे नावं अनामिक असल्यामुळे त्यावरून ओळखणे अशक्य होते. ती बावरून इकडेतिकडे बघू लागली. काय करावं, कोणाला विचारावं म्हणून मग ती कल्चरल कमिटीच्या ऑफिसकडे जाऊ लागली. निदान त्यांना नक्की माहित असेल ह्या आशेने. तिथे गेली, पण तिथे कोणीच नव्हते.
ती दरवाज्याजवळ असलेल्या बाकावर ढिम्मपणे बसली. मनात विचारांचे सत्र सुरु होतेच. कोणी केलंय हे रसग्रहण, कोण मला इतकं चांगलं ओळखत इथे. बालपणापासूनचे शिक्षण रत्नागिरीला झाल्यामुळे, हे तर माझं पहिलंच वर्ष ह्या कॉलेजमध्ये, नव्हे ह्या शहरातसुद्धा. काय करावं कळत नव्हतं. आजवर जे कोणाला तिने कधी सांगितलं नाही, ते आज तिलाच कोणीतरी समजावून सांगताय. त्या एक एक शब्दात अशी जादू होती, की तिला नकळत त्याची आठवण येऊ लागली. जुने दिवस आठवू लागले. शाळेतली शेवटची दोन वर्ष आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये असतानाचे दिवस तिच्या डोळ्यासमोर झरझर येऊ लागले.
त्या घडामोडी, ते मित्र, त्या पिकनिक्स, ती भांडणं आणि तो… हो त्याला कशी विसरणार होती ती. त्याच्या आठवणींत तिने अनेक रात्री रडून जागवल्या होत्या. कोणी कधी नकळतपणे आपल्या आयुष्यात येतो, आपल्याला धीराने सांभाळतो, आपण आपलं आयुष्य त्याच्यावर समर्पित करायला तयार असतो आणि अचानक..अचानक तो कुठेतरी दूर निघून जातो. ना त्याची काही खबर, ना कधी फोन. त्याला डोळेभरून बघायला तिचे डोळे तरसले होते, पण अचानक तो निघून गेला होता तिच्या आयुष्यातून. तिच्या मैत्रिणींनी खूप समजावलं, जाऊ दे त्याला विसर आता, त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. काही वाटत असतं तर तो गेलाच नसता तुला सोडून. तू तुझं आयुष्य बरबाद करून घेऊ नकोस… पण हिच्या मनात तो कुठेतरी खोलवर रुतून बसला होता. त्याचा आवाज, त्याची माया, त्याचा लडिवाळपणा ती अजिबात विसरू शकत नव्हती. आज इतक्या वर्षांनी तो भेटेल असं तिला वाटलं, पण तो कशाला येईल परत? जर त्याला यायचं होतं, तर सोडूनच का गेला… जाऊ दे आपण नको त्याचा विचार करायला असं मनात म्हणत ती बाकावरून डोळे पुसता उठायला लागली.
तेव्हढ्यात कोणीतरी तिला आवाज दिला,”हाय, तूच ती कविता लिहिली होतीस नं….(तो अडखळत बोलत होता)” ती डोळे पुसत म्हणाली,”Excuse Me, तू कोण.. तुला माझ्याबद्दल काय माहितेय? मी तुला ओळखते काय?” त्यावर तो म्हणाला, “नीट बघ नक्की ओळखशील..!!” तिने परत डोळे पुसले आणि त्याच्याकडे बघून आठवू लागली, की ह्याला कुठे बघितलंय म्हणून… (काहीसं आठवून..उत्साहाने) “अरे तू तर माझ्या शाळेत होतास नं, बॅकबेंचर? ना कधी कोणाशी बोलायचा, मोजक्या मित्रांबरोबर रमायचा..बरोब्बर?” 🙂
“हो बरोब्बर !! छान वाटलं तुला मी अजुन आठवतोय बघून”
“अरे मी कोणालाच विसरले नाही, पण तू किती बदललायस..म्हणून लगेच ओळखणं कठीण गेलं बस्स…कसा आहेस? तुला त्या कवितेबद्दल काय माहित आहे?”
“अरे हो हो.. किती ते प्रश्न…मला तुझ्याबद्दल बरचसं माहित आहे..त्यानेच सांगितलं होत…(तिचा चेहरा पडतो) प्रेम वगैरे एक आभास असतो, असं त्याला वाटायचं. आयुष्यात एक वय असं असतं, की प्रत्येकाला एका आधाराची गरज असतेच. त्याला तो फक्त काही क्षणांचा आभास वाटला आणि तो तुझ्या आयुष्यातून निघून गेला…शाळेचं वर ते. एक चूक म्हणून तो पुढे निघून गेला…पण मी तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी येणार पाणी बघितलंय तेव्हाही आणि आजही… तुझं त्याच्यावर असलेलं प्रेम मी तुझ्या डोळ्यात वाचलंय, तुझी होणारी तळमळ मी तुझ्या कवितेतून वाचली आणि न राहवून तो लेख लिहिला…”
“क्क्काय… तू तो लेख लिहिलास… पण का? काय गरज होती..? मला वाटलं की… त्याने ….”
“ह्म्म्म्म… मला माफ कर, पण काही गोष्टी नाही सांगू शकत. प्लिज मला कारण विचारू नकोस, मी नाही सांगू शकणार”
“तुला सांगावच लागेल, आज मला वाटलं की कितीतरी वर्षांनी तो माझ्याशी बोलतोय…तिच भावना, ते प्रेम. मला तू सांग, हा नक्की काय प्रकार आहे?”
“प्लीजजजजजज, मला नको भाग पाडू… मी नाही सांगू शकणार”
“तुला सांगावच लागेल, तुला माझी शप्पथ…” (हे बोलताना तिने हलकेच जीभ चावली. अरे ह्याला आपण असं कसं बोललो, कुठल्या हक्काने..) ती वरमून त्याला सॉरी म्हणाली, “नको सांगूस, नसेल सांगण्यासारखं”
“खरंच नाही सांगण्यासारखं, काय सांगू तुला.. तुला ते नाही आवडणार?”
“ह्म्म्म.. राहू दे, कदाचित तुला ते मला सांगण्यात, कमीपणाचे वाटत असेल. तू त्याचा मित्र, तुला त्याची बाजू बरोबर वाटणार आणि सगळी चूक माझी असेल हे गृहीत धरले असशील. असो, मला नाही काही फरक पडत. माझ्या भावना समजून घेणारं कोणीच नाही” 😦
“कमीपणा?…(त्याचा आवाज एकाएकी चढला) बोल नं काय सांगू काय? सांगू की माझं तुझ्यावर प्रेम होत आणि आजही आहे? जेव्हा आपण सगळे भेटायचो, तेव्हा त्याच्या निम्मिताने का होईना तुला बघता यायचं. तुझ्या बरोबर काही क्षण एकत्र घालवता यायचे… पण अचानक तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हरवलेले बघून खूप त्रास झाला. तुला होणारा त्रास मी बघितलाय. पण तुझी त्याच्यासाठी होणारी तळमळ इतकी निर्मळ होती, की माझं एकतर्फी प्रेम तुला कधी सांगू शकलो नाही.. कधी धीर झालाच नाही. तो असा निघून गेला तुझ्या आयुष्यातून की, काही झालेच नाही. त्याला सगळ्यांनी दूषणं दिली, पण तू त्याला कधी काही म्हणाली नाहीस. लोकं त्याच्याबद्दल काय नकोनको ते बोलत होती, पण तुझं मन फक्त त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतं आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे.. अगदी आजपर्यंत… मला काही हक्क नाही तुझ्या भावनांना लोकांसमोर आणायचा. पण.. पण त्यादिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू आणि एक विशिष्ट संताप बघितला आणि राहावलं नाही आणि ती कविता….. सॉरी !!” 😦
ती काहीचं बोलत नव्हती… खाली मान घालून हातातल्या रुमालाशी चुळबूळ करत होती… तो गप्प का झाला म्हणून तिने डोक वर काढलं, तर तिला फक्त त्याची डोळे पुसत जाणारी पाठमोरी आकृती दिसली.. ना तिने त्याला थांबवलं, नं त्याने मागे वळून बघितलं …
पूर्वप्रकाशित – दीपज्योती दिवाळी अंक २०११ (जालरंग प्रकाशन)
— सुझे !!
सुंदर…
ती मुलगी आणि तो मुलगाही जिवंत वाटतात…
आल्हाद,
प्रतिक्रियेसाठी धन्स रे 🙂
सुंदर !
सत्यकथा आहे काय ?? 🙂
अनघा,
नाय ग्… अनेक बघितलेल्या प्रसंगाची एक भेळ आहे ही 🙂
सुंदर
मस्तच आहे …………
सुषमाजी,
प्रतिक्रियेसाठी आभार आणि ब्लॉगवर स्वागत…. अशीच भेट देत रहा 🙂 🙂
Very good… Mastch 🙂
नागेश,
धन्स रे 🙂 🙂
सुझे ! मस्त लिहीलंयस रे ! संवाद छान !
समीर,
धन्स रे 🙂 🙂
मस्त झालीये रे.. ती कविता आणि कवितेतली एकूणच कल्पना खूप आवडली. मस्त एकदम..
रच्याक, अनघा + १
हेरंब,
धन्स रे… 🙂 🙂
मस्त….लिहिलयस……. कथा जमायला लागल्यात ……
अजून येउदेत…. 🙂
धुंडीराज,
साहेब आभारी आहे. लिखाणाचा प्रयत्न सुरु आहेत, फळे भोगायला तयार रहा 😉
. हेरंब+१
कविता जमली, ( याचा अर्थ कवितेचा ब्लॉग सुरु करावा असे नाही)
काका,
हा हा हा … नका काळजी करु, काही कवितेचा ब्लॉग वगैरे सुरु करत नाही 😉
हाहाहाहा काका :))))
हेरंबा,
=)) =)) =))
लेख मस्त जमलाय रे सुहा….!!!
सारिका,
धन्स गं 🙂
एकदमच भन्नाट !!!!
भोवरा,
धन्स आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा 🙂
अप्रतिम…
मनाली,
धन्स गं 🙂
जमलेय रे एकदम 🙂
बाकि अनघाला अनूमोदन आणि तूला पुन्हा तीने विचारलेला प्रश्न (नाही म्हणजे तू उत्तर दिलेले नाहीस नं अजून म्हणून ):)
तन्वीताई,
धन्स गं… उत्तर दिलंय गं, सध्या ब्लॉगकडे खूप दुर्लक्ष आहे. स्वारी 😦
तू सुद्धा या सिरीयलच्या प्रेमात का ?
शीर्षक म्हणून ‘अधुरी एक कहाणी’ ( हि पण सिरीयल )पण चालले असते.
स्वैर लिखाण छान जमलंय !
सागरा,
नाय रे बाबा… सिरिअलचा काही संबंध नाही इथे 🙂 🙂
धन्स रे !!
छान जमलाय लेख. गद्य पद्य एकत्र…
अवांतर १ : ती मुलगी लहानपणी रत्नागिरी ला कुठल्या शाळेत होती रे?
अवांतर २ : तुझ्या पोस्ट ची नावे पहाता पुढील पोस्टचे नाव “कुंकू” किंवा “या गोजिरवाण्या घरात” असायला हरकत नाही… 😀
सिद्ध्या,
धन्स रे !!
१. शाळेचे नाव माहित नाही… ती आहे की नाही हेच माहित नाही. काल्पनिक पात्र आहे. 😉
२. विचार केला जाईल हं 😉 😀
nice
पद्माकरजी,
खूप खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा !! 🙂
सगळच कथानक अगदी जिवंत … !!! 🙂
खूपच छान.. !!
श्वेताजी,
अनेक अनेक आभार. अशीच भेट देत रहा ब्लॉगला 🙂
khup changle lihile,khari watli.
स्नेहाजी,
खूप खूप आभार. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा 🙂 🙂