पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !!

पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !! 

मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम…
हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम…
बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम…
तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम…
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुंबईकरांना सलाम…
सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्‍या सुरक्षा यंत्रणेला सलाम…
कोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम…
सीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम…
शहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम…
जाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्‍या लास्ट बुलेटला सलाम…
हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम…
त्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम…
मुंबईवर हल्ला करणार्‍या पाकिस्तानला सलाम…
पुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्‍या आपल्या नेत्यांना सलाम…
हल्लेखोर आम्ही नव्हेच म्हणणार्‍या त्यांच्या नेत्यांना सलाम…
हल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्‍याला मीडीयाला सलाम…
त्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम…
वर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्‍या प्रत्येकाला सलाम…
कोरडे अश्रू ढाळणार्‍या लोकांना सलाम…
शहीदांच्या पराक्रमांचे बॅनर लावणार्‍या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम…
कसाबला जिवंत पकडणार्‍या पोलिसांना सलाम..
त्याला पोसणार्‍या आपल्या सरकारला सलाम…
त्याला फाशी देणार्‍या आपल्या न्यायदेवतेला सलाम…
त्याला सुधारू द्या असा म्हणणार्‍या मानवाधिकार समितीला सलाम..
बॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्‍यांना सलाम…
मृतांचे फोटो पुन्हापुन्हा प्रदर्शित करणार्‍या वृत्तपत्राला सलाम..
पोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्‍याला सलाम..
उद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्‍याला सलाम…
फेसबुकवर स्टेटस टाकून श्रद्धांजली देणाऱ्याला सलाम…
कमीत कमी शब्दात जास्त सांगून जाणारे ट्विट करणाऱ्याला सलाम…
कॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
ज्यांना सलाम करायचा राहिला त्या सगळ्यांना सलाम..
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..

 सलाम तुम्हा सर्वांना सलाम…  सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!!

सी- सॅट …

टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये “सी- सॅट” आणि “डी- सॅट” हे नेहमीच्या वापरातले शब्द. मागे आपण डी- सॅट बद्दल वाचले असेलंच. थोडक्यात सांगायचं झालं तर, “डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )” आणि “सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)” प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते.

जर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला फक्त ते संवादाच्या माध्यमातून परदेशात पोचवायचे असते आणि आपली तांत्रिक हुशारी बरोब्बर ठिकाणी वापरायची असते. पण एका झटक्यात ऐकणारे ते च्यामारिकन कुठले, त्यांच्यासमोर किती डोकं फोडा, जोपर्यंत ती लोकं त्यांचा मेंदू वापरणे बंद करत नाही, तो पर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला बांधता येतो तो फक्त अंदाज, तिथे ते काय करतायत याचा..त्यांना प्रत्येक गोष्ट लहान मुलांसारखी हळूहळू आणि पटवून द्यावी लागते. आता ह्यात त्यांची काही चुकी नाही म्हणा, तिथल्या प्राथमिक शिक्षणाचा घसरलेला दर्जा ह्यासाठी कारणीभूत आहे… एकदा एकीला सांगितलं की, कम्प्युटरच्या सगळ्या विंडो बंद कर, तर ती बया घरातल्या सगळ्या खिडक्या बंद करून आली आणि म्हणाली Don’t you think its odd? काय बोलावं आता? 😀 😀

आता माझं जे नवीन प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशन सांभाळतो. खास करून दुर्गम, खेड्यापाड्यातील लोकांसाठी ही सुविधा एक वरदान आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शहरात जितकी कंपनीची ग्राहकसंख्या आहे, त्याहून अधिक ग्राहकसंख्या दुर्गम भागात आढळते. कारण त्यांना त्याची जास्त गरज असते. तिथेही आयुष्याची ३५-४० वर्ष शहरात पैसे कमावतात ऐशो आराम करतात आणि मग उरलेला पैसा घेऊन कुठेतरी गावात, जंगलात, वाळवंटात राहायला जातात मन:शांतीसाठी. तिथे ना त्यांना फोन नेटवर्क मिळत, ना इंटरनेट. मग त्यांच्याकडे सॅटेलाईट कम्युनिकेशन, हे एकच उपलब्ध माध्यम असतं जगाशी जोडण्याचे. म्हणूनचं सॅटेलाईट कम्युनिकेशनला लगेच आणि जास्त प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेचे लष्कर आणि जगभरातील सगळ्या ATM मशीन्सचं नेटवर्क, हे आमच्या सॅटेलाईट कम्युनिकेशनचा वापर करूनचं जोडलेले आहेत. हे नेटवर्क त्यातल्यात्यात कमी खर्चात सेटअप होतं, पण त्याचा मेंटेनन्स खुपंच जास्त आहे. पण हे नेटवर्क खुपच नाजूक आहे. तसेच अमेरिकेत वाढत असलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे ह्या नेटवर्कला खूप वेळा (नेहमीच) धक्का लागतो आणि तो धक्का आम्हाला सहन करावा लागतो. मग आम्हाला फोनाफोनी, शिव्याशाप सुरु…त्यातल्या अश्याच एका धक्क्याची कहाणी इथे देतोय 🙂

मदत...

(संभाषणाचे जमेल तितकं मराठीत भाषांतर करतोय…)

(ट्रिंग ट्रिंग !!) जवळपास पंचेचाळीशीच्या आसपास असलेल्या स्टिफनचा आवाज ऐकू आला… मी काही बोलायच्या आधीचं त्याने कंपनीच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली होती..

स्टिफन:- युवर कंपनी सक्स… मी माझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही मला त्याचा परतावा देत नाही.. मी तुमच्यावर केस करेन.

मी:- (ऑफकोर्स आधी माफी मागितली आणि एका नवीन डी- सॅटची मनापासून तयारी करत विचारलं) नक्की प्रॉब्लेम काय आहे स्टिफन?

स्टिफन:- (काही बोलायच्या मुडमध्ये नव्हता) मला तुझ्या बॉसशी बोलायचं आहे, कंपनी सीईओशी.. माझा फोन ट्रान्सफर कर अमेरिकेत…

मी:- स्टिफन, मला असे करता येणार नाही. पण तू जर मला नक्की काय झालंय सांगितलंस, तर मी तुला नक्की मदत करायचा प्रयत्न करेन…

स्टिफन:- मदत…नको मला तुझी मदत… मला तू तुझ्या बॉसचा नंबर दे..!!

मी:- सॉरी, पण मला तसे करता येणार नाही.. (मी खुणेनेच माझ्या मॅनेजरला कॉल ऐकायला सांगितला त्याच्या डेस्कवरून)

स्टिफन:- (सूर वाढवत) #$#$@$, ^%&%^$# तू मला नाही म्हणालास…मला??

मी:- (माफी मागत) मला तू नक्की सांग काय झालंय ते, मला माझ्या मॅनेजरपेक्षा तरी जास्त माहित आहे ह्या सर्विसबद्दल. (मॅनेजर डोळे वटारून बघू लागला आणि हसायला लागला)

स्टिफन:- अच्छा, तू स्वतःला शहाणा समजतोस काय? माहितेय तुम्ही भारतीय लोकं हुशार असता..पण शेवटी अमेरिकन्स ते अमेरिकन्स…!!

मी:- ह्म्म्म.. (काही बोललो नाही)

स्टिफन:- आम्ही हे केलं, आम्ही ते केलं.. जगाला जगायची दिशा वगैरे दिली आणि आता जगावर सत्ता गाजवतोय. आमची संस्कृती सगळं जग मानतेय….

मी:- (माईक बंद करून, मस्त पाणी पिऊन आलो..तो बोलतच होता)

स्टिफन:- फक्त, तुमच्या भारतात एक गोष्ट चांगली आहे, नाती सांभाळायची जिद्द आणि अक्कल.. तुम्ही त्या बाबतीत पुढे गेलात..

मी:- (हे ऐकून मी एकदम बावरलो..म्हटलं ह्याला काय झालं आता… मग मीच म्हणालो) काही प्रॉब्लेम झालाय का?

स्टिफन:- सुहास, तुझं लग्न झालंय काय रे?

मी:- नाही.. (हा विषय टाळत) मला कळेल का नक्की काय प्रॉब्लेम झालाय नेटवर्कचा?

स्टिफन:- काही नाही.. सगळं एकदम सुरळीत सुरु आहे !!

मी:- क्काय…(आवशीचा घोव तुझ्या) मग तू शिव्या का देत होतास?

स्टिफन:- माफ कर दोस्ता, पण त्या तुझ्यासाठी किंवा तुझ्या कंपनीसाठी नव्हत्या…

मी:- मग… नक्की झालंय काय? मी तुला काही मदत करू शकतो काय?

स्टिफन:- मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होतं… स्वतःला मोकळं करायचं होतं… माझी बायको मला सोडून गेली दुसऱ्याकडे. मी साधा सॉफ्टवेअर इंजिनिअर. आयुष्यात २० वर्ष प्रचंड कष्ट केले, पैसा कमवला आणि उडवलासुद्धा. प्रेम केलं एका मुलीवर आणि तिच्याशीच लग्न केलं, मग आम्हाला मुलगी झाली. तिच नाव जेन…मग वयाच्या ४३ व्या वर्षी कंटाळून नोकरी सोडली. मी नोकरी सोडल्याने मला पैश्याचा एकुलता एक स्त्रोत म्हणजे, गावी घरासमोर असलेली थोडीफार शेती. पोटापाण्यापुरते पैसे आरामात मिळतात त्यातून, पण बायकोला ते कमीपणाचं वाटायचं आणि शेवटी १५ वर्षाच्या पोरीला माझ्याकडे सोपवून निघून गेली… आता ती मुलगी सुद्धा घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतेय आणि गेला एक आठवडा ती घरी आली नाही. मित्राच्या ऑफिसमध्ये काम करतेय म्हणाली.. वेळ मिळाल्यास घरी चक्कर मारेन लवकरचं असं म्हणतेय… माझी मुलगी मलाच म्हणतेय जमल्यास घरी चक्कर टाकेन.. काय बोलावं? तिचा खूप राग आला होता, पण तिला ओरडू शकत नाही. काही म्हणालो तर, घर सुद्धा सोडून जाईल जेन. कोणाशी बोलावं, मन मोकळं करावं, तर शेजारी कोणी नाही. माझा सख्खा शेजारी माझ्या घरापासून जवळजवळ ३०-३५ किलोमीटर अंतरावर राहतो. मोबाईल नाही, टीव्ही नाही.. आहे ते फक्त इंटरनेट

मी:- स्टिफन, वाईट वाटलं हे ऐकून !!

स्टिफन:- आमच्या इथे नात्यांना फार कमी वेळ किंमत असते… काही वेळा वाटतं की, ही नाती अशीच टिकतील…पण कुठल्याही क्षणी, तो माणूस आपल्याला लाथाडून दूर निघून जातो, कधीच परत नं येण्यासाठी.. माझं दोघींवर खूप प्रेम आहे रे.. पण त्यांना त्याची किंमत नाही… आज मनसोक्त दारू प्यायलो आहे, मस्त बार्बेक्यू बनवायचा प्लान आहे आणि तुझ्याशी बोलतोय.

मी:- (विषय बदलावा म्हणून) अरे व्वा.. बार्बेक्यू..सही हैं… ख्रिसमसची तयारी सुरु झाली का? (मी स्वतःच जीभ चावली, त्याला तर अजुन दोन महिने अवकाश आहे)

स्टिफन:- हा हा हा हा… विषय बदलतोयस…ख्रिसमसला अजुन खूप वेळ आहे रे. जाऊ दे. तू कर तुझं काम…!!

मी:- सॉरी, बोलण्याच्या ओघात निघून गेलं. मुद्दामून नाही बोललो..

स्टिफन:- ह्म्म्म्म..ठीक आहे रे. मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होत… तुमच्या नेटवर्कमध्ये, ह्या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन फिरवता येतो, म्हणून मी फोन केला आणि सगळा राग रिता केला तुझ्यावर. माफ कर मला, खरंच माफ कर !!

मी:- (मी काय बोलावं मला सुचत नव्हतं…मॅनेजरला खुणावलं, त्याने हाताने खुन करून सांगितलं कट कर फोन..एएचटी वाढतेय (AHT = Average Handle Time)) स्टिफन, मी समजू शकतो तुझी परिस्थिती….पण आम्हाला वैयक्तिक गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत. जर तुला सर्विसचा काही प्रॉब्लेम नसेल, तर मला हा कॉल कट करावा लागेल….सॉरी !!

स्टिफन:- हो हो.. नक्की कर आणि होsss (तोडक्यामोडक्या शब्दात का होईना तो आनंदाने हिंदीत ओरडला) फिर मिलेंगे !!!

मी:- नक्की… काळजी घे.. Bye !!

=======================================================

अमेरिकेच्या लॅविश संस्कृतीबद्दल सगळ्यांना माहित आहेच, पण तिथे असाही एक वर्ग आहे जो त्या लॅविशपणाला कंटाळून शहराबाहेर पळ काढतोय (आपल्यासारखंच). काय बोलावे सुचत नव्हते. एक वेगळेच वास्तव समोर आले होते..आपल्याकडे सुद्धा आपल्या मनात कधी कधी विचार येतो, जाऊया आता गावाकडे, शहरात राहून कंटाळा आलाय. ह्या धकाधकीच्या जीवनात आता जगायचा खरंच कंटाळा आलाय. 😦

मी मॅनेजरला ओरडून सांगतो, चल मी आता ब्रेक घेतो. तो जा म्हणाला आणि मी दारातून बाहेर पडणार इतक्यात तो ओरडला… “सुहास, स्टिफनने सी-सॅट भरा हैं तेरे कॉल कें लिये, और बार्बेक्यू पार्टी का इन्व्हिटेशन भी भेजा हैं…!! 🙂 ”

मी नुसताच हसलो… आणि बाहेर पडलो !!

पूर्वप्रकाशित – मीमराठी दिवाळी अंक २०११

— सुझे !!

गुंतता हृदय हे….!!

साठ्ये कॉलेजमध्ये एकदम उत्सवाचे वातावरण होते. कॉलेजच्या वार्षिक युथ फेस्टिव्हल्सची तयारी जोरदार सुरु होती. रोज टीव्ही, वर्तमानपत्रात जाहिराती झळकत होत्या. एकंदरीत हा फेस्टिव्हल कॉलेजसाठी प्रतिष्ठेचा बनला आणि त्यामुळे आयोजनात कुठल्याही प्रकारची हयगय केली जात नव्हती. फेस्टिव्हलच्या थीमचा एक भाग म्हणून, कॉलेजने दरवर्षीप्रमाणे एक स्मरणिका छापायचे ठरवले आणि त्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य पाठवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले गेले. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रवेशिका पारखून निवड करणे सुरु होते. मराठी साहित्य छाटणीचे काम कॉलेज जिमखान्यात सुरु होते.

ह्या आयोजनाला सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता आणि एक से बढकर लेख, कविता आयोजाकांपर्यंत पोचल्या होत्या. इतके लेख आणि साहित्य त्यांच्याकडे पोचले की, त्यांनी अजुन प्रवेशिका घेणे बंद केले आणि तशी सूचना नोटीस बोर्डावर लावली. सगळे आयोजक कँटिनमध्ये चहा घ्यायला गेले. जेव्हा ते सगळे जण परत आले, तेव्हा त्यांना जिमखान्याच्या टेबलावर एक बंदिस्त लिफाफा आढळला. फेस्टच्या मासिकासाठी एका मुलीने कविता लिहून पाठवली होती. त्या पाकिटावर तिने नाव आणि बाकी माहिती लिहिली होती. आयोजकांपैकी एकाने ते पाकीट उघडलं आणि कविता वाचायला सुरुवात केली..

==================================
आज पुन्हा तेच स्वप्न पडलं..
मला उडता येत होत..
आसमंतात करत होती मुक्त संचार..
स्वच्छंदी मनात फक्त तुझाच विचार..

पंख काही नव्हते मला..
तरीही मी उडत होते..
हवं तसं हवं तिथे..
जणू मी हवेत तरंगत होते..

मग मनात विचार आला..
कुठे बरं जावं, काय बरं शोधावं..
क्षणाचाही विलंब जाहला नसावा..
आतून वाटले तुझा चेहरा पाहावा..

रात्रीचा गर्द अंधार..
सगळं जग निद्राधीन..
मी मात्र तुझ्या ओढीने..
उडत राहतेय दिशाहीन…

अखेर एक खिडकी दिसते..
हे तुझेच घर अशी खात्री पटते..
मला कसं कळलं विचारू नकोस..
स्वप्नातल्या गोष्टींवर अंकुश नसे..

मी तशीच विहरत त्या खिडकीपाशी येते..
तुझ्या ओढीने शोधाशोध करते..
पलंगावर तू निर्धास्त पहुडलेला..
अंधारात फक्त तुझा चेहरा उजळलेला..

डोळ्याचे पारणे फिटे पर्यंत..
मी फक्त तुला पाहते..
अरे कूस बदलू नकोस..
असंच मनोमन पुटपुटत राहते..
===============================

स्मरणिकेचे संपादक: “ह्म्म्म…..चांगला प्रयत्न आहे…प्रियकराची आठवणीत हरवलेली एक प्रेयसी. एकदम जीव ओतून लिहायचा प्रयत्न केलाय. पण… पण आपण ही कविता नाही स्वीकारू शकत. कविता उशिरा पाठवलीय. (ते शिपायाला हाक मारतात)
“पांडू, हे पाकीट ह्या पोरीला नेऊन दे आणि तिला सांग कविता नाही स्वीकारू शकत, कारण साहित्य द्यायची मुदत संपली आहे म्हणून” आणि सगळे कामात गर्क होतात.

“तो” मात्र ती कविता वाचून स्तब्ध झाला होता. त्याला राहून राहून त्या मुलीचं नाव ओळखीचे वाटत होतं. तो लगेच पांडूच्या मागून धावत गेला आणि आडूनआडून बघायला लागला की ती मुलगी नक्की कोण…पांडू एका वर्गासमोर जाऊन उभा राहतो आणि त्या मुलीला आवाज देतो. ती बाहेर येते, पण ह्याला तिचा चेहरा दिसत नाही. पांडू तिच्याशी बोलत असतो. तिला आपली कविता नाकारली आहे हे निश्चितचं आवडत नाही, आणि ती तो कागद चुरगळून बाहेर फिरकावते. हा तिला बघायचा प्रयत्न करतो, पण त्याला फक्त एक पाठमोरी आकृती दिसते, जी डोळे पुसत वर्गात जात असते. तो लगबगीने उठतो आणि धावतच त्या कागदाच्या बोळ्याजवळ पोचतो. कोणी बघत नाही हे बघून, ती कविता नीट घडी करून खिशात ठेवून देतो.

कॉलेजच्या आवारात विविध स्पर्धांच्या पात्रता फेरी सुरु होत्या. सगळीकडे नुसता गोंधळ सुरु होता. फेस्टची तयारी पुर्ण होत आली होती. आता सगळे आतुरतेने त्या दिवसाची वाट बघत होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरु होती. होता होता फेस्टिव्हलचा दिवस उजाडला. कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी अधिकृतपणे फेस्टिव्हल सुरु झाल्याची घोषणा केली. आता पुढचा आठवडाभर नुसता हैदोस घालायला सगळे मोकळे.

विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी विविध स्पर्धेतून भाग घेत होत्या, सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सायन्स म्हणा, वकृत्व म्हणा, रोबोटिक्स म्हणा की गायन म्हणा….आयोजनात काही कसूर पडली नव्हती. सगळं कसं सुरळीतपणे सुरु होतं. संयोजकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना “उत्सव” ह्या स्मरणिकेचे वाटप सुरु केलं. साहित्याची ही मेजवानी कोणी सोडेल तर शप्पथ…!!!
त्यातल्या कथा आणि कविता इतक्या उत्कृष्ट दर्ज्याच्या होत्या, की सगळ्यांना ते आवडत होत. तिला सुद्धा स्मरणिकेची एक प्रत दिली होती, पण ती तोंड पाडून लायब्ररीकडे जात होती. तिला अजिबात रस नव्हता वाचनात. तिचा प्रचंड हिरमोड झाला होता आपली कविता नाकारल्यामुळे . तासभर लायब्ररीत बसून ती घरी जायला निघाली. दरवाज्यातच तिच्या मैत्रिणी घोळक्याने उभ्या होत्या आणि काही तरी कुजबुजत, खिदळत होत्या.

तिला काही कळले नाही, तिने विचारलं तिच्या मैत्रिणीला, “काय गं.. काय झालंय?” तिच्या मैत्रिणीने काही नं बोलता, स्मरणिकेचे एक पान उघडून तिच्या पुढे केलं. कवितेचे शीर्षक “शीर्षक नसलेली कविता” होतं आणि ती तिचीच कविता होती. कोणीतरी त्या कवितेचे रसग्रहण केलं होतं.

कसला तरी शॉक लागल्यासारखं ती उभी होती, काय बोलावं तिला सुचत नव्हतं. तिने ते रसग्रहण वाचले आणि तिचे डोळे पाण्याने डबडबून गेले. काही झालं तरी तो स्वतःला सावरू शकत नव्हती. ज्याने ते रसग्रहण लिहिलं होतं, त्याने तिच्या भावना तंतोतंत हेरल्या होत्या आणि त्या सुरेख शब्दातून मांडल्या होत्या. ती धावतच जिमखान्याकडे निघाली. तिथे चौकशी केली त्या लेखाबद्दल, पण कोणालाच काही नक्की माहित नव्हते. लेखकाचे नावं अनामिक असल्यामुळे त्यावरून ओळखणे अशक्य होते. ती बावरून इकडेतिकडे बघू लागली. काय करावं, कोणाला विचारावं म्हणून मग ती कल्चरल कमिटीच्या ऑफिसकडे जाऊ लागली. निदान त्यांना नक्की माहित असेल ह्या आशेने. तिथे गेली, पण तिथे कोणीच नव्हते.

ती दरवाज्याजवळ असलेल्या बाकावर ढिम्मपणे बसली. मनात विचारांचे सत्र सुरु होतेच. कोणी केलंय हे रसग्रहण, कोण मला इतकं चांगलं ओळखत इथे. बालपणापासूनचे शिक्षण रत्नागिरीला झाल्यामुळे, हे तर माझं पहिलंच वर्ष ह्या कॉलेजमध्ये, नव्हे ह्या शहरातसुद्धा. काय करावं कळत नव्हतं. आजवर जे कोणाला तिने कधी सांगितलं नाही, ते आज तिलाच कोणीतरी समजावून सांगताय. त्या एक एक शब्दात अशी जादू होती, की तिला नकळत त्याची आठवण येऊ लागली. जुने दिवस आठवू लागले. शाळेतली शेवटची दोन वर्ष आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये असतानाचे दिवस तिच्या डोळ्यासमोर झरझर येऊ लागले.

त्या घडामोडी, ते मित्र, त्या पिकनिक्स, ती भांडणं आणि तो… हो त्याला कशी विसरणार होती ती. त्याच्या आठवणींत तिने अनेक रात्री रडून जागवल्या होत्या. कोणी कधी नकळतपणे आपल्या आयुष्यात येतो, आपल्याला धीराने सांभाळतो, आपण आपलं आयुष्य त्याच्यावर समर्पित करायला तयार असतो आणि अचानक..अचानक तो कुठेतरी दूर निघून जातो. ना त्याची काही खबर, ना कधी फोन. त्याला डोळेभरून बघायला तिचे डोळे तरसले होते, पण अचानक तो निघून गेला होता तिच्या आयुष्यातून. तिच्या मैत्रिणींनी खूप समजावलं, जाऊ दे त्याला विसर आता, त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. काही वाटत असतं तर तो गेलाच नसता तुला सोडून. तू तुझं आयुष्य बरबाद करून घेऊ नकोस… पण हिच्या मनात तो कुठेतरी खोलवर रुतून बसला होता. त्याचा आवाज, त्याची माया, त्याचा लडिवाळपणा ती अजिबात विसरू शकत नव्हती. आज इतक्या वर्षांनी तो भेटेल असं तिला वाटलं, पण तो कशाला येईल परत? जर त्याला यायचं होतं, तर सोडूनच का गेला… जाऊ दे आपण नको त्याचा विचार करायला असं मनात म्हणत ती बाकावरून डोळे पुसता उठायला लागली.

तेव्हढ्यात कोणीतरी तिला आवाज दिला,”हाय, तूच ती कविता लिहिली होतीस नं….(तो अडखळत बोलत होता)” ती डोळे पुसत म्हणाली,”Excuse Me, तू कोण.. तुला माझ्याबद्दल काय माहितेय? मी तुला ओळखते काय?” त्यावर तो म्हणाला, “नीट बघ नक्की ओळखशील..!!” तिने परत डोळे पुसले आणि त्याच्याकडे बघून आठवू लागली, की ह्याला कुठे बघितलंय म्हणून… (काहीसं आठवून..उत्साहाने) “अरे तू तर माझ्या शाळेत होतास नं, बॅकबेंचर? ना कधी कोणाशी बोलायचा, मोजक्या मित्रांबरोबर रमायचा..बरोब्बर?” 🙂

“हो बरोब्बर !! छान वाटलं तुला मी अजुन आठवतोय बघून”

“अरे मी कोणालाच विसरले नाही, पण तू किती बदललायस..म्हणून लगेच ओळखणं कठीण गेलं बस्स…कसा आहेस? तुला त्या कवितेबद्दल काय माहित आहे?”

“अरे हो हो.. किती ते प्रश्न…मला तुझ्याबद्दल बरचसं माहित आहे..त्यानेच सांगितलं होत…(तिचा चेहरा पडतो) प्रेम वगैरे एक आभास असतो, असं त्याला वाटायचं. आयुष्यात एक वय असं असतं, की प्रत्येकाला एका आधाराची गरज असतेच. त्याला तो फक्त काही क्षणांचा आभास वाटला आणि तो तुझ्या आयुष्यातून निघून गेला…शाळेचं वर ते. एक चूक म्हणून तो पुढे निघून गेला…पण मी तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी येणार पाणी बघितलंय तेव्हाही आणि आजही… तुझं त्याच्यावर असलेलं प्रेम मी तुझ्या डोळ्यात वाचलंय, तुझी होणारी तळमळ मी तुझ्या कवितेतून वाचली आणि न राहवून तो लेख लिहिला…”

“क्क्काय… तू तो लेख लिहिलास… पण का? काय गरज होती..? मला वाटलं की… त्याने ….”

“ह्म्म्म्म… मला माफ कर, पण काही गोष्टी नाही सांगू शकत. प्लिज मला कारण विचारू नकोस, मी नाही सांगू शकणार”

“तुला सांगावच लागेल, आज मला वाटलं की कितीतरी वर्षांनी तो माझ्याशी बोलतोय…तिच भावना, ते प्रेम. मला तू सांग, हा नक्की काय प्रकार आहे?”

“प्लीजजजजजज, मला नको भाग पाडू… मी नाही सांगू शकणार”

“तुला सांगावच लागेल, तुला माझी शप्पथ…” (हे बोलताना तिने हलकेच जीभ चावली. अरे ह्याला आपण असं कसं बोललो, कुठल्या हक्काने..) ती वरमून त्याला सॉरी म्हणाली, “नको सांगूस, नसेल सांगण्यासारखं”

“खरंच नाही सांगण्यासारखं, काय सांगू तुला.. तुला ते नाही आवडणार?”
“ह्म्म्म.. राहू दे, कदाचित तुला ते मला सांगण्यात, कमीपणाचे वाटत असेल. तू त्याचा मित्र, तुला त्याची बाजू बरोबर वाटणार आणि सगळी चूक माझी असेल हे गृहीत धरले असशील. असो, मला नाही काही फरक पडत. माझ्या भावना समजून घेणारं कोणीच नाही” 😦

“कमीपणा?…(त्याचा आवाज एकाएकी चढला) बोल नं काय सांगू काय? सांगू की माझं तुझ्यावर प्रेम होत आणि आजही आहे? जेव्हा आपण सगळे भेटायचो, तेव्हा त्याच्या निम्मिताने का होईना तुला बघता यायचं. तुझ्या बरोबर काही क्षण एकत्र घालवता यायचे… पण अचानक तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हरवलेले बघून खूप त्रास झाला. तुला होणारा त्रास मी बघितलाय. पण तुझी त्याच्यासाठी होणारी तळमळ इतकी निर्मळ होती, की माझं एकतर्फी प्रेम तुला कधी सांगू शकलो नाही.. कधी धीर झालाच नाही. तो असा निघून गेला तुझ्या आयुष्यातून की, काही झालेच नाही. त्याला सगळ्यांनी दूषणं दिली, पण तू त्याला कधी काही म्हणाली नाहीस. लोकं त्याच्याबद्दल काय नकोनको ते बोलत होती, पण तुझं मन फक्त त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतं आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे.. अगदी आजपर्यंत… मला काही हक्क नाही तुझ्या भावनांना लोकांसमोर आणायचा. पण.. पण त्यादिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू आणि एक विशिष्ट संताप बघितला आणि राहावलं नाही आणि ती कविता….. सॉरी !!” 😦

ती काहीचं बोलत नव्हती… खाली मान घालून हातातल्या रुमालाशी चुळबूळ करत होती… तो गप्प का झाला म्हणून तिने डोक वर काढलं, तर तिला फक्त त्याची डोळे पुसत जाणारी पाठमोरी आकृती दिसली.. ना तिने त्याला थांबवलं, नं त्याने मागे वळून बघितलं …

पूर्वप्रकाशित – दीपज्योती दिवाळी अंक २०११ (जालरंग प्रकाशन)

— सुझे !!