गेल्यावर्षी २५ तारखेला रोहनमुळे तिकोना दुर्गाला भेट देण्याचा योग आला. तो अनुभव अविस्मरणीय होता. पहिल्या मराठी ब्लॉगर्स ट्रेकनंतर, आम्हा सर्वांची ती दुसरी भेट होती. ह्या ट्रेकचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे अनघा, श्रीताई ह्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. यावर्षीदेखील त्याच तारखेला तो योग जुळून आला आणि आम्ही सगळे कासला भेट देण्याचे ठरवले. राजीवकाकांनी सगळी व्यवस्था चोख केली होती, त्यामुळे प्रवासाचा अजिबात त्रास झाला नाही. बरोब्बर १२:३० ला आम्ही ठाण्याहून प्रवास सुरु केला. रात्रभर आम्ही गाणी म्हणत / केकाटत जागून काढली. आमची मैफिल एकदम मस्त जमली होती. पहाटे ५ वाजता गौरीला चांदणी चौकातून पिकअप करून, आम्ही कासच्या दिशेने कुच केले.
कास पठार म्हणजे फुलांचा स्वर्ग. गेली अनेक वर्ष काहीसा दुर्लक्षित असा हा भाग, आता सातारा जिह्यातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र बनलं आहे. फोटोग्राफीची आवड असलेल्या मंडळींना तर ही वेगळी पर्वणीच. फुलांचा सडा पडावा, अशी फुलं संपूर्ण पठारावर (१२०० एकर) विखुरलेली आहेत. अनेक प्रकारची विविधरंगी फुलं आपल्याला इथे बघायला मिळतात. अजुन जास्त लांबण लावत नाही, काही निवडक फोटो टाकतोय. एन्जॉय 🙂 🙂
सूर्योदय..बसमधून उतरल्यावर हे साहेब एकदम अंगावर धावून आले 🙂 🙂सकाळचा नाश्ता गरमागरम कांदा पोहे !!कास पठारावर स्वागत !!--
दीपक, चैतन्य, देवेंद्र, राजीव काका, धुंडीराज, सागर आणि भारत ...
कास पठाराची भेट मस्तच झाली. सगळ्यांनी एकदा नक्की भेट द्यायला हवी, पण लवकरात लवकर. इथे मानवी वस्ती वाढली, तर ह्या जागेचं काही खरं नाही..तसे काही ठिकाणी प्लॉटस् ची बुकिंग झालेली दिसते पठारावर जाताना, कुंपणांची गर्दी होती थोडीफार 😦
आज २२ सप्टेंबर २०११, बरोब्बर २ वर्षापूर्वी मराठी ब्लॉगिंगचा || श्री गणेशाय नम: || करून मराठी ब्लॉगविश्वात पदार्पण केलं होत. सुरुवात पार डळमळीतच झाली, काही धड लिहिता येत नव्हतं आणि शुद्धलेखनाचे पार बारा वाजवले होते. अजूनही तशीच परिस्थिती आहे म्हणा, पण त्यातल्यात्यात थोडा सुधारलो म्हणता येईल 🙂
ह्या पोस्ट द्वारे, पुन्हा एकदा महेंद्रकाका आणि हेरंबचे आभार मानतो. ह्यांनी भरीस पाडलं नसतं तर, इथवर कधीच आलो नसतो. ह्या दोघांनी लिखाणाला खूप खूप पाठींबा दिला. 🙂
(हा प्रयत्न आवडला नसल्यास, कोणाला जबाबदार ठरवावे हे सुज्ञास सांगणे न लगे 😛 )
दुसरा वाढदिवस 🙂 🙂
सुरुवातीला मराठी ब्लॉगविश्व खूप लहान भासलं, पण जशी जशी ओळख होत गेली, तशी त्याची व्याप्ती किती मोठी आहे ते कळले. मराठीमध्ये लिखाण करणारे हजारो ब्लॉग्स बघून मनात प्रचंड आनंद जाहला, पण खूप जणांनी चांगली सुरुवात करून नंतर लिहिणे बंद केले. 😦 चांगली गोष्टी अशी की, जे नियमित लिहायचे त्यांच्यामुळे मला सतत काहीबाही खरडायची सवय लागली.. खूप नावं घेता येतील यासाठी – देवेंद्र, कांचनताई, तन्वीताई, रोहन, अपर्णा, योगेश, आनंद पत्रे, अनुजा ताई, विद्याधर, सिद्धार्थ, विशुभाऊ, तृप्ती, मैथिली, देवकाका, दीपक, अनु, सागर…. अजुन खूप नावं आहेतच, बाजूला लिस्ट आहे बघा निवडक ब्लॉग्सची 🙂
ह्या सर्वांची ओळख सुरुवातीला मराठी ब्लॉगर्स म्हणून झाली, मग ते ब्लॉगर्स मित्र झाले आणि आता ते चांगले मित्र झाले आहेत, जे ब्लॉग्स लिहितात. रक्ताच्या नात्याहून काही महत्वाची नाती ह्या ब्लॉग्स मुळे मिळाली आणि त्याचा वेळोवेळी प्रत्यय देखील आला. खरंच स्वतःला खूप नशीबवान समजतो, की हा ब्लॉगिंगचा किडा मला चावला आणि आज मी इथवर आलोय. सुहास झेले चा सुझे आणि काही जणांसाठी सुझे चा अण्णा (अण्णा हजारे नव्हे 🙂 ) कधी झालो, ते कळलेच नाही. ह्या वर्षी मराठी ब्लॉगर्स मेळाव्याचे आयोजन करायची संधी सुद्धा मला मिळाली 🙂
मराठी ब्लॉगविश्व, मराठी ब्लॉग जगत, नेटभेट, मी मराठी.नेट, मिसळपाव, मायबोली अश्या अनेक मराठी संस्थळांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला एक निराळं अस्तित्व दिलं आणि सगळ्यांत महत्वाचे आभार ब्लॉग वाचकांचे, ज्यांनी वेळोवेळी प्रतिक्रियांमधून आपले मत बिनदिक्कतपणे मांडले. जे मला पुढल्या वाटचालीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरले. सर्वांचे मन:पूर्वक आभार. 🙂
आजवर ब्लॉगवर ११८ पोस्ट पब्लिश केल्या असून, माझ्या प्रतिक्रियांच्या कमेंट्स धरून, एकूण २६९० कमेंट्स ब्लॉगला मिळाल्या आहेत आणि सध्याची वाचकसंख्या ५२,६०० आहे. 🙂
मध्यरात्रीच्या सुमारास गेट वेच्या उधाणलेल्या समुद्रात काही सेकंदासाठी एक तेजस्वी प्रकाश पसरला. दिल्लीत परवा बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे आज पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त होता. कोणाला वाटलं तो कॅमेराचा फ्लॅश आहे, तर कोणाला वाटलं लाईट हाऊसचा दिवा. कोणी ते विशेष गांभीर्याने घेतलं नाही आणि दुर्लक्ष केलं.
इतक्यात एका हवालदाराने अंधारात उभ्या असलेल्या व्यक्तीला हटकले, “ए कोण रे तू, इतक्या रात्री इथे काय करतोयस, दिसत नाही इथे यायला बंदी आहे ते??”
“नारायण नारायण…वत्सा तू मला ओळखले नाहीस काय? (हातातल्या चिपळ्या वाजवत) मी नारदमुनी, देवलोकी माझा मुक्काम असतो”
पिऊन आला आहेस वाटतं? कुठे चालला आहेस? आणि .. हाता-पायाला गजरे, लांब केस, हा अवतार कसला रे? – इति हवालदार
“देव तुला क्षमा करो, पण मी जरा घाईत आहे. मला वाटतं मी चुकीच्या ठिकाणी आलोय. असो मला लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे आहे… मी निघतो …!!!
ऑ.. तो हवालदार काही बोलायच्या आत नारदमुनी तिथून अदृश्य !!
इकडे नारदमुनी लालबागच्या राजाच्या, इति मुंबईच्या राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोचले. तिथे पोलिसांनी परत त्यांना हटकले, आणि रांगेकडे काठी दाखवून, तिथं उभं राहायला सांगितले. मुनींनी मान वाकडी करून रांगेच्या शेवटचा अंदाज घेतला, आणि हताशपणे आकाशाकडे बघितले. तर लगेच तिथला एक कार्यकर्ता त्यांच्यावर खेकसला, “ए चल, मागे जा, दिसत नाही का इतकी लोकं इथे दर्शनासाठी उभी आहेत? चल मागे जा !!!”
नारदमुनी आता वरमले, आणि पुढल्याक्षणी ते अदृश्यरुपात राजाच्या मंचावर अवतरले. मंचासमोर भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी लोटली होती. गणपती बाप्पा मोरयाचा नाद आसमंतात दुमदुमत होता. राजा सर्वांना मनोभावे आशीर्वाद देत होता. तितक्यात राजाचे लक्ष नारदमुनींकडे गेले, डोळ्यात आश्चर्यकारक भाव दाटले आणि गडबडीत सिंहासनावरून पायउतार होऊ लागले. तो नारदमुनींच्या पाया पडला.
“नारायण ..नारायण, कसा आहेस गणेशा? भूतलावर सगळं आलबेल नं?”
“हो मुनिवर्य, पण आपण अचानक इथे कसे येणं केलंत? मी येतंच होतो काही दिवसांनी देवलोकी…”
“हो हो.. माहित आहे, आपला मुक्काम रविवारपर्यंत आहे इथे. आज भगवान विष्णू आणि भगवान शंकर चर्चा करत असताना आपला विषय निघाला. आपल्या आगमनाची इतकी जोरदार तयारी बघून दोघेही भारावून गेले, मग मलाही राहवले नाही आणि तुमचा दरबार बघायला आलो इथे.”
“अहो, दरबार कसला? लोकांची प्रचंड श्रद्धा आहे माझ्या ह्या रुपावर. जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्तमंडळी इथे येतात…”
“नारायण नारायण… हे ऐकून खूप आनंद जाहला राजा. आपली कीर्ती जगभर पसरली आहे. आपल्यासमोर भक्तांचा महासागर आहे. केवळ मुखदर्शनासाठी पाच-पाच प्रहर लोकं रांगेत उभे राहतात.
“मुनिवर्य, माझ्याकडून काही अपराध झालाय का? मला आपण आदरार्थी सन्मान का देत आहात? मी आपल्यासाठी तोच गौरीपुत्र गणेश आहे”
“नाही रे गणेशा, अपराध कसला…. इथे तू राजा आहेस, तेव्हा तुला मान मिळायला हवाच. तू भक्तांचा लाडका आहेस, ते तुला विश्वासाने, श्रद्धेने नवस बोलतात आणि ते नवस पुर्ण झाल्यावर तो फेडायला ही येतात मोठी-मोठी दक्षिणा घेऊन. तुझे स्वयंसेवक रोज किती दक्षिणा अर्पण झाली याची जाहीर घोषणा देखील करतात. तुझे भक्त तहानभुक विसरून रांगेत उभ्याने तुझ्या नावाचा गजर करत असतात. भांडणे होतात, बाचाबाची होते. तुझ्या मंडपाच्या सुरक्षेसाठी हजारो माणसं दिवसरात्र झटत असतात. त्यावरून त्यांचे तुझ्यावर असलेले प्रेम दिसले रे मला”
(हे ऐकून राजा वरमला) “माफी असावी, पण ह्यात माझा काही दोष नाही. मी कुठल्याही भक्ताकडून कसलीही अपेक्षा करत नाही. भक्तगण इथे माझ्या दर्शनासाठी येतात याचा मला आनंद आहेचं, पण त्यांनी फक्त इथेच यावे असा माझा अट्टहास कधीच नसतो. मी तर इथल्या बाजार वसाहतीचा मूळ गणपती, त्यांनी श्रद्धेने माझी नित्यनेमाने स्थापना केली. पण हळूहळू मला मोठ्ठं केलं गेलं आणि आता मला इतकं मोठं केलंय की मला शब्दात वर्णन करता येणार नाही मुनिवर. हौसेला मोल नसते, तसेच श्रद्धेला ही नसते हे ही तितकंच खरं. केवळ अमुकतमुक ठिकाणाचा गणपती पावणारा मग तिथे भक्तांचा नुसता खच पडलेला, पण माझ्या कुठल्या छोट्याशा पडीक मंदिरात माझ्यासमोर साधा दिवा लागत नाही किंवा वर्षोनुवर्षे माझी पूजा केली जात नाही” 😦
“गणेशा, शांत हो, मी समजू शकतो !! ही मानवाची मनोवृत्ती आहे रे. तो देवाला पुजतो, मनोभावे सेवा करतो. देवाला इतकंच हवं असतं हे मात्र विसरतो. मोठ्या देणग्या दिल्यावर देव श्रीमंत होत नाही, श्रीमंत होणार ती केवळ माणसंच. तू कुठल्याही अपेक्षेविना भक्तांच्या मनोकामना पुर्ण करतोस, पण हे त्यांना ह्या जन्मात कळणे अशक्य आहे. गणपती म्हटलं की तू किंवा सिद्धिविनायक, साईबाबा म्हटलं की शिर्डी अशी धारणा लोकांच्या मनावर बिंबवली गेली आहे, मग त्यासाठी त्यांचेच एखादे छोटे रूप आपल्या आसपास दुर्लक्षित राहिले तरी चालेल” 😦
“अगदी मनातलं बोललात तुम्ही मुनिवर, पण…पण मी कसं समजावू….काय करू मी?”
“नारायण नारायण.. हताश नको होऊस गणेशा, तुझ्या ह्या रुपाने जी स्वार्थी लोकं आपला फायदा उचलत आहेत ते तू बघतो आहेसच, पण तुझ्या दर्शनासाठी आलेली ही भक्तमंडळी भोळी आहेत, तुझ्या भक्तीने त्यांना मानसिक समाधान मिळतंय त्यांना निराश नको करूस. सदैव त्यांच्यावर तुझी कृपा ठेव.”
“जशी आपली आज्ञा मुनिवर !!”
(राजा नारदमुनींच्या पाया पडतो)
“नारायण नारायण… चल गणेशा आता मला निघायला हवं. तुझा हा दरबार प्रत्यक्ष बघायचा होता म्हणून इथे आलो, पण मी जे बोललो ते लक्षात असू दे !!”
“होय मुनिवर, अजुन थोडावेळ थांबता नाही का येणार? कितीतरी महिन्यांनी कोणाशी प्रत्यक्ष बोलायला मिळालंय”
“माफ कर गणेशा, पण मला निघायला हवं. तुझ्या प्रवेशद्वारासमोर एका पडवीत गरीब कुटुंबाने तुझी मनोभावे स्थापना केली आहे. मला तिथे थांबायला जास्त आवडेल.. नारायण नारायण !!!”
(नारदमुनी अदृश्य होतात. राजा हताशपणे आपल्या सिंहासनावर बसतो आणि भक्तांना हात वर करून आशीर्वाद देतो)
लालबागचा राजा... (फेसबुकवरून साभार)
———————————————————————————————
तळटीप – कोणाला राग आला असेल तर मानून घ्या, पण ही सत्य परिस्थिती आहे. मनात जे होत, तेच इथे प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न केलाय.