किल्ले पेठ (कोथळीगड)

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना सह्याद्रीतील गिरीदुर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे त्यांनी असंख्य गिरीदुर्ग लष्करीदृष्ट्या भक्कम केले होते. हे करताना त्यांनी फक्त आपले लक्ष्य बलाढ्य गिरीदुर्गांवर केंद्रित न करता, छोट्या छोट्या गिरीदुर्गांवरही केंद्रित केले. शिवकालात मोक्याच्या ठिकाणी असलेले गिरीदुर्ग, टेहाळणीसाठी उपयोगात आणले जात असे.

कोथळीगड हा देखील असाच टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला. मागे ब्लॉगवर लिहिलेले कामण आणि असावा हे देखील, त्याच प्रकारात मोडणारे किल्ले. पेठला मी २००८ मध्ये प्रसन्न आणि अनिशबरोबर जाऊन आलो होतो, रविवारी खास विक्रांतसाठी पुन्हा पेठवारीला तयार झालो. कर्जतपासून २१-२२ किलोमीटर अंतरावर, आंबिवली नावाचे छोटे गाव आहे. एसटी थांब्याजवळ असलेल्या हॉटेलच्या बाजूने एक पक्का रस्ता पुढे जातो. त्या रस्त्यावरून २-३ मिनिटे चालल्यावर, डाव्या हाताला एक चढणीचा कच्चा रस्ता लागतो. हीच वाट धरून पुढे जायचं. आंबिवली गावापासून पेठ गावापर्यंत असलेलं अंतर अंदाजे ३ किलोमीटर. एक वाईट गोष्ट म्हणजे पुढील काही वर्षात, लोखंडवाला बिल्डर्सचं एक प्रोजेक्ट ह्याच कच्च्या रस्त्याच्या सुरुवातीला बनतंय. बुकिंग सुरु असल्याचा बोर्ड लावला आहे तिथे. 😦  त्या वळवळणाच्या कच्च्या रस्त्याने पुढे गेलो, तर एक तासाभरात आपण पेठ गावाच्या पठारावर पोचतो. पेठवाडीजवळ हा किल्ला असल्याने, ह्याला पेठचा किल्ला असेही म्हणतात… 🙂

हाच तो कच्चा रस्ता...

एकदा पठारावर पोचल्यास तुम्हाला पेठ किल्ला स्पष्ट दिसू लागेल.  दुरून बघितल्यावर एका पाणबुडीच्या आकाराचा हा किल्ला दिसतो आणि पठाराच्या उजव्या बाजूला मस्त दरी आणि शुभ्र कोसळणारे धबधबे दिसतात. एकदम प्रसन्न वाटतं इथे. मस्त जोरदार हवा सुरु असते, आणि समोर मस्त हिरव्या गवताचा गालीचा आपले भान हरखून टाकतो.

समोर आहे तो पेठचा किल्ला..

पेठ गावात पोचल्यावर मस्त गरमागरम चहा मारला. हॉटेल मालकाकडून गडावर जायच्या वाटेची माहिती घेतली. मी मागे जेव्हा आलो होतो, तेव्हा गाव अगदी साधसुधं होत, पण आज गावात मस्त पक्की घरे आहेत.  गावाच्या बाहेरूनच, शेतीच्या बंधाऱ्यावरून गडावर जायला वाट आहे, पण मी जो रस्ता माहित आहे त्याच रस्त्याने जायचे ठरवले. हा ग्रुप पूर्णपणे नवीन होता माझ्यासाठी, मी फक्त विक्रांतला ओळखत होतो. बाकी धुंडीराज आणि ज्यो नेहमीचीच मंडळी. सगळ्यांची मस्त ओळख झाली होती आणि आम्ही धम्माल करत होतो. काही जणांचा हा पहिलाच ट्रेक होता, त्यामुळे त्यांना सांभाळून आम्ही पुढे जात होतो.

Team Trek Along

गावापासून गडाची वाट एकदम सोप्पी आहे. ३५-४५ मिनिटात आपण एका भग्न प्रवेशद्वारातून गडावर पोचतो. तिथून उजवीकडील पायऱ्यांच्या वाटेने आपण एका प्रशस्त गुहेजवळ येऊन पोचतो. ही गुहा पूर्णपणे कातळात खोदून काढली असून, गुहेच्या तोंडाशी भैरोबाचं देऊळ आहे. गुहेतील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले असून, गुहेत जनाईची मूर्ती आहे. तिथे कोल्हापूरच्या दुर्गमित्र संस्थेने माहितीसाठी एक फ्लेक्स बॅनर लावला आहे. गुहा एकदम अस्वच्छ आहे, प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्सचा ठिग. त्यातल्यात्यात भिंती स्वच्छ केल्या आहेत. मागे आलो तेव्हा सगळ्या प्रेमी युगुलांची नावे लिहिलेली होती भिंतीवर, हरामखोर साले प्रेम करायला गडावर येतात आणि त्याच्या नोंदी भिंतीवर करतात. x-(

गुहा आणि नक्षीदार खांब (२००८ साली काढलेला फोटु)

गडाच्या कातळाच्या पोटातून नागमोडी ७५ पायऱ्या खोदलेल्या आहेत,  ज्या आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जातात. वर एक छोटेखानी दगडी प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला हत्तीचे आणि सिंहाचे दगडात कोरलेले शिल्प आहे. गडमाथ्यावर एक पाण्याचे टाकं आणि एका पडीक मंदिराचे अवशेष आहेत. तिथून परत खाली उतरून गुहेत आल्यास, डाव्या बाजूला पुढे गेल्यास एक विस्तृत पठार आहे. तिथे एक तोफ चांगल्या अवस्थेत आहे. संपूर्ण गडाला फेरी मारता येते, पण ह्यावेळी पावसामुळे प्रचंड काटेरी झुडपं वाढली आहेत त्यामुळे तो बेत रद्द केला. तरी ज्योसाठी अर्ध्यापर्यंत एक फेरी मारून आलो. तिथे दोन पाण्याची टाकी आहेत, ज्यातलं पाणी पिण्याच्या लायकीच नाही. तिथून थोडं पुढे गेलं की एकदम छोटीशी पायवाट आहे, ज्याच्या एका बाजूला दरी आणि एका बाजूला सरळ उभं कातळ (गेल्यावेळी काढलेला फोटो). गडमाथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश, भीमाशंकरची डोंगररांग आणि पदरगड दिसतो.

गडमाथ्यावरून...अरेच्चा मी खालीच राहिलो 😉

मराठ्यांच्या काळात ह्या किल्ल्याचा वापर शस्त्रांचा साठा करायला करत असे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये, ह्या गडाचे किल्लेदार होते माणकोजी पांढरे. एकदा गफलतीने मोघल सरदाराला आणि त्याच्या सैन्याला मराठ्यांचे सैन्य समजून प्रवेश दिला आणि हा किल्ला मराठ्यांनी गमावला. औरंगजेबाने त्या मुघल सरदाराचा सत्कार करून, त्याला गडाच्या दरवाज्याची सोन्याची किल्ली भेट म्हणून दिली.  तेव्हापासून ह्या किल्ल्याचे नामकरण “मिफ्ताहुलफतह” म्हणजेच “विजयाची किल्ली” झाले.

कातळात खोदलेल्या पायऱ्या...

थोडावेळ भटकून, आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पाऊस अधूनमधून सुरु होताच. नेहमीप्रमाणे घरी परतायचा कंटाळा आला होता, पण पोटात कावळे ओरडायला लागले होते. आम्ही आंबिवली गावात जेवणाची व्यवस्था सकाळीच केली होती, आम्हाला फक्त तिथे जायचा कंटाळा आला होता 🙂 विक्रांत आणि माझ्या गप्पा सुरु होत्या. ह्या पठ्ठ्याला सगळ्या झाडांची आणि फुलांची माहिती होती. मी फक्त ऐकायचं काम करत होतो.  परत आम्ही पठाराच्या टोकाला आलो, इथे मात्र मी दरीत डोकावणाऱ्या दगडावर उतरायचा मोह टाळू शकलो नाही. 🙂

आत्महत्या नाही, आत्मा शांत करतोय 🙂 🙂
Glory Lily (Gloriosa Superba) (मराठीत - कळलावी)

शेवटी आंबिवली गावात उतरलो, मस्त गरमागरम पिठलं, मटकीची उसळ, पोळी, भात, डाळ, पापड आणि लोणचं असा फडशा पाडला. जेवल्यावर एकदम सुस्तावलो होतो, घरी जायचा कंटाळा आला होता (तसा कंटाळा प्रत्येक ट्रेकला गेल्यावर, घरी परतताना येतोच म्हणा 😀 ). परतीच्या प्रवासासाठी आम्ही टमटम आधीच सांगून ठेवली होती, त्यातून आम्ही निघालो. स्टेशनला जायचा रस्ता प्रचंड वाईट आहे, कर्जतला आम्ही पोचायला आणि गाडी सुटायला एकंच गाठ पडली. मग ४० मिनिटे वाट बघून पुढल्या ट्रेनने घरी परतलो.

एका मस्त किल्ल्याला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला, आणि या प्रवासात अनेक नवीन मित्र देखील मिळाले. Cheers !!

– ही पोस्ट खास विक्रांत आणि ट्रेक अलॉंग ग्रुपसाठी. सगळे फोटो विक्रांत पुराणिककडून साभार. गेल्यावेळी काढलेले फोटो इथे बघता येतील.  🙂

– सुझे !! 🙂

तबेला क्लास !!

माय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

अपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी (?) असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला.  ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.

R क्षण...

प्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची असते, पण ते गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मदत करत असतात.

प्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा प्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.

असेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.

दीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.

त्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण होत. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.

म sssध्यां ssss त ssss र sss

मूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांतर दिलेला होता याची नोंद घ्यावी 🙂 🙂

आरक्षण...

इथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिलेल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.

हळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग तोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग !!!! 😀 😀

पहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने  😀

असो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉

– सुझे !!

किल्ले आसावा…

महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाची ताठ मानेने साक्ष देणारे गडकोट किल्ल्यांची सफर, श्रावणातला पहिला विकांत, मस्त धो-धो पाऊस आणि दुर्गप्रेमी मित्रांची सोबत, अजुन काय हवं?

नाणेघाटानंतर आम्ही किल्ले अशेरीला जाण्याचा बेत केला होता. रविवार ३१ जुलैला सगळ्यांनी, सकाळी ८ वाजता बोईसर स्टेशनला भेटायचे ठरले. पावसाचा जोर शुक्रवारपासून होता मुंबईत. रविवारी पहाटे उठायचा प्रचंड कंटाळा आला होता. बाहेर जोरदार पाऊस सुरु होता. घरातून बाहेर पडलो आणि तिथेच भिजलो. मनात विचार आला की, कल्टी मारावी आज…पण (एक बार जो कमिटमेंट करदी… असं काही नाही, सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागल्या असत्या) म्हणून निघालो 😀

दिपक आणि ज्योती पहाटे ४:१५ च्या सुमारास घरातून बाहेर पडले, पनवेल ते दादर असा प्रवास करत ५:३० ला दादरला पोचले. त्यांनी तिथून ६:०० ची गुजरात मेल पकडली. वास्तवात आम्ही सगळे वसई-बोईसर मेमूने जाणार होतो, पण त्यांना ती पकडता आली नसती म्हणून त्यांनी एक्सप्रेस ने यायचं ठरवलं आणि ज्यामुळे ते सगळ्यांच्या आधीच, म्हणजे ७ ला बोईसरला पोचणार होते. आनंदचा फोन आला होता, की मेमू ३०-३५ मिनिटे उशिरा येणार आहे. मग मी मेमूचा प्लान रद्द करून, बोरिवलीला ६:३० वाजता गुजरात एक्सप्रेस पकडली आणि जनरल डब्यात न चढता, रिझर्वेशन असलेल्या डब्यातून आम्हा तिघांचा प्रवास सुरु झाला. 🙂

बसायला मस्त जागा मिळाली होती, एक डोळा टीसीच्या येण्याकडे आणि एक डोळा बाहेर पडणाऱ्या पावसाकडे होता. बाहेर सगळीकडे पाणीचपाणी दिसतं होतं. पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. परत एकदा आळशी मनाला जाग आली आणि ट्रेक रद्द करून, जेवून परत फिरायचं काय असा विचार मनात येऊ लागला. वाटत होत, कोणी एक जण जरी नाही आला, तरी मागे फिरायचं 😉 पण सगळ्यांनी हाच विचार केला वाटत, कारण सगळे थोडेफार उशिरा का होईना हजर झाले 🙂 देवेंद्रच्या NPCIL मधला ट्रेकिंग ग्रुप, आका आणि आकाचे दोन मित्र असे सगळे जमलो. आम्ही बाकी सगळी मंडळी यायच्या आधी मस्त नाश्ता* केला होता. सगळे जमल्यावर त्यांनी नाश्ता केला आणि आम्ही बोईसर एसटी डेपोमध्ये गेलो. डेपो पाण्यातचं होता, सगळीकडे पाणी तुंबले होते. मनाला परत धाकधूक वाटली, कारण पावसाचा जोर थांबायचा नाव घेत नव्हता आणि इतक्या पावसात किल्ले अशेरी करणे थोडे धोक्याचे आहे आणि आपण तिथे गेलोच तर परत यायला खुप उशीर होईल, असे श्यामकाकांनी सांगितले.

मग परत विचारचक्र फिरू लागली. दिपक देवेंद्रला म्हणाला ट्रेक रद्द करून, बोईसरची प्रसिद्ध बिर्याणी खाऊन घरी निघू 😉 सगळ्यांनी त्याला लगेच अनुमोदनही दिले. अजुन एक पर्याय होता की, चिंचणी बीचला भेट देऊन यावी. इतक्यात श्यामकाका म्हणाले, इथे जवळचा एखादा सोप्पा किल्ला करू आणि लगेच येऊ परत. त्यांनी आसावा किल्ला सुचवला. ह्या किल्ल्याचे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो. खुप कंटाळा आला होता, पण किल्ला बघायला आलो आहोत, तर हा किल्ला तरी बघूनचं घरी जायचं असं ठरवून आम्ही निघालो. पाऊस कोसळत होताच, अक्षरशः ढगफुटी झाली होती. (तिथे खरंच ढगफुटी झाली होती, ते आम्हाला घरी आल्यावर कळले – बातमी)

बोईसर पूर्वेला, टाटा आणि ऑसवाल बिल्डर्सचे हाउसिंग प्रोजेक्ट ओलांडून पुढे काही किलोमीटरवर वरांगडे हे गाव आहे. एसटीने उतरल्यावर, उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे. जिथे डाव्या बाजूला विराज इंडस्ट्रीचं एक प्रोजेक्टसुद्धा आहे. ठाण्याहून येताना, गुजरात हायवे ने तारापूर फाटा घेऊन, ७०-७५ किलोमीटर आत यायचे. तिथे वरांगडे गाव आहे. ह्या रस्त्यावर “प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा” बोर्ड आहे, त्यामुळे हा कच्चा रस्ता, साक्षात प्रधानमंत्री आल्याशिवाय पुर्ण होणार नाही याची खात्री पटली.

किल्ले आसावा…

१० मिनिटे चालल्यावर उजवीकडे एका पक्क्या घराच्या समोरून, थोड्या अंतरावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून गडावर जायची सरळ वाट आहे. पण त्यावेळी पाण्याचा प्रवाह खुपचं जोरदार होता आणि कमरेइतकं पाणी त्यावेळी तिथे होतं. त्यामुळे आम्ही ती वाट सोडून, थोडं पुढून जाण्याचा निर्णय घेतला. ही वाट म्हणजे, आमची वाट लावणारी वाट होती. आम्हाला गुडघाभर चिखलातून वाट काढून जावं लागणार होत. जिथे वाटायचं की चिखल असेल, तिथे दगड असायचा आणि जिथे दगड म्हणून पाय ठेवावा, तर गुडघाभर चिखलात तुम्ही हसत हसत उभे असता. 🙂

किल्ल्याची वाट सोप्पी आहे, दोन तास रेंगाळत, कंटाळा करत शेवटी गडावर पोचलो. ह्या गडाचा उल्लेख इतिहासात इतका नाही, पण हा टेहळणीसाठी वापरात असावा. गडावर पोचताच, दोन पाण्याची स्वच्छ टाकी आहेत. श्यामकाकांच्या मते, त्यांना नैसर्गिक झरे देखील आहेत आणि तिथे बारमाही पाणी उपलब्ध असते. तिथून थोडे पुढे, एक पाण्याचे मोठे जलाशय आहे, ज्यात खालपर्यंत उतरायला दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत. इथलं पाणी, अजिबात पिण्यायोग्य नाही. गडावर अजुन एक ग्रुप त्यावेळी होता. त्यांचा ट्रेक लीडर (कल्पेश म्हात्रे) जेव्हा भेटला, तेव्हा तो म्हणाला ई-वाडवळचा ग्रुप घेऊन आलो आहे. कल्पेश हा वॅकचा सदस्य आहे (Vasai Adventure Club). थोड्या गप्पा मारल्यानंतर, आका आणि बाकी मंडळी खाली असलेली गुहा बघायला निघाले. मी, श्यामकाका आणि दीपक यांनी पाण्याच्या टाक्याजवळचं थांबायचा निर्णय घेतला. आम्ही मस्त गप्पा मारत, ट्रेक रुटची देवाणघेवाण करत बसलो होतो. श्यामकाका, त्याचे ट्रेकचे अनुभव सांगण्यात एकदम मग्न झाले होते.

सुरुवात…
चिखलदरा ओलांडून जमिनीवर पोचलो… 😉
पाण्याचे टाके..
जलाशय..
मी, दीपक आणि श्यामकाका 🙂 🙂

ही मंडळी पुढे गुहेकडे गेली आणि मस्त जेवण उरकून निवांत बसली होती. आम्ही वर ह्यांची वाट बघतोय, पण दीड तास झाला ही मंडळी वर आली नाहीच. शेवटी त्यांना फोन केला, तेव्हा ते म्हणाले, की ते सगळे त्याचं वाटेने खाली उतरायचा बेत करत होते. इथे आम्हा तिघांची पंचाईत झाली. कारण, आम्ही तिघेजण वरती वाट बघतोय हे ह्यांना माहित असायला हवं होत. जर त्यांनी आधीच सांगितलं असतं हा प्लान, तर आम्हीपण तेंव्हाच खाली उतरलो असतो. मग आम्ही तिघे घाई घाईत खाली जायला निघालो आणि रस्ता चुकलो 🙂 🙂 (हा माझा सगळ्यात आवडता भाग ;-))

गुहेत असलेलं पाण्याचं छोटं तळं..

खूप वेळ आरडाओरडा करून प्रत्युतर मिळाले नाही, वेळ जात होता. २:३० वाजून गेले होते. आम्हाला ५:३० शटल चुकवायची नव्हती. थोडावेळ वाट बघून त्यांना एसएमएस करून, आम्ही आलो त्याचं वाटेने गड उतरतोय असं सांगितलं. त्याचवेळी शेवटच्या हे ssss ओला उत्तर मिळाले, आणि आनंद आम्हाला शोधत वर आला. पाठोपाठ सगळा ग्रुप वर आला. थोडी शाब्दिक चकमक घडली आणि आम्ही उतरायच्या वाटेला लागलो 😉

आम्ही सारे….
आका… ( सगळे फोटो ह्यानेचं काढले आहेत) 🙂

एका तासात खाली पोचलो, मस्त फ्रेश झालो. एव्हाना पावसाचं पाणी उतरलं होत, आम्ही बूट वगैरे धुवून घेतले आणि चहा घेऊन ४:४५ला बोईसर स्टेशनला पोचलो. आनंद आणि त्याचे मित्र ठाण्याला बसने गेले आणि मी, दीपक, ज्यो आणि बाळा आम्ही चौघे डहाणू-विरार शटलने परत आलो. आश्चर्याचा धक्का म्हणजे आम्हाला शटलमध्ये बसायला जागा मिळाली, नाही तर तो प्रवास खूप खडतर असतो गर्दीच्यावेळी. 🙂

असो दिवस संपला, आम्ही एका नवीन गडाला भेट देऊन आलो होतो. खूप छान वाटत होतं. देवेंद्र, ही बिर्याणी उधार तुझ्यावर, पुढच्यावेळी कसलीही हयगय केली जाणार नाही 😉

सर्व फोटो आनंद काळेकडून साभार..!!

*नाश्ता – अळूवडी, मुगडाळ भजी, फाफडा, जिलेबी, डोसा, मेदूवडा आणि चहा फक्त (हे सांगायचं राहिलं होतं 😉 )

– सुझे !!