अविस्मरणीय नाणेघाट…!!

गेल्यावर्षी मराठी ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने सेनापतींची (रोहन चौधरी) प्रत्यक्ष भेट झाली होती. त्या भेटी आधीही रोहनचा ब्लॉग वाचत होतोच, त्याने केलेली सह्यभ्रमंती बघून/वाचून, मला सह्याद्रीची जास्त ओढ लागली. मेळाव्यात असंच गप्पा मारताना, त्याने मराठी ब्लॉगर्स ट्रेकची कल्पना मांडली होती. आपल्या मराठी ब्लॉगर्समध्ये बहुसंख्य ब्लॉगर्संना भटकंती आणि विशेषतः शिवाजीमहारांच्या गड-किल्ल्यांची भटकंती आवडत असल्याने ही कल्पना सगळ्यांनी उचलून धरली होती. त्याप्रमाणे रोहनने १७ जुलै रोजी,विसापूर येथे पहिला मराठी ब्लॉगर्स ट्रेक आयोजित केला होता. त्यावेळी सगळ्यांनी उत्साहात नावनोंदणीदेखील केली होती, पण एक-एक करत सगळे गळू लागले आणि शेवटी आम्ही फक्त ६ जण, विसापूर ट्रेकला गेलो आणि भरपूर धम्माल केली. सांगायचा मुद्दा हा, की तो दिवस माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस होता. एक तर खुद्द सेनापतींच्यासोबत किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य मिळालं आणि दुसरं कारण म्हणजे, खुप खुप चांगले मित्र मिळाले. 🙂

त्या दिवसानंतर आम्ही सर्वांनी एकत्र किती गड-किल्ले सर केले, त्याची गणतीचं नाही. ह्या वर्षीदेखील १७ तारखेला तसाच ट्रेक जमवता येतंय का, ते बघत होतो. अनायासे रविवार आला. दिपकला आधीच सांगितलं होत, ज्या दिवशी आपण सगळे पहिल्यांदा भेटलो होतो, तो दिवस तसाचं साजरा करायचा, जसा एका वर्षापूर्वी केला होता. खुप पर्याय आमच्यासमोर होते, एकमेकांना ईमेल्स सुरु झाले. इथे जाऊया का, तिथे जाऊया का?, असं करत करत शेवटी नाणेघाट नक्की केला. 🙂

मी, दिपक, सागर, भारत, देवेंद्र, आका आणि प्रतिभा वहिनी, असे सात जण नक्की झालो. सेनापती दुसऱ्या दिवशी दुबईला जाणार होते, त्यामुळे त्यांना यायला जमले नाही. त्यात मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु होता. पावसाच्या गोंधळामुळे मला पोचायला तब्बल ४५ मिनिटे उशीर झाला :(, पण गाडी असल्याने काही काळजी नव्हती. मी येईपर्यंत ठाण्याच्या प्रसिद्ध अशोक हॉटेलमध्ये, सगळ्यांनी नाश्ता उरकून घेतला आणि मला पोहे आणि उपमा पार्सल करून घेतले. बरोब्बर ७ वाजता आम्ही ठाण्याहून निघालो. कल्याणच्या रस्त्याने पार कंबरडेच मोडले, गाडीचे आणि आमचेही. मुरबाडहून पुढे, वैशाखिरे गावातून थोडीपुढेचं नाणेघाटाची वाट सुरु होते. रस्त्यावरचं तुम्हाला नाणेघाट –>असा दिशादर्शक दिसेलचं. तिथे आम्ही गाडी पार्क केली. आधीच ३-४ गाड्या तिथे उभ्या होत्या. त्यामुळे खूप सारी मंडळी, ह्या वाटेवर आहेत हे ताडले. साधारण ९:१५ च्या सुमारास आम्ही तिथून निघालो. वातावरण एकदम प्रसन्न होतं. आकाशात ढगांची दाटीवाटी सुरु होती. हिरवागार निसर्ग त्या मंद हवेत, डौलाने डुलत होता. जोरदार पाऊस पडणार, म्हणून आम्ही खुश होतो.

वैशाखिरे गावातून नानाच्या अंगठ्याचे पहिले दर्शन...

आमच्या ह्या छोटेखानी ग्रुपला लीड करत होती, प्रतिभा आनंद काळे. ओजसच्या बाळंतपणानंतर वहिनींचा हा पहिलाचं ट्रेक. त्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यांनी आम्हाला चालता चालता थोडीफार माहिती दिली. जीवधन करून नाणेघाट करता येतो असे सांगितले. तेवढ्यात उजव्या बाजूला, नानाचा अंगठा धुक्यातूनवर डोके वर काढू लागला. सगळ्यांचे कॅमेरे ते नयनरम्य दृश्य टिपण्यात मग्न झाले. आम्हाला आमचे ध्येय दिसतं होते. वाट सोप्पी होती, पण लांबलचक होती.

सेनापतींच्या ब्लॉगवर याबद्दल वाचले होतेचं. नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारास सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. ह्या घाटाचा वापर करण्यासाठी व्यापारांकडून जकात वसूल केली जायची. त्यासाठी घाटाच्या सुरुवातीला एक मोठ्ठे दगडाचे रांजण ठेवले आहे. त्यात नाणी/पैसे गोळा केले जायचे, म्हणून ह्याला नाणेघाट असं म्हणतात. ह्या जकातीच्या बदल्यात व्यापारांच्या सामानाला, सैन्याद्वारे सुरक्षा पुरवली जायची. त्या सैन्यासाठी घाट मार्गात अनेक लहान-मोठ्या गुहा आणि पाण्याची टाकी खोदलेली आहेत. घाटाच्या वरच्या बाजूला गावातून पक्का रस्ता आहे, जिथून तुम्ही गाडीने नाणेघाटात येऊ शकता.

आम्ही सारे..
फोटो खूप झाले, आता पटापटा चालते व्हा….
नाणेघाट - मुख्य वाट

आम्हाला नाणेघाटात पोचायला पावणे तीन तास लागले. रमत गमत, फोटोसेशन करत आम्ही वर पोचलो. तिथून खाली नजर टाकली आणि दूर कुठे तरी लांब, गावाचं एक छोटं अस्तित्व आणि हिरवीगार निसर्गाची दुलई इतकंच दिसतं होत. आम्हाला जग जिंकल्यासारखा आनंद झाला होता. आम्हाला वाटलं वर चढताना पाऊस पडेल, पण वरुणराजा नाराज दिसतं होता. आम्ही घामाने पुरते भिजलो होतो, पाऊस पडला नाहीचं. नाणेघाटाच्या मुख्य व्यापारी मार्गाने आम्ही वर निघालो, तेव्हा हळू हळू पाऊस सुरु झाला. तिथे ट्रेकर्सची (??) भरपूर गर्दी होती, जत्रा भरली होती असे म्हणा हवंतर. काही उत्साही वयस्कर मंडळीदेखील तिथे होती. आम्ही गणेशाचे दर्शन घेऊन, खादाडी करायला बसलो. ब्रेड-श्रीखंड-जाम आणि मक्याचा चिवडा-लेमन भेळ एकत्र करून, मस्त पोटभर जेवलो. एव्हाना पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली होती. सगळीकडे दाट धुके दाटले होते. थोडी भटकंती केली, मस्त गरमागरम चहा घेतला. २ वाजले आम्हाला परतीच्या वाटेवर निघायचं होतं, तिथून निघावं असं वाटत नव्हतं…..पण 😦

कातळात खोदलेले पाण्याचे टाके….
नाणेघाट – मुख्य वाट..
गुहेतील गणेशमूर्ती..
जकातीचा रांजण
नाणेघाटातली मुख्य गुहा..
देवेंद्रराजे..
दीपक..
खा रे खा…
धुक्यात हरवलेली नाणेघाटामधली मुख्य वाट …
परत येताना जबरदस्त पाऊस सुरु झाला.. पाण्याचे लोट डोंगरावरून खाली बदाबदा कोसळत होते…. 🙂
पाण्याचे लोट 🙂 🙂

घाटाचे ते दृश्य डोळ्यात सामावून घेत, गप्पागोष्टी करत आम्ही लगबगीने खाली उतरू लागलो. पावसाचा जोर प्रचंड होता. शुभ्र पाण्याचे लोटच्या लोट डोंगरावरून खाली कोसळत होते. आम्ही २ वाजता खाली उतरायला सुरुवात केली आणि अडीच तासात खाली पायथ्याशी पोचलो. नानाचा अंगठा धुक्यात हरवून गेला होता. तिथे खूप पाऊस पडत होता. बाजूला जीवधन पठारावर असलेला खडा पारसी सुळका आम्हाला खुणवत होता. त्याला लवकरचं येतो भेटीला, असं सांगून मुंबईच्या दिशेने सुसाट निघालो.

संपूर्ण दिवस सार्थकी लागला होता. अजिबात थकवा जाणवत नव्हता. याचवेळी आम्ही ठरवले, की जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी असाचं एक ट्रेक आयोजित करायचा आणि त्यात जमेल तितक्या ब्लॉगर मित्रांना घेऊन जायचं. सेनापतींनी सुरु केलेली ही प्रथा, आम्ही सुरु ठेवायचा नक्की प्रयत्न करू. !!

– सुझे 🙂

स्पेशल कोचिंग…

एक ४० मजली उत्तुंग ऑफिस बिल्डिंग आणि त्याच्या मेनगेट समोर उभं असलेला एक सामान्य माणूस. मराठीत त्याला आपण कॉमन मॅन म्हणतो. थोडावेळ तो तिथेचं घुटमळतो, आत जाऊ की नको अश्या संभ्रमात, हातात असलेल्या कागदाकडे बघतो. ते एक हॅंडबील असतं. त्यात असलेल्या जाहिरातीत हांच पत्ता दिलेला आहे, याची पुन्हा पुन्हा खात्री करतो. शेवटी तो धीर एकवटून आत जायला निघतो. तिथे उभे असलेले ७-८ सिक्युरिटी गार्ड त्याला खणखणीत सॅल्युट मारतात, आणि त्यातला एक जण त्या माणसाला घेऊन त्या राजेशाही ऑफिसमध्ये जातो. तो माणूस आधीच ह्या वातावरणात अवघडलेला, त्यात असं काही अनपेक्षित घडलं की, त्याला अजुन जास्तचं भीती वाटायला लागली होती.

त्या माणसाला एका क्युबिकलमध्ये बसायला सांगून, तो सिक्युरिटी गार्ड तिथून तडक निघून गेला. हा ऑफिस न्याहाळत बसला होता. तितक्यात एक सुंदर तरुणी (अप्सरा, बेब!!) त्याच्यासमोर येऊन बसली. त्याच्याकडे बघून एकदम गोssड हसली आणि हात पुढे करून “हॅलो सर” म्हणाली. हे बघून साहेब अजुन जास्त वरमले, आणि त्यांनी हात जोडून दुरूनचं नमस्कार केला.

ती:- “नमस्कार सर, तुमचं बि.सी.आयमध्ये स्वागत!! आम्ही आपल्याला गेली दोन वर्ष सतत फोन करून बोलवत आहोत, पण आपण आमच्याकडे दुर्लक्ष केलंत. बॉम्बिंग कोचिंग इन्स्टिट्यूटबद्दल आता शहरातील शेंबड्या मुलाला देखील माहित आहे, पण आपण फार निष्काळजीपणा दाखवलात.”

तो:- “माफ करा, पण मी पडलो सामान्य माणूस. मला अश्या बडेजाव गोष्टींची खुप खुप भीती वाटते.”

ती:- (काहीशी ओरडत) “सामान्य माणूस इथेचं तर चुकतो. असो आता आला आहात इथे आम्हाला आनंद आहे. परवा म्हणे तुम्ही दादरच्या बॉम्ब हल्ल्यात जखमी झालात, खरं आहे का हे?”

तो:- “हो मॅडम, हाताला आणि पाठीला किरकोळ मार बसला. अजूनही दुखतंय हो खुप. आज बायको ने दम दिलाय, आधी जाऊन बीसीआयमध्ये नावं नोंदवून या दोघांच. नाही तर घरात पाऊल ठेवू नका.”

ती:- “खुप हुशार आहेत आपल्या पत्नी.त्यांना का नाही आणलंत इथे?”

तो:- “तिला इथे आणलं तर घरी पाणी कोण भरेल? नळ येतो हो २ ला.”

ती:- “ठीक ठीक… काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सगळी माहिती देते. तुम्हाला काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही नंतर विचारू शकता. आधी मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी, की थंडगार कैरी पन्हं??”

तो:- “पन्हं चालेल …!!” (आधीच आंबे, कैऱ्या बघायला मिळाल्या नाहीत यावर्षी)

ती:- (फोनकरून पन्हं आणायला सांगते) “तर तुम्हाला मी आधी आमच्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती देते. बॉम्बिंग कोचिंग इन्स्टिट्यूट, ही सरकारमान्य संस्था आहे. जिथे तुम्हाला अनुचित घटना घडल्यावर कसे वागावे, काय दक्षता घ्यावी याचे प्रशिक्षण दिलं जात. “खाजीव सांधी” मोहिमे अंतर्गत, आमच्या संस्थेला सरकारतर्फे पैसा पुरवला जातो आणि आम्ही लोकांसाठी ही सेवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देतो. आमच्या इथे अनेक मान्यवर तज्ञ लोकं आपल्याला मार्गदर्शन करतील आणि संकटसमयी मदत करतील. आमची सेवा २४ तास आणि वर्षाचे १२ महिने सुरु असते. त्यामुळे आपण कधीही आम्हाला संपर्क करू शकता, आम्ही आपल्या सेवेत हजर राहू.”

तो:- “ह्म्म्म्म.. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे जमेल? मी फक्त घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर इतकाच प्रवास करतो.”

ती:- “अहो नक्की जमेल, कोणीतरी म्हटलं आहे नं केल्याने होत आहे रे असंचं काहीसं?? इथे प्रशिक्षण देताना तीन वर्गवारी केली आहे. पहिल्या वर्गात म्हणजे इकोनॉमी वर्गात, तुम्हाला नाममात्र शुल्क भरून प्रवेश दिला जातो. त्यात तुम्हाला सगळी माहिती एका पुस्तकाद्वारे शिकवली जाते. ह्यात कुठलंही प्रात्याक्षिक नाही, फक्त घोकंपट्टी म्हणा हवं तर. दुसरा वर्ग जो आहे, तिथे तुम्हाला काही प्रात्यक्षिकं आणि तज्ञांच मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला त्या परिस्थितीत नेमकं कसं वागायचं ते सांगतील.”

तो:- “आणि तो तिसरा वर्ग कोणासाठी?”

ती:- “ती आमची प्लॅटिनम क्लास सेवा आहे, इथे सगळ्यांत जास्त फी असते. इथे तुमच्यासाठी अनेक प्रात्यक्षिके आणि विशेष तज्ञांच मार्गदर्शन दिलं जात, ज्यांना आम्ही खास दिल्लीवरून बोलावतो तुमच्यासाठी आणि अजुन अनेक फायदे आहेत.”

तो:- “अहो, जीव महत्त्वाचा आहे म्हणूनचं, तर इथे आलोय. फायदे तोटे काय करू घेऊन?”

ती:- “असं कसं, तुम्हाला प्लॅटिनम वर्गात तुम्हाला बॉम्बविरोधी प्रशिक्षण दिलं जातंच, पण अजुन तुम्हाला खूप काही सांगितलं जात. विशेषतः ह्या वर्गासाठी आमच्याकडे वेगळे शिक्षक आहेत, ज्यांची भाषणे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळेल, आत्मविश्वास वाढेल. ह्यात चाहूल सांधी, सी. पिदंम्बरम, विगपराजय सिंग, मोहनमण सिंग अशी मान्यवर व्यक्ती आपल्या सेवेत हजर राहतील. तसेचं तुम्हाला प्रशिक्षण संपल्यावर एक बॉम्बप्रुफ सुट आणि सहा महिन्याचे धान्य भेट म्हणून दिलं जात.”

तो:- (डोळे मोठे करून हे सगळं ऐकत ..) “पण तुम्ही मला इतका खर्च करायला सांगताय, त्यापेक्षा असे हल्ले होऊ नये यासाठी काही का करत नाही? तुमच्या दिल्लीमध्ये इतक्या ओळखी आहेत, मग का नाही हे सगळं बंद करत?”

ती:- “शेवटी आलात सामान्य माणसाच्या लायकीवर. धंदा म्हणजे काय तुम्हाला कळणार नाही हो साहेब. तुम्हाला काय वाटतं आम्हाला हे थांबवता आलं नसतं? पण का थांबवायचं ह्याला काही उत्तर? आमच्या पोटापाण्याचे काय? सत्ता म्हणजे काय कळायला तुम्हाला राजकारण्याचा जन्म घ्यावा लागेल आणि ती कशी टिकवायची हे तुम्हाला सात जन्मात कळणार नाही. तुम्ही लवकर सांगा, तुम्हाला जीव महत्त्वाचा की पैसा?”

तो:- “जीव महत्त्वाचा आहेचं, पण पैसा…”

ती:- “इतका विचार करू नका, आमची एक बॅच उद्या सुरु होतेय. तुम्ही आता लगेच अर्धी फी भरा आणि उद्यापासून तुम्ही येऊ शकता इथे सकाळी ९-१२ ह्या वेळेत. काळजी करू नका, ही सरकारमान्य संस्था आहे. आम्ही इथे तुम्हाला लुबाडायला बसलो नाही. विश्वास ठेवा.”

तो:- “अच्छा, बघुया आपण. किती पैसे द्यावे लागतील आज आगाऊ?”

ती:- “जास्त नाही, तुमचे आणि तुमच्या बायकोचे मिळून १२ लाख आणि टॅक्स वेगळा. तुमचा जीव वाचवणार आहोत आम्ही.”

तो:- “काssssssय? १२ लाख? अहो, १२ लाख म्हणजे १२ वर किती शून्य, ते पण सांगता येणार नाही मला. मी सामान्य माणूस आहे हो. दया करा हो”

ती:- “वाटलंच मला, लायकी नाही नं पैसे भरायची? मग तुमचं इथे काही काम नाही. सिक्युरिटी ह्यांना बाहेर काढा. श्या माझा किती वेळ फुकट गेला, मी मेकअप टचअप करून येते. Useless Fellow… मर जा असाच, कशाला मरत मरत जिवंत आहेस?”

तो:- “अहो..पण..माझं….ऐका……..” (मघाशी अदबीने वागणारा गार्ड त्याला दरवाज्याकडे धक्के मारत नेत होता)

त्या सामान्य माणसाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. तो बिचारा हताश तोंड पाडून, हतबलपणे त्या बिसीआयच्या ऑफिसकडे बघत होता. पैसा असेल तर, स्वतःचा जीव विकत घेता येतो हे कळून चुकले होते त्याला. आता ऑफिसला जाऊन फायदा नव्हता, म्हणून तो घरी जायला निघाला. तो बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा राहिला, जाहिरातीचा तो कागद चुरगळून रागात गटारात फेकून दिला… आणि तितक्यात मोठा आवाज झाला…

धssssडाsssssम !!

– सुझे !!!

“जे जे” वांछिल ते ते लाहो !!

नाही इथे मी पसायदानावर लिहत नाही आहे. एक स्वानुभव सांगतोय जो, गेले १०-१२ दिवस मी अनुभवतोय. आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात, जे आपल्या भावनांची मर्यादा बघतात.आपल्याला कितीही राग आला, तरी आपले हात दगडाखाली असतात आणि आपण त्या क्षणी नुसतं बघण्याशिवाय काही काही करू शकत नाही.

३० तारखेला मध्यरात्री वडिलांना छातीत दुखत होतं, म्हणून जवळच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिथे त्यांना योग्यवेळी सगळे उपचार दिले गेले आणि आयसीयुमध्ये चार दिवस ठेवलं. त्यांची तब्येत एकदम चांगली झाली होती आणि ते फिरतसुद्धा होते. काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की, हृदयाची प्रक्रिया योग्य रीतीने सुरु नाही आणि त्यासाठी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन अॅन्जिओग्राफी करून घ्यावी लागेल. त्या टेस्टनंतर आपल्याला कळेल की, नक्की हृदयाच्या रक्त वाहिनीत कुठे अडथळा आहे काय? त्याचवेळी त्यांनी मला सांगितलं की, त्यांना काही धोका नाही आहे, पण आपल्याला ह्या सगळ्या चाचण्या करून घ्याव्या लागतील पुढील धोका टाळण्यासाठी.

मोठ्या हॉस्पिटलात त्यांना घेऊन जायला ओळख आणि पैसा हे लागणारचं होत. मी त्वरित माझ्या मित्रांना फोन केला आणि सुदैवाने दीपकचे काका जेजे मध्ये असल्याचे कळले. त्यांनी माझ्यासाठी खुप धावपळ केली, मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांच्यामुळेचं वडिलांना लगेच जेजेमध्ये भरती केलं गेलं. माझ्या जीवातजीव आला आणि मी आयसीयुमध्ये केस पेपर्स घेऊन गेलो. त्यांनी लगेच अॅन्जिओग्राफी करू म्हणून सांगितलं आणि मला काही सर्जिकल गोष्टी आणायला सांगितल्या.

मी आयसीयुतून बाहेर पडतो नं पडतो तोच, एक माणूस माझ्यासमोर आला आणि म्हणाला मी देतो तुमची औषधं आणि माझ्या हातात एक पिशवी दिली. त्याच्या म्हणण्यानुसार त्यात सगळी औषधं आणि सर्जिकल वस्तू होत्या. मी डॉक्टरांकडे गेलो, ते बरोबर आहे की नाही विचारायला. तो इसम माझ्यासोबत आला, डॉक्टर म्हणाले ह्याने दिलंय नं, मग बरोबर आहे सगळं. मी त्या माणसाला धन्यवाद म्हटलं आणि डॉक्टरांशी बोलायला लागलो. त्या माणसाला पुढे काय गोष्टी लागणार, इंजेक्शन्स लागणार माहित असावं. तो ती घेऊनचं फिरत होता. डॉक्टर माझ्याजवळ आले, की तो त्याना विचारायचा आणि लगेच हवी ती औषधं हजर करायचा. डॉक्टर जसे जसे मला काही आणायला सांगायचे, तसे हे दोन-तीन लोक माझ्या भोवती गोळा व्हायचे आणि सांगायचे मी देतो आणून स्वस्तात.

मला एकतर काय करावे सुचेना. वडिलांची अॅन्जिओग्राफी झाली आणि त्यांनी लगेच अॅन्जिओप्लास्टी करावी लागेल असे सांगितलं. पैसे असतील तर आज करू नाही तर, शुक्रवारी. मी त्यांना विचारलं,”शुक्रवारी केली तर चालेल का?” तर ते म्हणाले, “चालेल नं, पण रिस्क आहे, काहीही होऊ शकतं.” नाईलाजाने मी त्यांना लगेच अॅन्जिओप्लास्टी करायला सांगितली, पण ते म्हणाले आधी पैसे जमा करा त्याशिवाय आम्ही काही करू शकणार नाही. आम्हाला काही गोष्टी लागतात अॅन्जिओप्लास्टी आणि त्या खुप महाग असतात. तुम्ही पैसे आणा, तोवर आम्ही ते सामान मागवतो. मी त्यांना सांगितलं मी पैसे आणतो, तुम्ही ऑपरेशन करायला घ्या. तरी ते एक तास थांबून राहिले आणि मग त्यांनी ऑपरेशन करायला घेतलं. 😦

डॉक्टरांना लागणारी सगळी औषधं ती लोकं आणून देत होती आणि मी फक्त त्या लोकांना पैसे देत (वाटत) होतो. नंतर मला कळलं की हॉस्पिटलबाहेर असणाऱ्या औषधाच्या दुकानातली ही एजंट मंडळी आहेत ही. तसेच तिथे मोठ्या मोठ्या औषधांच्या कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसुद्धा तिथे होते. कॅथ लॅबमध्ये ऑपरेशनच्यावेळी लागणारी अनेक उपकरणे असतात, जी शरीरात बसवली जातात. जसे पेसमेकर, स्टेंटस्. ती उपकरणे ही लोकं घेऊन उभी असतात.

एकतर परिस्थिती अशी बिकट की, आपण आपल्या माणसाच्या काळजी पोटी हातोहात पैसे खर्च करायला तयार असतो. मागेपुढे बघत नाही त्या क्षणी आणि अशी लोकं, आपल्या ह्या मजबुरीचा फायदा उचलतात. तरी तिथे मोठ्या अक्षरात नोटीस लिहिली होती की, कुठल्याही औषधाच्या विक्रेत्याला आणि मेडिकल कंपनी रिप्रेझेंटेटिव्हला इथे येण्यास सक्त मनाई आहे. पण ते बघतंय कोण? इथे तर पुर्ण फौज होती अश्या लोकांची. 😦

दोन दिवसांनी जेव्हा वडिलांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केलं, तर तिथे वेगळाच प्रकार बघायला मिळाला. काही जण हृदयाच्या रक्तवाहिनेत ४-४ ब्लॉक असून देखील तिथे पडून होते, कारण त्यांच्याकडे अॅन्जिओप्लास्टी करायला पैसे नव्हते. काही लोकांकडे थोडेफार पैसे होते, त्यात डॉक्टर म्हणाले हृदयातला एक ब्लॉक काढून देतो आणि बाकी ब्लॉक नंतर काढू अशी उत्तर मिळायची. अतिशय विचित्र वागणं होत डॉक्टर लोकांच. रोज यादी केली जायची, कोणी पैसे आणले आणि कोणी नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांची अॅन्जिओप्लास्टी लगेच करून द्यायचे आणि ज्यांच्याकडे पैसे नाही, ते तिथेच जनरल वार्डमध्ये पडून राहायचे. 😦

एकतर जेजे सरकारी रुग्णालय, त्यामुळे स्वस्त उपचार होतील म्हणून रुग्णांची मोठी रीघ असते इथे. मुंबईतील नावाजलेल्या हॉस्पिटल्सपैकी एक अश्या हॉस्पिटलमध्ये एक सो एक हुशार डॉक्टर्स आहेत. सगळ्या अद्यावत सुविधा आहेत, पण ह्या सुविधा तुमच्याकडे पुर्ण पैसे असल्याशिवाय मिळवता येत नाही. लोकं अश्यावेळी अनेक ट्रस्टकडे धाव घेतात, पण त्या येण्याजाण्यात आणि पैसे मंजूर होण्यात वेळ हा जाणारचं. अश्या एकाही लोकोपयोगी ट्रस्टच ऑफिस हॉस्पिटलच्या परिसरात नाही. सगळे सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा ट्रस्टकडे धावत होते, कारण ह्याच ट्रस्ट त्यातल्यात्यात जवळ होत्या.

खरंतर सरकारने सगळ्या सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यायला हव्यात, पण सरकार ह्या बाबतीतही कमालीचं उदासीन आहे. इथल्या ऑपरेशनचा खर्च, हा इतर कुठल्याही खाजगी हॉस्पिटलच्या खर्चा इतकंच खर्चिक आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सामान्य लोकांसाठी उरलेलं नाहीचं. मी त्याक्षणी पैसे भरून सगळे इलाज करून घेऊ शकलो वडिलांवर, पण..पण बाकीच्यांच काय?

आता वडिलांची तब्येत चांगली आहे. त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला आहे, पण तिथे २२ नंबर वार्डमध्ये एका २१ वर्षीय तरुणाला मेंदूमध्ये रक्ताची गाठ आणि हृदयाच्या रक्तनलिकेत ३ ब्लॉक आहेत. त्याची परिस्थिती अतिशय गरीब. त्याचा पुर्ण परिवार, पेशंटला हॉस्पिटलने दिलेल्या जेवणातचं जेवतो. ज्याचा ऑपरेशनचा खर्च ५-६ लाखाहून अधिक आहे… हा मुलगा पैसे भरू शकेल काय आपल्या उपचाराचे? ह्याचीच काळजी मला राहून राहून वाटतेय. 😦 😦

खरंच सरकारने ह्या परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, पण मला माहित आहे ते देणार नाही. सामान्य माणसाची किंमत काय असते सरकारदृष्ट्या, हे वेगळं सांगायला नको. 😦 😦

– सुझे