नागपुरामधलं सगळ्यांत मोठ्ठं आणि सर्व सोयींनी उपयुक्त अश्या, इंदिरा गांधी सरकारी हॉस्पिटलामधला नेहमीचाच दिवस. नेहमीप्रमाणेचं खून, अपघात, जाळपोळ, मारामारी, अश्या ढीगभर कॅज्युल्टी केसेस पडून होत्या. लोकांची प्रचंड गर्दी होती. डॉक्टर्स आपापली कामे करत होते. त्यांतच आज पहिल्या पावसाचा तुफान तडाखा बसला होता संपूर्ण शहराला, त्यामुळे गर्दी, गोंधळ आणि हाहाकार असं एकूण चित्र होतं सगळ्या परिसरात. ह्यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या मुलांची एक बँच, इंटर्न म्हणून कॅज्युल्टीमध्ये प्राथमिक तपासण्या करत होती. त्यांना फक्त एका फॉर्मवर रुग्णाची त्यावेळची परिस्थिती कशी आहे याची नोंद घेणे आणि प्राथमिक उपचार करणे, ही जबाबदारी हॉस्पिटलाने दिली होती. त्यात त्यांनी रुग्णाला इंजेक्शन देणे, रक्तदाब तपासणे, टाके घालणे अशी कामे करायची. बाकी काहीही उपचार करण्यासाठी त्यांना सीएमओची (CMO – कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर) परवानगी घेणे गरजेचे असते.
नितिका, अतिशय हुशार डॉक्टर. ह्याच वर्षी ज्युपिटर मेडिकल कॉलेजमधून, पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. सगळे सीनिअर्स तिच्या कामावर खूश होते. आयुष्यात कधी बघितली नसतील इतकी प्रेतं, रक्त ती रोज ९ तासाच्या शिफ्टमध्ये, दर ५ मिनिटाला बघायची. तसंही डॉक्टर लोकांसाठी हे काही नवीन नाही, त्यांना ह्या गोष्टींचे प्रशिक्षण दिलेलं असतंच, पण कधी कधी तिला ते सगळं नकोसं वाटायचं. विचार करायची की जनरल वार्डमध्ये बदली करून घ्यावी, पण पुढे निष्णात सर्जन होण्यासाठी हा अनुभव गरजेचा होता. आज तिने डबल शिफ्ट केली होती, काम खूप होतं. लोकांची गर्दी कमी व्हायची, नावंच घेत नव्हती. संध्याकाळचे ६:३० वाजले होते. ती थोडा आराम करावा म्हणून, कोपर्यात एका खुर्चीवर डोळे मिटून शांत बसून होती. तितक्यात एक म्हातारे गृहस्थ इमर्जन्सी वॉर्डमध्ये धावत धावत आले, “डॉक्टर…डॉक्टर माझ्या पोरांना खूप मार लागलाय हो, त्यांना बघा नं!” नितिका तातडीने उठली आणि, त्यांनी सांगितलेल्या बेडपाशी पोचली. त्यांच्या तीन मुलांना जबरदस्त मार लागला होता, आणि खूप रक्तस्त्राव सुरु होता. त्यांच्या गाडीला एका भरधाव ट्रकने टक्कर दिली होती आणि ही तीन भावंड त्यात जबर जखमी झाली होती.
तिने लगेच CMO राघवेंद्र ह्यांना फोन केला. ह्या केसची माहिती दिली आणि काय काय करू हे विचारून घेतलं. नितिकाने त्या काकांना एक कॅज्युल्टी फॉर्म दिला, आणि लगेच उपचार करायला सुरुवात केली. ते बाजूला उभे राहून, डोळे पुसत पुसत फॉर्म भरत होते. राघवेंद्र सर एका दुसर्या पेशंटला बघत होते, ते धावत इमर्जन्सी वॉर्डमध्ये आले, आणि परिस्थितीचे गांभीर्य बघता, आरएस आणि आरऑर्थोला (RS – Resident Surgeon, R Ortho – Resident Orthopedics) त्वरित बोलवायला सांगून, सगळ्यांची तपासणी केली. मोठ्या मुलाला हाताला आणि तोंडाला मोठी जखम झाली होती, त्यांनी त्याला इंजेक्शन देऊन टाके घालायला सांगितले. मधल्या मुलाला खांद्याला, छातीला आणि पायाला मार बसला होता आणि त्याला पाय देखील हालवता येत नव्हता. छोट्या मुलाला गुडघ्याला आणि कपाळाला मार बसला होता.
राघवेंद्रसरांनी सगळ्यांना एनएस (NS – Normal Saline) लावायला सांगून, सगळ्यांवर लक्ष ठेवायला सांगितले. आरएस पोचणार होतेच, इमर्जन्सी वॉर्डमध्ये. तोपर्यंत नितिका, त्यांच्या जखमा साफ करून त्यांना ड्रेसिंग करत होती. ७:२० पर्यंत हे सगळं सुरू होतं. ते काका सारखे हिला येऊन सांगायचे, माझ्या मुलांना बरं करा, पाया पडतो. ही त्यांना जमेल तितका धीर देण्याचा प्रयत्न करत होती. तरी ते हात जोडून मुलांना वाचवायची आर्जवा करत होते. मोठा आणि छोटा मुलगा काही प्रमाणात स्टेबल होते, पण त्यांचा भाऊ खूप सिरीअस होता. नितिकाने तिला सांगितलेलं काम केलं होतं आणि ती इतर पेशंटना बघत होती. ती मग काकांकडे आली, तिने विचारलं मुलाच्या ड्रेसिंगसाठी काही गोष्टी लागतील, त्या आणून देता का बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून. त्यांनी त्या निमुटपणे आणून दिल्या. दुसरे डॉक्टर मोठ्या मुलाला टाके घालणार होते, तरी ते काका रडत होते, वाचवा, माझ्या मुलाला वाचवा म्हणून, तिने त्यांना धीर दिला. मोठे डॉक्टर आहेत तिथे, काळजी करू नका. पण ते ऐकायला तयार नव्हते, शेवटी ही वैतागून म्हणाली, “काका काळजी नका हो करू, मी माझं काम केलंय, अजून मी काही करू शकत नाही. देवावर विश्वास ठेवा!! ”
दोन डॉक्टर त्यांच्या भावाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्याची प्रकृती खालावत होती. खांद्याला आणि छातीला मार बसल्यामुळे, त्याला श्वास घेतांना थोडा त्रास होत होता. ऑक्सिजन मास्क लावून, त्याला कृत्रिम श्वास देण्यात येत होता, तरी काही फरक पडत नव्हता. त्याचा रक्तदाब उतरत चालला होता. शेवटी त्याला ईओटीमध्ये (EOT – Emergency Operation Theater) हलवायचा निर्णय घेतला गेला आणि त्याला ईओटीमध्ये आत घेऊन गेले.
इकडे नितिका आपली शिफ्ट संपवून, कँटिनमध्ये चहा घ्यायला गेली. तिला सीएमओची सही घेतल्याशिवाय शिफ्टवरून घरी जाता येणार नव्हतं. तिने तोंडावर थंडगार पाणी मारलं आणि गरमागरम चहा घेतला. पाऊस अजून सुरूच होता, ढग गडगडत होते. बाहेर वातावरण प्रसन्न होतं, पण खूप काम झाल्यामुळे ती थकलेली होती. झोप येत होती तिला. थोडावेळ तिथे बसून, ती इमर्जन्सी वॉर्डकडे निघाली.
दरवाज्यात ते काका मान खाली पाडून उभे होते. तिने त्यांना काही विचारायच्या आत ते म्हणाले, “मॅडम, पोरगा गेला माझा. ऑपरेशन थिएटरामध्ये नेला तेव्हाच तो गेला 😦 त्याच्या आईला ह्या धक्क्याने चक्कर आली, तिला बाहेर बसवून आलो आहे. ” नितिका एकदम स्तब्ध उभी, काय बोलावे सुचेनासे झाले तिला. ते काका बोलत राहिले, “पोरी तुझे खूप आभार, तुम्ही माझ्या दोन मुलांना वाचवलंत. ह्या तिघांना मी सांगितलं होतं, पाऊस पडतोय कुठे जाऊ नका, पण ह्यांना पावसात गाडी फिरवायची हौस… आता फिटली ह्यांची हौस 😦 ” ते क्षणभर शांत झाले, मग त्यांनी हात जोडले, “माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर माफ करा.. पण… असो” त्यांना बोलताच येईना. अश्रू सावरत ते म्हणाले, “डॉक्टरसाहेब, शिफ्ट संपली का तुमची? आराम करा, खूप काम झालं नं आज? पुन्हा तुमचे खूप खूप आभार, निघतो मी”
नितिका शांत उभी होती, स्वतःला दोष देत होती, की आपण मघाशी ह्यांच्यावर उगाच रागावलो, एक अपराधीपणाची भावना मनाला छेदून गेली. काय वाटत असेल त्या बापाला ह्या क्षणी, याची कल्पना करणे अशक्य होते तिला. इतकं सगळं झालं, तरी हा माणूस आपल्याला धन्यवाद काय म्हणतो, असा नॉर्मल काय वागतो, याचे तिला आश्चर्य वाटत होते. एका मुलाच्या जाण्याचे दु:ख आणि दोन मुले वाचल्याचा आनंद असा संमिश्र भाव त्यांच्या चेहर्यावर होता. डोळे तुडुंब भरून वाहत होते. हिला काही बोलणेच सुचत नव्हते, त्यांच्या पाठीवर हलकेच थोपटून, “काळजी घ्या” म्हणून ती निघाली.
पाऊस अजिबात थांबायचे नावं घेत नव्हता. तिने त्या भरलेल्या आभाळाकडे एकदा बघितलं आणि डोळे पुसले. ती देवाला दोष देत होती. देवा, का मला आज एक जीव वाचवायची संधी दिली नाहीस तू? एका बापाला त्याचा मुलगा सुखरूप आहे हे सांगितल्यावर, त्याच्या चेहर्यावर येणारा आनंद का नाही बघू दिलास तू मला? देवानंतर लोकं डॉक्टरला पूज्य मानतात, कारण तो एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवून आणू शकतो.. मग आज हा विश्वास का खोटा ठरवलास तू? मान्य आहे, मी डॉक्टर आहे, पण शेवटी मी पण एक माणूस आहे, मला ही भावना आहेत… मग माझ्या भावना अश्या का दुखावतोयस देवा.. का… सांग ना, का? 😦 😦
तितक्यात प्रचंड ढगांच्या गडगडाटासह, विजा चमकून पाऊस जास्त जोरात बरसू लागला… जणू देवालाही आपले अश्रू थोपवता आले नाही..अश्रू थोपवता आले नाहीत!!
– ही एक सत्यकथा आहे. नितिका माझी बहीण आहे. प्रसंग मांडण्यात थोडाफार बदल केला आहे, पण घटना १००% सत्य आहे.
– ही कथा ह्यावर्षीच्या जालरंग प्रकाशनाच्या ऋतू हिरवा २०११, ह्या अंकात प्रकाशीत झाली होती. आपल्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे.
– सुझे !! 🙂