Where is the HOPE?

सरतेशेवटी सत्यसाईबाबा अनंतात विलीन झाले.. (असंच लिहितात ना?) आज सकाळपासून त्यांच्या अत्याविधीचे थेट, आपलं लाईव्ह प्रक्षेपण सुरु होतो. गेले ३ दिवस हा प्रकार सुरु होता म्हणा. कोण रडले, कोण काय बोलले, त्यांची संपत्ती किती, त्यांचे शिष्य किती, तो बाबा खरा होता की खोटा, यावर प्रचंड काथ्याकुट झाला. माझा देवबाप्पा त्या बाबांच्यासमोर देहासमोर बसून शोकाकुल रडला, हे ही किती तरी वेळा बघितलं, नव्हे तेच तेच दाखवलं. सगळ सगळ बघत आलो हे गेले तीन दिवस. त्यांनी आयुष्यभर जमा केलेल्या मायेचा, माफ करा ट्रस्टचा पुढला धनी कोण यावर चिंतन सुरु आहे सध्या. ट्रस्टपण काही छोटी नाही, तब्बल १ लाख ४० हजार कोटीं रुपयाची मालमत्ता आहे. तुम्ही म्हणाल, हे सगळ का सांगतोय?

मी त्यांच्या विषयी बोलणारा कोण? त्यांनी पैसा कमावला, लोकांची सेवा केली आणि आता ते गेले. लोकांनी श्रध्दांजली वाहिली, त्यांना शांती मिळाली. एक बाबा इतकी संपती जगभरातून गोळा करतो, आणि त्याचा काही भाग लोकांसाठी वापरतो आणि त्याचा उदो उदो होतो. आता ती ट्रस्टच्या नावे असल्याने कोणी चौकशी करायचा प्रश्न नाहीच. आता तो सगळा पांढरा पैसा आहे.

असो, माझा बोलायचा मुद्दा हा नाही. आपण भारतात राहतो आणि बडे बडे देशो मैं, ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं. आपल्या देशात पैश्याला काही म्हणजे काहीही कमी नाही हे दाखवायला एक उदाहरण सांगितलं. गेल्या एका वर्षात जितके घोटाळे बाहेर आले आहेत, त्याने आपण काही देशांच्या बजेटचा डोलारा उचलू शकलो असतो. १२ हजार कोटी काय, ७० हजार कोटी काय… किती किती पैसा आहे आपल्या देशात, पण साला आपलंच नशीब पांडू म्हणून रोज ऑफिसला जा, मरमर काम करा. महिन्याच्या शेवटी पोटाला चिमटे काढत जगा, हौसमौज टाळा. आपला जन्म हा केवळ असाच जाणार. ह्याउलट अशी लोक आहेत ज्यांना पैसे ठेवायला जागा नाही. स्विस बँकमध्ये १०-१२ खाती काय, ७०-८० मजल्याची घर ती काय, फिरायला ऊंची गाड्यांचा ताफा तो काय, जीव जपायला केलेली सुरक्षायंत्रणा काय.सगळ कसं स्वप्नवत.

पैसा कमावत असताना ह्यांनी केलेले कष्ट (???) जगजाहीर आहेतच. मोठमोठ्या लोकांकडून चुटकीसरशी कामे करून देणारा पैसा ह्यांच्या हातचा मळ. ह्या लोकांना भीती कशाचीही नाही, कालसुद्धा जेव्हा कलमाडीला कोर्टातून बाहेर आणलं, तेव्हा साहेब असे बाहेर आले की, त्यांनी भारतरत्न मिळवलं आहे. त्यांच्यावर सॉरी त्याच्यावर जेव्हा चप्पल फेकून मारली आणि त्याचा नेम चुकला, तर हे ध्यान दात काढून हसत होत. लाज, शरम, भीती, कायदा ह्या सगळ्या तुच्छ गोष्टी आहेत.

गेल्या दोन तीन दिवसात कानावर आलेल्या बातम्यांमध्ये अजून एक बातमी होती, ती ज्युलिअन असांजेची. टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याने स्वतः स्विस बँकची माहिती बघितली आहे आणि त्यात अनेक भारतीय नावे आहेत. त्यांच्या नावावर भला मोठा पैसा जमा आहे. जगातला सगळ्यांत जास्त काळा पैसा हा भारतातूनच येतो (बातमी) आणि त्याचे पुरावेदेखील तो लवकरच देणार आहे. त्याने भारतीयांना सांगितलं आहे “Don’t Loose Hopes Completely, We will soon put those names in front of you”

हे तर आपल्या देशातील लोकसुद्धा, कित्येक वर्ष ओरडून सांगत आहेत. विरोधक थोडे दिवस हल्लाबोल करतात पण हे सगळ नावापुरतं. कारण त्यांचीही खाती जोपर्यंत तिथे भरली जात नाही, तोपर्यंत हे इथे गोंधळ घालणार. एकदा का पैसे पोचल्याची पोचपावती आली, की मुग गिळून गप्प राहायचं आणि दुसऱ्या मुद्द्यावर सरकारला धाऱ्यावर धरायचं.

खरंच सांगतो, आता पेशन्स नाही आणि खात्री तर नाहीच नाही. जे आजवर बघितलं आहे त्यानंतर जरी ती नावे बाहेर आली त्या बँकेमधून, तरी काही फरक पडणार नाही असंच दिसतंय. विकीलिक्सला सुरुवातीला अमेरिकेतून जास्त विरोध होता, पण आता तो भारतातून आहे. एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जशी कमीतकमी पैश्यात लोकांना काम करायला लावून जगवते आणि आपण वारेमाप नफा ओढत राहते. 😦

खरंच सांगा कुठे आहे होप? नक्की कुठे जातोय आपण? काय होणार पुढे?

– सुझे

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी !!

आज चैत्र शुद्ध पौर्णिमा , शके १९३३

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी  आणि  हनुमान जयंती ..

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

आज महाराजांची ३३१ वी पुण्यतिथी.

मनात स्वराज्याच्या स्वप्नाची ज्योत अखंड तेवत ठेवून, आयुष्यभर त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचं कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. आज रायगडावर होणाऱ्या एका विशेष समारंभात, शिवभूषण  हे पुस्तक प्रकाशीत होतंय. हे पुस्तक म्हणजे, कवी भूषण यांच्या ५८६ छंदांचे, श्रीयुत निनादराव बेडेकरांनी मराठीत केलेला अनुवाद आहे. त्यातील एक सवैया स्तुती छंद महाराजांच्या चरणी अर्पण.

सुंदरता  गुरुता प्रभुता भनि भूषन होती है आदरजामें |

सज्जनता  ओ दयालुता दीनता कोमलता झलकै परजा में |

दान कृपानहु कों करिबो करिबो अभै दिनन को बर जामें |

साहिनसें रनटेक विवेक इते गुन एक सिवा सरजा में || ३७७||

कवी भूषण म्हणतो – सौंदर्य, गुरुत्व, प्रभुत्व या गुणांमुळे त्याला आदर प्राप्त झाला आहे. प्रजेविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूपणा आणि विनम्रपणा हे गुणही त्याच्यात आहेत. शत्रूंना तो तलवारीचे दान तर दीनांना तो अभयदान देतो. शाहाशी प्राणपणे युद्ध आणि विवेक हे असे सर्व गुण त्या शिवा सरजात एकवटलेले आहेत….

|| छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा ||

– सुझे

सई..

मंदार ऑफिसमध्ये मिटींगमध्ये खुप व्यस्त होता, त्याचं मन लागत नव्हत कशातच. तिला माहेरी जाऊन एक महिना झाला होता. आज कामाच्या गडबडीत त्याला तिला भेटता देखील आलं नाही की साधा फोन करता आला नाही. अचानक त्याचा फोन वाजला आणि तो ऑफिसमधून गडबडीत बाहेर पडला. गाडी सुरु केली आणि मंगलमूर्ती नर्सिंग होमच्या दिशेने सुसाट निघाला. पिल्लूला लेबर पेन सुरु झाले होते आणि पिल्लूच्या बाबांनी धावपळ करून तिला हॉस्पिटलला नेलं होत.

मंदार हॉस्पिटलला पोचला, पिल्लूला लेबर रूममध्ये नेलं होत. बाहेर तिचे आई-बाबा चिंताग्रस्त उभे होते. मंदार ने घरी फोन करून सांगितलं आणि त्याचे आई बाबा तडक निघाले हॉस्पिटलकडे. डॉक्टरांची धावपळ सुरु होती. नर्स आत-बाहेर करत होत्या. ह्याला खुप काळजी लागून राहिली होती. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी मंदारला आत बोलावलं पिल्लू जवळ. हा तिला धीर देत होता, तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. थोड्यावेळाने सगळ सुरळीत पार पडलं. एक पांढऱ्याशुभ्र टॉवेलमध्ये गुंडाळलेला, हात पाय मारत असलेला, जोर जोरात रडत असलेला एक छोटुसा जीव घेऊन डॉक्टर दोघांच्या पुढे आले. पिल्लू घामाने चिंब भिजलेली होती, पण चेहऱ्यावर एक समाधान होत आणि खुप आनंद पण.

डॉक्टर म्हणाले, “अभिनंदन मुलगी झालीय” मंदार ने पिल्लूच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि तिचा हात घट्ट धरून मनापासून आभार मानले. दोन वर्ष सुखाने संसार केल्यावर, त्यांनी बघितलेलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद दोघेही लपवू शकत नव्हते. मंदार बाहेर आला आणि त्याने सगळ्यांना ही गोड बातमी दिली. पिल्लूला दुसऱ्या वार्डमध्ये हलवणार होते काही मिनिटात.

तिथे प्रत्येक पलंगाशेजारी एक पाळणा ठेवला होता. पिल्लूला तिथे नेलं आणि सगळे तिच्याभोवती गोळा झाले. ती शांत पडून होती. मंदार शेजारीच बसला होता. सगळे त्या बाळाची वाट बघत होते. काही मिनिटांनी डॉक्टर तिथे त्या पिल्लूच्या छोट्याश्या बाळाला घेऊन आले. तिला पिल्लूच्या शेजारी ठेवलं. गुलाबी गुलाबी कांती, इवले इवले हात-पाय, चेहऱ्यावर एका नवीन अनोळखी जगात आल्याचे भाव. भिरभिरती नजर…पिल्लू लाडाने त्या बाळाकडे बघत होती.

सगळ्यांना खुप खुप आनंद झाला होता. सगळे मग बाहेर थांबले. पिल्लू हलकेच उठून बसली, मंदार ने काळजीपूर्वक ते बाळ तिच्या कुशीत ठेवलं. तिचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले, मंदारसुद्धा आपले अश्रू थांबवू शकत नव्हता. तिच्या शेजारी बसून तो दोघी मायलेकींना न्याहाळत बसला होता. ते बाळ पिल्लुकडे टकामका बघत होत. ती त्या बाळाच्या इवल्या हातात एक बोट देऊन खेळत होती, तोंडून आपसूक बोबडे बोल बाहेर पडत होते त्या बाळासाठी. खुप खुश होती ती.

मग तिला जाणीव झाली की समोर मंदार बसलाय. त्याला मांडी घालायला सांगून, हलकेच ते बाळ त्याच्या हाती देऊन म्हणाली, “बघ तुला मुलगी हवी होती ना. तुझ्या मनाप्रमाणे झालं आणि ती दिसतेय पण अगदी तुझ्यासारखीच” त्याने भरलेल्या डोळ्याने दोघींकडे बघितले आणि मनोमन देवाचे आभार मानले. तेव्हढ्यात ते बाळ रडू लागलं. त्याने तिला “अले अले..काय झाल बाळाला…” अस् म्हणून शांत करायचा प्रयत्न केला, पण तिने मोठ्ठ भोकाड पसरलं होत. त्याने पिल्लूकडे बघितलं. ती हसत होती आणि तिने हलकेच त्या जीवाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला शांत करू लागली.

कसली तरी आठवण झाल्याने, मंदार ने घाई घाईत मोबाईल काढला आणि एक नंबर फिरवला. पिल्लू त्याला इशाऱ्याने विचारात होती, काय झालं म्हणून. त्याने डोळे हलकेच मिटून शांत राहायला सांगितलं तिला. नंबर लागला आणि तो बोलू लागला.

“सई, आली… अभिनंदन.” आणि त्याने तो फोन सईच्या जवळ नेऊन तीच रडणं ऐकवलं. मग त्याने फोन कट केला आणि तिच्याशी खेळू लागला. पिल्लूने विचारलं “कोणाला फोन केला होतास. कोणाच अभिनंदन केलंस”?

मंदार म्हणाला, “तु रागावणार नसशील तरच सांगेन”
ती म्हणाली, “बोल ना, नाही रागवत..काय झालं?”

तो बोलू लागला, “हा फोन मी तुझ्या शोनाला केला होता, जेव्हा मला कळलं की तु हॉस्पिटलमध्ये आहेस, तेव्हाचं मी त्याला इथे बोलावून घेतलं होत. पण तो भेटणार नाही म्हणाला. तो तुझा एक भूतकाळ आहे आणि तुझ्या समोर तो यायला तयार नव्हता. तो म्हणाला मला की, बेबी झालं की मला तिचा एकदा आवाज ऐकव बस्स. मला तुमच्या दोघांबद्दल लग्नाच्या आधीच माहित होत. तोच मला भेटून सगळ सांगून गेला. त्याने मला तुझी काळजी घेण्याचे आणि मी त्याला भेटलोय हे तुला कळू न देण्याचे वचन मागितले. त्याची स्वप्न तो तुझ्या रुपात बघत जगत होता पिल्लू, इथेच तुझ्या आसपास. मला त्या क्षणी त्याचा आणि तुझा राग आला होता, पण त्याने मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तु तुझा भूतकाळ आपल्या संसारात आणणार नव्हतीस आणि तु त्यासाठी त्याच्याशी तुसडेपणाने वागलीस आणि त्याच्याशी भांडलीस. तो पण रागावला तुझ्यावर आणि परत कधी तुला भेटणार नाही म्हणून तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला, पण त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही तुझ्यावर असलेलं. त्याच्या डोळ्यात मला ते दिसायचं आणि तुझा खुप हेवा वाटायचा, पण त्याची इच्छा नव्हती की मी हे तुला कधी कळू द्याव.”

ती ओरडली अक्षरशः –  “काssssय? तु हे काय बोलतोयस मंदार. मला हे का नाही सांगितलं तु आधीच? मी त्याला साफ सांगितलं होत की एकदा माझ लग्न झालं की मी त्याची कोणी राहणार नाही आमच्या लग्नाला घरून विरोध होता आणि मी घरच्या लोकांच्या संमतीशिवाय काही करणार नव्हते आणि हे त्याचं देखील मत होत. माझा नवरा आणि त्याचे कुटुंब हेच माझ घर आणि त्यांची काळजी घेण हेच माझ कर्तव्य, अस त्याला मी ठाम बजावून सांगितलं होत. त्यामुळेचं तो माझ्या आयुष्यातून दूर निघून गेला होता आणि त्याला माझी मान्यता होती. मी त्याला पूर्णपणे विसरले नाही, पण माझ आयुष्य हे फक्त आपल्या कुटुंबापर्यंतचं मर्यादित आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहील. विश्वास ठेव मंदार !!”

मंदार : “अग हो, मी कुठे काय म्हणतोय… तु उगाच तसा काही विचार करू नकोस. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे ग. त्याचं एक स्वप्न तु पुर्ण करणार आहेस, म्हणून मी त्याला बोलावलं होत. तो खाली बागेतच बसून राहिला, वर यायला त्याने स्पष्ट नकार दिला. फक्त म्हणाला तिचा आवाज ऐकव मला. तुला बोलायचं आहे का त्याच्याशी”?

तिने मानेनेच हो म्हटले…मंदार ने फोन लावला आणि तिच्याकडे दिला. त्याने बाळाला उचलून आपल्याकडे घेतलं आणि खेळत राहिला. ती थोडी अवघडून उभी रहात खिडकीजवळ आली. तिची नजर बागेमध्ये त्याला शोधू लागली. तितक्यात बागेमधून बाहेर पडणारी एक पाठमोरी आकृती तिने लगेच ओळखली. तिने फोनवर “हॅल्लो” म्हटले…तिथून प्रतिसाद यायची वाट बघत ती त्या पाठमोरी आकृतीकडे बघत होती.

एक हलकेच दीर्घ श्वास घेऊन पलीकडून आवाज आला, “अभिनंदन पिल्लू. सईला अगदी लाडात वाढवं. तिला जास्त ओरडू नकोस, काळजी घे. तुझी आणि तिची. मंदारला सांगून ठेव, मी आता त्याला परत कधीच भेटणार नाही. मी इथून लांब जातोय कायमचा. सुखी रहा !!!”

एक दीर्घ कथा लिहायचे काही महिन्यांपूर्वी ठरवले होते. काही केल्याने जमत नव्हते, माझा कंटाळा आणि वाचकांना होणारा अतिदीर्घ कथेचा त्रास म्हणून हे आटोपशीर घेतोय. स्वैरलिखाणाच्या नावाखाली तीन लघु कथा लिहिल्या आणि हा त्या कथेचा शेवटचा भाग. अर्धवट वाटेल, पण प्रत्येक कथा सुरु होऊन तिथेच संपवायचा प्रयत्न केलाय जेणेकरून, त्या वेगवेगळया कथा वाटाव्यात. जमल्यास कधी मधले भाग टाकेन. बघुया पुढेचं पुढे 🙂

ह्या आधीचे भाग …

१. सुखी रहा

२. पहिली भेट – एक स्वैरलिखाण

३. ओढ नव्या जीवाची…

– सुझे 🙂