रस्सा – मराठमोळी मेजवानी !!!

आपल्या मुंबई उपनगरात वाढत चालेल्या लोकसंख्येचा मला झालेला एक फायदा म्हणजे एक सो एक अप्रतिम हॉटेल्स सुरू झाली :). तिथे मराठी, थाई, मॅक्सिकन, गुजराती, पंजाबी, चायनीज, मोघलाई प्रकारच जेवण मिळत. मोठे मोठे ब्रँड, लोकांच्या भुका भागवू लागले. जवळपास जिथे जिथे नवीन हॉटेल सुरू होई, तिथे एकदा का होईना चक्कर मारुन त्याच रेटिंग आपणच ठरवायच अशी माझी सवय. मग माझ्या मित्रांना सांगाव की नको रे तिथे जेवण काही खास नाही, अरे त्यापेक्षा इथे जा मस्त जेवण मिळेल, ते पण वाजवी किमतीत वगैरे वगैरे… 🙂

तशी मुंबई उपनगरात मराठी पद्धतीच मासांहारी जेवण मिळणारी हॉटेल्स खूपच कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच म्हणजे आपल पुरेपूर कोल्हापूर, सायबीण गोमंतक, जय हिंद पण कांदिवली-बोरीवली परिसरात अस एकही हॉटेल नाही, असेल तर अजुन माझ्या माहितीत नाही. हॉटेल्स सुटत नाही तशी माझ्या नजरेतून, हे माझ्या तब्येतीकडे बघून कळल असेलच एव्हाना तुम्हा सगळ्यांना 😉

असो, तर सांगायाच मुद्दा हा की हल्लीच दोन-तीन महिन्यांपुर्वी एक छोटेखानी हॉटेल “रस्सा” आमच्या चारकोपमध्ये सुरू झालय. नावातच रस्सा असल्याने तोंडाला पाणी सुटायला वेळ लागला नाही 🙂 विशेष म्हणजे, तिथे गेल्यावर पहिली आवडलेली गोष्ट म्हणजे आसन व्यवस्था. बाहेर मस्त खाटा आणि त्यावर चादर टाकून एकदम गावाचा फील दिलाय. तिथे जेव्हा दुसर्यांदा गेलो होतो, तेव्हा मला अभिजीत दिसला काउंटरवर. हा माझ्या शाळेत होता, माझ्या वर्ग मैत्रिणीचा भाऊ. त्याने सुद्धा ओळखल मला आणि म्हणाला की तो आणि त्याचे चार मित्र यांनी सगळ्यांनी मिळून हे हॉटेल सुरू केलय. तेव्हाच मला रस्साच्या नावाची रेसीपी मिळाली (RASSA – Ravi – Abhijit – Shree – Swarup – Abhishek) अश्या पाच मराठी तरुण मित्रांनी एकत्र येऊन रस्सा नावाच हे हॉटेल सुरू केलय. ते सगळे स्वत: मोठमोठ्या कंपनीत नोकरी करतात, पण नोकरी सांभाळून हा व्यवसाय त्यांनी सुरू केलाय याच फार कौतुक वाटल मला. (माझ पण असच एक स्वप्न आहे..बघुया) 🙂

This slideshow requires JavaScript.

येथील जेवणाची चव एकदम घरगुती आहे. इथे जेवण थाळी प्रकारात मिळत. वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी इथे उपलब्ध आहेत. चिकन थाळी, मटण थाळी, पापलेट थाळी एकदम प्रसिद्ध. मला इथे आवडलेला विशेष प्रकार म्हणजे कोंबडी वडे, अफलातून असतात. मला आधी वाटल होत, की नावात रस्सा म्हणून इथे खास कोल्हापुरी पांढरा आणि तांबडा रस्सा मिळेल, पण तस नाही. अभिजीत म्हणाला होता, की आधी ते देत होते, पण नंतर काही कारणास्तव त्यांनी ते बंद केल. आशा आहे परत सुरू होईल. नवीन हॉटेल असल्याने मेन्यु लिमीटेड आहे, पण एक थाळी तुम्हाला उदर तृप्तीचा ढेकर देण्यास पुरेशी आहे 🙂 इथे जेवणावर तुटून पडणारे खूप गुजराती लोक पण आहेत. खिश्याचा विचार कराल तर, एकदम परवडण्यासारख. मी अजुन नवीन नवीन मेन्यु येण्याची आतुरतेने वाट बघतोय. इथे पोचायच असेल तर हा घ्या पत्ता – शॉप नंबर १, गणेश चौकाच्या बाजूला चारकोप, कांदिवली (प.). जवळच लॅंडमार्क म्हणाल तर PF ऑफीस लागूनच आहे. इथला फोन नंबर आहे – 28676833 आणि हो ते एफबीवर सुद्धा आहेत – रस्सा. एकदा इथे खाऊन बघाच आणि सुझेची आठवण नाही आली तर सांगा. 🙂

खूप दिवस खादाडीवर लिहल नव्हत म्हणून ही एक छोटी पोस्ट… तिखट, झणझणीत मानून घ्या 🙂

– सुझे

अपेक्षेच ओझ…

इतके दिवस वाट बघत असलेला क्रिकेटचा महासंग्राम आजपासून ढाका येथे सुरू होतोय. जगातील १४ संघ ही स्पर्धा जिंकण्याचे मनसुबे घेऊन त्वेषाने ह्या संग्रामात उतरतील. भारतातील मीडियाचा सारखा प्रचार भारतीय जनतेच्या अपेक्षा अजुनच वाढवत आहेत. भारतीय संघाने हा कप जिंकवा म्हणून सगळे प्रार्थना करत आहेत. काहींनी देव पाण्यात ठेवलेत. काही जण भारताच्या मॅचला सुट्टी किवा आजारी पडून बॉल अन् बॉल याची देहा याची डोळे बघण्यास सज्ज आहेत. प्रचंड प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहेत. खेळाडूंच्या मुलाखती, त्यांचे स्टॅट्स सगळ सगळ आपल्यासमोर राहील पुढील दीड महिना. 🙂

 

जाहिरात ..!!

आपण भारतीय लोक म्हणजे क्रिकेटसाठी अती भावनिक, गेले दोन वर्ल्डकप सुरू होण्याच्या आधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेडियममध्ये सत्कार केले, हार फूल दिले….पण पण काही कारणाने एखाद्या संघाकडून पराभूत झाल्यावर त्यांच्या घराची तोडफोड केली, शिव्या दिल्या, खेळायची अक्कल काढली… अस व्हायला नको. खेळ आहे हा, जो चांगला खेळेल तो जिंकेलच आणि तोच जिंकायला हवा. खेळामधली खिलाडूवृत्ती जपून ह्या स्पर्धेचा आनंद लूटा.

स्पर्धेत सामील होणार्‍या प्रत्येक संघाला शुभेच्छा…  🙂

स्पर्धेच वेळापत्रक इथे बघता येईल – http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

– सुझे

घराला घरघर…

महावीर नगर (कांदिवली) येथे एक फ्लॅट १ कोटी रुपयाला विकला गेला, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सला एका कोपर्‍यात आलेली ही बातमी. म्हणाल तर खास नाही तर एकदम बकवास. जेव्हा आम्ही डहाणूकरवाडीत राहायचो, तेव्हा महावीर नगर इथे गर्द झाडीच जंगल होत. तिथे छोट्या मोकळ्या जागेवर आम्ही क्रिकेटसुद्धा खेळायचो. आता तिथली परिस्थिती पूर्णपणे बदललीय. उंच उंच टॉवर, प्रशस्त लिंक रोड, शॉपिंग कॉंप्लेक्स…आपल्या मुंबईच्या प्रगतीच हे स्वरूप नक्कीच छान आहे, पण मी स्वत: नक्कीच म्हणेन की परिस्थिती खूप वाईट होत जातेय दिवसेंदिवस 😦

सुरुवातीला, म्हणजे १०-१२ वर्षापुर्वी मरीन लाइन्स, चर्चगेट, दादर ही महागडी आणि सगळ्या सुविधा असलेली उपनगर् होती. पण..पण आता लोवर परेल, बांद्रा, सांताकृज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरीवली आणि विरारसुद्धा. हो, विरारसुद्धा त्यात समाविष्ट झालय. कांदिवली पश्चिम एक बीएचके फ्लॅट ४०-५० लाख, विरारला २०-५२ लाख. आजच्या तारखेला विरारला ६ ते ८ तास लोडशेडिंग असत. तुम्हाला बिल्डर घरा सोबत दोन जेनरेटर्स पण देतात..ते पण मोफत…मोफत.. मोफत… तरी तिथे जागेचा हा असा चढता भाव सुरू आहे.

साडेतीन वर्ष नोकरी केली, थोडा फार पैसा जमवून आता घर शोधायला बाहेर पडतो, तर माझ्या बजेट मध्ये विरारपर्यंत पण घर घेण शक्य नाही अस दिसतय.. पार हतबल झालोय जागेचे वाढते भाव बघून…लोकांचे ऑफीसला एकाच बाजूने जाणारे लोंढे बघून….खरच त्रास होतो. थोड लांब घर घ्यायच म्हटल तर प्रवासातच दोन-तीन तास जायचे… 😦 लांब घर घेण्यासाठी दिलेली काही आश्वासन् भारी असतात म्हणा उदाहरणार्थ… भविष्यात सरकारकडून इथे नवीन रेलवे स्टेशन बांधणार आहेत, लोड शेडिंग फक्त ४ च तास होईल, मेट्रो येणार, विमानतळ येणार, मॉल येणार, कमी ट्रॅफिक, मुबलक पाणी, हिरवागार निसर्ग, मोठ्ठे एक्सप्रेस रस्ते… हे सगळ माझ्या कांदिवलीत पण होत, १५ वर्षापूर्वी. तेव्हा वडिलांनी ७ लाखात आमच राहत घर घेतल होत. ज्याचा आता भाव आहे तब्बल ५०-५५ लाख.. त्यामुळे आता इथे घर घेण हे मला तरी अजिबात शक्य नाही… खरच 😦

सगळीकडे चाळी, जुन्या बिल्डिंग्स पाडून मोठ्ठे मोठ्ठे टॉवर बांधत सुटले आहेत सगळे. ह्यात मोठ्ठे बिल्डर तर सरकारकडून कुठले ही प्रॉजेक्ट मंजूर करून घेऊ शकते ह्याची अनेक उदाहरणे आहेत आपल्यापुढे. जेव्हा सिफीमध्ये होतो तेव्हा चारकोप (कांदिवली) जिथे मी राहतो, तिथे दोन नवीन सेक्टर्स (८-९) बांधणार अशी बातमी उडाली. त्यावेळी तिथे वन प्लस वन अश्या घरांची फाईल निव्वळ ७ लाखात मिळत होती. तेव्हा सुद्धा ही रक्कम खूप जास्त होती म्हणा माझ्यासाठी, तरी घरी बोलून बघितल होत. पण मग त्या प्रॉजेक्टवर न्यायालयाने आक्षेप घेतला आणि ते थांबल. सगळ्यांनी आपल्याजवळ असलेल्या जागेच्या फाइल्स भीतीपोटी परत विकल्या स्वस्तात (कशाला पैसे अडकवून ठेवा उगाच म्हणून). मग जादू झाली, ते प्रॉजेक्ट दिमाखात आणि एकदम युद्ध पातळीवर सुरू झाल. ज्यांनी जागा विकल्या नाहीत आणि ज्यांनी स्वस्तात मिळतेय जागा म्हणून दोन-तीन जागा घेऊन ठेवल्या. ती लोक आज करोडपती आहेत. ह्या विकासाला राज्यसरकारने मंजुरी दिली होती. कधी चारकोपला आलात तर सेक्टर ८ ला एक चक्कर मारा. ह्या सेक्टरमध्ये शेवटच्या बिल्डिंगच्या बाजूला गोराई खाडीच पात्र आहे. भले गाळ का असेना, पण भरती आली की काही प्रमाणात पाणी येत तिथे.

हे चारकोप, इमेजवर क्लिक केल्यावर तुम्हाला जी एकसंध लहान लहान घर दिसतील ती आता तोडून टॉवर्स बांधणार आहेत...एकदम डाव्याबाजूला कोपर्‍यात आहे ती गोराई खाडी...

आता अजुन एक मोठी गोष्ट इथे होतेय..कदाचित ह्याला अजुन तरी पुरावा नाही आहे, पण एका मोठ्या बिल्डरने इथल्या म्हाडा सोसायटी पाडून इथे टॉवर बांधून देतो अस वचन दिल. खूप आकर्षक स्कीम दिल्या. चारकोप परिसरात असलेल्या प्रत्येक उत्सवाला जोरदार मदत केली पैश्याने. आता त्याने परस्पर ती जागा तिसर्‍या बिल्डरला विकली आहे. खरच काय होईल ते माहीत नाही पुढे पण.. मेट्रोच एक मुख्य स्थानक म्हणून चारकोपचे वाढलेले भाव, बिल्डर लोकांची हाव आणि सामान्य माणसाच अस्तित्व इथून लवकरच संपणार अस दिसतय.

हे झाल एक उदाहरण, संपूर्ण मुंबईत हेच सुरू आहे. ग्रँट रोडचा रेड लाइट भाग, मुंबईतला भविष्यातला महाग असा भुखंड आहे. उत्तन जे गोराई गावाच्याच्या पलीकडे असलेला निर्जन डोंगरांचा भाग आयटी हब होणार म्हणून तयारी सुरू झाली आहे. (इथे गूगलच एक ऑफीस सुद्धा होणार आहे, माहीत नाही अफवा खरी आहे की नाही). पालघर, बोईसर इथे आजपर्यंत मुंबईच्या इतिहासात कधी बांधले गेले नाहीत एवढे मोठे गृहनिर्माण प्रॉजेक्ट्स सुरू आहेत. बोईसरला टाटाच्या प्रॉजेक्टमध्ये असलेले ९५० फ्लॅट्स १६-२२-२८ लाखाला विकले गेलेत आणि प्रॉजेक्ट पूर्णपणे सोल्ड आउट झालसुद्धा एका वर्षापूर्वी. पनवेलला विमानतळ नक्की येणार, हे जेव्हा लोकांना कळल तेव्हा, इथे जागेचा भाव अडीच हजारावरून पार ६ ते ७ हजारावर पोचलाय. म्हणजे आता सगळ्या सामान्य लोकांनी मुंबईच्या बाहेरच रहाव अस गृहीतच धरलय.

मला वाटायच, ह्या राहत्या घरच्या आजूबाजूला फारफार तर दोन-तीन स्टेशन मागे-पुढे घर घेईन. पण मुंबईत घर घेण, हे कर्मकठीण होऊन बसलय निदान माझ्यासारख्या सामान्य मुलाला तरी…

इथे मिळते तशी संधी दुसर्‍या शहरात मिळत नाही, पण आता ती शोधावी म्हणतो…
खरच इथे घर घेण्याची आशा सोडावीच म्हणतो 😦

— सुझे