मिड्ल फिंगर

आज २५ जानेवारी, आपल्या देशात आजचा दिवस हा “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. हे मला पण परवाच एका टीवी जाहिरातीमधून कळल होत. भारतीय निवडणूक आयोगाच्या सौजन्याने ह्या दिवसाला एक ब्रीदवाक्य सुद्धा मिळालय. “Proud to be a voter — Ready to vote”.

भारत, जगातली सगळ्यांत मोठ्ठी लोकशाही असलेला देश. जगात आजच्या घडीला कुठल्याही देशात इतके जास्त पक्ष झाले नाही. इतके नेते नसतील. आपल्या इथले बरेच राजकारणी लोक जगाच्या शक्तिशाली लोकांच्या यादीत आहेत. जे उत्तम नैत्रुत्व करू शकतात. जे देशाची ओळख बनतात. खरच, एखाद्या देशाला चालवण ही काय साधी गोष्ट नाही. ती लोक महान असावीच लागतात. त्या महान लोकांची निवड करण्याचा हक्क आपल्याला मतदान देत. त्यामुळेच मतदानाचा हक्क बजावणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण झाली की भारतीय घटनेनुसार आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. आपण मग आपल ते अमुल्य मत एका पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकून त्याला जिंकून देतो. मग तो आपल्या सत्तेच्या बळावर लोकोपयोगी कामे करतो, देशाला पुढे नेतो इत्यादी इत्यादी…ही लोकशाही. हो.. हे शाळेत असताना सगळ्यांना शिकवल होत.

पण माझा आता खरच विश्वास उडत जातोय ह्या सगळ्या सिस्टमवरुन. आपण निवडून देतो तो नेता हा आपल्यासाठी नाही तर त्या पक्षासाठी जास्त काम करतोय. सध्या आपला देश सद्ध्या कॉंग्रेस नावाची एक ब्रॅण्डेड कंपनी चालवतेय आणि ह्यांचे नेते भस्म्या झाल्यासारखे नुसते पैसे जमवतायत.

आपला क्रमांक एकच शत्रू कोण? दहशतवाद? पाकिस्तान? चीन? वाटत नाही मला अस. ह्या दहशतवादी लोकांच बरय काय ते एकदाच नुकसान करून मोकळे होतात. पण हे भ्रष्टाचारी राजकारणी लोक आपले नंबर १ शत्रू आहेत. ह्या दहशतवादी लोकांपेक्षा आपल्यातीलच काही लोक आपल्या देशाचे एक नंबरचे शत्रू ठरले आहेत. किती तरी पटीने आपलीच लोक पैश्याच्या लोभापायी आपल्याच देशाला लुटत आहेत, देशाला विकत आहेत, देशाशी गद्दारी करत आहेत आणि आपल्याच देशाची अब्रू सगळ्या जगासमोर उधळत आहेत. तेही राजरोस सर्रास. दुर्दैवाने आपल्याला सगळा माहीत आहे, पण आपण सगळे इतके कोडगे झालो आहोत ह्याचच जास्त वाईट वाटत. 😦

गेली सहा महिने आपण काही मोठ्या घोटाळ्यांबद्दल ऐकून आहोत. काय परत परत तेच बोलायच. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आदर्श घोटाळ्याच्या कैवारी बनवून राजीनामा द्यावा लागला आणि त्यात अनेक महारथी लोकांचे बिंग उघडे पडले. सारवासारव करताना कॉंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटत होता. आधीच त्यांच्या मागे कलमाडी प्रकरणाची चौकशी होतीच, मग काय त्यांना पदावरून काढून नवीन नेत्याची नियुक्ती केली आणि एक चौकशी आयोग नेमुन सामान्य जनतेच्या तोंडाला पान पुसली कारवाईच नाटक करून. आदर्शचा बिल्डर गणितात खूपच कच्चा असावा ७ मजल्याच्या जागी २१ मजले आणि त्यातले ६० टक्के फ्लॅट्स महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या सदस्यांना किवा त्यांच्या नातेवाईकांना. वाह..ह्याला म्हणतात सेट्टिंग !! मुळात कारगिलच्या शहीद सैनिकांना मुंबईत फ्लॅट देण आणि त्यासाठी परवानगी मिळवणे हीच मोठी आश्चर्याची बाब.

कॉंमनवेल्थमध्ये ७० हजार करोड भारतीय सरकारने मंजूर करून पण कलमाडी यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून भारताचे स्टॅंडर्डस वेगळे असल्याचे जगाला दाखवले. सार्‍या जागतिक मीडीया ने भारताची छी थू केली. खूप देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार पण टाकला. चौकशी अंती कळला की, ह्यात पण घोटाळा आहे आणि त्यात मोठे दिल्लीवाले मंत्री गुंतले आहेत. त्यातच आता बाहेर आला घोटाळा २ जी स्पेक्ट्रमचा. भारतीय इतिहासातील सगळ्यात मोठ्ठा घोटाळा. १२० हजार करोड..किती शून्य असतील ह्याच्या मागे हे त्या घोटाळा करणार्‍या राजाला माहीत सुद्धा नसाव. मला आधी वाटायाच बोफोर्स हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे पण तो तर फक्त (?) ६४ कोटी रुपयाचा होता. पण ह्यांनी मला खोट पाडल. 😦

मिड्ल फिंगर

पैसा..पैसा..पैसा.. ही अशी भूक लागली आहे ह्या लोकांना की आपल्याच लोकांकडून पैसे लुबाडून आपल्यातलेच असल्याचा दावा करतात आणि आपल्यावर राज्य करतात. स्विस बँकेत अकाउंट लिमिट संपेपर्यंत पैसे भरतात, आपल्याकडून चोरून. हे सगळे घोटाळे उघड होऊन सुद्धा आपली कुबडी न्यायव्यवस्था त्यांची बाहेर निघण्याची बरोबर व्यवस्था करतेय. देशात कायदा आणि सुव्यवस्था ही फक्त दहशतवादी हल्ले, खून, दरोडे, दंगली, बलात्कार याच गोष्टींसाठी. त्याचे निकाल लागता लागता एक पिढी स्वर्गात गेली असते. मग हे घोटाळे किस झाड की पत्ति? कोणाला कशाचीच भीती नाही. सगळे बुडाखाली पैसे दाबून घरी मस्त झोपले आहेत. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष तू तुझे घोटाळे कर, आमचे घोटाळे उघडे पाडू नकोस अशी आर्जवा करीत आहे.

मग ह्यांना जाब विचारणारा उरल कोण. समजा कोणी सामान्य माणसाने तक्रार करायची ठरवली तर न्यायव्यवस्था आपली इतकी उच्च आहे की काही बोलायलाच नको. इंग्रज गेले, आता हे आपल्यावर राज्य करत आहेत. आपल्यावर वर वर असे जुलुम होत नाहीत त्या काळासारखे, पण जे होत आहेत ते आपल्याच लोकशाहीला आतून पोखरत जात आहेत. पोखरणारे उंदीर पण आपलेच. म्हणूनच लोकशाही या शब्दाबद्दल खूप चीड निर्माण झालीय मनात. जो तो पैशाची पोती भरण्यात व्यग्र..

आता हल्ली महाराष्ट्रात झालेल कांदे भाववाढ प्रकरण आठवा. हे मुद्दाम आणि एकदम विचारपूर्वक केलेल प्लॅनिंग वाटल. लोकांना दाखवायला की आम्ही ९०-१०० रुपये या दराने विक्री सुरू असलेला कांदा ३०-४० रुपयावर आणला. जसे सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधी केलेले स्टॅंटस केले जातात त्यात आणि ह्यात काय फरक आहे. गुजरात, बिहार अश्या राष्ट्रांतून असे प्रकार होताना दिसतात का? नाही…तिथे मतदान पण ७०-७५ टक्के होत. का..? कारण त्यांना नरेंद्र मोदी आणि नितिश कुमार ह्यांना पडू द्यायच नसत. पण आपल्या इथे समोरचा कितीही चांगला नेता असो, आपल्या पक्षांचा नाही ना..तर त्याला पाडायला आपला उमेदवार उभा रहायलाच हवा. गोरगरिबांची मत एका दारूच्या बॉट्टलवर बदलवता येतात. जो सॉफॉस्टिकेटेड मतदार असतो तो फक्त महागाई वाढतेय, तसा माझा पगार पण वाढला पाहिजे ह्याच मनस्थितीत. राबतोय, मरतोय..पण आपल्या पोटापुरता विचार करतोय. काय चुकल त्याच?

काही दिवसांनी कुठला घोटाळा?? विसरून जातो आपण. मग परत काही घोटाळा होईल..मस्त तीन-चार दिवस चर्चा चालेल…नावापुरत त्या पदावरून त्याची हकालपट्टी, शिक्षा नाहीच.. आरामात आपल्या घरी बसून कमवलेले पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार करण्यात मग्न. निवडणुका होतील…तोच परत निवडून येणार. नवीन आश्वासन देणार. आपण टाळ्या वाजवणार..मग तो परत आपलीच मारणार 😦

आपण आपल मत ह्यांना देतो आणि हे आपल्याला मिड्ल फिंगर दाखवून आपली वेड्यात तर गणती करत आहेत. माझ्या मनात आता विचार येतो, मी आता मतदान का करू? कोणी सांगू शकेल? सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान..हे कोणी तरी किती विचारपूर्वक लिहल असेल नाही??? मी मतदान केल्याने काही फरक पडेल?

– सुझे

१४ जान्युअरी १७६१

प्रत्येक वर्षी १४ जानेवारी, मकरसंक्रांतीला जेव्हा मी सगळ्यांना शुभेच्छापर संदेश पाठवायचो, तेव्हा मला अभिजीतकडून लगेच एक ईमेल यायचा, लालभडक अक्षरात लिहलेला तो ईमेल म्हणजे पानिपताच्या संग्रामाची माहिती देणारा आणि सण कसले साजरे करता याचा जाब विचारणारा. तो ईमेल आजही इनबॉक्समध्ये पडून आहे. विचार करायचो. कारण, छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये जो मराठ्यांचा सुवर्णकाळ होता, तो पानिपतच्या लढाईमुळे पूर्णपणे दुर्लक्षित झाला.

नुकतच साठ्ये महाविद्यालयात, जनसेवा समिती विलेपार्लेतर्फे एक अभ्यासवर्ग “पानिपताचा महासंग्राम”आयोजित केला होता. निनादराव बेडेकर, पांडुरंगराव बलकवडे आणि लष्करातील निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे ह्यांनी आपले विचार ह्या अभ्यासवर्गात मांडले होते. अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली गेली. त्याच धर्तीवर त्यांचे काही विचार इथे मांडतोय.

आज म्हणजे, १४ जान्युअरी २०११ ला या युद्धाला २५० वर्ष पूर्ण झाली. भारताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड म्हणून पानिपताच्या लढाईकडे बघितल जात. पण आपण त्या घटनेला पार दुर्लक्षित केल आहे. जनमानसावरही या घटनेचा इतका प्रभाव होता की, त्या धरतीवर अनेक वाक्यप्रचार मराठी बोली भाषेत रूढ झाले. उदा. १७६० भानगडी, पानिपत होणे, विश्वासराव मेला पानिपतात, अटकेपार झेंडे लावणे. बोली भाषा ही खर्‍या अर्थाने संस्कृतीच प्रतिनिधित्व करत असते अस मानल्यास पानिपतचे समर समाज मनात किती खोलवर भिनले आहे याची प्रचीती येते.

सन १७५२ च्या करारा अन्वये बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी मुघल सल्तनतला अंतर्गत आणि बहिर्गत आक्रमणापासून संरक्षण करावे असे ठरले होते. ह्यात मुख्यत्वे अब्दालीचे परकीय आक्रमण होते आणि त्या बदल्यात त्यांना म्हणजेच मराठ्यांना उत्तरेकडील सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याचे हक्क मिळाले. त्यात नजीबखान रोहील्याने (हा अब्दालीचा हिंदूस्थानातील पाठीराखा.) अब्दालीला मुसलमान धर्माचे रक्षण करण्याच्या नावाखाली चिथवले. मराठ्यांचे नियंत्रण कायमचे उखडून टाकायला पटवून दिले आणि अब्दालीने १० जान्युअरी १७६० ला यमुना चार ठिकाणाहून ओलांडून मराठ्यांच्या बयाजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे यांचा पाडाव करून दुआबातमध्ये तळ ठोकला आणि हीच पानिपताची नांदी होती. मराठ्यांनी दत्ताजीच्या वधाचा बदला आणि हिंदूस्थानाचे अब्दाली-नजीबाच्या आक्रमणापासून कायमचा बंदोबस्त करायचे ठरवले.

ह्यावेळी चुकुनही त्यांच्या मनात आल नाही की आपण एका धर्माविरुद्ध लढतोय. आपण लढतोय ते आपल्या हिंदूस्थानासाठी. पूर्ण देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यानी आपल्या खांद्यावर घेतली होती. ह्यातूनच आपल्याला कळते की मराठे किती बलशाली होते. त्यांची जरब होती दिल्ली आणि संपूर्ण भारतावर. त्यामुळेच महाराष्ट्र सोडून ते अब्दालीचा बंदोबस्त करायला अटकेपार निघाले. त्यातच मराठ्यांनी केलेल्या कुंजपुर्‍यातील दारुण पराभवाचे वर्तमान ऐकून अब्दाली अतिशय संतप्त झाला. मोठ्या त्वेषाने बागपतजवळ गौरीपुराला यमुनापार करून २८ ऑक्टोबर रोजी मराठ्यांशी अंतिम युद्ध लढण्यासाठी पानिपतजवळ नूरपूर गावी तळ देऊन राहिला. भाऊंना हे वर्तमान समजल्याबरोबर त्यांनी अब्दालीसमोर दोन कोसावर पानिपतास मराठी सैन्याचा तळ दिला.

अशा रीतीने सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर एका महायुद्धाचे प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे ठाकले. १३ जानेवारीला रात्री भाऊंनी ठरवले की उद्या युद्ध करायचे व दिल्लीची वाट धरायची आणि १४ जानेवारीस पहाटे खंदक ओलांडून सर्व मराठा सैन्य बुणगे व बायकांसकट छावणीतून बाहेर पडले व यमुनेच्या रोखाने युद्धास सज्ज झाले.

तुंबळ युद्ध झाले. दोन्हीकडे सैन्य जवळजवळ सारखेच. मराठे खूप त्वेषाने लढले. अखेरच्या काही तासात ह्या युद्धाला कलाटणी मिळाली. विश्वासराव गोळी लागून पडले. सैन्यात एकच गडबड उडाली. सगळे सैरावैरा पळू लागले. त्याचाच फायदा घेत अब्दालीने आपले राखीव सैन्य मराठ्यांच्या दिशेला सोडल. पानिपतच्या रणांगणावर सव्वा लाख बांगडी फुटली. खूप इतिहासकारांनी सदाशिवरावांनाच ह्या पराभावला कारणीभूत ठरवल, त्यांच कमकुवत नैत्रुत्व, फसलेली युद्धाची आखणी असे अनेक आरोप केले गेले त्यांच्यावर. भाऊ शूरवीर होते, पण त्यांच्यासमोर असलेला अब्दाली हा एक उत्तम अनुभवी सेनापती होता. तिथेच भाऊ थोडे कमी पडले. सगळे युद्धभुमी सोडून पळून जात असताना ते युद्धभूमीवर उतरून तलवारीचे सपासप वार करत शत्रूला मर्द मराठ्याच दर्शन घडवत होते. शेवटी ते पडले आणि मराठे हरले 😦

भाऊसाहेब योद्धा थोर अंगामधी जोर, पुरा धैर्याचा, विश्वासरावही तसाच शौर्याचा ||
दोहो बाजूस भाला दाट पलिटेना वाट, अशा पर्याचा, किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ||
दृष्टांत किति कवि भरील,काय स्तव करील ऐश्वर्याचा,शेवटी बिघडला बेत सकळ कार्याचा ||

– कवी प्रभाकर

 

काला आम - पानिपत युद्धाचे स्मारक

हे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमण त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले. या बाबतीत त्यांना उपमा फक्त फिनिक्स पक्ष्याचीच शोभेल. मराठे नुसते उठले असे नसून त्यांनी उत्तर हिंदुस्थानात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मोगल सत्ता हातात घेऊन तिचे नियंत्रण करण्याचा अपुरा राहिलेला मराठ्यांचा मनसुबा महादजी शिंद्यांनी तडीस नेला. दिल्लीत लाल महालावर तब्बल १५ वर्ष (१७८८ ते १८०३) भगवा दिमाखात फडकत होता.

१४ जान्युअरी  १७६१ साली पानिपत येथे मराठे भारतीय राजकीय ऐक्यासाठी, भारत हा येथील लोकांचा परकीयांना येथे स्थान नाही, या उदात्त भूमिकेसाठी लढले. त्यांचा पराजय होऊनही त्यांच्या ध्येयाचा विजय झाला.

|| त्या पानिपतच्या रणसंग्रामातील वीर मराठा योद्ध्यांना मानवंदना ||

 

संदर्भ:
पानिपताचा महासंग्राम अभ्यासवर्ग (निनादराव बेडेकर आणि पांडुरंगराव बलकवडे यांच भाषण)
पानिपतचा रणसंग्राम मराठे विरुद्ध अफगाण १४ जान्युअरी १७६१ – निनादराव बेडेकर (लेखक)
साप्ताहिक विवेक – http://www.evivek.com/index.html

— सुझे

ट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली

३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल 😦 मग विचार केला निदान पहिला वीकेंड तरी एखाद्या किल्ल्यावर जाव. शांत थोडावेळ निवांत कुठल्यातरी गडाच्या तटबंदीवर, उंच टेकडीवर बसाव आणि डोळे बंद कराव आणि मोठा श्वास घ्यावा. मग ठरवल की ३१ च्या रात्री करायचा ट्रेक रविवारी २ जानेवारीला करायचा. गड ठरलाच होता माहुली (आसनगाव)

किल्ले माहुली, मुंबई-नाशिक हाय वे जवळ आहे. मुंबईहून इथे लोकल ट्रेनने येता येतं किवा हाय वे वरुन. ट्रेनने सेंट्रल रेलवेच्या आसनगाव स्टेशनला उतरून एसटीने किवा रिक्षाने माहुली गावापर्यंत पोहचता येत. ते अंतर अंदाजे ६ किमी आहे. गावात असलेल्या गीताभारती मंदिराच्या मागून किल्ल्याकडे जाण्याची पायवाट आहे. सगळीकडे मार्किंग्स असल्यामुळे रस्ता शोधायला कष्ट घ्यावे लागत नाहीत. मंदिराच्या इथूनच किवा ट्रेनमधूनच तुम्हाला प्रसिद्ध नवरा, नवरी आणि भटोबा सुळके दिसतील.

नवरा, नवरी आणि भटोबा सुळके (भंडारगड)
हाच तो प्रसिद्ध धबधबा..मी इथे २००८ मध्ये गेलो होतो

ह्याच किल्ल्यावरुन येणारा एक प्रसिद्ध धबधबा आहे. जिथे वॉटर रॅपल्लिंग केल जात. मी १० ऑगस्ट २००८ ला तिथे गेलो होतो, पण किल्ल्यावर गेलो नव्हतो. त्यामुळे आज किल्ल्यावर जाण्याचा योग आला, हि अपार समाधानाची गोष्ट होती.. रोहन आणि अनिशने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित गर्दी होती. खूप जण आम्हाला वाटेत भेटलेसुद्धा. त्यात दुकल्यांची म्हणजेच मराठीत आपण कपल, जोड्या वगैरे म्हणतो ती होती. (मायला कसली हौस ती प्रेमाची, रस्ताभर चाळे करत जातात नालायक) x-(

भंडारगड, माहुली आणि पळसगड…

शेवटचा टप्पा…

असो, बघायला गेलं तर हा गड फार नशीबवान आहे. साक्षात महाराजांनी लहानपणी इथे काही दिवसांसाठी वास्तव्य केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला. इतिहासात ह्या किल्ल्याची अजून एक नोंद सापडते ती पुरंदरच्या तहात. ह्या तहामध्ये महाराजांना २३ किल्ले मोघलांना द्यावे लागले होते. तहानंतर अवघ्या अडीच वर्षात महाराजांनी हे २३ किल्ले जिंकलेच, त्यात भर म्हणून अजून २०० हून जास्त किल्ले स्वराज्यात सामावून घेतले.

गड चढायला सोप्पा आहे पण ते चढून जाण्याचा अंतर खूप जास्त होत. गेले ३ महिने ट्रेक बंद असल्यामुळे खूप दमछाक होत होती. लाल माती आणि त्यावर असलेले ते गुळगुळीत गोटे आम्हाला खूप वेळा पाडण्याचे प्रयत्‍न करीत होते. शेवटी वाटेत थांबत थांबत वर पोचलो. शेवटची शीडी चढून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचणार याचा खूप आनंद झाला. तिथेच बाजूला असलेल्या एका मोठ्या दगडावर मांडी घालून बसलो, डोळे मिटले आणि उघडून त्या दरीत डोकावलो आणि आपण केलेल्या परिश्रामाचे चीज झाले असा म्हणून मनोमन सुखावलो 🙂 सगळा थकवा नाहीसा झाला. एक वेगळाच उत्साह अंगी संचारला. तिथे दोन तीन ग्रूप्स आधीच आले होते. त्यांनी आम्हाला महादरवाज्याकडे कसे जायचं वगैरे सांगितले.

कमान महादरवाज्याची.. इथे अजुन फोटो काढू शकलो नाही 😦

पाण्याच टाक..एकदम स्वच्छ आणि थंड पाणी 🙂

थोड अंतर चालताच डाव्या बाजूला पाण्याच एक टाकं आहे, पण ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही. आम्ही त्या गार गार पाण्यात हात पाय धुवून मस्त फ्रेश झालो. गडावर झाडी खूपच वाढली आहे आणि त्यात पायवाट चुकण्याची खूपच शक्यता होती. मग आम्ही महादरवाज्याकडे निघलो. तिथे उर्दू शिलालेख आणि शिवलिंग बघितले. इथे जे पाण्याचे टाके आहे, त्यात एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी असत. “पण तिथुनच बाजूला असलेल्या महादरवाजा आणि देवड्या यात प्रचंड घाणीच साम्राज्य होत. पिशव्या, उरलेल जेवण, हाड्, थर्मकोलच्या प्लेट्स… रोहन बोलला त्याप्रमाणे हा पिकनिक स्पॉट आहे याची खात्री पटली.” 😦

पाटलाचं केळवण
खा रे खा 🙂
थ्री ट्रेकर्स 🙂

मग आम्ही थोड खाउन घ्यायचं ठरवलं. सगळ्यांत स्पेशल डब्बा होता “ज्यो”चा, मस्त गाजराचा हलवा. मग आम्ही तो डबा एक एक घास करत खाउ लागलो. नो डाउट मी आणि दीपक ने जास्त ताव मारला त्यावर, कारण तो खरच खूप छान झाला होता. मग तिथून आम्ही निघालो भंडारगडाकडे. मध्ये एक जुनाट मंदिर/वाडा बघितला, त्यात मध्यभागी एखादी मूर्ती असावी पण सगळी पडझड झाली होती. समोरच एक छोट तळ आहे तिथून पुढे दहा मिनिटे पुढे चालत गेलो की भंडारगड सुरू होतो एक दरी ओलांडून पुढे गेलो की पुढे नवरा, नवरी आणि कल्याण दरवाजा, पण तिथे आम्ही जाउ शकलो नाही कारण आमच्याकडे रोप नव्हता. 😦 नवरा, नवरीला दुरुनच शुभेच्छा देत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

गड चढायला तीन साडे तीन तास लागले, पण आम्ही एक तास ४५ मिनिटात उतरून खाली आलो. मस्त हॅण्डपंपवर हात पाय धुवून गरमागरम पोहे आणि चहा मारला 🙂 आणि मग घरी पोचलो रात्री १० ला.

२०११ मधला हा पहिला ट्रेक. आशा करतो की असे नवनवीन किल्ले ह्या वर्षात फिरता येतील. 🙂

एक विनंती:

महाराजांच्या कारकिर्दीची साक्ष देणारे हे किल्ले, आपला इतिहास त्या अभेद्य तटबंदीतून ताठ मानेने सांगतात, भरभरून बोलतात. फक्त तो इतिहास ऐकायची इच्छाशक्ति हवी. पिकनिक करायला रेसॉर्टस, हॉटेल्स पडली आहेत. तिथे हवा तो धुमाकूळ घाला, पण किल्ल्यावर नको. अश्या किल्ल्याचं पावित्र्य जपणं आपलं कर्तव्य आहे. कसं वाटत असेल महाराजांना, आपल्या किल्ल्याची अशी दुरवस्था पाहताना? ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे लढले, आपल्या जिवाच रान केललं. तिथे आपण साधी स्वच्छता सुद्धा राखु शकत नाही. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. असं नका करू, विनंती करतो. नाही तर पुढल्यावेळी असे चाळे करणाऱ्यांना, आमचे चाळे सहन करावे लागतील.

— सुझे 🙂